Home Blog Page 65

१५० कोटी निष्क्रिय खाती हटीवण्याचा एलॉन मस्कचा ट्विटर बाबतीत महत्वपूर्ण निर्णय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जगभरात प्रसिद्ध असलेली मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर हल्ली चांगलीच चर्चेत येत आहे, बहुधा वापरकर्त्यांचे ट्विट व्हायरल होत असते मात्र सध्या ट्विटरच्या नवीन मालकामुळे ट्विटर चर्चेत राहत आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यापासून अनेक बदल या समाज माध्यमाबाबतीत घेण्यात आले आहे. ट्विटरच्या संबंधी चर्चेच्या विषयांपैकी कर्मचारी कपातीचा निर्णय, ब्लू टिक प्रीमियम सबस्क्रिबशन प्लॅन इत्यादींचा यामध्ये समावेश राहिला आहे. आता नव्याने घेण्यात येत असलेल्या निर्णयानुसार ट्विटर जवळपास १५० कोटी निष्क्रिय खाती हटविणार असल्याची माहिती आहे.

एलॉन मस्क यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरवर जवळपास १५० कोटी अशी निष्क्रिय खाती आहेत जी एकदा लॉग इन केल्यावर परत वापरण्यात आली नाही अथवा बहुतेक वापरकर्ते पासवर्ड विसरल्याने त्यांनी परत लॉग इन करण्याचा प्रयत्न केला नाही. या सर्वांचा एकंदरीत परिणाम बघता ही सर्व खाती निष्क्रिय अवस्थेत आहेत. यामुळे ट्विटर वर नाहक तसेच निष्क्रिय अकाउंटची गर्दी झाली आहे. अशा सर्व अकाउंटला हटविण्याची कारवाई केल्या जाणार आहे, यामुळे ट्विटरवर नवीन जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ट्विटरवर असलेल्या निष्क्रिय खात्याची माहिती देणारे एक अद्ययावत तसेच अचूक परिणाम देणारे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून याद्वारे निष्क्रिय, तसेच वापरातून बाद असलेली खाती संपूर्णपणे ट्विटरवरून हटविण्यात येणार आहे, ज्यांची संख्या १५० कोटीच्या घरात आहे. बोगस ट्विटर अकाउंटच्या विरुद्ध एलॉन मस्क यांची सुरुवातीपासूनच कठोर भूमिका राहिली आहे. त्यामुळे या नवीन निर्णयामुळे ज्या वापरकर्त्यांची खाती सुमारे एक वर्षांहून अधिक कालावधीपासून लॉग इन करण्यात आली नाही ती सर्व डिलीट केल्या जाणार आहे. हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह राहणार असून, यामुळे बोगस तसेच नाहक तयार करून ठेवलेल्या खात्यांचे ट्विटरवरील अस्तित्व संपुष्टात येणार आहे.

 

संजय राऊतांना जीवे ठार मारण्याच्या धमकीमुळे खळबळ; सीमावाद प्रकरणाचे कनेक्शन असल्याचा संशय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नेहमी कुठल्या ना कुठल्या प्रकरणाने चर्चेत असतात. नुकतीच काही दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटका झालेल्या संजय राऊतांची राजकारणातील सक्रियता पुन्हा पूर्वीप्रमाणे वाढली आहे, यावेळी कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रकरणी देखील राऊतांनी काही विधाने केली होती. राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती, देसाईंच्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊतांना फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राजकीय वातावरणात एकच खळबळ निर्माण झाली आहे.

सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला असून कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राच्या वाहनांवर यापूर्वी दगडफेकीचे प्रकार घडले होते. कर्नाटक मधील कन्नड वेदिका संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक असून, संजय राऊतांना काल दोनदा फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला. दरम्यान शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेद्वारे संजय राऊतांना सज्जड दम देत म्हटले होते की, “आत्ताच जेलमधून सुटला आहात, पुन्हा जेल मध्ये जावं लागेल” त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शंभूराज देसाई यांच्या या विधानानंतर संजय राऊतांना फोन आल्याने देखील संशय अधिक वाढत चालला आहे.

राऊतांना धमकीचा फोन आल्याने कन्नड वेदिका संघटनेवर संशय व्यक्त करण्यात येत असून, सध्या याबतीत नेमका कुणाचा संबंध आहे हे निश्चित नाही. मात्र, येत्या काळात यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणि सीमावाद प्रकरण पुन्हा पेटण्याची दाट शक्यता आहे. संजय राऊत मागील काही दिवसांपासून सतत शिंदे-फडणवीस सरकारवर सीमावाद प्रकरण योग्यरीत्या हाताळल्या न गेल्याच्या टीका करत आहे, त्यामुळे त्यांना शांत राहण्याचा सल्ला शंभूराज देसाई यांनी दिला आहे. मात्र या दोन नेत्यांमध्ये वाद विकोपाला जाण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.

 

सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री आणि महाविकास आघाडी नेत्यांदरम्यान बैठक; सामोपचाराने तोडगा निघण्याची शक्यता..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान सीमाप्रकरणी पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली असून कर्नाटकमधील काही संघटना या विषयाला हिंसक वळण देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. हे प्रकरण न्यायालयात असताना याआधी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक, महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांवर चढत निदर्शने करणे इत्यादी प्रकार सुरु आहेत. हा प्रकार एवढ्यावरच न थांबता कन्नड वेदिका रक्षण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा देखील दहन केल्याने आता सर्व सीमा उल्लंघन करण्याचे कार्य कर्नाटक कडून झाले आहे, नेमक्या या वादावर तोडगा निघावा म्हणून महाविकास आघाडीचे नेते पुढाकार घेताना दिसून येत आहे. सीमावाद प्रकरणी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, राजन विचारे तसेच अरविंद सावंत यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे भेट घेतली.

यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि महाविकास आघाडी नेत्यांमध्ये बैठकीच्या वेळी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचे महाराष्ट्रविरोधात प्रक्षोभक वक्तव्य, राज्यात सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून करण्यात येणारी वादग्रस्त विधाने, शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्रात केली जात असलेली उलटसुलट विधाने इत्यादी विषय केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली. खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना विश्वास व्यक्त केला की, केंद्रीय गृहमंत्र्यांनी या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी आश्वस्त केले आहे, त्यामुळे नक्की काहीतरी मार्ग ते काढतील.

सध्या गुजरातमध्ये नव्याने भाजपने विजय प्राप्त केला असल्याने या राज्यातील शपथविधी आटोपल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरण सोडविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकार याप्रकरणी जातीने लक्ष देत प्रकरण सोडवणार व कुठल्याही प्रकारचा पक्षपात केला जाणार नाही, असा आम्हाला विश्वास असल्याचे मत यावेळी सुप्रिया सुळे यांनी मांडले. एकंदरीतच महाराष्ट्रातील विरोधी पक्ष सीमावाद प्रकरणी सक्रिय झाल्याने, राज्य सरकारची याप्रकरणी भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे कारण वेळीच हे प्रकरण नियंत्रणात आणले गेले नाही तर चिघळले जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही असंही त्या बोलल्या.

 

समृद्धी महामार्ग लोकार्पण कार्यक्रमावरून प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानांवर शरसंधान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्राच्या दूरगामी विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या समृद्दी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील कार्य जवळपास पूर्णत्वास गेले आहे, लवकरच हा मार्ग जनतेच्या सेवेत खुला करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामार्गाचे लोकार्पण केले आहे. नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा बघता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळ्याला निमित्त ठेवून पंतप्रधानांवर टीकेची तोफ डागली आहे. मराठवाडा साहित्य संमेलनाला उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती, यावेळी बोलताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मुद्दा उपस्थित करताना उद्धव ठाकरेंनी काही प्रश्न नरेंद्र मोदी यांना विचारले आहेत.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांनी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र प्रकरणी महाराष्ट्राला काय दिलासा देणार आहे, याबाबतीत अगोदर स्पष्टीकरण द्यावे, नंतरच शिवसेनाप्रमुखांच्या नावाच्या महामार्गाचे लोकार्पण करावे. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जी अरेरावी सीमावादावर लावली आहे, त्यावर पंतप्रधानांनी सणकून बोलले पाहिजे. सध्या महाराष्ट्र, पंतप्रधानांच्या भूमिकेची या प्रश्नी वाट बघत आहे, असे देखील ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राच्या विकासाच्या दिशेने समृद्धी महामार्ग हा सुरु झालाच पाहिजे, राज्याच्या राजधानी आणि उपराजधानीला जोडणाऱ्या महामार्गाचे कार्य आमच्या शासनकाळात अधिक झाले, असे देखील नमूद करायला यावेळी उद्धव ठाकरे विसरले नाही. एकीकडे राज्यातील मोठ्या महामार्गाचे लोकार्पण करायचे आणि दुसरीकडे कर्नाटकाने महाराष्ट्राचा मार्ग बंद करण्याचे कार्य सुरु केले आहे, त्यामुळे या प्रश्नावर पंतप्रधानांनी आपले मत ठेवणे आवश्यक असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

सीमावाद प्रकरणी खुद्द शिवसेनाप्रमुख तीन महिने कारावास भोगून आले होते, त्यामुळे त्यांच्या नावाच्या महामार्गाचे लोकार्पण होताना सीमाप्रश्नी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट होणे गरजेचे असल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले. एकदंरीतच उद्धव ठाकरेंनी उदयाला होणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यावरून केंद्र सरकारला घेरण्याचे संपूर्ण प्रयत्न केल्याचे त्यांच्या या विधानातून दिसून आले.

 

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी १३ महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या अनिल देशमुखांना जामीन मंजूर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे कथित १०० कोटी वसुली प्रकरणी मागील १३ महिन्यांपासून तुरुंगात होते. गेल्या अनेक दिवसांपासून याप्रकरणी जामीन मिळावा म्हणून अनिल देशमुख प्रयत्न करत होते, मात्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल राखून ठेवल्याने देशमुखांच्या जामिनावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले होते. नुकत्याच पुढे आलेल्या माहितीनुसार अनिल देशमुख यांना काही अटीशर्तींसह १ लाख रुपये इतक्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात अनिल देशमुख यांनी जबरदस्तीने १०० कोटी इतकी वसुली करण्याचे आदेश पोलीसांना दिल्याचे प्रकरण प्रकाशझोतात आले होते. याप्रकरणी ‘ईडी’ व ‘सीबीआय’ने खंडणी व आर्थिक गैरव्यवहार असे गंभीर आरोप अनिल देशमुखांवर ठेवले होते. हे सर्व आरोप राजकीय आकसापोटी होत असल्याचे मत अनिल देशमुखांनी व्यक्त केले होते, त्यामुळे १३ महिन्यांपासून याप्रकरणी तपासणी व सुनावणीचे सत्र सुरु होते. दरम्यानच्या काळात अनिल देशमुखांचे प्रकृतिस्वास्थ देखील खालावले होते.

अखेर न्यायालयाने अनिल देशमुखांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे. वाढते वय, आजार इत्यादी कारणे अनिल देशमुखांनी जामीन अर्जात नमूद केले होते, या सर्व बाबींचा विचार करत न्यायालयाने अनिल देशमुखांना जामीन मंजूर केला आहे. देशमुखांना जामीन मंजूर होताच त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून आले.