Home Blog Page 118

‘टाटा’ समुह कंपनी कडून ‘मेड इन इंडिया’ आयफोनचे उत्पादन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या व्यावसायिक कंपन्यांपैकी एक म्हणजे टाटा कंपनी. जमशेदजी टाटा यांनी १८६८ मध्ये स्थापन केलेला, टाटा समूह हा एक जागतिक उपक्रम आहे, ज्याचे मुख्यालय भारतात आहे, ज्यामध्ये दहा वर्टिकलमध्ये ३० कंपन्या आहेत. टाटा कंपनीबाबत सध्या एक चर्चा सुरू आहे. स्मार्टफोन युजर्समध्ये आयफोनची क्रेझ किती आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. यामुळेच टाटा सन्स लवकरच भारतात आयफोन तयार करू शकते. टाटा समूह यासाठी ‘ऍपल इंक’चे तैवानी सप्लायर विस्ट्रॉन कॉर्पशी चर्चा करत असल्याचे म्हटले जात आहे.

टाटा समूह आयफोन बनवणारी पहिली भारतीय कंपनी ठरणार !

टाटा समूहाला भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात स्वावलंबी बनवायचे आहे. अशा परिस्थितीत ‘टाटा ग्रुप’ आणि ‘ऍपल इंक’ यांच्यातील हा करार झाल्यास आयफोन बनवणारी पहिली भारतीय कंपनीचा चीनला आव्हान देण्याचा मोठा प्रयत्न असेल. यामुळे टाटा समूह आयफोन बनवणारी पहिली भारतीय कंपनी ठरणार आहे.
त्याचबरोबर यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला तसेच भारतीय कंपनीला चालना मिळेल.
भारताची लोकसंख्या पाहता येथे भविष्यात आयफोनच्या मार्केटला मोठा वाव आहे. हे लक्षात घेऊन टाटा समूहाने आता भारतातच आयफोन निर्मिती करण्याचा विचार सुरू केला आहे.

ऍपल इंक ही कंपनी भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या एकत्रित उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्सुक आहे. त्यासाठी ही कंपनी टाटा समूहाच्या संपर्कात असून लवकरच टाटा आणि ऍपल कंपनीमध्ये एक महत्त्वाचा करार होण्याची शक्यता आहे.

भारताला याचा फायदा होऊन चीनला दणका बसणार ?

भारतात आयफोन बनवल्यास देशाला अनेक फायदे होतील. भारत आयफोन बनवणाऱ्या चिनी कंपन्यांना स्पर्धा देऊ शकेल आणि यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील चीनचे वर्चस्व कमी होण्यास मदत होईल. यासोबतच ‘ऍपल इंक’नंतर इतर परदेशी कंपन्या देखील भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्योग स्थापन करण्यासाठी आपली पावले उचलतील, ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला नवीन शक्ती मिळेल.

यासोबतच आयफोन भारतात बनवल्याने देशात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच, जेव्हा आयफोन भारतातच बनवले जातात, तेव्हा बाहेरून आयात करण्यावर कोणताही कर लागणार नाही आणि त्यामुळे भारतीय बाजारपेठेतही आयफोन स्वस्त मिळू शकतात. टाटा समूहाने भारतात आयफोन निर्मिती सुरू केल्यास चिनी कंपन्यांना मोठा दणका बसू शकतो. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रात भारताला चीनवर अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही.

 

कर्जवाटप करताना नवीन उद्योजकांचे खच्चीकरण केल्यास बँकांवर होणार कायदेशीर कारवाई – उद्योगमंत्री उदय सामंत


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सांस्कृतिक उपराजधानी असे नावलौकिक असलेल्या डोंबिवलीत ‘सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट’ च्या माद्यमातून आणि एमआयडीसी च्या सहकार्याने ‘इंजिनिअर्स डे’ च्या निमित्ताने सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित एका कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे उपस्थित होते.

सर्व कागदपत्राची पुर्तता केलेल्या नवीन युवा उद्योजकाला जर बँक कर्ज देण्यासाठी वारंवार हेलपाटे मारण्यास भाग पाडत असेल व त्याचे खच्चीकरण करत असेल तर अशा युवा उद्योजकांच्या पाठीशी एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकार ठाम उभे असून अशा बँकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी कार्यक्रमात दिला.

तर गेल्या अडीच वर्षात किती प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले याची मी उद्या यादीच जाहीर करतो असे देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. याच कार्यक्रमात पुढे बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला शब्द दिला आहे की उद्योजकांच्या प्रगतीसाठी व त्यांना बळ देण्यासाठी तुम्ही जो शब्द द्याल तो मी दिला आहे असे समजेन व आपण तो पूर्ण करू असे सांगितले. एक संकल्प करत असल्याचे सांगत महाराष्ट्रातील उद्योजकाला कुठलाही त्रास होणार नाही हे उद्योग खात्यातील अधिकाऱ्यांनी आपली जबाबदरी समजून काम केले पाहिजे त्यावर आमचे नियंत्रण देखील असेलच . उद्योजकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी उद्योजकांची एक समिती स्थापन केली जाईल व लवकरच त्यावर सरकार च्या माध्यमातून निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

‘कामा’ संघटनेतील उद्योजकांना भेटणारे उदय सामंत हे पहिले उद्योगमंत्री

कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (कामा) ही संघटना १९५८ पासून अस्तित्वात असून डोंबिवली एमआयडीसी येथे कार्यरत आहे. कामगार किंवा उद्योजकांच्या असोसिएशनचे प्रश्न मंत्रालयाच्या केबिनमध्ये बसून सोडवण्यापेक्षा प्रत्यक्षात असोसिएशनच्या कार्यालयात बसून सोडवणे महत्त्वाचे आहे. मंत्री त्यांच्या घरातला आहे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. या उद्देशाने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज कामा संघटनेला भेट दिली. मात्र कामा संघटनेला त्यांच्या कार्यालयात येऊन भेट देणारे उदय सामंत हे पहिले उद्योग मंत्री ठरले आहेत. “कालपासून जे सारखे टीका करत आहेत त्यांनी सांगावं की ते कितीवेळा या ठिकाणी आले ? त्यामुळे नुसती टीका करण्यापेक्षा आपली जबाबदारी स्वीकारली तर काम सोपे होते. तीच जबाबदारी घेत मी त्यांच्या कार्यालयात त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आलो आहे.” असे ते बोलताना म्हणाले.

कामगारांना भविष्यात न्याय देण्यासाठी योग्य भूमिका एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी कामा संघटनेच्या भेटीदरम्यान दिले. यावेळी कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी, कमल कपूर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अमबलगन उपस्थित होते व त्यांनी उदय सामंत यांना विघनहर्ता श्री गणेशाची मूर्ती देत कोरोना कालावधी नंतरचे उद्योजकांचे सगळे विघ्नांचे निराकारण करावे याकरिता साकडे घातले.

तत्कालिन मंत्र्यांनी येथील कंपन्या स्थलांतरित करण्याचा जो निर्णय घेतला होता तो नेमका काय आहे ते तपासावे लागेल . यासंदर्भात येथील उद्योजकांशी बोलावे लागेल. जर खरोखर यात तथ्य असेल तर पाऊल उचलावे लागेल. वेदांताची हाय कमिटीची मीटिंग सहा महिन्यांपूर्वी लावणे गरजेचे होते पण ती मीटिंग लावली गेली नाही. मुख्यमंत्र्यांनी ती मीटिंग दोन महिन्यांपूर्वी लावली. मात्र आधीच सहा महिने त्यांना उशीर केल्याने त्यांनी प्रतिसाद दिला नाही. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ येथील बंद झालेले कारखाने गुजरातला जाऊ देणार नाही. जर काही कारखाने आजारी झाले असतील तर त्यांना पुन्हा नव्याने ऊर्जा देण्याचे काम प्रशासन व सरकारतर्फे करण्यात येईल. ‘गर्व से कहो हंम हिंदू है’ हा नारा मुख्यमंत्र्यांनी आता अचानक दिलेला नाही तर हा नारा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आधीच दिला होता, मात्र गेल्या अडीच वर्षात हा नारा काही जण विसरले आहेत असे ते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांदरम्यान म्हणाले.

जाहिरात होर्डिंग्ज पालिकेने ताब्यात घेऊन थकबाकीदार ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: मीरा भाईंदर शहरात विविध ठिकाणी महापालिकेने जाहिरात होर्डिंग्ज उभारली आहेत, ती चालविण्यासाठी मात्र खाजगी ठेकेदारांना देत आपली जबाबदारी झटकून टाकल्याने लाखों रुपयांचा महसूल बुडाला असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी केला आहे.

ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे महापालिकेचे लाखों रुपयांचे नुकसान होत असताना थकबाकी वसुलीसाठी कोणतेही प्रयत्न न करता पालिका प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे नागणे म्हणाले.

एकीकडे न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्याच्या कडेला, झाडांवर, विजेच्या खांबांवर जाहिरात करणे कायदेशीर गुन्हा आहे, महासभेत तसा ठराव संमत झाला आहे.

असे असताना देखील विनापरवानगी जाहिरातबाजी करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई पालिका प्रशासनाकडून केली जात नाही वा राजकीय दबावाखाली कार्यक्रम पार पडल्यानंतर बॅनर उतरवले जातात.

सदर होर्डिंग्ज वर ठेका पद्धतीच्या नावाखाली ठेकेदार मालकीहक्क दाखवत मनमानी कारभार करीत असल्याचे प्रकाश नागणे यांनी सांगितले.

एका विशिष्ट राजकीय पक्षाला झुकते माप देत हेच ठेकेदार पालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत असल्याने त्या सर्वांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याकडील लाखोंची थकबाकी कायदेशीर मार्गाने वसूल करण्यात यावी तसेच शहरातील सर्व होर्डिंग्ज महापालिकेने ताब्यात घेऊन ठेकेदारी पद्धत बंद करावी.

शहरातील जाहिरातदारांना दिलासा देत नियमानुसार दरपत्रक ठरवून न्यायालयाच्या निर्देशानुसार अधिकृतपणे परवानगी देण्यात यावी.

सदर कामकाज पालिका प्रशासना मार्फत करण्यात यावे अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडे केली आहे.

आमिर खान च्या घरावर ‘ईडी’ ने छापा मारत केले १७ कोटी रुपये जप्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोलकात्यात ‘ईडी’ने मोठी कारवाई केली आहे. कोलकाता मधला व्यापारी आमिर खानच्या घरात ‘ईडी’ला मोठं घबाड सापडलं असून त्याच्या घरातून तब्बल पाच ट्रंकमध्ये १७ कोटी रुपये इतकी कोट्यावधीची रोकड जप्त करण्यात आली आहे. व्यापारी आमिर खान याच्या ‘गार्डन रीच’ निवासस्थानी ‘ईडी’ने काल सकाळी छापा टाकला. पाच ट्रंकमध्ये ही रोकड ठेवण्यात आली होती. शनिवारी सकाळी पैशांची मोजणी सुरु केली आणि रात्री उशीरापर्यंत मोजणी सुरुच होती. ‘ईडी’ अधिकाऱ्यांबरोबर केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही तैनात करण्यात आली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या रकमेत ५०० रुपयांच्या नोटांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. याशिवाय काही २००० आणि २०० रुपयांच्या नोटा सुद्धा होत्या. प्रिवेंशन ऑफ मनी लॉण्ड्रींग अॅक्ट अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. फेडरल बँकेच्या अधिकाऱ्यांनी मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे कोलकाता इथल्या पार्क स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये १५ फेब्रुवारीला एफआयआर च्या आधारे आमिर खान आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

‘ईडी’ने दिलेल्या माहितीनुसार आमिर खान ‘गेमिंग ऍप’च्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत होता. त्याने ई-नगेट्स नावाचं एक मोबाईल गेमिंग ऍप लॉन्च केलं होतं. सुरुवातील या गेमिंग ऍपच्या माध्यमातून त्याच्या युजर्सना चांगली बक्षिसं देण्यात आली. युजर्सच्या वॉलेटमध्ये पैसे पाठवण्यात आल्याने युजर्सचा विश्वास वाढला आणि त्यांनी ऍपमध्ये पैसे गुंतवण्यास सुरुवात केली.

या ऍपची प्रसिद्धी वाढत गेल्याने मोठ्या प्रमाणावर युजर्सने पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. त्यामुळे मोठी रक्कम गोळा झाली. त्यानंतर अचानक ऍपद्वारे पैसे काढण्यावर बंदी घालण्यात आली. इतकंच नाही तर सर्व डेटा ऍप सर्व्हरवरुन हटवण्यात आला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं युजर्सच्या लक्षात आलं. युजर्सची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली आहे याची तक्रार दाखल करण्यात आली त्यामुळे ‘ईडी’ ने सदर कारवाई केली.

गृहमंत्रालयातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी लवकरच जाहीर होणार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

चातकासारखी बदल्यांची वाट पहाणाऱ्या आणि वारंवार हुलकावणी मिळत असल्याने नैराश्याच्या मोडमध्ये आलेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्र्यांकडून कोणत्याही क्षणी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भाने राज्यभरातून गेलेले सर्व अहवाल लक्षात घेता १२ सप्टेंबर किंवा त्यानंतर कोणत्याही दिवशी बदल्यांची यादी जाहिर केली जाऊ शकते. शिर्षस्थ पातळीवरून या माहितीला दुजोरा मिळाला आहे.

२०२० नंतर राज्यात कधी नव्हे एवढा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा बदलीचा हा वादग्रस्त विषय ठरला आहे. बदलीच्या निमित्ताने कोट्यवधींची डील झाल्याचा जोरदार आरोप झाल्याने आणि या आरोपाची केंद्रीय संस्थांकडून कसून चाैकशी झाल्याने गेल्या दोन वर्षांत अधिकाऱ्यांच्या बदलीचा विषय टांगणीवर ठेवला असल्यानेच राज्यात प्राधान्य मिळाले. परिणामी एकाच ठिकाणी नियुक्त मुदतीपेक्षा जास्त कार्यकाळ काम करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांचा तीव्र हिरमोड झाला आहे.

सेवाकाळ पूर्ण झाल्यामुळे अनेक पोलीस अधिकारी आपल्या बदलीच्या ऑर्डची वाट बघत आहेत. मात्र, विशिष्ट राजकीय भूमीकेमुळे बदलीची यादी निघायला तयार नाही. या यादीच्या प्रतिक्षेत अनेक अधिकारी ‘ओव्हर सर्व्हीस ड्यू’ (नमूद कालावधीपेक्षा अधिक सेवा) झाले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणच्या अधिकाऱ्यांची ही स्थिती आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात पहिले गृहमंत्री, अनिल देशमुख यांच्या रुपात दुसरे तर आता परत देवेंद्र फडणवीसांच्या रुपातच तिसरे गृहमंत्री दिले आहे. त्यामुळे पोलीस दलात नागपूरचे नाव गृहमंत्र्यांचे शहर म्हणूनही घेतले जाते. अशा या शहरात काही अधिकाऱ्यांचा सेवाकाळ २०२१ मध्येच पूर्ण झाला. त्यामुळे ते वर्षभरापासून बदलीच्या आदेशाची वाट बघत आहे. नुकतीच गणेशोत्सवाची सांगता झाली. दोन आठवड्यानंतर नवरात्रोत्सव आणि दसऱ्याचा बंदोबस्त सुरू होईल. त्यानंतर हिवाळी अधिवेशन, दिवाळीचाही बंदोबस्त लागेल. परिणामी आता नाही तर एकदम दसरा-दिवाळी नंतरच बदल्यांची यादी काढावी लागेल. ते ध्यानात घेऊन सोमवारी १२ सप्टेंबरपासून पुढच्या कोणत्याही दिवशी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची जंबो यादी जाहिर केली जाणार असल्याचे समजते. खास सूत्रांच्या माहितीनुसार, गृहमंत्रालयातून बदली प्रक्रियेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्याही क्षणी प्रतिक्षेतील अधिकाऱ्यांना आनंदाची बातमी देऊ शकतात, असेही सूत्रांचे सांगणे आहे.

१३ पैकी ९ अधिकाऱ्यांना प्रतिक्षा

उपराजधानीत १० डीसीपी (उपायुक्त) आणि अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त तसेच पोलीस आयुक्त असे एकूण १३ वरिष्ठ अधिकारी आहेत. यापैकी सहआयुक्त अस्वती दोरजे, उपायुक्त चिन्मय पंडित, संदीप पखाले आणि चेतना तिडके हे वरिष्ठ अधिकारी सोडता सर्वांचाच सेवाकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे सर्वांना बदलीच्या आदेशाची प्रतिक्षा आहे. काही अधिकारी प्रतिनियुक्तीवरही जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

आयुक्तांना एक्स्टेंशन ?

राज्यात मुंबईनंतर सर्वाधिक व्हीआयपींच्या आगमनांची वर्दळ असलेले शहर म्हणूनही नागपूरचे नाव घेतले जाते. त्यामुळे येथे सलग बंदोबस्ताचा ताण असतो. त्यात नागपूरचा वाढता क्राईम रेट पाहता येथे सेवा देण्यास फारसे कुणी उत्सूक नसतात. येथील गुन्हेगारी वाढल्याची ओरड होत असली तरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे प्रयत्न चांगले आहेत. ते लक्षात घेता त्यांना आणखी काही महिने एक्स्टेंशन मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.