Home Blog Page 81

स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तीवेतनात दुप्पटीने वाढ..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे आता स्वातंत्र्य सैनिकांना १० हजार रुपयांऐवजी दरमहा २० हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल.

भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना याचा लाभ मिळणार आहे. या निवृत्तीवेतनात वाढ करण्याची मागणी वारंवार होत होती. यासाठी वार्षिक अंदाजे ७४.७५ कोटी रुपये इतका अधिक खर्च येईल. या निवृत्तीवेतन वाढीचा राज्यातील ६२२९ स्वातंत्र्य सैनिकांना लाभ होणार आहे. भारतीय स्वातंत्र्य लढा, हैद्राबाद मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम अशा देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी दरमहा निवृत्तीवेतन देण्याची योजना महाराष्ट्र शासनाने सन १९६५ पासून सुरु केली आहे. त्यानुसार २ ऑक्टोबर २०१४ पासून दरमहिन्याला १० हजार रुपये इतके निवृत्तिवेतन देण्यात येत होते.

 

कौटुंबिक वादातून बापाच्या डोक्यात लाकडी फळीचा फटका मारून त्यांना जागीच ठार मारणाऱ्या मुलाला पोलीसांनी ठोकल्या बेड्या..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बापाच्या डोक्यात लाकडी फळीचा फटका मारून ३१ वर्षीय मुलाने जन्मदात्या ६० वर्षीय बापालाच जागीच ठार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक हिंसाचाराची ही घटना अंबरनाथ पूर्वेतील एका चाळीत घडली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहे.

प्रकाश देविदास सूर्यवंशी असे अटक आरोपी मुलाचे नाव आहे. तर देविदास किसन सूर्यवंशी असे हत्या झालेल्या बापाचे नाव आहे.

रक्तस्त्राव झाल्याने जागीच ठार

मृत देविदास हे पत्नी आणि आरोपी मुलगा प्रकाश यांच्यासह अंबरनाथ पूर्वेकडील दत्त कुटीर चाळीत राहत होते. गेल्या काही दिवसापासून बाप लेकात घरगुती कारणावरून कौटुंबिक वाद होत होते. बाप लेकाचा पुन्हा याच वादातून १३ नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान घरातच वाद झाला. हा वाद यावेळी विकोपाला जात मुलाने घरात असलेल्या लाकडी जाड फळी उचून बापाच्या डोक्यात जोरदार फटका मारला. या जाड फळीच्या हल्ल्यात बाप जागीच जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडून त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आरोपी मुलगा पोलीस कोठडीत

दरम्यान, घटनेची माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्यात समजताच पोलीसांचे एक पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत देविदास यांचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून हल्लेखोर मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर मृतकाच्या पत्नीने मुलाविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीसांनी आरोपी मुलावर भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आरोपी मुलाला दुपारच्या न्यायालयात हजर केले असता त्याला अधिक तपासाकरिता पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे हे करीत आहेत.

केरळचे ‘बँड पथक’ ठरला ‘भारत जोडो’ यात्रेत आकर्षणाचा केंद्रबिंदू..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

लष्करी संचलनाप्रमाणे बिगुल, कवायतीची धून, ताशाचा कडकडाट आणि त्या तालावर अत्यंत शिस्तबद्ध रीतीने ‘लेफ्ट-राईट- लेफ्ट’ करत जाणारे “स्वर्गधारा बँड पथक” भारत जोडो यात्रेत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

यात्रेत या १४ जणांच्या बँड पथकाला निश्चित असे स्थान आणि ओळख आहे. सर्वात पुढे या पथकाचे संचलन असते आणि मागे त्याच तालावर पाऊले टाकत यात्रा चालते. धून कानावर येताच राहुल गांधी यांची पदयात्रा जवळ आल्याचे गावागावात, चौकात उभ्या लोकांना कळते. हे बँड पथक केरळ मधील ‘स्वर्गधारा चॅरिटेबल ट्रस्ट’चे आहे.

अनेक सार्वजनिक व खाजगी समारंभ ते करतात. त्यातून मिळणारे उत्पन्न पथकातील कर्मचाऱ्यांचे पगार आणि शिल्लक रक्कमेतून गोरगरीब मुलांना शिक्षण, गरजवंत लोकांसाठी वैद्यकीय मदत दिली जाते.

नौदलाच्या बँड पथकाच्या धर्तीवर या पथकाला खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवृत्त नौदल अधिकारी सिनोय यांनी पाच महिने लष्करी शिस्त आणि संचलनाचे धडे दिले आहेत. नौदलाप्रमाणे सफेद गणवेश, काळे बूट आणि दंडक घेऊन संचलनाचे नेतृत्व करणारा कॅप्टनही आहे.

कॅप्टनसह प्रमुख दोन वादक असे तिघेजण संपूर्ण यात्रेसोबत असतील तर उर्वरित सदस्य दर महिन्याला बदलले जातात. आतापर्यंत दोन वेळा सदस्य बदलले आहेत. लांबचा पायी प्रवास आणि सतत वाद्य वाजवत शिस्तबद्ध संचलन केल्याने शरीरावर प्रचंड ताण येत असतो, त्यामुळे यात्रेसाठी एकूण ३० जणांचे नियोजन केले आहे, असे पथकाचे प्रमुख समीर के. यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

पहाटे साडेपाच वाजता पदयात्रा सुरू होण्याच्या स्थळी ते तयार असतात. काही क्षणातच राहुल गांधी दाखल होतात. मग “सारे जहाँ से अच्छा.. ” या धूनने सलामी दिली जाते आणि पदयात्रेला सुरूवात होते. तर “जन गण मन..” या राष्ट्रगीताच्या धूनने यात्रेला अल्पविराम मिळतो.

यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन यात्रेकरूंचे निधन झाले. त्या दिवशी श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि दुखवटा पाळण्यासाठी बँड पथकाचे संचलन बंद ठेवण्यात आले होते.

कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालणाऱ्या १५० भारत यात्रींसोबत, राहुल गांधी यांचे अंगरक्षक, सीआरपीएफचे जवान, त्यांच्या भोवती राज्य पोलीसांचे ‘डी’ आकारातील सुरक्षा कड्यातील पोलीस पथक, यात्रेचे व्यवस्थान बघणारी दिल्लीची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची विशेष टीम आणि त्यांचे खास फोटोग्राफर, यांच्यासह हे बँड पथक सुद्धा न थकता आणि न थांबता मार्गक्रमण करत आहे.

 

चित्रपट अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झाले आहे. ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतल्या विलेपार्ले येथील राहत्या घरी मध्यरात्री एकच्या सुमारास त्याचे निधन झाले. सुनील शेंडे हे घरामध्ये चक्कर येऊ पडले. त्यामुळे त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. त्यांच्या पार्थिवावर पारशीवाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुनील शेंडे यांच्या पाश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुलं हृषिकेश, ओंकार आणि सुना असा परिवार आहे.

ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांनी मराठीसोबतच बॉलिवूडमधील अनेक चित्रपटामध्ये दमदार भूमिका सारकारल्या होत्या. चित्रपट आणि मालिका या माध्यमांमध्ये काम केले होते. बॉलिवूडच्या ‘गांधी’, ‘सरफरोश’ आणि ‘वास्तव’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये सुनील शेंडे यांनी काम केले होते. या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका या अत्यंत लोकप्रिय ठरल्या. तसंच, त्यांनी ‘कथुंग’, ‘मधुचंद्राची रात्र’, ‘जसे बाप तसे पोर’, ‘ईश्वर’, ‘नरसिंहा’ या हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले होते. त्यांनी साकारलेल्या भूमिकांचे खूप कौतुक झाले. ‘गांधी’ चित्रपटात त्यांनी साकारलेली छोटी भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. सुनील शेंडे यांनी डीडी दूरचित्रवाणीवरील ‘सर्कस’ मलिकेमध्ये बाबूजी (सर्कसचा मालक) ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून ते चित्रपटसृष्टीपासून दूर होते. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

 

उच्च न्यायालयाने याचिका कर्त्यालाही फटकारत ठाकरे, राऊत, देशमुखांवरील सर्व याचिका फेटाळल्या..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला मोठा दिलासा दिला आहे. निव्वळ प्रसिध्दीसाठी राजकीय हेतूने प्रेरीत उद्धव ठाकरे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. इतकेच नव्हे तर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावरील प्रसिद्धीसाठी दाखल केलेल्या याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.

न्यायमूर्ती एस.व्ही.गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस.जी.डिगे यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी हेमंत पाटील यांनी अशाचप्रकारे दाखल केलेल्या तीन याचिकांही न्यायालयाने फेटाळून लावला आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील शंभर कोटी वसुलीच्या आरोपांत उद्धव ठाकरे यांचीही तपासयंत्रणेनं चौकशी करावी, अशी मागणी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी याचिकेतून केली होती. या याचिकेतही खंडणी उकळल्याचे आरोप करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेत खंडणी उकळल्याचे आरोप केले होते. याशिवाय निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेचाही उल्लेख होता.

तसेच, हेमंत पाटील यांनी संजय राऊत यांच्या विरोधात कोविड कालावधीत औषधोपचारांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारी याचिका दाखल केली होती. संजय राऊत यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत, सुजीत पारकर यांच्यावरही या याचिकेत आरोप केले होते. पण ही याचिकाही निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा ठपका ठवला. तसेच, याचिकाकर्त्याने यात कोणतेही ठोस पुरावे, माहिती आणि कागदपत्रे दिलेली नसल्याचे निरीक्षणही नोंदवले.

याशिवाय हेमंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नबाव मलिक यांच्याविरोधातही तिसरी याचिका दाखल केली होती. माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमुळे सामाजिक सलोखा बिघडतो असा दावा याचिकेत पाटील यांनी केला होता. पण उद्धव ठाकरे यांच्यासह केलेल्या या सर्व याचिका निव्वळ प्रसिद्धीसाठी दाखल केल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने या याचिका फेटाळून लावल्या आहेत.