Home Blog Page 96

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ‘संमत’ साहित्य संमेलनाचे आयोजन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘नॅशनल एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘सरस्वती विद्या भवन’ संकुलाच्या हिरक महोत्सव आणि भारताच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ‘ संमत ‘अर्थात संस्कृत,मराठी व तमिळ साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे साहित्य संमेलन मुलुंड येथील ‘एनईएस इंटरनॅशनल स्कूल’ (स्वप्ननगरी) याठिकाणी १५ व १६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात प्राचीन काळातील संत साहित्य, संत कवयित्री, त्यापुढील काळातील संयुक्त महाराष्ट्रातील शाहिरी परंपरा, गांधी भगतसिंग यांची विचारसूक्ते, दलित साहित्य, स्त्रीवाद आणि या संदर्भात महाभारत, तमाशा मधील स्त्रियांचे मूल्यमापन, भारतीय संविधान आणि आदिवासींचे विश्वव्यापी अधिकार या विषयांबरोबरच मराठीतील जैन साहित्य, विस्थापितांचे साहित्य, बालसाहित्य, ग्रामीण साहित्य, वैज्ञानिक दृष्टिकोन युक्त साहित्य, वंचितांची रंगभूमी या साहित्य प्रवाहांवरही प्रकाश टाकण्यात येणार आहे.

या बरोबरच तमिळ साहित्यात प्रचलित असणारे साहित्यिक ‘करन कारकी‘, ‘पुथिया माधवी‘ यांचा प्रत्यक्ष परिचय करून घेण्याची संधी तमिळ भाविकांना या संमेलनामुळे प्राप्त होणार आहे अशी माहिती समुहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर.वरदराजन यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

 

सुरूवातच राष्ट्रगीताने होणार टपाल विभागाच्या कामकाजाची..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कुठल्याही कार्यक्रमाची सुरूवात ही राष्ट्रगीताने होते पण शासकीय कार्यालयात कर्मचारी आल्यावरच कामकाजाची सुरुवात होते पण नागपूरात असे एक सरकारी कार्यालय आहे जेथे कामकाजाची सुरुवात प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीताने होते.

नागपुरातील (जीपीओ) जनरल पोस्ट ऑफिस, टपाल विभाग आहे जिथे येथील कामकाजाची सुरुवात ही प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीताने होते. या कार्यालयाच्या कामकाजाची सुरुवात सकाळी १० वाजताची आहे. मात्र कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी निर्धारित वेळेच्या १५ मिनिटा अगोदरच कार्यालयात पोहोचतात आणि त्यानंतर सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पोस्टमन एकत्रित येऊन प्रतिज्ञा आणि राष्ट्रगान गाऊनच आपल्या कामकाजाला सुरुवात करतात. त्यांचा हा नित्यक्रम असून गेल्या १२ वर्षांपासून अविरतपणे हे सुरू आहे.

 

कम्युनिस्ट पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीला..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

एकेकाळीचे कट्टर दुश्मन असणारे कम्युनिस्ट पक्ष आणि शिवसेना आज चक्क एकत्र आले, अंधेरी पोट निवडणुकीत पाठिंबा देण्याच्या निमित्ताने कम्युनिस्टांनी थेट आज मातोश्री गाठली.

एकेकाळी मुंबई वर वर्चस्व असलेल्या कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्यासाठी शिवसेनेने आपले सर्वस्व पणाला लावले होते, त्यातूनच पुढे कॉम्रेड कृष्णा देसाई यांचा खून ही झाला होता, त्या आरोपात शिवसैनिक तुरुंगातही गेले होते.

मात्र काळाच्या ओघात चित्र पूर्णपणे पालटले असून कट्टर दुश्मन आणि ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी अशी ख्याती असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आणि बाळासाहेबांच्या उभ्या आयुष्यात कधीही न घडलेली गोष्ट आज घडली.

आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही असे आठवडा भरापूर्वीच स्पष्ट करणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला अंधेरी पोट निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील हिंदुत्व कट्टर विरोधक कम्युनिस्ट पार्टीच्या शिष्टमंडळाने मातोश्री गाठली आणि त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

 

सिनेतारक आमिर खानच्या जाहिरातीवरून वादंग..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या काही काळापासून विविध कारणांमुळे लोकांच्या टिकेचा धनी ठरत असलेला आमिर खान आता एका जाहिरातीवरून अडचणीत आला आहे. ‘लालसिंग चढ्ढा’ या चित्रपटावरून त्याच्यावर उठलेला टिकेचा धुरळा खाली बसत नाही तोवरच आता कियारा अडवाणी सोबत त्यांने नुकत्याच केलेल्या एका जाहिरातील हिंदू लग्न प्रथांमध्ये विरोधाभास दर्शवणारा प्रसंग चित्रित केल्याबद्दल त्याला ट्रोल गेले जात आहे.

फक्त ५० सेकंदांच्या एका व्यावसायिक बॅंकेच्या या जाहिरातीत आमिर खान आणि कियारा अडवाणीचे लग्न होते आणि तो घर जावई म्हणून तिच्या सोबत सासरी येतो असे दृश्य दाखवण्यात आले आहे. यावेळी धान्याने भरलेले माप ओलांडून तो सासरच्या घरी गृहप्रवेश करतो असे दाखवण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीत या विधी स्त्रीया करतात त्यामुळे काही राजकीय नेत्यांनी आणि धर्मरक्षकांनी या प्रसंगावर आक्षेप घेत आमिर खानवर टिकेची झोड उठवली आहे.

मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या जाहिरातीचा जोरदार निषेध केला असून आमिर खानने हिंदुंच्या रीतिरिवाजांशी खेळण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला आहे. ‘द काश्मिर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील या जाहिरातीबाबत ट्विट करून प्रश्न उपस्थित केला आहे.

 

उध्दवची मशाल सापडली वादाच्या भोवऱ्यात..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उद्धव ठाकरेंना मशाल निवडणूक चिन्हं देण्यात आल्यामुळे समता पार्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. “मशाल चिन्हं पुन्हा समता पार्टीला द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे.

जर उद्धव ठाकरेंना दिलेले मशाल हे चिन्हं त्वरीत काढले गेले नाही तर समता पार्टी सुप्रीम कोर्टात जाईल असा इशारा समता पार्टीचे अध्यक्ष उदय मंडल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.