Home Blog Page 83

राहुल गांधी सोबत ‘भारत जोडो यात्रा’ मध्ये सामील झाला जनतेचा प्रचंड मोठा जनसागर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो पदयात्रा’ नांदेड जिल्ह्यातून निघून हिंगोली जिल्ह्याच्या प्रवेशद्वारापाशी आली त्यावेळेस जनतेचा प्रचंड मोठा जनसागर या यात्रेत सामील झाला होता. आदित्य ठाकरे यांनी भारत जोडो पदयात्रेमध्ये सहभागी होऊन राहुल गांधी यांची गळाभेट घेऊन शिवसेनेचा भारत जोडो यात्रेला पूर्णपणे पाठिंबा आहे हे उपस्थितांना दर्शविले. राहुल गांधी यांची काल सकाळी सहा वाजल्यापासून पदयात्रा हिंगोली जिल्ह्याच्या दिशेने सुरू झाली होती. या पदयात्रेत ज्या जिल्ह्यातून राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा जाऊ शकत नाही. त्या त्या आजूबाजूच्या जिल्ह्यातून पदयात्रेचे स्वागत करण्यासाठी पदयात्रेमध्ये सहभागी होण्याकरता लाखोंच्या संख्येने लोक सहभागी होत होते.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानाला प्रतिसाद देण्याकरता हजारोंच्या संख्येने वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोंढे येत असताना दिसत होते. लातूर हा मराठवाड्यातील एक भाग असल्याने लातूरमधूनही हजारो कार्यकर्ते या पदयात्रेसाठी येताना दिसत होते. नांदेड वरून हिंगोली येथे प्रवेश करत असताना त्या ठिकाणी भारत यात्रेचे भव्य प्रवेशद्वार उभे करण्यात आले होते. बहुतांशी लोकांनीं आपल्या पारंपारिक कला सादर करून राहुल गांधीचे स्वागत केले .कला पथके हि आपली पारंपारिक कला सादर करत होते.

कलापथकांना विचारल्यानंतर तुम्हाला कोणी बोलवले व का असे विचारले, तरीही त्यांनी सांगितले आम्ही स्वत: होऊन या भारत जोडोचे स्वागत करण्यासाठी आलेलो आहोत. राहुल गांधी यांची सर्वसामान्य माणसाबद्दलची तळमळ आम्हाला दिसत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य संगीत लोककला सादर करणारे दिसत होते. जनतेचा जो अफाट जनसागर लोटला होता हा जनसागर कोणत्त्यांयाही आमिषाला बळी पडून आला नव्हता. तर तो आपल्या देशाच्या प्रेमासाठी येथे आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रत्येकाला विचारल्यानंतर त्यांच्यामध्ये एकच भावना होती की ‘जो आम्हाला तारू शकतो असा हा आमचा नेता पायी येतोय, त्याच्या हाकेला साद देणे, त्याला प्रतिसाद देण्याची सर्वत्र भावना दिसत होती.

हिंगोलीच्या प्रवेशद्वारापासूनच महाराष्ट्रातील आघाडी सरकारमधील शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे हिंगोली पासून सहभागी झाले आणि या दोघांची गळाभेट झाली. राहुल गांधी व आदित्य ठाकरे यांची गळाभेट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. आणि आता आपल्या देशातील तरुण जागा झाला आहे यातून दिसून येत होते.

लाखोच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा मार्गावरती प्रचंड गर्दिचे लोंढे दिसत होते. खेड्यापाड्यातून आलेले असंख्य लोकं दिसत होती. आणि ह्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे हे देखील जाणवले. त्याच बरोबर या भारत जोडो यात्रेत स्वखुशीने सर्वच वयोगटातील लोक सहभागी झाले आहे हे विशेष आहे.

 

केतकी चितळेने जितेंद्र आव्हाड अटक प्रकरणात उडी घेत पोलीसांना दिले पत्र..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे येथील विवियाना मॉल मधील चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा सुरु असलेला शो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून बंद करण्यात आला होता. प्रसंगी प्रेक्षकांना जबरदस्तीने चित्रपटगृहाबाहेर हुसकावून लावण्यात आले होते. तसेच एका प्रेक्षकाला मारहाण देखील करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीतर्फे जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वात चित्रपटगृहात हा सर्व प्रकार घडवून आणल्याने याप्रकरणी काल वर्तकनगर पोलीस स्टेशनकडून जितेंद्र आव्हाडांना अटक करण्यात आली होती. दरम्यान जितेंद्र आव्हाड अटक प्रकरणात मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने उडी घेत वर्तकनगर पोलीसांना पत्र लिहिले आहे. सदर पत्र तिने आपल्या वडिलांकरवी पोलीस स्थानकात पाठविले आहे.

यावेळी पत्रात केतकीने नमूद केले आहे की, पोलीसांकडून आव्हाडांवर लावण्यात आलेली कलम पुरेशी नाही कारण चित्रपटगृहात एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती तेव्हा त्याची पत्नी देखील सोबत होती आणि तिला देखील मारहाण झाली होती. त्यामुळे कलम ३५४ जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या साथीदारांवर लावण्यात यावे अशी मागणी यावेळी केतकीने केली आहे. सदर हल्ला प्रकरण हे सुनियोजित होते त्यामुळे कलम १२० (ब) देखील लावण्याची मागणी केतकीकडून करण्यात आली आहे. हे सर्व न झाल्यास आम्ही हायकोर्टात जाऊन कलम वाढविण्याची विनंती करू असा थेट इशाराच केतकीने देऊन टाकला.

केतकी चितळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा वाद तसा जुनाच आहे, यापूर्वी केतकीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली होती परिणामी तिला जेलमध्ये सुद्धा जावे लागले होते. नव्याने आता जितेंद्र आव्हाड प्रकरणी केतकीने पुन्हा एका नव्या वादात उडी घेतल्याने हे प्रकरण कुठल्या दिशेला जाते हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.

 

फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो; संजय राऊतांचं सूचक विधान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या तीन महिन्यांनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले आहेत. बाहेर पडल्यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय कलगीतुरा अधिकच रंगण्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच शिंदे गटात दाखल झालेले खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच असून आज सकाळी त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी महाराष्ट्रातील शिंदे सरकारला लक्ष्य केलं. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांशी शक्यताही व्यक्त केली आहे.

“गजानन किर्तीकर सोडून गेल्याचं दु:ख अधिक”

“अमोल किर्तीकर कडवट शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेसोबतच आहेत. गजानन किर्तीकरांनी घेतलेल्या निर्णयात ते सहभागी नाहीत.त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. १०० दिवसांनी तुरुंगातून सुटल्यानंतर जेवढा आनंद झाला नाही, तेवढा आनंद मला अमोल आमच्यासोबत राहिल्याचा झालाय. अशाच कडवट लोकांसोबत शिवसेनेचा प्रवास पुढे जाणार आहे. आम्हाला अनेक लोक सोडून गेले. पण गजानन किर्तीकर सोडून गेल्याचं दु:ख आम्हाला जास्त आहे”, असं संजय राऊत यावेळी बोलताना  म्हणाले.

वर्तक नगर पोलीसांनी केले जितेंद्र आव्हाड यांना अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

माजी गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आज दुपारी पोलीसांनी अटक केली आहे. विवियाना मॉल मध्ये चित्रपट शो बंद पाडून प्रेक्षकाला मारहाण करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

‘हर हर महादेव’ या चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप घेत आव्हाड यांनी आपल्या समर्थकांसह चार दिवसांपूर्वी ठाण्यातील विवियना मॉल मध्ये जाऊन चित्रपटाचा खेळ बंद पाडला होता, यावेळी एका प्रेक्षकाशी कार्यकर्त्यांची बाचाबाची होऊन त्यात त्या प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी पोलीसांनी आव्हाड आणि त्यांच्या शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी नंतर मनसे ने विरोधी भूमिका घेत त्यादिवशी तो शो पुन्हा सुरू करण्यास भाग पाडले होते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच चित्रपटाचा खेळ प्रेक्षकांना मोफत दाखवला होता.

आज दुपारी या प्रकरणी पोलीसांनी आव्हाड यांना अटक केली असून सायंकाळी उशिरा पर्यंत त्यांना जामीन झाला नव्हता.

 

गजानन कीर्तिकरांचा शिंदे गटात प्रवेश; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आधीच आमदार आणि खासदारांनी साथ सोडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक झटका बसला आहे. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. गजानन कीर्तिकर हे शिवसेनेतील वरिष्ठ आणि दिग्गज नेते मानले जातात. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तिकरांची भेट घेतली होती. त्यामुळे कीर्तिकर शिंदे गटात जाणार अशा चर्चा तेव्हापासून रंगल्या होत्या. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीवरील नाराजी गजानन कीर्तिकर यांनी अनेकदा जाहीरपणे व्यक्त केली आहे. मात्र दुसरीकडे अनेकदा कीर्तिकरांनी शिंदेंचं तोंड भरून कौतुकही केलं होतं. त्यामुळे कीर्तिकर ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत जाणार का ? यावर तर्क वितर्क लढवले जात होते. अखेर आज त्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.

कोण आहेत गजानन कीर्तिकर

गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे दिग्गज नेते असून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. १९९० ते २००९ या काळात चार वेळा आमदार राहिले आहेत. शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री होते. गजानन कीर्तिकर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांचं शिंदे गटात जाण उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.