Home Blog Page 134

‘शिवसंग्राम’ संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महासंचालकांना आदेश..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना दिलेले आहेत.

मराठा समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळीच प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी या मृत्यची सखोल चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले होते.

त्यानुसार आज त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ याना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.

 

भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रदेश कार्यालयात जल्लोषात स्वागत; मुंबई भाजपा अध्यक्ष मा. आशिष शेलार यांचा सत्कार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

पावसांच्या धारात, वाद्यांच्या जल्लोषात आणि घोषणांच्या दणदणाटात भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात बुधवारी स्वागत केले. मुंबई भाजपाचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष शेलार यांचेही कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला की, मा. बावनकुळे व मा.शेलार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत भाजपा आगामी काळात मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवेल.

भाजपाचे मावळते प्रदेशाध्यक्ष व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या स्वागत समारंभास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री बबनराव लोणीकर, संभाजी पाटील निलंगेकर, हर्षवर्धन पाटील, आ. राणा जगजितसिंह, आ. नितेश राणे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. श्रीकांत भारतीय, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. उमा खापरे यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मा. बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला एकविसाव्या शतकात देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला राज्यातील प्रत्येक बूथवर ५० युवा वॉरिअर्स उभे करायचे आहेत. या २५ लाख युवा वॉरिअर्सच्या जोरावर आगामी २०२४ च्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठे यश मिळवायचे आहे. आपल्याला आगामी काळात मुंबई महापालिका जिंकायची आहे. सर्व निवडणुकांमध्ये भाजप पक्षच नंबर एकचा राहील यासाठी मेहनत करायची आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या यशाची परंपरा टिकवायची आहे.

भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मा. बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले.

मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, चंद्रशेखर बावनकुळे सामान्य पार्श्वभूमीतून पुढे आले आहेत. भाजपाचा अध्यक्ष किंवा मुख्यमंत्री होण्यासाठी घराण्याची पार्श्वभूमी नव्हे तर पक्षातील मेहनत आणि गुणवत्ता आवश्यक असते. पक्षामध्ये नेतृत्वावर विश्वास ठेऊन श्रद्धेने काम करत रहावे याचे बावनकुळे हे उदाहरण आहे. मेहनत घेणारे नेतृत्व राज्याचे अध्यक्ष म्हणून मिळाले आहे.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाने मा. आशिष शेलार यांच्यावर जबाबदारी दिली असून ते पक्ष नेतृत्वाच्या विश्वासाला पात्र ठरतील, असे मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. मुंबई महानगरपालिकेवर विजयाचा झेंडा लावल्याशिवाय थांबणार नाही, असा निर्धार मा. आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये समावेश झाल्याबद्दल मा. देवेंद्र फडणवीस यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचे मुंबई विमानतळावर कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी व मा.आशिष शेलार यांनी विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतीस्थळ, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आणि चर्चगेट येथील अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा येथे अभिवादन केले.

 


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. यापूर्वी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि गोविंदा संघांसाठी घेतलेल्या निर्णयांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुबार मदत केली जाईल. राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एस.टी. बस मधून मोफत प्रवास देण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सहकार मंत्री अतुल सावे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात जिरायती शेतीसाठी १० हजार प्रति हेक्टर ऐवजी १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर, बागायती शेतीसाठी २७ हजार रुपये प्रति हेक्टर आणि २५ हजार रुपये प्रति हेक्टर करण्यात आली आहे. बारमाही शेतीसाठी आता हेक्टरी ३६ हजार रुपये झाले आहेत. २ हेक्‍टरवरून ३ हेक्‍टरवर आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात जवळपास दुप्पट मदत होईल. शेतकर्‍यांची गय केली जाणार नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय लागू करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जातील, असेही शिंदे म्हणाले.

शेतकऱ्यांना वीजदरात सवलत

जून २०२१ पासून उच्च दाब व उच्च दाब उपसा जलसिंचन योजनांच्या शेतकर्‍यांना प्रति युनिट २ रुपये १६ पैसे प्रती युनिट इतकी सवलत कायम आणि लघुदाब जलसिंचन ग्राहकांनासुद्धा जून २०२१ पासून नवीन सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वीज वितरण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून महावितरण कंपनीने ३९ हजार ६०२ कोटी रुपये आणि बेस्टचे ३ हजार ४६१ कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात आला आहे.

तसेच वीज वितरणातील हानी १५ टक्केपर्यन्त कमी करून ग्राहकांसाठी प्रिपेड / स्मार्ट मीटर याचा १ कोटी ६६ लाख ग्राहकांना फायदा ग्राहकांना होणार आहे. ग्रामीण गृहनिर्माण योजनांतील पात्र परंतु भूमीहीन लाभार्थीना जागा देण्यासाठी सवलती देण्यात आल्या आहेत. यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या धर्तीवर १ हजार रुपये इतकी मुद्रांक शुल्क रक्कम निचित, मोजणी शुल्कामध्ये ५० टक्क्यांपर्यंत सवलत २ मजली ऐवजी ४ मजली इमारत बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

गोविंदा पथकांना विमा संरक्षण

अनेक गोविंदा पथकांना सरकारने विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी होत होती, या मागणीनुसार आता गोविंदा पथकातील सदस्यांना सरकारकडून १० लाखांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. या विमा संरक्षणाचा हप्ता सरकार भरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच भंडारा जिल्ह्यातील महिलेवर झालेल्या अत्याचारप्रकरणी राज्य राखीव पोलीस दलाच्या आयुक्त श्रीमती रागसुधा यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला असून या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालविण्यात येणार आहे. शक्ती कायद्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

मागील सरकारने घेतलेले निर्णय रद्द केलेले नाहीत. त्या निर्णयाचा आढावा घेऊन पूनर्विलोकन करण्यात येत आहे. अत्यावश्यक व प्राधान्य क्रमानुसार निर्णयांची अंमलबजावणी केली जाईल. राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना ३ टक्के महागाई भत्ता देण्यात येणार आहे. वाढीव महागाई भत्त्याचा लाभ ऑगस्ट २०२२ पासून रोखीने देण्यात येणार आहे. आता हा महागाई भत्ता ३४ टक्के होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या भागाचे ९५ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी पंचनामे केल्याच्या तक्रारी असल्याने ते पूर्णत्वास जात आहेत. याबाबत तातडीने मदत केली जाईल. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. हे सरकार जनतेच्या हिताचे असून कोणत्याही कामाला स्थगिती दिलेली नसून त्याचा आढावा घेऊन महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बैठकीत स्पष्ट केले.

 

डोंबिवलीतील सम्राट चौकात कोरोनाच्या दिर्घकाळानंतर ‘दीपेश म्हात्रे फाउंडेशन’ तर्फे २०२२ च्या भव्यदिव्य दहीकाला उत्सवात कर्णबधिर मुलांना दहीहंडी फोडण्याच्या प्रथम मान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

डोंबिवली पश्चिम येथील पंडित दीनदयाळ रोड वरील सम्राट चौकात यंदा दोन वर्षानंतर दिनांक १९.०८.२०२२ रोजी होत असलेल्या दहीकाला उत्सवात यंदा माजी नगरसेवक व युवा नेता ‘दीपेश म्हात्रे फाउंडेशन’ यांच्यातर्फे “स्वराज्य दहीहंडी महोत्सव २०२२” मध्ये यंदाचे खास वैशिष्ट्य म्हणून दहीहंडी फोडण्याचा प्रथम मान कर्णबधिर मुलांना मिळणार आहे. कोरोना काळात सर्वत्र निर्बंध घालण्यात आल्यामुळे सर्वच उत्सव बंद पडले होते ते निर्बंध आता शिथिल करण्यात आल्यामुळे यंदा गोविंदा पथकांसाठी राज्य शासनाने दहा लाखांचा विमा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर गोविंदा पथकांमध्ये आनंदाचे वातावरण असून राज्यात सगळीकडे ‘जन्माष्टमी व दहीकाला उत्सव’ जोमात आणि जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे असे चित्र आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे देखील या उत्सवासाठी डोंबिवलीत उपस्थित राहणार असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच या उत्सवाला ‘सोनी’ मराठी वाहिनीवरील “महाराष्ट्राची हास्यजत्रा” या लोकप्रिय कॉमेडी मालिकेतील कलाकार गौरव मोरे व शिवाली परब हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.

विशेष म्हणजे ‘दीपेश म्हात्रे फाउंडेशन’ यांच्यातर्फे यंदा भव्यदिव्य अश्या तीन दहीहंड्या ठेवल्या असून एक डोंबिवलीच्या नागरिकांसाठी व मंडळांसाठी, दुसरी मुंबईच्या मंडळांसाठी व तिसरी महिला पथकांसाठी विशेष दहीहंडी असणार आहे. आतापर्यंत डोंबिवली-कल्याण मधील ३५ गोविंदा पथकाने आपले नाव नोंदीवले आहे तसेच ठाणे, मुंबई व आसपासच्या शहरातून मिळून एकूण १०० पथकं अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

कोरोना काळातील गेल्या दोन वर्षात नागरिकांना कोणत्याही उत्सवात भाग घेता आला नव्हता म्हणून ‘दीपेश म्हात्रे फाउंडेशन’ ने हा उपक्रम राबविण्याचा मानस केल्याचे तसेच कर्णबधिर मुलांना वेगळेपणा वाटू नये याकरिता ‘संवाद’ कर्णबधिर शाळेच्या अध्यक्षा व संचालिका श्रीमती. अपर्णा आगाशे यांच्याशी बोलून त्यांनी कर्णबधिर मुलांना पहिली प्रतिकात्मक दहीहंडी फोडण्याचा मान देत असल्याने डोंबिलीतील पहिली भव्यदिव्य प्रतिकात्मक दहीहंडी फोडण्याचा सम्मान कर्णबधिर मुलांचा असणार आहे असा हा आगळावेगळा उपक्रम राबवून सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न असून सामाजिक संदेश देत असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या उत्सवादरम्यान वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना पश्चिमेकडील सम्राट चौकाच्या पुढे जाण्या-येण्यासाठी गैरसोय होऊ नये याकरिता वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्याशी नियोजन करून सम्राट चौका पर्यंत येणारे रस्ते वाहतुकीसाठी एकदिशा करण्यात आले आहेत व वाहतुकीचे अधिक योग्य नियोजन करण्यासाठी व पोलीस यंत्रणेवर कुठेही ताण पडू नये म्हणून ‘दीपेश म्हात्रे फाउंडेशन’ तर्फे ३० वॉर्डन नेमण्यात आल्याचे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.

विशेषतः हा ‘जन्माष्टमी व दहीकाला २०२२’ उत्सव साजरा करत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ‘सेफ्टी चे सगळे प्रीकॉशन’ घेत लहान मुलं जी वरच्या थरांवर चढतात त्यांना ‘सेफ्टी हार्णेस’ देखील लावत असून सर्व नियमांचे पालन करून हा दहीकाला उत्सव हा मोठा हिंदू सण साजरा करत असल्याचे माजी नगरसेवक व युवानेते दीपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेतील उपस्थित पत्रकारांना सांगितले.

 

मराठा समाजाच्या न्याय्य हक्काच्या मागण्या पूर्ण करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विनायक मेटे यांना श्रद्धांजली..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मराठी समाजाला आरक्षण, सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत, हा दिवंगत विनायक मेटे यांचा ध्यास होता. सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, अरबी समुद्रातील शिवस्मारक यासाठी स्व.मेटे यांनी सतत प्रयत्न केले. मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी, त्यांच्या उन्नती, प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. मराठा समाजाच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, हीच दिवंगत विनायक मेटे यांना श्रद्धांजली अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहिली.

शिवसंग्राम चे नेते दिवंगत विनायक मेटे यांचे दि.१४ ऑगस्ट राजी अपघाती निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज येथे शाशकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, महसूल मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, यांच्यासह खासदार डॉ.प्रीतम मुंडे, खासदार इम्तियाज जलील यांची प्रमुख उपस्थिती होती.

विनायक मेटे यांचे अपघाती निधन ही अविश्वनिय, मनाला न पटणारी, मनाला चटका लावणारी, अप्रिय, दुःखद, वेदनादायी घटना असल्याचे सांगून श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काही माणसं कुटुंबापूरते मर्यादित नसतात, त्यांची समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असते. मराठा समाज व शिवसंग्राम हा त्यांचा परिवार होता, त्यांचा एकाच ध्यास होता तो म्हणजे मराठा समाज आरक्षण सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, अरबी समुद्रातील शिवस्मारक यासाठी दिवंगत मेटे यांनी सतत प्रयत्न केले. त्यासाठी जे जे करावं लागेल, ते सरकार करेल हा सरकारचा शब्द आहे.आमचे सरकार मराठा समाजाला नक्की न्याय देईल. दिवंगत मेटे देह रूपाने नसले तरी त्यांचे कार्य, संघर्ष चिरंतन आहे. त्यांच्या जाण्याचं दुःख पचवण्याची शक्ती, ताकद देव त्यांच्या कुटुंबियांना देवो. त्यांच्या दुःखात सहभागी आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

विनायक मेटे यांचे अपघाती निधन हा आपल्यायासाठी दुःखद प्रसंग असून, आज आपल्याला शब्द सुचत नाहीत. ही आपली वैयक्तिक हानी असल्याच्या भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा समाज, ऊसतोड कामगारांचे प्रश्न अरबी समुद्रातील शिवस्मारक असे एक एक विषय मार्गी लावण्याचा दिवंगत मेटे यांचा प्रयत्न होता. शिवसंग्राम मधून त्यांनी सामान्य तरूणाला जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अचानक जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी जे काम हाती घेतले, ते पूर्ण करण्याचा संकल्प आज करत आहोत, असे सांगून हा प्रसंग सहन करण्याची शक्ती त्यांच्या वैयक्तिक व शिवसंग्राम च्या कुटुंबियांना ईश्वराने द्यावी. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, सामाजिक न्याय मंत्री सामाजिक अधिकारा करिता मंत्रालय असल्याने व महाराष्ट्रातील मराठा व बहुजन समाजाचे प्रश्न आग्रहाने मांडणारा नेता म्हणून माझा मेटेंशी दीर्घ काळापासून संपर्क होता. विविध प्रश्न आणि मराठा आरक्षणाबाबत त्यांच्या भूमिकेला आमचा कायमच पाठिंबा होता या अनुषंगाने त्यांनी मांडलेल्या प्रश्नासाठी पुढच्या काळात नक्कीच कार्य केले जाईल असे रामदास आठवले म्हणाले.

अंत्यसंस्कारास सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अंत्यसंस्कार प्रसंगी आमदार संजय शिरसाट, आमदार धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार सुरेश धस, आमदार नमिता मुंडदा, आमदार श्वेता महाले, आमदार संदीप क्षिरसागर, आमदार संजय दौड, आमदार सुमनताई पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी राज्यमंत्री सुरेश नवले, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार सैय्यद सलीम, माजी आमदार रविकांत तुपकर, चंद्रशेखर बावनकुळे, पृथ्वीराज साठे, रमेश आडसकर, रमेश पोकळे, विविध पक्ष, सामाजिक संघटनांचे प्रमुख, समाजातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यासाठी देशाच्या विविध भागातून मोठया संख्येने लोकप्रतिनिधी व नागरिक आलेले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी दिवंगत मेटेंच्या पत्नी ज्योतीताई, कुटुंबीय, आप्त परिवार व मातोश्री यांची भेट घेऊन सांत्वन केले आणि त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित मंत्रिमंडळ सदस्यांनी देखील पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. अंत्यसंस्काराचा विधी शोकाकुल वातावरणात, कार्यकर्त्यांच्या घोषणाच्या गजरात झाला.