Home Blog Page 71

साई शेलारचा विजयी षटकार हुकला व सीमेवर झेलबाद; राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत खोणी संघाचा खंबाळपाडा संघावर रोमहर्षक विजय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात क्षणोक्षणी उत्कंठा वाढविणारा, अटीतटीचा सामना बरोबरीत सुटल्यानंतर, सुपर ओवर मध्ये विजयी षटकार हा चौकार ठरल्याने, सीमेवर साई शेलार झेलबाद झाला आणि खोणीच्या श्री गणेश संघाने स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती चषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय मिळविला. विजेते आणि उपविजेता संघास सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण, आमदार राजू पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर गंगाराम शेलार उर्फ नाना, भाजपचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, किरण ठोंबरे, महेश गायकवाड, शिल्पा शेलार, सिध्दार्थ शेलार, मनोज घरत, दिलीप भंडारी, राजू शेख, युवा आघाडीचे मितेश पेणकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

गेल्या २९ नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या स्वर्गीय ‘शिवाजी दादा शेलार स्मृती चषक २०२२’ अंतर्गत डोंबिवलीतील ह.भ.प.सावळाराम महाराज क्रिडासंकुलात मर्यादित षटकांचे टेनिस क्रिकेट सामने खंबाळपाडा येथील ‘एसएससीसी संघ’ आणि साई शिवाजी शेलार यांनी आयोजित केले होते. ४८ संघ या सामन्यात सहभागी झाले होते. रविविरी ४ नोव्हेंबर रोजी झालेला सामना डोळ्यांचे पारणे फेडणारा अटीतटीचा अंतिम सामना बरोबरीत सुटल्यानंतर मिळालेल्या ‘सुपर ओवर’ मध्ये फलंदाज साई शेलारचा विजयी षटकार सीमेच्या आतच पडण्यापूर्वी साई शेलार झेलबाद झाला. त्यामुळे खोणीचा श्रीगणेश संघ विजयी झाला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला दोन लाख रोख व चषक , तर उपविजेता संघास एक लाख रोख आणि चषक देण्यात आले.

सामन्याच्या पारितोषिक वितरण समयी नामदार रवींद्र चव्हाण म्हणाले की व्यसन आणि तणावपूर्ण घटनांपासून मुक्ती मिळावायची असेल तर आपण खेळांना प्राधान्य देत आपलेसे करत खिलाडूवृत्ती बाळगली पाहिजे. तर आमदार राजू पाटील यांनी खो-खो, कबड्डी आणि इतर खेळांप्रमाणे टेनिस क्रिकेट खेळाला शासनाकडून व्यावसायिक दर्जा मिळत नसून, या खेळातील तरुण नाहक वाया जात आहेत व अशा टिकेचे धनी होत असल्याची खंत व्यक्त केली.

या सामन्यांतील उत्कृष्ट खेळाडू

अंतिम सामनावीर – किरण म्हात्रे
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – स्वयंम खाडे, दहिसर संघ
उत्कृष्ट गोलंदाज – हर्षद ठोंबरे, खोणी
उत्कृष्ट फलंदाज – साई शेलार, खंबाळपाडा.
मालिकावीर – नितेश पाटील, निळजे.
तुतीय पारितोषिक – हर्ष इलेवन संघ, दहीसर.
चतुर्थ पारितोषिक – जय हनुमान संघ, निळजे

‘आगरी युथ फोरम डोंबिवली’ आयोजित १८ वा अखिल भारतीय आगरी महोत्सव..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कार्यामुळे लोकमान्यतेस पात्र ठरलेल्या “आगरी युथ फोरम” या सेवाभावी संस्थेच्या वतीने सन २००४ पासून अखिल भारतीय आगरी महोत्सव या चातकासारखी वाट पहात असतात असा अठरावा अखिल भारतीय आगरी महोत्सव दिनांक १२ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२२ या कालावधीत श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुल, डोंबिवली पूर्व येथे होणार आहे.

या महोत्सवाचा उदघाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री.एकनाथराव शिंदे व माननीय उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते सोमवार दिनांक १२ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता संपन्न होणार आहे. या उदघाटन सोहळ्यासाठी माननीय केंद्रीय राज्यमंत्री श्री. कपिल पाटील, माननीय मंत्री श्री.रवींद्र चव्हाण व समाजातील ज्येष्ठ नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

“कोरोना” जागतिक महामारीमुळे दोन वर्षांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर साजरा होणाऱ्या येत्या महोत्सवात आनंदाच्या पर्वणीमधे आनंद लुटण्यासाठी जनसागर उसळण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन मोहोत्सवामधे भेट देणाऱ्या आबालवृद्धांना, महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, खरेदीसाठी येणाऱ्यांना मानपसंद वस्तूच्या खरेदीचा आनंद घेता यावा, संगीतनृत्यप्रेमींना आगरी-कोळी ठसकेबाज गीतांवरील नृत्याचा मनमुराद आनंद लुटता यावा, खवय्यांना स्वादिष्ट आगरी-कोळी खाद्यपदार्थांवर मनसोक्त ताव मारता यावा, बच्चे कंपनीबरोबर त्यांच्या पालकांनाही पाळण्यात बसून आकाशाएवढा आनंद घेता यावा. त्यांच्या आनंदामधे बाधा येऊ नये म्हणून महोत्सव संयोजन समितीने अत्यंत नियोजन बद्ध अशी कार्यक्रमांची आखणी केलेली आहे.

आगरी समाज हा शेतीनिष्ठ कष्टकरी समाज आहे. साधारण शिवकाळापूर्वी शेतकरी हाच अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी होता, शेतकऱ्याला विविध गरजा बारा बलुतेदार भागवत असत. धान्याच्या बदली विविध सेवा, वस्तू प्राप्त होत असत. गावातल्या गावातच एकमेकांच्या गरजा वस्तू सेवांची अदलाबदल करून भागवल्या जात असत. युवा पिढीला आपल्या पूर्वीच्या सामाजिक जीवनापद्धती बद्दल अवगत करण्यासाठी या महोत्सवमधे आपली प्राचीन संस्कृती चित्ररूपाने साकारण्यात येणार आहे. लोकनेते दि.बा. पाटील साहेबांचे जीवनचरित्र चित्ररूपाने साकारले जाणार आहे.

‘चूल आणि मूल’ या संसार चक्रात अडकलेली आमची माता भगिणी समाजाच्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे. आमच्या महिला समिती सदस्या महोत्सवाच्या प्रवेश शुल्क विभागाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेतच. महिलावर्गाच्या सन्मानार्थ महोत्सवमधे एक दिवस महिलांसाठी राखून ठेवलेला असून त्यादिवशी रंगमंचापासून सर्व व्यवस्थापन महिलांकडे देण्यात येणार आहे. महिलांचा अध्यात्मिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग वाढलेला आहे हे लक्षात घेऊन आमच्या माताभागिनींचा सहभाग असलेल्या ‘हरिपाठाचे’ आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे समाजातील नामवंत संगीतभजनी बुवांचा ‘संगीत भजनाचा’ कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे “ज्ञानबा तुकाराम” च्या जयघोषात टाळमृदंगाच्या गजरात श्रीसंत सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील वातावरण मंगलमय होणार आहे. त्याचप्रमाणे खास महिलांसाठी “यशस्वी व आनंदी जीवनाची सूत्रे” या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून यामधे डॉ.संगीता पांडे (प्रभारी प्राचार्या, आदर्श कॉलेज) यांच्याशी सुसंवाद साधतील सौ.ज्योती पोहाणे (प्राचार्या, प्रगती कॉलेज) व सौ.सुप्रिया नायकर (प्राचार्या, ग्लोबल कॉलेज).

आपल्या महाराष्ट्राची राजभाषा मराठी असूनही सध्या आपली मराठी भाषा आणि मराठी शाळा संकटात असल्याचे चित्र दिसत आहेत. मातृभाषेमधे कानावर पडणारे ज्ञान ग्रहण करणे जास्त सोपे असते हे विज्ञानानेही सिद्ध केलेले आहे यादृष्टीने लोकजागर करण्याच्या हेतूने “मराठी भाषा व मराठी शाळा वाचवा” या विषयावरील परिसंवादामधे श्री.प्रकाश पायगुडे (कार्यवाह, मसाप पुणे) मा.आमदार श्री. बाळाराम पाटील (शिक्षक आमदार) यांचा सहभाग असेल. या कार्यक्रमाच्या समन्वयक असतील सौ.दिपाली काळे (सेवानिवृत्त मुख्याध्यापिका).

भूमिपुत्रांनी देशाच्या हितासाठी अनेक मोठे प्रकल्प उभारणी व त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कवडीमोल भावाने शासनाला जमिनी दिल्या. त्यातून राष्ट्राचा विकास साधला गेला परंतु ज्यांनी सरकारला जमिनी देऊन, भूमिहीन झाला तो समाज आज कुठे आहे. या समाजाचे भवितव्य काय ? या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी “भूमिपुत्रांचे भवितव्य” या विषयावरील परिसंवादामधे केंद्रीय राज्यमंत्री नामदार श्री. कपिल पाटील, माजीमंत्री श्री.जगन्नाथ पाटील, माननीय श्री.दशरथदादा पाटील (अध्यक्ष, लोकनेते दि.बा.पाटील विमानतळ नामकरण समिती), श्री.जे.डी. तांडेल (प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ) सहभागी असतील. समन्वयक असतील प्रसिद्ध कवी श्री.अरुण म्हात्रे.

उद्योग-व्यवसायामधे भविष्य घडवू इच्छिणाऱ्यांसाठी “चला तरुणांनो उद्योजक बनूया” या विषयावर जगप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचे व्याख्यान होणार आहे. त्याचप्रमाणे आगरी समाजातील प्रसिद्ध कवींचा सहभाग असलेला “आगरी बोली कविसंमेलन” होणार आहे.

प्रभोधनात्मक कार्यक्रमांप्रमाणेच लोकरंजन करण्यासाठी दररोज नवोदित हौशी कलाकार, शालेय विध्यार्थ्यांचे नृत्याविष्कार पहावयास मिळणार आहेत. त्याचप्रमाणे “झी मराठी” वाहिनीवर प्रक्षेपित होणाऱ्या मालिकांमधील प्रसिद्ध कलाकार आपल्या आनंदाच्या पर्वाणीमधे आपला आनंद द्विगुणीत करण्यासाठी दररोज उपस्थित राहणार आहेत आणि एक दिवस “उत्सव आनंदाचा” हा “झी मराठी” वाहिनीवरील लोकप्रिय कलाकारांचा खुमासदार कार्यक्रम होणार आहे.

महोत्सवासाठी जगप्रसिद्ध नेपथ्यकार श्री.संजय धबडे व ओम साई डेकोरेटर्स हे नेपथ्याचे काम करणार आहेत. महोत्सव कालावधीमधे दररोज दोन महिलांना “साडी ड्रॉ” च्या माध्यमातून पैठणी चा मान मिळणार आहे. तसेच महोत्सव कालावधीत विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार यांची उपस्थिती असणार आहे, त्याची घोषणा महोत्सव मंचावरून एक दिवस अगोदर करण्यात येईल असे आयोजकांकडून घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

 

लोकनायक महेश पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली अंबिका नगर येथील मा. नगरसेवक, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कल्याण तालुका प्रमुख तसेच जिल्हा समन्वयक महेश पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांने आज शनिवारी साजरा करण्यात आला. या विधायक कार्याचे डोंबिवलीतील नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेल्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची धुरा अंगावर घेतलेल्या महेश पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि कल्याण-डोंबिवली चे लोकप्रिय खासदर डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक सामाजिक कार्याला व्यापक स्वरुप देण्यास सुरुवात केली आहे. याचा श्रीगणेशा वाढदिवसाच्या निमित्ताने डोंबिवलीत जागोजागी पहायला मिळाला. सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत सामाजिक बांधिलकी जपत विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले होते. यावेळी महेश पाटील यांचे संपूर्ण कुटुंब, पत्नी, दोन मुले, बहिण माजी नगरसेविका डॉ.सुनिता पाटील, विजय बाकाडे, सुजित नलावडे, संजय विचारे, दत्ता वाटोरे, मूसा शेख, सिकंदर मखानी, महेश पाटील प्रतिष्ठान चे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील रुग्णांना महेश पाटील यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले. डोंबिवली पूर्व येथील कैलास लस्सी येथे अन्नदान करण्यात आले याचा लाभ शेकडो गरजुनी घेतला. खिडकाळी मंदीर येथे सकाळी धान्य वाटप, नंदादीप शाळा, टीटवाळ्यातील अंकुर बालविकास केंद्र तथा आश्रमाला लागणाऱ्या वस्तू वाटप तसेच अंगणवाडी शाळा आणि आचार्य भिसे शाळेत पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच सांगावं येथे रक्तदान शिबीराचे आणि हळदीकुंकू चे आयोजन करण्यात आले होते. तर सायंकाळी एमआयडीसीतील जेष्ठ नागरिक कट्टा येथे जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची १९ डिसेंबर पूर्वी उचलबांगडी ..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्यावरून राज्यभर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षातील नेत्यांशिवाय शिंदे गटाचे नेतेही राज्यपाल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर नाराज दिसत आहेत. यामुळे आता राज्यपालांना लवकरात लवकर केंद्रात पुन्हा बोलावून घ्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान, येत्या हिवाळी अधिवेशना पूर्वीच राज्यपालांना बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ५ डिसेंबर ते १९ डिसेंबरच्या दरम्यान राज्यपालांच्या बदलीची शक्यता आहे. पाच डिसेंबरला गुजरात विधानसभा मतदानाचा दुसरा टप्पा आहे. तर येत्या १९ डिसेंबरपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.

त्यापूर्वीच त्यांची बदली होण्याची शक्यता आहे. अन्यथा यंदाच्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडी हा मुद्दा प्रामुख्यानं उचलणार असल्याचं बोललं जात आहे. आणि त्यामुळेच सध्या राज्यपाल हटाव मोहिमेने वेग घेतल्याचे पाहावयास मिळत आहे.

महाराष्ट्राच्या पथ्यावर गुजरातच्या निवडणुका..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित होऊन जवळपास दोन महिने झाले. मात्र आगामी अधिवेशनाच्या निमित्ताने कामकाज सल्लागार समितीची बैठक होणे आवश्यक असताना या समितीची बैठक सातत्याने पुढे ढकलण्यात येत आहे. आता तिसऱ्यांदा समितीची बैठक पुढे ढकलत पुढील महिन्यात ठेवण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनासाठी नोव्हेंबर महिन्यात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु गुजरात निवडणूकीच्या पार्श्वभूमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुजरात येथे प्रचारासाठी जाणार होते. त्यामुळे ही बैठक २९ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली. मात्र आता २९ नोव्हेंबर रोजीही देवेंद्र फडणवीस हे गुजरात मधील प्रचारासाठी जाणार असल्याने २९ नोव्हेंबरची सदरची बैठक पुन्हा पुढे ढकलण्यात आली. महाराष्ट्रातील अनेक उद्योग परराज्यात जाणे, शेतकऱ्यांच्या समस्या, वीज बिलबाबत निर्माण झालेले प्रश्न अशा अनेक प्रश्नांवर अधिवेशनात चर्चा होणे क्रमप्राप्त असताना अद्यापही अधिवेशनाकरिता कामकाज सल्लागार समितीची बैठकच होत नाही. यामुळे आता महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

आता विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक डिसेंबर महिन्याच्या ५ किंवा ७ तारखेला होणार आहे. त्यावेळी अधिवेशनाच्या एकूण कालावधी आणि कामकाजाची रूपरेखा ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदरचे अधिवेशन एक आठवड्याचे करण्याचा विचार सध्या सुरु असल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्यातील सध्याची राजकिय परिस्थिती पाहता शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्याच्या हिताच्यादृष्टीने मोठे निर्णय घेण्याचे टाळले जात आहे. त्यातच शिंदे गटाच्या पात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर नियमित कामकाज चालवून पुढे ते सगळंच अवैध ठरविण्यापेक्षा विधिमंडळाच्या प्रथेप्रमाणे एक हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घ्यायचे मात्र त्याचा कालावधी एक आठवड्यापेक्षा असू नये यासाठी सरकारकडून गांभीर्याने प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

एकीकडे गुजरात निवडणुकीमुळे उपमुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनाही न्यायालयात उपस्थित राहण्याकरिता वेळ नसल्याचे दिसून आले आहे. कोरोना काळात आपतकालीन कायद्याचे उल्लंघन करत वीज दरवाढीच्या मुद्यावरून आंदोलन केल्याप्रकरणी सध्या न्यायालयात खटला सुरु आहे. गुजरात निवडणूकीची कारण पुढे करत सुनावणीला गैरहजर राहिल्यावरून न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर नाराजी व्यक्त करत प्रकरण प्रलंबित असताना गुजरात निवडणूकीच्या कामासाठी जाणे अधिकृत काम आहे का ? असा सवाल उपस्थित करत आणखी किती दिवस दोघे अनुपस्थित राहणार आहेत ? अशी विचारणाही न्यायालयाने मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांच्या वकीलांना केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे एकीकडे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असताना दुसरीकडे वाढीव वीज देयकांमुळे सर्वसामान्यांना हैराण केले होते. याविरोधात नार्वेकर, लोढा यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत बेस्टच्या महाव्यवस्थापकांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी या दोघांसह २० जणांवर लोकसेवकाला कर्तव्य बजावण्यापासून रोखणे, प्राणघातक हल्ला किंवा बळाचा वापर करणे, जमावबंदी असताना बेकायदेशीरित्या जमाव करणे या भारतीय दंड संहितेच्या कलमांसह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा आणि साथ रोग नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. आमदार-खासदार यांच्या विरोधातील खटले चालवणाऱ्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर याप्रकरणी सध्या आरोप निश्चितीवर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे आरोपींनी सुनावणीसाठी उपस्थित राहणे अपेक्षित होते. शुक्रवारी झालेल्या सुनावणीला नार्वेकर आणि लोढा यांच्यासह भाजपाचे ११ अन्य कार्यकर्ते अनुपस्थित राहिले. त्याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

भाजपा नेत्यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे न्यायालयाचे कामकाज पूर्ण होऊ शकत नाही, असे स्पष्ट करून न्यायालयाने आरोपीच्या वकिलांकडे आरोपींच्या अनुपस्थितीबाबत विचारणा केली. त्यावेळी नार्वेकर आणि लोढा हे गुजरात निवडणुकीच्या कामासाठी गेले असल्याचे दोघांच्या वकिलाने सांगितले. हे कारण ऐकल्यावर दोघे गुजरातच्या निवडणुकीसाठी गेल्याचे कारण योग्य वाटते का ? हे अधिकृत काम आहे का ? असल्यास ते नेमक्या कोणत्या अधिकृत कामासाठी गेले आहेत याची माहिती देण्याचे न्यायालयाने नार्वेकर आणि लोढा यांच्या वकिलाला सांगितले. त्यावर दोघे कोणत्या अधिकृत कामासाठी गुजरातला गेले आहेत याची माहिती नाही. परंतु त्यांना खटल्याच्या गांभीर्याची माहिती देण्यात आली असून पुढील सुनावणीला सर्व आरोपी न्यायालयात उपस्थित राहतील, असे आश्वासन त्यांचे वकील मनोज गुप्ता यांनी न्यायालयाला दिले. त्यानंतर न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी २१ डिसेंबर रोजी ठेवली.

यापूर्वीही नार्वेकर आणि लोढा यांच्यासह अन्य आरोपी अनेकदा न्यायालयात अनुपस्थित राहिले आहेत. ९ जुलै २०२१ रोजी सर्व २० आरोपी एकत्र न्यायालयात उपस्थितीत होते. दरम्यान, नार्वेकर आणि लोढा यांच्यासह अन्य आरोपींनी प्रकरणातून दोषमुक्त करण्यासाठी अर्ज केला होता. तो नंतर मागे घेण्यात आला. त्यामुळे न्यायालयाने आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू केली. मात्र नार्वेकर, लोढा यांच्यासह अन्य आरोपी न्यायालयात अनुपस्थितीत राहत असल्याने न्यायालयाला ही प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत.