Home Blog Page 70

राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेकरिता जनार्दन सावंत व श्रिया नाईक मुंबईचे कर्णधार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रोहा, रायगड येथे होणाऱ्या ४८ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेकरिता मुंबईचा कुमार व मुली संघ मुंबई खो-खो संघटनेचे कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा यांनी जाहीर केला तो खालील प्रमाणे.

मुंबई कुमार संघ:
जनार्दन सावंत (कर्णधार), पियुष काडगे, हर्ष कामतेकर, रोहित केदारे, भावेश बने (सर्व विद्यार्थी क्रीडा केंद्र), राजेश मंडल, देवांग ताम्हणेकर (उप कर्णधार), नितेश अष्टमकर (सर्व ओम साईसश्वर सेवा मंडळ), हार्दिक मोहिते, राज जोशी (सर्व वैभव स्पो. क्लब), विशाल खाके, तन्मय भुवड (सर्व श्री समर्थ व्यायाम मंदिर), अमित पाल (युवक क्री. मंडळ), विघ्नेश कोरे (अमरहिंद मंडळ), सुरज वैश्य (सरस्वती स्पो. क्लब), प्रशिक्षक : सागर मालप (विद्यार्थी), व्यवस्थापक : प्रथमेश जाधव (विद्यार्थी)

मुली संघ:
श्रिया नाईक (कर्णधार), तनवी मोरे (सर्व श्री समर्थ व्या‌ मंदिर), अथश्री तेरवणकर, रश्मी दळवी, ईशाली आंब्रे, कादंबरी तेरवणकर (सर्व ओम साईश्वर सेवा मंडळ), काजल पासी, मुस्कान शेख, शर्वी नडे (सर्व शिवनेरी सेवा मंडळ), प्रतीक्षा राज, भक्ती बोऱ्हाडे (आर्य सेना), सृष्टी पाष्टे (ओम समर्थ भा. व्या. मंदिर), रुद्रा नाटेकर (अमरहिंद मंडळ), स्पूर्ती चंदुरकर (उप कर्णधार) (वैभव स्पो. क्लब), जान्हवी लोंढे (सरस्वती कन्या संघ), प्रशिक्षक : श्रीकांत गायकवाड (ओम साईश्वर सेवा मंडळ), व्यवस्थापिका: कविता परब (ओम साईश्वर सेवा मंडळ)

 

रायगड येथे ४८ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रायगड मधील रोहा येथे सुरू होत असलेल्या महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने ‘रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन’ आयोजित ४८ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा ८ ते ११ डिसेंबरला रोहा येथे होणार आहे. या स्पर्धेमध्ये राज्यातील सुमारे पावणेसातशे खेळाडू आणि पदाधिकारी, पंच व प्रशिक्षक मिळून दोनशेहून अधिक जणं उपस्थित राहणार आहेत.

सदर राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा रोहा तालुक्यातील धाटाव-रोठ येथील परमपुज्य पांडुरंग शास्त्री आठवले औद्योगिक विद्यालय आणि एम. बी. मोरे फाडंडेशन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर होणार आहे. खासदार सुनिल तटकरे, माजी क्रीडामंत्री आदिती तटकरे, रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे, उपाध्यक्ष विजय मोरे, जिल्हा सचिव आशिष पाटील हे गेले पंधरा स्पर्धेची जय्यत तयारी करत आहेत.

स्पर्धेसाठी पाच मैदाने तयार करण्यात आली आहेत. सकाळ व दुपार सत्रात (रात्री प्रकाशझोतात) हे सामने होणार असून त्यासाठी फ्लडलाईटची व्यवस्था केली गेली आहे. चार दिवस चालणार्‍या या स्पर्धेला मुला-मुलींचे ४४ संघ, त्यांचे प्रशिक्षक, पंच व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या संघांना स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थितीसाठी ८ डिसेंबरला सकाळी ८ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. रेल्वेस्थानकावरुन संघांना निवासाच्या ठिकाणी पोच करण्यासाठी आणि निवासापासून मैदानावर ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ८ तारखेला मा. माजी मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते सायंकाळी होणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशनेचे सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत.

संस्कृती मिरा-भाईंदर आर्ट्स फेस्टिव्हलचे झाले दिमाखात उद्घाटन!

हजारो नागरिकांचा पहिल्याच दिवशी प्रतिसाद; शंकर महादेवन यांच्या गायनाने मिरा-भाईंदरकर रसिक मंत्रमुग्ध

भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर शहरातील सर्वात मोठ्या ‘संस्कृती मिरा-भाईंदर आर्ट फेस्टिव्हल’ चे काल राज्य सरकारचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शानदार जल्लोषात , प्रचंड गर्दीत उदघाटन झाले. पहिल्या दिवशी जगप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या प्रत्यक्ष लाईव्ह गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हजारो मिरा-भाईंदरकर संगीत रसिक या गायनाचे साक्षीदार बनलेच आणि ते मंत्रमुग्ध झाले. मिरा-भाईंदर शहरातील हजारो नागरिकांनी पहिल्या दिवशी या भव्य महोत्सवाला भेट देऊन आनंद घेतला.

प्रताप सरनाईक फाउंडेशन व संस्कृती युवा प्रतिष्ठान यांच्याकडून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान, इंद्रलोक, भाईंदर पूर्व येथे हे फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले आहे.

संपूर्ण मैदान फेस्टिव्हलसाठी सजले असून परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या मिरा-भाईंदर आर्ट्स फेस्टिवलचे उद्धाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते मोठ्या दिमाखात करण्यात आले.

यावेळी आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले, मिरा-भाईंदर वसई-विरारचे पोलिस आयुक्त सदानंद दाते, आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहता, भाजपा जिल्हाध्यक्ष रवि व्यास, युवा सेना सचिव पूर्वेश सरनाईक, नगरसेविका परिषा सरनाईक, जिल्हाप्रमुख राजू भोईर, विक्रम प्रताप सिंग, सचिन मांजरेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

रात्री या कार्यक्रमाला केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची विशेष उपस्थिती होती. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, तुतारीच्या निनादात जल्लोषात महोत्सवाचे उदघाटन झाले.

देश-विदेशातील सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाला हजारो मीरा भाईंदरकर उपस्थित होते. आपल्या गाण्याच्या अनोख्या शैलीत शंकर महादेवन यांनी त्यांची बहुतेक गाजलेली गाणी सादर केली आणि त्याला रसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळत होता,

प्रत्येक गाण्यावर उपस्थित संगीत रसिक थिरकले, तरुण-तरुणी अक्षरश: नाचत होते. आमदार प्रताप सरनाईक हे माझे गेल्या २० वर्षांपासून मित्र असून त्यांच्यामुळे मी मिरा भाईंदरमध्ये हा लाईव्ह शो करीत आहे, मिरा भाईंदर सारखे दर्दी रसिक प्रेक्षक कुठेच नाहीत, असे सांगत शंकर महादेवन यांनी या भव्य कला महोत्सवाचे कौतुक केले.

या कला महोत्सवाचे उदघाटक मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, “शहर विकासाच्या दिशेने जात असताना जनतेची सांस्कृतिक भूक भागवणे हे सुद्धा गरजेचे आहे. आमचे मित्र प्रताप सरनाईक यांचे व त्यांच्या टीमचे या भव्य फेस्टिव्हल आयोजनाबद्दल मन:पूर्वक कौतुक करतो. कोरोनाच्या नंतरच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात या भागातील जनतेची सांस्कृतिक गरज पूर्ण करण्याचे काम या मीरा भाईंदर आर्ट फेस्टिव्हलच्या माध्यमातून त्यांनी केले आहे. संपूर्ण महाराष्ट्राने ज्याचा गौरव करावा असा फार मोठा ‘उपवन आर्ट फेस्टिवल’ आमदार सरनाईक ठाण्यात गेली अनेक वर्षे आयोजित करतात. अशा फेस्टिव्हलची सातत्याने ठाणेकर व ठाण्याच्या आसपास राहणारे नागरिक वाट पाहत असतात. आज तशीच लक्षवेधी रोषणाई, किंबहुना उपवन फेस्टिव्हल पेक्षाही चांगली रोषणाई मिरा-भाईंदर मध्ये मी स्वतः अनुभवली. एखादी गोष्ट फार मनापासून करण्याचे काम सरनाईक करीत असतात. एखादा कार्यक्रम ज्यावेळी ते करत असतात त्यावेळी त्या कार्यक्रमामध्ये जीव ओतून त्या कार्यक्रमाची उंची वाढविण्याचे काम प्रताप सरनाईक सातत्याने करतात म्हणूनच हा फेस्टिवल उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने जात आहे” असे सांगत आमदार सरनाईक यांचे मंत्री चव्हाण यांनी कौतुक केले.

रामदास आठवले यांच्या कवितांना प्रतिसाद!

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही आर्ट फेस्टिव्हलला उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या. ‘मुझे भी है संगीत का ज्ञान, इसलिये मै हू शंकर महादेवन का फॅन’, ‘जो गाता है मन भावन, नाम है उनका शंकर महादेवन’, ‘प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदरमध्ये उभा केला आहे हेवन, कारण इथे आलेले आहेत शंकर महादेवन’ अशा कविता सादर करून आठवले यांनी प्रचंड टाळ्या मिळवल्या. प्रताप सरनाईक हे कार्यसम्राट आमदार आहेत, खूप विकासकामे त्यांनी मतदारसंघात केली आहेत. मोठे नाट्यगृह, विविध समाज भवने व अनेक विकासकामे सरनाईक यांनी केली आहेत. सरनाईक यांचा नंबर जरूर मंत्रिमंडळ विस्तारात लागेल. एकदा तुम्हाला मंत्रिपदाची संधी मिळाली पाहिजे. मुख्यमंत्री तुमचा नक्की विचार करतील आणि मी तुमची शिफारस करेल अशा शब्दात आठवले यांनी कौतुक केले.

आर्ट फेस्टिव्हलचे आकर्षक प्रवेश द्वार, रांगोळी प्रदर्शन, चित्र प्रदर्शन, विविध कला प्रदर्शन यांच्या दालनातही नागरिकांची पाहण्यासाठी गर्दी होत आहे. तसेच लहान मुलांसाठी ‘गेम झोन’ खाद्यप्रेमींसाठी खाद्य विभाग, कल्चरल ऍक्टिव्हिटी, फन फेयर, सेल्फी पॉईंटसह अनेक आकर्षक कला-संस्कृतीशी निगडित गोष्टी फेस्टिव्हलमध्ये असून १२ डिसेंबरपर्यंत फेस्टिव्हलमध्ये मीरा भाईंदरच्या नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

गर्भाशयातील दीड किलो वजनाचा फायब्रॉइड काढण्यात वोकहार्ड हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश!

मिरारोड येथील वोकहार्ड हॉस्पिटल्समध्ये एका महिला रुग्णावर लॅपरोस्कोपिक हिस्टेरेक्टोमीद्वारे झाली यशस्वी शस्त्रक्रिया!

मुंबई, प्रतिनिधी: मिरारोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्स डॉ. राजश्री तायशेटे भासले स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ तसेच लॅप्रोस्कोपिक सर्जन यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने लॅपरोस्कोपिक हिस्टेरेक्टोमीद्वारे एका महिलेवर शस्त्रक्रिया करून दीड किलो वजनाचा 10 सेमी लांबीचा गर्भाशयाचा फायब्रॉइड यशस्वीरित्या काढण्यात आला.

ही 48 वर्षीय महिला रुग्ण बोईसर येथील रहिवासी आहे. तिच्या दोन्ही प्रसुती सी सेक्शनने झाल्या होत्या. मात्र तिच्या दुसऱ्या प्रसूतीनंतर तिला ओटीपोटात तीव्र दुखणे आणि मेनोरेजिया किंवा मासिक पाळीच्या दरम्यान असामान्य आणि जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने तिने डॉक्टरांकडे धाव घेतली. तिने स्थानिक डॉक्टरांचा सल्ला घेतला परंतु मागील अनेक शस्त्रक्रियांमुळे उपचार करण्यात जास्त जोखीम असल्यामुळे, रुग्णाला वोक्हार्ट हॉस्पिटल, मिरारारोड येथे पाठवण्यात आले.

डॉ. राजश्री तायशेटे भासले स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ तसेच लॅप्रोस्कोपिक सर्जन वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मिरारोड माहीती देताना सांगतात की “रुग्णाला जास्त रक्तस्त्राव आणि वेदना होत होत्या. तिची तपासणी केली असता गर्भाशय ग्रीवाचे फायब्रॉइड आढळून आले. एक टक्‍क्‍यांहून कमी महिलांमध्ये ही समस्या दिसून येते. मूत्रवाहिनी (मूत्रपिंडापासून मूत्राशयापर्यंत मूत्र निचरा करणारी नळी) जवळ असल्यामुळे त्यांना कुशल शस्त्रक्रियेची गरज आहे. त्या महिलेला ऍनिमिया ही झाला होता. फायब्रॉइड तिच्या मूत्रमार्गावर दबाव आणत होता आणि तिच्या किडनीवर परिणाम करत होता. रक्त संक्रमण झाल्यानंतर तिची लॅपरोस्कोपिक हिस्टेरेक्टॉमी करण्याचे ठरविले.
डॉ. तायशेटे पुढे म्हणाल्या की, या शस्त्रक्रियेदरम्यान, 5 मिमी कॅमेरासह 3 पोर्ट वापरण्यात आले ज्याला आम्ही मिनिमल पोर्ट आणि मिनिमल एक्सेस सर्जरी असे म्हणतो. ही एक डागविरहित शस्त्रक्रिया होती. गर्भाशय ग्रीवा आणि फायब्रॉइड्सला काढणे हे एक मोठे आव्हान होते कारण तिच्या मागील शस्त्रक्रियांमुळे ओटीपोटात चिकटपणा होता. मात्र प्रसंगावधान राखुन ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. अखेर योनीतून दीड किलो वजनाचा 10 सेमी लांबीचा फायब्रॉइड काढण्यात डॉक्टरांना यश आले. शस्त्रक्रियेनंतर ४८ तासांत रुग्ण घरी देखील परतला”

कोणत्याही असामान्य स्त्रीरोगविषयक समस्यांना तोंड देण्यासाठी विशीनंतर स्त्रियांनी नियमित स्त्रीरोग तपासणी करुन घेणे महत्त्वाचे ठरते. तीव्र ओटीपोटात दुखणे आणि मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या रक्तस्रावामुळे मी चिंताग्रस्त झाली होती. मी पोटावर गरम पाण्याची पिशवी ठेवणे, गरम पेये पिणे, व्यायाम करणे, ताठ बसणे, आल्याचा चहा घेणे आणि भरपूर पाणी पिणे यासारखे अनेक घरगुती उपाय करून पाहिले. पण या सर्व गोष्टी मला वेदनांपासून मुक्त करण्यात अयशस्वी ठरल्या. मी जवळजवळ 8 वर्षे हा त्रास सहन केला. शेवटी, वेदना असह्य झाल्यावर मी तज्ज्ञांकडे धाव घेतली व तातडीने उपचार करून फायब्रॉइड काढून टाकल्याबद्दल मी डॉक्टरांचे आभार मानते. मी आता वेदनामुक्त आहे आणि माझी दैनंदिन कामे सहजतेने करू शकते. मी इतर महिलांना देखील शरीरातील कोणत्याही असामान्य बदलांकडे दुर्लक्ष करू नका आणि तत्काळ वैद्यकीय मदत घ्या असे आवाहन करत असल्याचेही या महिला रुग्णाने स्पष्ट केले.

अपहरण झालेल्या पाच वर्षांच्या मुलाला कुर्ला रेल्वे पोलीसांनी बारा तासांत शोधून काढले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

टिटवाळा येथे राहणाऱ्या फिर्यादी शबनम मोहन तायडे (वय: २५ वर्षे) या दिनांक. ०३.१२.२०२२ रोजी कुर्ला पश्चिम परिसरात कॅटरिंग च्या कामासाठी गेल्या असता घरी परत जाण्यासाठी रात्री उशिरा कुर्ला रेल्वे स्टेशन येथे आल्यावर शेवटची गाडी जाऊन लोकल वाहतूक बंद झाल्यामुळे त्या त्यांच्या ५ वर्षाच्या मुलासह कुर्ला रेल्वे स्टेशन फलाट क्र.१ वरील बुकिंग हॉलमध्ये झोपल्या असताना दि.०४.१२.२२ रोजी पहाटे ४ वाजता जाग येताच पाहिले की ५ वर्षांचा सोबत झोपलेला मुलगा गायब ! त्यांनी कुर्ला स्टेशन व राहत्या टिटवाळा परिसरात सर्वत्र शोध घेऊनही मुलगा काही सापडला नाही म्हणून त्यांनी कुर्ला रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी सांगितलेल्या हकीकतीवरून कुर्ला रेल्वे पोलीस यांनी त्यांची रीतसर फिर्यादीची नोंद घेऊन गु.रजि.नं. १३६१/२०२२, कलम ३६३ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गंभीर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या अधिपत्याखाली केलेल्या मार्गदर्शनानूसार तात्काळ दोन तपास पथकं तयार करण्यात आले व कुर्ला स्टेशन व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे यातील अपहृत बालकांस एक महिला घेऊन जात असल्याचे दिसून आल्याने तिची गुप्त माहितीदाराच्या माध्यमातून माहिती घेऊन तिचे मोबाईल फोन लोकेशन घेऊन प्रथम कुर्ला, विद्याविहार, जरीमरी व त्यानंतर गोरेगांव अशा विभागात शोध घेत असताना, गोरेगांव पूर्व येथील बुरगनपाडा झोपडपट्टी येथे तपास करीत असताना एका झोपडपट्टी मधून आरोपी महिला नामे रेहाना कासीम शेख (वय: २४ वर्षे) राहणार गोरेगांव पूर्व, मुंबई हिस गुन्ह्यातील अपहृत बालकासह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता त्या आरोपी महिलेनेच गुन्ह्यातील बालकाचे अपहरण करून पोलीसांना माहिती मिळू नये म्हणून वेळोवेळी तिने तिचे राहण्याचे ठिकाण बदलत असल्याचे निष्पन्न झाले तसेच ते अपहृत बाळ फिर्यादी यांना बोलावून खात्री केले असता ते तिचेच असल्याचे सिद्ध झाल्यामुळे आरोपी महिलेस दि.०५.१२.२०२२ रोजी १६.२० वाजता अटक करण्यात आली असून आज दि.०६.१२.२०२२ रोजी मा.महानगर दंडाधिकारी ३५ वे न्यायालय, सीएसटी येथे हजर करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष राठोड करीत आहेत.

सदर गुन्ह्याच्या तपासाची कामगिरी मा.कैसर खालिद, पोलीस आयुक्त , लोहमार्ग मुंबई तसेच श्री. मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, मध्य परिमंडळ, लोह.मुंबई, श्री.देविदास सोनावणे, सहा.पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाल्मिक शार्दूल, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, संदीप बागुल, सपोनि सुभाष राठोड, सपोनि साळुंखे, पोहवा प्रदीप शिंदे, शिर्सेकर, निकम, गोडे, गिरासे, झोम्बाडे, बागवान, पवार, महिला पोहवा पंडित, गुरव, आढाव, पोना पाटील, लवटे, पंदेरे, महिला पोना अभंग, पोशि कागणे, मपोशि पाटील यांनी सलग १२ तास कर्तव्यावर हजर राहून कारवाई पार पाडली आहे.