Home Blog Page 84

भातशेतीच्या जमिनीवर टाकले ‘कत्तलखाना’ चे आरक्षण! उत्तनवासीयांचा आरक्षणाला विरोध!

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या उत्तनला गलिच्छ करु नका! उत्तनच्या रहिवाशांची महापालिका प्रशासनाला विनंती

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: तब्बल पाच वर्षे उशिराने का होईना पण अखेर वादग्रस्त ठरलेला मिरा भाईंदर शहराचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या आहेत. या विकास आराखड्यात भाईंदर पश्चिमेकडील उत्तन, शिरेरोड येथील सर्वे क्रमांक 282/4 या भूखंडावर कत्तलखान्याचे आरक्षण टाकण्यात आले असून उत्तनच्या रहिवाशांचा या आरक्षणाला विरोध असल्याचे बोलले जात आहे.

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या उत्तनला आधी डम्पिंग ग्राऊंड सारखा घाणेरडा कचरा प्रकल्प दिला आणि आता त्याच परिसरात कत्तलखाना उभारण्यात येणार असून उत्तनच्या परिसरातील लोकांनाच मिरा भाईंदर महानगरपालिके कडुन असे घाणेरडे प्रकल्प का दिले जात आहेत? असा सवाल येथील नागरिकां कडून केला जात आहे.

उत्तनच्या धावगी येथील डम्पिंग ग्राऊंड मुळे आधीच येथील जनता त्रस्त झालेली आहे. या डम्पिंग ग्राऊंडमुळे संपूर्ण परिसरात घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे व त्यामुळे उत्तनच्या रहिवाशांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत. त्यातच आणखीन दत्तमंदिर कोपरा ह्या ठिकाणी मेट्रो कारशेड होणार असल्याच्या बातम्या अनेक वर्तमानपत्रात येत आहेत, MMRDA विकास आराखड्यात येथे मलःनिसारण प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. आणि आता उत्तन शिरेरोड येथे कत्तलखान्यासाठी (सर्वे नं 282/4) ही भातशेतीची जमीन संपादनासाठी लोकांना नोटिसा दिल्या असल्याचे सांगितले जात आहेत.

उत्तनमध्ये धावगी, डोगंर पायथा व शिरेरोड ह्या ठिकाणी वडीलोपार्जीत शेती व्यवसाय चालतो. उत्तन डम्पिंग ग्राऊंडच्या दूषित पाण्यामुळे तीकडची शेतजमीन नापीक झाली आहे. डंम्पीगमुळे येथील वातावरण, जमीन तसेच जल प्रदूषण देखील होत आहे. डंम्पीग ग्राऊंडचे दूषित पाणी समुद्रात जाऊन गेल्यामुळे येथील मासेमारीवर देखील विपरीत परिणाम झाला आहे. असे असताना आता उत्तनमध्ये कत्तलखान्या सारखा घाणेरडा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.

मिरा-भाईंदर शहराच्या विकास आराखड्यात यापूर्वी देखील उत्तन परिसरात कत्तलखान्याचे आरक्षण टाकण्यात आले होते परंतु ह्या कत्तलखान्याला स्थानिकांचा आधिपासुनच विरोध आहे. कारण ह्या ठिकाणी बाहेरची गुरेढोरे आणुन ईथे कापली जातील ज्यामुळे घाण आणि दुर्गंधी पसरेल. घाणेरडे पाणी शेतात व समुद्रात जाऊन जल प्रदूषण होईल अशी भिती उत्तनच्या नागरिकांमध्ये पसरलेली आहे.

उत्तन परिसरातील रहिवाशांना चांगल्या सरकारी शाळा, कॉलेज, हॉस्पिटल असावे, चांगली उद्याने असावीत अशी सर्वाची ईच्छा आहे. कोळी लोकांना बोटीतुन मासळी उतरविण्यासाठी आधुनिक पद्धतीची जेटी असावी, मासळी साठविण्यासाठी आधुनिक पद्धतीचे शीतगृह असावे, मासळी विकण्यासाठी आधुनिक पद्धतीची बाजारपेठ/ मार्केट निर्माण करण्यात यावे, मासळी सुकविण्यासाठी Fish drying yards तयार करण्यात यावेत अशा मूलभूत सुविधांची गरज असताना महाराष्ट्र शासन आणि मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासन मात्र उत्तन सारख्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसरात घाणेरडे प्रकल्प लादत असल्याने येथील नागरिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे.

शिरेरोड येथील सर्वे क्रमांक 282/4 या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या कत्तलखान्याला अनेक नागरीकांनी हरकत घेतली असून हे आरक्षण रद्द न केल्यास उत्तनच्या रहिवाशां तर्फे मोठे जन आंदोलन केले जाईल असा इशारा महापालिका प्रशासनाला देण्यात आला आहे.

भारत जोडो यात्रेला भाजपनेही पाठिंबा द्यावा; संजय राऊतांचे जाहीर आवाहन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शंभरहुन अधिक दिवसांची तुरुंगाची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाच्य खासदार संजय राऊत यांच्या वागणुकीत आणि विचारसरणीत कमालीचा बदल जाणवत आहे. तुरुंगातून सुटल्यावर पहिली प्रतिक्रिया देताना काल राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली होती तसेच केंद्रातील बडे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे विधान केले होते. नव्याने संजय राऊत यांनी भाष्य केले असून यावेळी देखील त्यांचा कल भाजपकडे दिसून आला.

येत्या काळात लोक कल्याणाचा उद्देश ठेवत आपण विविध नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचे राऊत म्हणाले, तसेच सध्या महाराष्ट्रात प्रवास करत असलेल्या भारत जोडो यात्रेचे यावेळी त्यांनी तोंडभरून कौतुक देखील केले. भारत जोडो यात्रा देशातील वैर व कटुता संपविण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. ही यात्रा एकप्रकारे चळवळ आहे. त्यामुळे भाजपने देखील भारत जोडो यात्रेला पाठिंबा द्यावा, असे विधान संजय राऊत यांनी यावेळी बोलताना केले.

एकंदरीतच राऊतांचे हे विधान अनेक जणांच्या भुवया उंचावणारे ठरणार आहे. लवकरच संजय राऊत, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे, तत्पूर्वी त्यांनी केलेले हे मोठे विधान या भेटीवर काय परिणाम करणार हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.

 

महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते रस्त्याचे आणि भूमिगत नाल्याचे भूमिपूजन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पावसाळ्यात वर्षानुवर्षे डोंबिवलीतील नांदीवली येथील स्वामी समर्थ मठ परिसरात पाणी तुंबून तेथील परिसरातील लोकांच्या घरात व दुकानात पाणी शिरून हाल होत असतात व आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होत असते.

कल्याण लोकसभेचे लाडके खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रस्त्याच्या कामांसाठी एमएमआरडीए कडून मंजूर करून घेतलेल्या रुपये ४४५ कोटी पैकी ह्या विभागातील ‘गजानन चौक ते नांदीवली नाला’ हा रस्ता, ‘स्वामी समर्थ मठ ते मानपाडा रोड साईबाबा मंदिर’ रास्ता व ‘नांदीवली नाला ते लाईफ केअर हॉस्पिटल’ या परिसरात भूमिगत नाला बांधण्यात येत असून त्याचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते नियोजिलेले आहे. तरी परिसरातील समस्त नागरिकांनी या भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहण्यास कल्याण उप-तालुका प्रमुख उमेश बाबू पाटील व उप-शहर प्रमुख अमित बनसोडे यांच्या तर्फे सर्वांना निमंत्रण देण्यात येत आहे.

देशाच्या राजधानीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला; नेपाळमध्ये भूकंपाचे केंद्रस्थान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील बहुतांश भागात मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले ही घटना तब्बल दोनवेळा झाल्याने भीतीने अनेक नागरिक घराबाहेर पडले होते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.३ इतकी नोंदवण्यात आली आहे. रात्रीला झालेल्या या भूकंपाचे केंद्रस्थान नेपाळमध्ये मणिपूर या ठिकाणी जमिनीच्या आत १० किलोमीटर खोल असल्याची माहिती आहे. त्यामुळे नेपाळ मधील काही भाग देखील या भूकंपाने हादरला असून एकूण ६ जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी आहे.

काल रात्री ९ वाजताच्या सुमारास उत्तर प्रदेशातील लखनऊ व आजपासच्या भागात प्रथम भूकंपाचे धक्के जाणवले होते ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.९ इतकी होती. त्यानंतर काही तासानंतर मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास राजधानी दिल्ली व उत्तर भारतात जास्त तीव्रतेचे भूंकपाचे धक्के जाणवले. भारतात झालेल्या भूकंपामध्ये अद्याप कुठलीही जीवितहानी किंवा मालमत्ता हानी झाल्याची नोंद नाही. मात्र नेपाळच्या बाबतीत ही जीवितहानी करणारी नैसर्गिक आपत्ती ठरली.

भारतात दोनदा भुकंपाचे धक्के जाणवले असले तरी नेपाळ अवघ्या २४ तासांत तीनवेळा भूकंपामुळे हादरला असून सध्या तिथे झालेल्या मालमत्ता हानीबाबत कुठलीही माहिती समोर आली नाही. यापूर्वी नेपाळने भूकंपांची सर्वात मोठी हानी सहन केली होती, ज्यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला होता तसेच प्रचंड मालमत्ता हानी झाली होती.

 

माजी मंत्री अनिल परब यांचा ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणी गुन्हा दाखल होऊन अंतरिम जामीन मंजूर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे माजी मंत्री अनिल परब यांच्यावर दापोलीत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. दापोलीतील मुरुड इथे बांधलेल्या रिसॉर्ट प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असून प्रत्यक्ष बांधकाम पूर्ण होण्याआधीच ग्रामपंचायतीशी संगनमत करून त्यांनी कर आकारणी करून शासन आणि ग्रामपंचायत यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दापोली पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी रूपा दिघे यांनी याबाबत पोलीसांत फिर्याद दिली असून अनिल परब यांच्यासह मुरुड ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच सुरेश तुपे आणि ग्रामसेवक अनंत कोळी हेदेखील सह आरोपी आहेत.

दापोलीतील ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि आमदार अनिल परब यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि ३४ नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी अनिल परब यांना आज अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. खेड सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे.

दापोलीतील ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणी अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अनिल परबांवर शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्याचा आरोप आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात फसवणूक करत बनावट कागदपत्रांच्या आधारे एक रिसॉर्ट बांधल्याचा आरोप होत आहे. २०१७ मध्ये अनिल परब यांनी या रिसॉर्टसाठी भूखंड विकत घेतला आणि कोरोनादरम्यान लॉकडाऊनच्या काळात या शेतीच्या भूखंडावर रिसॉर्ट बांधण्याचे काम केले.

मिळालेल्या माहितीनुसार, जमीन खरेदी केल्यानंतर दोन वर्षांनी २०१९ मध्ये याची नोंदणी झाली आणि त्यानंतर २०२० मध्ये ही जमीन मुंबईतील केबल ऑपरेटर आणि शिवसेनेचे माजी खासदार रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ही जमीन १.१० कोटी रुपयांना विकण्यात आली. दरम्यान किरीट सोमय्यांकडून हे रिसॉर्ट पाडण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या मते रिसॉर्टच्या बांधकामातून पर्यावरण नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे परब यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणी ‘ईडी’ने (अंमलबजावणी संचालनालय) २६ मे रोजी अनिल परब यांच्या सात ठिकाणी छापेमारी केली. तसेच त्यांच्या साथीदारांच्या घरांवरही छापे टाकून चौकशी केली. दरम्यान परब यांनी जमीन खरेदीपासून ते बांधकामात अनियमितता केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. मात्र परब यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत सोमय्या यांच्यावर मानहानीचा दावाही दाखल केला आहे.