Home Blog Page 76

अनेक वर्षांपासून डायलिसिसवर असलेल्या रूग्णावर मिरारोडच्या वॉक्हार्ट रूग्णालयात मूत्रपिंडाचे यशस्वी प्रत्यारोपण!

कॅडेव्हर प्रोग्रामव्दारे ब्रेन-डेड झालेल्या ७३ वर्षाच्या रूग्णाच्या कुटूंबियांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे एका तरूणाने मिळाले जीवनदान!

मुंबई, प्रतिनिधी: मिरारोड पूर्वेकडील वोक्हार्ट हॉस्पिटल्स, येथे 73 वर्षांच्या ब्रेन-डेड रुग्णाच्या कुटुंबाने त्याच्या अंतिम इच्छा म्हणून रुग्णाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे या रुग्णाने केलेल्या मूत्रपिंड (किडनी) दानामुळे याच रुग्णालयातील एका ४३ वर्षीय रुग्णाला नवजीवन मिळाले आहे.

वॉक्हार्ट रूग्णालयातील कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. पुनीत भुवानिया आणि सल्लागार यूरोलॉजिस्ट, एंड्रोलॉजिस्ट आणि रेनल ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. आशुतोष बघेल यांनी एकत्रितपणे ही मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली आहे.

दिल्लीचा सौरव मुखर्जी हा ४३ वर्षीय पुरूष रुग्ण क्रोनिक किडनी विकारामुळे गेल्या ४ वर्षांपासून डायलिसिसवर होता. झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (ZTCC) आणि वोक्हार्ट रूग्णालयाच्या कॅडेव्हर प्रोग्रामद्वारे रुग्णाला किडनी मिळाली. तो दिल्लीहून मुंबईला रवाना झाला आणि आवश्यक क्रॉस-मॅच चाचणीनंतर ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली असून मीरारोडच्या वोक्हार्ट रूग्णालयात यशस्वी मूत्रपिंड(किडनी) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. १० दिवसांनंतर त्याला रूग्णालयातून घरी सोडण्यात आले असून आता तो सामान्यपणे जीवन आपले जगत आहे.

डॉ. पुनीत भुवानिया, वोक्हार्ट रूग्णालय, मीरारोड येथील कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन यांनी माहिती देताना सांगितले की, डोनर हे ७३ वर्षीय गृहस्थ होते. त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे ब्रेन डेड घोषित करण्यात आले होते. या दात्यामुळे सहा जणांचे जीव वाचवले जाऊ शकतात असे त्यांच्या कुटूंबियांनी सांगितले. त्यांच्या कुंटूंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेत मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे आणि त्वचा दान करण्यात आली. त्यापैकी श्री सौरव यांना किडनी मिळाली असून वोक्हार्ट रूग्णालयात यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली आहे.

अवयव दानामुळे एक व्यक्ती ८ लोकांचे जीव वाचवू शकते. यामध्ये मूत्रपिंड, यकृत, हृदय, आतडे, डोळे, फुफ्फुसे, स्वादुपिंड आणि त्वचेचा समावेश असतो. प्रत्येक वर्षी अंदाजे ५०,००० पेक्षा जास्त लोकांना मूत्रपिंड (किडनी) निकामी झालेल्या रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची आवश्यकता असते तर त्यापैकी फक्त ५००० पेक्षा कमी रुग्णांना प्रत्यारोपणाची संधी मिळते.

आपल्या देशात अवयव दानाबद्दल जागरुकतेच्या अभावामुळे विविध उपक्रम राबविण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपले अवयव दान करण्याचे वचन दिले पाहिजे कारण आपल्या मृत्यूनंतरही आपण ८ लोकांचे जीव वाचवू शकतो. प्रतीक्षा यादीतील अधिकाधिक लोकांना अवयव मिळावेत म्हणून प्रत्येक नागरिकांनी अवयवदानाची शपथ घेणे गरजेचे आहे.

गरजू रुग्णाला मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यासाठी दोन मार्गांनी मिळू शकते, प्रथम जेव्हा त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांनी त्यांना एक किडनी दान केली किंवा दुसरी ते राज्य शव प्रत्यारोपण कार्यक्रम यादीमध्ये स्वतःची नोंदणी करतात.

“माझी किडनी निकामी झाल्यानंतर मला किडनी प्रत्यारोपणाची नितांत गरज होती. मी जगेन की नाही अशी शंका होती. पण वोक्हार्ट रूग्णालयाने घेतलेल्या अमर्याद परिश्रमामुळे वेळीच किडनी प्रत्यारोपण होण्याचे भाग्य मला लाभले. लाखो जीव वाचवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे येऊन अवयव दान करावेत अशी माझी इच्छा आहे” असे रुग्ण श्री सौरव यांनी सांगितले असून त्यांनी वोकहार्ड रुग्णालयातील डॉक्टर आणि त्यांचे नर्सिंग स्टाफ यांचे आभार मानले आहे.

नौदल आणि एनडीए अकादमी परीक्षेत मराठी मुलींचे सुयश..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (खडकवासला) आणि नौदल अकादमी (एझिमला,केरळ) यांच्यासाठी युपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत अनुष्का बोर्डे आणि वैष्णवी गोर्डे यांनी देशात अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवून सुयश प्राप्त केले आहे. या परीक्षेत एकूण ५१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रुबीन सिंहने या परीक्षेत पहिल्या क्रमांकाचे यश मिळवले आहे.

युपीएससी कडून १० एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्विसेस सिलेक्शन बोर्डाद्वारे मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर हा अंतिम निकाल जाहिर करण्यात करण्यात आला. मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मुलींना या संरक्षण दलाच्या या परीक्षांमध्ये समान संधी देण्यात आली होती. जून २०२२ पासून एनडीए मध्ये मुलींची पहिली तुकडी प्रशिक्षणासाठी दाखल झाली. आता अनुष्का आणि वैष्णवी यांनी मिळवलेले हे यश पाहून अनेक मुलींना या स्पर्धेचे क्षितिज खुणावू लागेल असा विश्वास वाटत आहे.

 

दिव्यात रेशनिंग ऑफिस व रेशनिंग दुकानाची संख्या वाढविण्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आदेश..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिवा शहराची लोकसंख्या पाच लाखाच्या घरात गेली आहे. येथील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दिव्यात नवीन रेशनिंग ऑफिस व नवी रेशनिंग दुकानांना परवानगी मिळावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री व अन्न नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन केली. यावेळी भाजपचे शिवाजी आव्हाड यांच्या प्रत्यक्ष भेट व मागणी नंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ फोनवरून याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

ठाणे जिल्ह्यातील दिवा शहराची लोकसंख्या मागील काही वर्षात वेगाने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनते येथे प्रशासकीय व्यवस्था अस्तित्वात नाही. रेशनिंग सुविधांच्या बाबत येथील नागरिकांना डोंबिवली व मुंब्रा या शहरांवर अवलंबून राहावे लागते. दिवा शहरात रेशनिंग ऑफिस नसल्याने व रेशनिंग दुकानांचे जाळे मजबूत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असते. नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीचे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी या गंभीर विषयावर मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन दिवा शहरात रेशनिंग ऑफिस व वाढीव रेशनिंग दुकाने यांना मंजुरी द्यावी अशी मागणी केली. या मागणीची तातडीने दखल घेत मंत्री चव्हाण यांनी संबंधित अधिकारी यांना याबाबत आदेश दिले असल्याची माहिती शिवाजी आव्हाड यांनी दिली.

 

 

फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन – मुस्कान प्रकल्पामार्फत बाल सुरक्षा सप्ताह साजरा..

+
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन – मुस्कान मार्फत पुणे आणि पिंपरी – चिंचवड येथे अनेक ठिकाणी बाल सुरक्षा साप्ताह १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला. फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन – मुस्कान ही वीस वर्षापासून बाल लैंगिक अत्याचार (CSA) विरोधात काम करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक जनजागृती, समुपदेशन आणि पुनर्वसन, पोलीस सहकार्य आणि कायदेशीर सहाय्य, केवळ मुलांवरच नव्हे तर तरुण प्रौढ, पालक, शिक्षक, पोलीसांसोबत मिळून बदल घडवून आणण्यासाठी काम करते.”


बालदिनानिमित्त फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन (एफएफसीपी) – मुस्कानने कासारवाडी येथील छत्रपती शाहू महाराज व शुक्रवार पेठेतील डॉक्टर वसंतदादा पाटील माध्यमिक विद्या निकेतन येथे सलग दोन दिवस शाळेतील भिंतीवर “वाँल पेंटिंग” च्या माध्यमातून बाल लैंगिक अत्याचार थांबावा व मुलं सुरक्षित रहावे यासाठी संदेश देण्यात आला. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक सहभाग दर्शविला. संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी बाल लैंगिक अत्याचार विरोधी या विषयी पथनाट्याचे सादरीकरण केले. यातून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श कसा ओळखावा व असुरक्षित स्पर्श झाल्यास त्याच वेळी नाही म्हणा, सुरक्षित ठिकाणी जा व विश्वासातील व्यक्तीला सांगून या घटनेबाबत कायदेशीर पद्धतीने दाद मागा हा पथनाट्यातून संदेश देण्यात आला व याचे सादरीकरण विविध ठिकाणी करण्यात आले.

बाल सुरक्षा सप्ताह निमित्त, एफएफसीपी – मुस्कान व पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड परिसरात बाल लैंगिक अत्याचारापासून मुलांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने व बाल लैंगिक अत्याचाराच्या वास्तविकतेबद्दल लोकांना जागृत करणे आणि त्यांना बोलण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी रॅलीचे आयोजन केले. अशा प्रकरणांबद्दल न घाबरता किंवा लाज न बाळगता एफएफसीपी – मुस्कान संस्थेच्या हेल्प लाईन क्रमांक ९६८९०६२२०२ , ९११२२९९७८५ व ९११२२९९७८४ वरती संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

राज्यपाल हटवा’, शिंदे गटातून उमटला सूर; मराठी व्यक्तीला राज्यपाल पद देण्याची मागणी..


संपादक: मोईन सय्यद  / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज आणि नितीन गडकरी यांची तुलना केल्याने हे प्रकरण चांगलेच तापले असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून वेगवेगळ्या प्रकारे राज्यपालांवर टीकेची झोड उठत आहे. यापूर्वी विरोधक राज्यपालांना धारेवर धरत असल्याचे चित्र होते, मात्र आता सत्ताधारी आमदारांकडून राज्यपालांना हटविण्याची मागणी होत असल्याचे चित्र आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत सोहळ्यादरम्यान नितीन गडकरी यांची तुलना शिवाजी महाराज यांच्यासोबत केल्याने यापूर्वी संभाजीराजे यांनी राज्यपाल हटविण्याची मागणी करणार असल्याचे वक्तव्य केले होते.

आतापर्यंत संभाजी ब्रिगेड, खासदार संजय राऊत, उदयराजे भोसले, विरोधी पक्षनेते अजित पवार, आदित्य ठाकरे इत्यादी नेत्यांनी राज्यपालांना खडे बोल सुनावले होते. त्यामुळे राज्यपालांविरोधात चांगलीच वातावरण निर्मिती झाली आहे, आता थेट शिंदे गटातील आमदाराने राज्यपालांविरोधात संताप व्यक्त केला असून, राज्यपालांना राज्यातून हटविण्याची मागणी केली आहे.

शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही मागणी केली आहे. यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले, “ज्या राज्यपालांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही, ज्यांना राज्य काय आहे हे कळत नाही अशा व्यक्तीला आपल्या दिलदार राज्याच्या ‘राज्यपाल’पदी ठेवण्यात येऊ नये. हल्लीच्या राज्यपालांना कुठे पाठवायचे तिथे पाठवा परंतू महाराष्ट्राच्या मातीतील मराठी माणसालाच राज्यपालपदी बसवा”, अशी विनंती संजय गायकवाड यांनी भाजपकडे केली आहे.

यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या प्रकरणी सूचक मत व्यक्त करताना प्रकरणाची सावरासावर करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र खुद्द सहकारी पक्षातील आमदारांकडून राज्यपाल विरोधी सूर उमटत असल्याने, या प्रकरणाला निवळने सत्ताधाऱ्यांसाठी आव्हान ठरणार आहे.प्रसंगी केंद्र सरकारला देखील यामध्ये मध्यस्थता करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.