Home Blog Page 11

*किलबिल शाळेचा वाद विवाद स्पर्धेत तृतीय क्रमांक* .

अहमदपूर:-
मासूम शेख

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त महात्मा फुले विद्यालय अहमदपूर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदरील स्पर्धेमध्ये किलबिल शाळेतील इयत्ता आठवीतील कुमारी शर्वरी बालासाहेब बयास व प्रेरणा माधव लोंढे या विद्यार्थ्यांच्या गटाने ऑनलाइन शिक्षण पद्धती ही शिक्षणास तारक की मारक या विषयावर वाद-विवाद स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून तृतीय क्रमांक मिळवला. तसेच तुषार बळीराम मुसळे व रुद्राक्ष शिवशंकर होनराव यांनी सहभाग घेतला. त्याबद्दल शाळेच्या वतीने संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले प्राचार्य संतोष पाटील उपप्राचार्य धर्मसिंग यांच्या वतीने सदरील विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन करण्यात आले

*महात्मा फुले हेच मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचे जनक – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार*

अहमदपूर:-
मासूम शेख

जागतिक सामाजिक विषमतेचे भान असलेल्या महात्मा फुले यांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी बहुजनांना व स्त्रियांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचे जनक असून पुढे हाच विचार समोर ठेवून राजर्षी शाहू महाराजांनी शाळा सुरू केल्या आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली, असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी डॉ. मारोती कसाब व डॉ. संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी पुढे बोलतांना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की , महात्मा फुलेंवर तत्कालीन परिस्थितीसह शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राचा प्रभाव ही तेवढाच होता. त्याचबरोबर थॉमस पेन च्या राइट्स ऑफ थॉट्स या ग्रंथामुळे महात्मा फुले यांनी आपले जीवन समाज सुधारण्यासाठी वाहून घेतले. आपण महात्मा फुले महाविद्यालयाचे पाईक आहोत त्यांनी ज्याप्रमाणे मुक्ता साळवे सारखी विद्यार्थी घडविली त्या पद्धतीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी घडवून फुलेंना आपण आदरांजली वाहिली पाहिजे. त्याबरोबर सामाजिक विषमतेच्या निर्मूलनाचे कार्य फुलेंचा विचार समोर ठेवून केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या मनोगतात डॉ. संतोष पाटील म्हणाले की, आधुनिक भारताच्या जडणघडणीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले होते त्यांनी विचारातून नव्हे तर आपल्या कृतीतून बहुजनांना गुलामगिरी मुक्तीचा मार्ग दाखविला. यावेळी डॉ. मारोती कसाब यांनीही मार्गदर्शन केले ते म्हणाले की, सनातनी विचारधारेच्या ज्या सात बंदी बहुजनावर होत्या त्यापैकी एक ज्ञानप्राप्तीची बंदी होती. ही बंदी उठविण्याचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले आणि मुक्ता साळवे सारख्या विद्यार्थिनी त्यांनी घडविल्या. महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते तर ते इतिहासाचे सत्यशोधक होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि पहिली शिवजयंती त्यांनी सुरू केली, असेही ते म्हणाले. तसेच उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी महात्मा फुलेंच्या अखंडाचा संदर्भ देत स्वलिखित काव्यातून महात्मा फुलेंना आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार संस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी प्रो .डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, प्रो. डॉ. नागराज मुळे, डॉ. प्रशांत बिरादार, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. किरण गुट्टे, प्रा. प्रकाश गायकवाड, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, वामनराव मलकापूरे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*बाधित शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा करावेत तसेच ईकेवायसी करुन घ्यावे- तहसीलदार उज्वला पांगरकर यांचे आवाहन*

अहमदपूर:-
मासूम शेख

अहमदपूर तालुक्यातील सर्व अतिवृष्टी /पूर बाधीत शेतकर्‍यांनी लवकर विनाविलंब करता आवश्यक ते कागदपत्रे जमा करावेत तसेच ईकेवायसी करुन घ्यावी असे आवाहन तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माहे सप्टेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी / पूर यामुळे बाधित झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी शेतकर्‍यांना अनुदान मदत सन 2024 मध्ये एकुण बाधिक शेतकरी संख्या 57404 पैकी 45420 बाधीत शेतकर्‍यांच्या याद्या डीबीटी पोर्टलव्दारे अपलोड करण्यात आल्या आहेत. तसेच बाधीत शेतकर्‍यांना व्हीके नंबर प्राप्‍त झाल्यानंतर ईकेवायसी केल्यानंतर तपासणी करुन शासन स्तरावरुन अशा शेतकर्‍यांना मदत देण्याची प्रक्रिया चालू आहे. 45420 अपलोड पैकी 36015 या शेतकर्‍यांनी ईकेवायसी केली असुन 9405 शेतकरी यांची ईकेवायसी करणे प्रलंबित आहे. सदरील शेतकर्‍यांनी विनाविलंब बाधीत शेतकरी यांनी तात्काळ ईकेवायसी आपल्या जवळच्या महा ई सेवा केंद्रावरुन करुन घ्यावी. तसेच शिल्‍लक असलेल्या बाधीत शेतकर्‍यांनी आपले आधार क्रमांक, बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, आयएफ सी कोड, मोबाईल नंबर, इ. संबंधीत तलाठी यांच्याकडे तात्काळ जमा करावे. तसेच बाधीत शेतकर्‍यांनी डीबीटी पोर्टलव्दारे याद्या अपलोड झाल्यानंतर, बाधीत शेतकर्‍यांना व्हीके नंबर प्राप्‍त होईल. त्यानंतर ईकेवायसी केल्याची खात्री करुन शासन स्तरावरुन आपणास मदत देण्यात येत असते याची नोंद घ्यावी.
सदरील प्रक्रिया शासनाने सुचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलव्दारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यासाठी या कार्यालयाकडून बाधीत शेतकर्‍यांच्या याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत. पुढील प्रक्रिया शासन स्तरावरुन संबंधित लाभार्थी यांचे खातेवर जमा करण्याची प्रक्रिया चालु आहे. तरी राहिलेले उर्वरीत 11984 बाधीत शेतकर्‍यांनी आपले आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, आयएफसी कोड, मोबाईल नंबर इत्यादी संबंधीत तलाठी यांच्याकडे तात्काळ जमा करावे.

*निवडणुक कार्य उत्‍तमरित्या पार पाडल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतिने सौ.मंजुषा लटपटे, मनिष कल्याणकर, उज्वला पांगरकर, संतोष लोमटे यांचा सत्कार संपन्न*

अहमदपूर:-
मासूम शेख

236 विधानसभा अहमदपूर – चाकुर मतदार संघ निवडणुक कार्य उत्‍तमरित्या पार पाडल्याबद्दल येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतिने निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सौ. मंजुषा लटपटे, उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष कल्याणकर, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उज्वला पांगरकर, मुख्याधिकारी संतोष लोमटे यांचा सत्कार करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, 236 विधानसल अहमदपूर – चाकुर मतदार संघ निवडणुक प्रक्रिया सुरु झाल्यापासून दोन्ही ट्रेनिंगचे कार्य, पोस्टल मतदान, दिव्यांग मतदान इत्यादी निवडणुकीचे कार्य उत्‍तमरित्या पार पाडल्याबद्दल येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतिने निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सौ. मंजुषा लटपटे, उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष कल्याणकर, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उज्वला पांगरकर, मुख्याधिकारी संतोष लोमटे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष अहमदपूर तालुका अध्यक्ष प्रा. विश्‍वंभर स्वामी, सचिव शिवाजी गायकवाड, कोर्याध्यक्ष उदयकुमार गुंडीले, संघटक डॉ. बालाजी गोविंदराव कारामुंगीकर, जेष्ठ पत्रकार दिनकर मद्येवाड, सहसचिव बालाजी तोरणे पाटील, उपाध्यक्ष प्रा. मारोती बुद्रूक पाटील, बालाजी पारेकर, महादेव महाजन, धम्मानंद कांबळे, संदिप गुंडरे, मासुम शेख आदींची उपस्थिती होती.
यावेळी सत्काराला उत्‍तर देताना निवडणुक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे म्हणाल्या की, निवडणुक कार्य उत्‍तम व पारदर्शी होण्यासाठी माझ्या सर्व टिमने उत्‍तम कामगिरी केली आहे या सर्वांचे मोलाचे योगदान आहे. पोलिस प्रशासनानेही आम्हास चांगले सहकार्य केले. सदरील सत्कार आम्हास नविन पुढिल कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळते असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव शिवाजी गायकवाड यांनी केले. तर यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष कल्याणकर, तहसीलदार उज्वला पांगरकर, मुख्याधिकारी संतोष लोमटे, प्रा. विश्‍वंभर स्वामी आदींनी मनोगत व्यक्‍त केले.
कार्यक्रमाचे सुत्रचंलन डॉ. बालाजी कारामुंगीकर यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी मानले.

*महात्मा फुले महाविद्यालयात स्व. अशोकराव पाटील एकंबेकर यांना अभिवादन*

अहमदपूर:-
मासूम शेख

येथील महात्मा फुले महाविद्यालयात किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे माजी अध्यक्ष स्वर्गीय अशोकराव पाटील एकंबेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या स्वर्गीय अशोकराव पाटील एकंबेकर यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी हे होते तर प्रो. डॉ.अनिल मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय अशोकराव पाटील एकंबेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी स्व. अशोकराव पाटील एकंबेकर यांच्या जीवन व कार्यावर यथोचित मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बी.के. मोरे यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी डॉ. सतीश ससाणे , प्रो.डॉ. नागराज मुळे , डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. संतोष पाटील , प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, शिवाजी चोपडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.