Home Blog Page 82

गुजरातमधील ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी च्या एकमेव आमदाराने राजीनामा देत शरद पवारांना दिला धक्का..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सध्याच्या घडीला देशात गुजरात मधील निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या तीन पक्षात मुख्य टक्कर होणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपने जोरदार मुसंडी मारत वर्चस्व कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे. तर भाजपला रोखण्यासाठी विरोधक जोर लावत आहेत.

यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादीचे गुजरातमधील एकमेव आमदार कंधाल जडेजा यांनी राजीनामा दिला आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
पोरबंदरमधील कुटियाना येथून कंधाल जडेजा यांना उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्यानंतर त्यांनी हा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. कंधाल जडेजा हे २०१२ पासून कुटियाना मतदारसंघातून निवडून येत आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत ५० टक्क्यांहून अधिक मतांनी जिंकून येत भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला होता.

राज्यसभा निवडणुकीवेळी कंधाल यांनी बंडखोरी केली होती. उमेदवारी न मिळाल्याने कंधाल जडेजा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरात प्रदेशाध्यक्षांनी दिली आहे. राज्यसभा निवडणूक आणि राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी कंधाल जडेजा यांनी पक्षादेश झुगारुन भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. कंधाल जडेजा यांनी ११ नोव्हेंबरलाच कुटियानामधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विशेष म्हणजे त्याच दिवशी राष्ट्रवादीने काँग्रेससोबत उमरेठ, नरोडा आणि देवगड बारिया या तीन जागांसाठी आघाडी केल्याचे जाहीर केले होते. पक्षाविरोधात जाऊन उमेदवारी दाखल करणाऱ्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, गुजरात विधानसभेच्या १८२ मतदार संघांसाठी निवडणुका होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. गुजरातमध्ये एकूण दोन टप्प्यात मतदान होणार असून, पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबर ला होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबर रोजी होईल.मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे.

 

देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भेटीत नेमकी काय खलबतं शिजली ?


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रालयाचा कारभार असल्याने विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मध्यंतरीच्या काळात महिलांबाबत राजकीय वर्तुळातून करण्यात आलेल्या विधानांनी गृहखात्याच्या स्वतःच्याच मंत्र्यांवर वचक नसल्याची ओरड झाली होती, ज्यामध्ये अब्दुल सत्तारांचे प्रकरण चांगलेच प्रकाशझोतात आले होते. पुन्हा एकदा हा मुद्दा नव्याने उचलून धरण्यात आला आहे, त्याच अनुषंगाने विरोधी पक्षातील महिला आमदार आणि खासदारांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती.

विरोधी पक्षातील महिलांनी राज्यातील सत्ताधारी नेते महिलांबाबत बेताल वक्तव्य करतात परंतू त्यांना गृह खात्याकडून तसेच सत्ताधारी नेत्यांकडून समज दिला जात नाही अशी तक्रार राज्यपालांकडे केली आहे. प्रसंगी गृहखात्याच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित करण्यात आले आहे. या महिला लोकप्रतिनिधींची राज्यपालांसोबत बैठक आटोपताच तातडीने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेण्यास पोहचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यात सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यापीठ कायदेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती पुढे आली असून राज्यपालांनी काही महत्वपूर्ण बाबतीत त्यांना सूचना देखील केल्याचे समजते. प्रसंगी राज्य सरकारमधील नेते मंडळींच्या बेताल वक्तव्याबाबतीत देखील राज्यपाल आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. यापूर्वी अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या विधानाने राजकीय वातारवरण तापले होते आता विरोधी पक्षातील नेते जितेंद्र आव्हाड महिलेच्या विनयभंग प्रसंगी चर्चेत आहे. त्यामुळे या सर्व स्थितीमुळे कुठेतरी महिलांबाबतीत मुद्दे राजकीय वातावरण तापवताना दिसत आहे.

 

ट्विटर ‘ब्लू टिक’ साठी भारतात पैसे मोजावे लागणार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ट्विटरची मालकी टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांच्याकडे आल्यापासून ते सातत्याने नवनवीन बदल करत आहेत. ट्विटरला विकत घेण्याचे एलॉन मस्क यांचे स्वप्न पूर्ण झाल्याने ते आता नवीन बाबींना लागू करत ट्विटरला एक आगळेवेगळे स्वरूप देण्याकरिता प्रयत्नशील दिसून येत आहे. ट्विटरची मालकी एलॉन मस्क यांच्याकडे आल्यावर सर्वप्रथम त्यांनी अनेक जुन्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली होती. नव्याने ट्विटर करिता घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये ‘ट्विटर ब्लू’ पेड सब्स्क्रिप्शन चा समावेश आहे. त्यामुळे ट्विटरवर ब्लू टिक साठी शुल्क आकारणी केली जाणार असून सुरुवातीला विविध देशात ब्लू टिक साठी वेगवेगळे शुल्क आकारण्यात येईल असे कळविण्यात आले होते.

नव्याने ट्विटर ब्लू टिक साठी ट्विटरकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत माहिती पुढे आली असून भारतात ट्विटरवर ब्लू टिक करीत मासिक ७१९ रुपये इतकी शुल्क आकारणी केली जाणार असल्याचे समजते. हे एक पेड सबस्क्रिप्शन राहणार असून यामध्ये काही नवीन सेवावैशिष्ट्यांचा देखील लाभ वापरकर्त्यांना मिळणार आहे. भारतात सुरुवातीला असा अंदाज लावण्यात येत होता की ‘ब्लू टिक’ साठी मासिक ६६० रुपये मोजावे लागतील परंतू नव्याने पुढे आलेल्या माहितीमुळे या तर्कांना पूर्णविराम लागला आहे.

भारतात पुढील एक महिन्याच्या कालावधीत ‘ट्विटर ब्लू’ पेड सब्स्क्रिप्शन सुरु केले जाणार असल्याची माहिती ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी दिली होती परंतू सध्या काही जणांना ‘ब्लू टिक’ ऍक्सेस मिळत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. यामुळे नवीन कुठल्या सेवा वैशिष्ट्यांचा अंतर्भाव ट्विटर मध्ये होणार याबाबतीत वापरकर्त्यांना उत्सुकता लागलेली आहे.

सध्या जरी ट्विटरने भारतात ७१९ रुपये इतक्या शुल्काची घोषणा केले असले तरी भविष्यात याबाबतीत काही बदल देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अनेक जणांनी भारतात ‘ब्लू टिक’ साठी आकारण्यात येणारी रक्कम अधिक असल्याचे मत व्यक्त केले आहे. प्रीमियम सेवा वैशिष्ट्यांमध्ये मोठ्या साईझचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याची सुविधा देण्यात येणार आहे, असे प्रथमदर्शी सांगण्यात आले होते.

 

महिलेकडून विनयभंगाची तक्रार दाखल होत जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी सध्या कमी न होता दिवसागणिक आणखीणच वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. यापूर्वी ठाणे येथील ‘विवियाना मॉल’ मधील चित्रपटगृहात गोंधळ घालत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना चित्रपटगृहाबाहेर हुसकावून लावले होते. प्रसंगी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. सदर प्रकरणी न्यायालयाने आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असता जामीनावर सध्या त्यांची सुटका झाली आहे. आता नव्याने आव्हाड अडचणीत आले आहे ते एका महिलेच्या विनयभंगाच्या तक्रारीमुळे, याप्रकरणी पुन्हा एकदा आव्हाडांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, कळवा खाडी पुलाचे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी जितेंद्र आव्हाड तसेच तक्रारकर्ती महिला देखील उपस्थित होती. सदर महिला ४० वर्षीय असून त्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहे. यावेळी बाजूला व्हायला सांगताना या महिलेला जितेंद्र आव्हाडांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे महिलेचे म्हणणे आहे, त्यामुळे मुंब्रा पोलीस स्थानकात जितेंद्र आव्हाडांविरोधात कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

एकंदरीतच केवळ आठवडाभरातच दुसऱ्यांदा जितेंद्र आव्हाडांवर गुन्ह्याची नोंद झाल्याने ते चांगलेच चर्चेचा मुद्दा बनले आहे. यावेळी एका महिलेने विनयभंगाचा आरोप केल्याने हे प्रकरण जितेंद्र आव्हाडांना अडचणीत आणण्याची दाट शक्यता आहे. यामुळे आव्हाडांच्या राजकीय आणि सामाजिक प्रतिमेला नक्कीच धक्का पोहचणार असून, काळिमा फासला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी राष्ट्रवादीच्या गोटातून यावर काय प्रतिक्रिया येते हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.

 

भारत जोडो, पदयात्रा नसून एक जनचळवळ; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते काश्मीर अशी सुनियोजित असलेली ‘भारत जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रातून प्रवास करत आहे. राज्यात या यात्रेचा महाराष्ट्रातून प्रवासाला प्रारंभ मराठवाडा विभागातून सुरु झाला असून देगलूर येथून सुरु झालेली ही यात्रा सध्या नांदेडला पोहोचली आहे. यात्रेदरम्यान एक दिवसाची विश्रांती घेताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि नांदेड मधील ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नुकतीच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. प्रसंगी, बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुजराती नेत्यांचे धनाजी आणि संताजी आहे.

“राहुल गांधी यांना यात्रेदरम्यान अनेक लोक येऊन भेटत आहे ज्यांचा प्रत्यक्षपणे राजकारणाशी काडीमात्र संबंध नाही तरीही त्यांच्या भावना सरकारबाबत तीव्र आहे. या सर्व बाबींचा विचार करता देशात किती अत्याचारी सरकार अस्तित्वात आहे या बाबीची कल्पना येते”, असे पटोले म्हणाले. पुढे बोलताना पटोले म्हणाले, खुद्द माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन ‘भारत जोडो’ यात्रेचे कौतुक करत आहे, त्यामुळे ही पदयात्रा नसून एक जनचळवळ बनली आहे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केले.

येत्या काही दिवसांत ही पदयात्रा शेगांव येथून प्रवास करणार आहे त्यावेळी शेगांवला होणारी सभा महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे चित्र पालटवेल असा आशावाद यावेळी नाना पटोलेंनी व्यक्त केला. यावेळी नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना बंगाल येथील निवडणुकीचा दाखला दिला, याप्रसंगी दाढी वाढविणे हा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. राहुल गांधी यांना वेळ मिळत नसल्याने ते दाढी करत नाही, मात्र देशाच्या पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या वेळी रवींद्रनाथ टागोर सारखी दाढी वाढवली होती, परंतू तिथे हरल्यावर पुन्हा जुन्या शेपमध्ये दाढी आणली. अरुणाचल प्रदेश मध्ये चीनने काही गावे बळकावली असून सरकारी संपत्ती विकल्याने मोदी रोज अडीच किलो शिव्या खातात, अशा कठोर शब्दात टीका पटोलेंकडून करण्यात आली.

एकंदरीतच ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने विरोधक राज्य सरकार आणि केंद्र सरकारला धारेवर धरण्यात कुठलीही कसर सोडताना दिसत नाही आहे. लवकरच ही यात्रा विदर्भात येणार असून यावेळी खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विदर्भातील असल्याने ते काय मत मांडतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे, विदर्भात या यात्रेला आणखी प्रतिसाद मिळण्याचा अंदाज बोलला जात आहे.