Home Blog Page 94

कोनगाव पोलीसांनी घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा केला पर्दाफाश..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोनगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार चार जणांच्या आंतरराज्यीय टोळीला अटक करण्यात कोनगाव पोलीसांना यश आले असून त्यांच्याकडून कोनगाव हद्दीतील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांसह हैद्राबाद येथील वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला आहे.

दिनांक २५ फेब्रुवारी रोजी भिवंडी कल्याण रोडवरील पिंपळघर येथील शगुण टेक्स्टाईल मार्केट मधील साडी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील अडीच लाख रुपयांची रोकड घरफोडी केली होती. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार कोनगाव, ठाणे, नालासोपारा, वसई विरार, खालापुर जिल्हा रायगड या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून वाहनांची माहिती गोळा करून तांत्रिक माहीती व गुप्त बातमीदारांमार्फत संशयित आरोपी हुसैन रफिक शेख (वय:३० वर्षे), रशीद रफिक शेख (वय: ३२ वर्षे), दोन्ही राहणार अहमदाबाद हायवे जवळ, चिंचोटी, तालुका वसई, तरबेज दाऊद शेख (वय: ३९ वर्षे) राहणार साकी विहार रॉड, पवई व राफीकुद्दीन झहीरुद्दीन सैय्यद (वय: ३२ वर्षे) राहणार चंद्रानगर, बल्लागुडा, इस्माईलनगर, हैदराबाद, तेलंगणा राज्य यांना अटक करून त्यांचेकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे. कोनगाव पोलीसांनी गुन्ह्यात वापरलेली कार व रोख रक्कम असा ५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या सोबत याच आरोपींनी ७ फेब्रुवारी रोजी कोनगाव पोलीस स्टेशन हद्दीत हरी ओम स्वीट मार्ट दुकानाचे शटर उचकटून घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

मनसे प्रमुखांचे आगामी निवडणुकांसाठी ‘एकला चलो रे’ भूमिकेवर ठाम धोरण..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

येत्या काळात महापालिका निवडणुकांची सर्वच पक्षांना प्रतीक्षा लागलेली असताना स्थानिक पातळीवर पक्षाला मजबुती देण्याचे प्रयत्न राज्यातील सर्वच पक्षांद्वारे करण्यात येत आहे. मनसेच्या गोटातून महत्वाची बातमी पुढे आली असून राज ठाकरे यांनी आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, याबाबतीत सूचना देखील त्यांनी सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना केल्या आहे.

नुकतीच मुंबईच्या रंगशारदा येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत पक्षप्रमुख राज ठाकरे यांची बैठक पार पडली यावेळी पुन्हा एकदा ‘एकला चलो रे’ अशी भूमिका राज यांनी मांडली. प्रसंगी मार्गदर्शन करताना विविध विषयांवर चर्चा देखील झाली तसेच सज्ज होण्याचा सल्ला मनसैनिकांना देण्यात आला. सध्याच्या राजकीय स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला, तसेच सध्याच्या व याआधीच्या सरकारला जनता वैतागली असून वेगळा पर्याय देण्यावर यावेळी चर्चा झाल्याचे समजते.

तुम्ही तुमचे कार्य करा विजयापर्यंत नेण्याची जबाबदारी माझी आहे असा ठाम विश्वास देखील यावेळी पदाधिकारी व राज्यभरातील कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी दिला. सध्या शिवसेना पक्षाचे विभाजन झाल्याने तसेच महाविकास आघाडी सरकार सत्तेबाहेर पडल्याने येत्या काळातील निवडणुकांमध्ये मनसेला यश गाठले अधिक कठीण जाईल, कारण भाजप तसेच शिंदेची बाळासाहेबांची शिवसेना एकीकडे तर दुसरी महविकास आघाडी असे कडवे आव्हान राज ठाकरेंच्या मनसेसमोर राहणार आहे.

मुंबई गुन्हे शाखेने दाऊद टोळीशी संबंधित पाच जणांच्या मुसक्या आवळत केली मोठी कारवाई..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कुख्यात गुंड आणि तस्कर तसेच मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार तसेच प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम सध्या भारताबाहेर आश्रय घेऊन आहे तरी त्याचे हस्तक व या गँगशी संबंधित गुंड सध्याही भारतात सक्रिय आहेत. अशाच गुंडांवर धडक कारवाई करत त्यांना अटक करण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. सदर व्यक्तींना खंडणी प्रकरणी अटक झाल्याचे समजते, दाऊदचा हस्तक छोटा शकील तसेच रियाज भाटीला अटक केल्यानंतरची ही मोठी कारवाई समजण्यात येते. यावेळी मुंबई गुन्हे शाखेने एकूण पाच व्यक्तींना अटक केली असून त्यांची नावे पापा पठाण, अमजद रेडकर, फिरोज लेदर, अजय गंडा, समीर खान अशी आहेत.

अटक केलेले सर्व गुंड हे सराईत खंडणीबहाद्दर असून वर्सोवा येथील एका व्यावसायिकाची त्यांनी ३० लाखाची कार तसेच साडेसात लाख रुपयाची रोकड लुटत खंडणी वसूल केली होती. पोलिसांनी खाक्या दाखवताच चौकशीतून सर्व माहिती पुढे आली आहे, सध्या चौकशी सुरु असून आणखी महत्वपूर्ण माहिती या पाच गुन्हेगारांकडून प्राप्त होण्याची शक्यता आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

  

ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर एसटी कर्मचारी संपावर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी मागच्या वर्षी म्हणजे २०२१ ला ऐन सणासुदीच्या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते. अनेक महिने हा संप चालल्याने राज्यातील जनेतेचे मोठे हाल झाले होते. मोठ्या शिताफीने सरकारनं हा संप मिटवण्यासाठी काही एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या आणि आश्वासनं दिली होती.

मात्र, आता यावर्षी पुन्हा एसटी कर्मचारी संप करण्याच्या तयारीत असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी पुन्हा संप करण्याची शक्यता आहे. यामागचं कारण म्हणजे, एसटी महामंडळातील प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा पगार रखडला आहे. या महिन्याची १० तारीख उलटली तरीही त्यांना पगार मिळालेला नाही.

याशिवाय सरकारने औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आणि सरकारने उच्च न्यायालयाला दिलेली हमी पाळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप सरकारवर होत आहे. याशिवाय एसटी खात्यातील चालक, वाहक आणि यांत्रिक कर्माचाऱ्यांचाही निव्वळ पगार आहे.

त्यामुळे कामगारांचे पीएफ, विमा, घराचे हफ्ते थकले आहेत. या सगळ्या भोंगळ कारभारामुळे मुख्यमंत्र्यांबद्दल कामगारांत तीव्र नाराजी आहे. ही नाराजी व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या न्याय-हक्कांसाठी एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलन आणि संपाच्या पावित्र्यात आहेत अशी माहिती मिळत आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी मोदी मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मोदी मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. कॅबिनेट बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस दिला जाणार असून, ११.२७ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना १,८३२ कोटी रुपयांचा उत्पादकता लिंक्ड बोनस दिला जाणार आहे. याची कमाल मर्यादा १७,९५१ रुपये असेल असे ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

बोनसच्या निर्णयासह आजच्या बैठकीत तेल वितरण कंपन्यांना २२,००० कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान देण्यासह मंजूरी देण्यात आली आहे. जगभरात एलपीजीच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे सामान्यांनावर आर्थिक ताण पडत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी आणि वाढत्या किमतींचा बोजा सामान्यांवर न पडण्यासाठी तेल विपणन कंपन्यांना २२,००० कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील नागरिकांवर पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमतींचा बोजा पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पत्रकार परिषदेत कॅबिनेट मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, गुजरातमधील कांडला येथे दीनदयाल बंदर प्राधिकरणाअंतर्गत कंटेनर टर्मिनल आणि बहुउद्देशीय कार्गो बर्थ बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सुमारे ६ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. याशिवाय पूर्वोत्तर राज्यांमध्ये पायाभूत सुविधा आणि इतर सामाजिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पीएम- डीवाईन योजना मंजूर करण्यात आली आहे. ही योजना चार वर्षांसाठी (२०२५-२६ पर्यंत) असेल. केंद्रीय मंत्रिमंडळाने बहु-राज्य सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, २०२२ मंजूर केले आहे, जे बहु-राज्य सहकारी संस्था अधिनियम, २००२ मध्ये सुधारणा करण्यासाठी आहे. यामध्ये ९७ व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदींचा समावेश असेल असे कॅबिनेट मंत्री अनुराग ठाकूर या बैठकीत म्हणाले.