Home Blog Page 136

४८ कोटींची खोटी बिले देणाऱ्यास अटक; महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने केलेल्या कारवाईत जी.एस.टी. ची ४८ कोटी रुपयांची खोटी बिले देणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. जी.एस.टी. ची खोटी बिले देत असल्याचा संशय असलेल्या  मे. विवांता मेट्ल कॉर्पोरेशन या व्यापाऱ्यांसंबंधी राज्य वस्तू व सेवा कर विभागाने विशेष तपास हाती घेतला होता. मे. विवांता मेट्ल कॉर्पोरेशनचा मालक इम्तियाझ अब्दुल रेहमान सय्यद, (वय -३५ रा. चिता कॅम्प, मानखुर्द, मुंबई) याने कुठल्याही वस्तू किंवा सेवेची खरेदी-विक्री न करता सुमारे ४८ कोटी किमतीच्या खोट्या बिलांवर आधारीत, सुमारे ८.७० कोटी रुपयाचे इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच (ITC), त्याला देय असलेल्या जी.एस.टी रकमेवर, ८.७० कोटी रुपयांची खोटी वजावट घेतली आणि याच स्वरुपाची खोटी बिले इतर कंपन्यांना जारी केली. ही रक्कम देखील सुमारे ९ कोटीच्या घरात आहे.

अस्तित्वात नसलेल्या अशा बोगस कंपन्यांकडून बिले घेऊन कर भरणे टाळणे, हा वस्तू व सेवाकर कायद्यांतर्गत गुन्हा आहे. या पार्श्वभूमीवर दि. ०५ ऑगस्ट २०२२ रोजी, वस्तू व सेवा कर विभागाने, इम्तियाझ अब्दुल रेहमान सय्यद यास अटक करून न्यायालयात हजर केले. मुंबईचे अतिरिक्त महानगर दंडाधिकारी यांनी त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्या अन्वेषण-ब शाखेच्या प्रमुख व सहआयुक्त, श्रीमती. सी.वान्मथी (भा.प्र.से), यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्यकर उपायुक्त श्रीमती. रुपाली बारकुंड यांच्या पर्यवेक्षणात ही मोहीम पार पडली. याप्रकरणी सहायक राज्यकर आयुक्त श्री. दिपक दांगट, पुढील तपास करत आहेत.  सहायक राज्यकर आयुक्त – ऋषिकेश वाघ, रामचंद्र मेश्राम, सुजीत पाटील आणि अन्वेषण – ब विभागातील राज्यकर निरीक्षकांनी या विशेष मोहीमेत सक्रिय सहभाग घेतला. वर्ष २०२२-२३ मधील या ३३ व्या अटकेद्वारे महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाने, खोटी बिले आणि खोट्या कर वजावटी घेणाऱ्या कसुरदार व्यापाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.

भाषण देण्याआधीच प्रसिद्ध भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्यावर चाकूने भोसकून हल्ला..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमधील एका व्याख्यानादरम्यान चाकूने भोसकून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. न्यूयॉर्कमधील इन्स्टिट्यूटमध्ये एका व्यक्तीने स्टेजवर चढून रश्दींना धक्काबुक्की केली आणि हल्ला केला. या घटनेनंतर रश्दी यांना हवाई ऍम्ब्युलन्स ने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. दरम्यान, सलमान रश्दी यांना ‘द सैटेनिक वर्सेस’ या पुस्तकाच्या लेखनावरून जिवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या होत्या. धमक्या मिळाल्यानंतर त्यांच्यावर तब्बल ३३ वर्षांनी हल्ला करण्यात आला.

मुंबईत जन्मलेले आणि बुकर पारितोषिक विजेते सलमान रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकावर १९८८ पासून इराणमध्ये बंदी घालण्यात आली आहे. कारण अनेक मुस्लिम धर्मीय याला निंदा मानतात. इराणचे दिवंगत नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी रश्दी यांच्या मृत्यूबद्दल बक्षीस देण्याचा फतवा काढला होता. रश्दींची हत्या करणाऱ्याला ३ मिलियन डॉलरचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

रिपोर्ट्सनुसार, रश्दी लेक्चर देण्यासाठी स्टेजवर पोहोचताच एका व्यक्तीने त्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. या व्यक्तीच्या हातात चाकूसारखे धारदार शस्त्र असल्याची माहिती समोर आली आहे. धक्काबुक्की केल्यानंतर त्याने रश्दी यांच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर रश्दी यांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून हल्ल्यामागील कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

 

एकनाथ खडसे यांचा ‘मंत्रिपदासाठी वरिष्ठांची भेट घ्या’ असा पंकजा मुंडे यांना सल्ला..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील नवे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला आता गती मिळत असताना भाजप व शिंदे गटाच्या काही आमदारांचा शपथविधी झाला आहे. मंत्रिमंडळाच्या शर्यतीत काही जणांना सुगीचे दिवस आले आहेत, तर काही माजी मंत्र्यांना डावलल्याने आता अंतर्गत धुसफूस निर्माण होताना दिसत आहे. भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांची देखील एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागेल असा अंदाज होता, परंतू तो साफ खोटा ठरला. पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी दिसून येत आहे, स्वतः पंकजा मुंडे यांनी काल याबाबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता भाजपचे माजी नेते व हल्लीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांना खास सल्ला दिला आहे.

एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांना मंत्रिपद हवे असल्यास त्यांनी थेट पक्षातील वरिष्ठांना भेटण्याचा सल्ला दिला आहे, यावेळी मत व्यक्त करताना एकनाथ खडसे म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांच्या जवळच्या लोकांना तसेच ओबीसींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना नेहमीच डावलण्याचा प्रकार घडला आहे. माझ्याबाबतीत सुध्दा नेमका हाच प्रकार झाला होता, त्यामुळे पंकजा यांनी थेट पक्षातील वरिष्ठांना भेटून आपली भूमिका स्पष्ट करावी असे सुचवले.

एकंदरीतच नाराज नेत्यांनी आता नाराजीचा सूर आवळणे सुरु केले असून येत्या काळात पंकजा मुंडे व्यतिरिक्त एकनाथ शिंदे गटातील काही आमदार त्यांची नाराजी व्यक्त करतात की ‘जैसे थे’ भूमिका घेतात हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.

 

कोनगाव पोलिसांची धडक कारवाई; सापळा लावत ५५ लाख ४० हजार रुपयांचा राज्यातील प्रतिबंधित गुटका केला जप्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी मुंबई-नाशिक महामार्गावरील बासुरी उपहारगृहाजवळ अन्न व औषध प्रशासनासह संयुक्त कारवाई करत राज्यात प्रतिबंधित असलेला ५५ लाख ४० हजार रुपयांचा गुटखा गुरुवारी जप्त केला आहे. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात भादवि कायदा कलम क्र. १८८, २७२, २७३, ३२८, ३४, २६(२), २७, २३, २६(२)(४), ३०(२)(अ), ५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आसिफ रहीम (२८ वर्षे) याला अटक केली आहे.

मुंबई नाशिक महामार्गावरून तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांना आणि अन्न व औषध प्रशासनास मिळाली होती. त्यानुसार पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सापळा रचत ‘बासुरी उपहारगृह’ येथून वाहतूक करणारा एक कंटेनर अडविला. त्यामध्ये ५५ लाख ४० हजार रुपये किंमतीचा राज्यात प्रतिबंधित असलेला १५० गोणी गुटखा पथकास आढळून आला. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी कंटेनरचा चालक आसिफ रहीम याला अटक केली आहे व हा गुटखा कुठून आणला गेला व तो कोणाला विक्री करण्यात येणार होता याचा पुढील तपास सुरू आहे असे कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त मिरा-भाईंदर शहरात महापालिका प्रशासना तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन!

स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात महिलां करिता मॅमोग्राफी मशीनचे महापौर, आयुक्तांच्या हस्ते लोकार्पण

मिरा-भाईंदर : भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार मिरा भाईंदर शहरात देखील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “स्वराज्य महोत्सव” तसेच “घरोघरी तिरंगा” या उपक्रमा अंतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

त्यानुसार १२ ऑगस्ट रोजी घोडबंदर येथील ऐतिहासिक किल्ला आणि जंजिरे धारावी किल्ला या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत किल्ल्यावरील डेब्रिज उचलणे, गवत काढून सफाई करणे, ज्याठिकाणी जास्त प्रमाणात जंगली गवत आले आहे ते साफ करून संपूर्ण किल्ल्याचा परिसर हा नियमितपणे स्वच्छ ठेवण्यात येणार आहे. स्वच्छता मोहिमेनंतर महापौर व आयुक्त यांच्या उपस्थितीत सामूहिक राष्ट्रगीत गायन संपन्न झाले.

तसेच आरक्षण क्रमांक ३६४ येथे ‘मियावाकी’ या जापानच्या तंत्रज्ञानावर आधारित उद्यानामध्ये महापौर ज्योत्स्ना हसनाले आणि आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
मिरा-भाईंदर शहरात जास्तीत जास्त झाडे लावून ‘आपली वसुंधरा’ ही निर्मळ करण्याचा ध्यास मिरा-भाईंदर महानगरपालिकेने घेतला असून महापौर व आयुक्त तसेच सर्व पदाधिकारी आणिअधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश यावेळी शहरवासीयांना देण्यात आला.

त्याच बरोबर मिरारोड पूर्वेकडील स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात महिलांकरिता मॅमोग्राफी मशीनचे लोकार्पण देखील करण्यात आले. या मॅमोग्राफी मशीन द्वारे महिलांना डॉक्टरांच्या योग्य त्या सल्ल्यानुसार स्तन कर्करोगाचे मोफत परीक्षण करण्यात येणार असून ज्या महिलांना स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) बाबत शंका आहे त्या महिलांनी स्व. इंदिरा गांधी रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे.

भाईंदर पश्चिमेकडील मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात मिरा-भाईंदर शहरातील स्वातंत्र्य सैनिकांची माहिती देणारे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. मिरा भाईंदर शहरातील जवळपास 42 अजरामर होऊन गेलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती देणाऱ्या विशेष दालनाचे महापौर व आयुक्त यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व महानगरपालिकेत येणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती होणे या उद्देशाने आयुक्त दिलीप ढोले यांच्या संकल्पनेतून या स्वातंत्र्य सैनिकांच्या माहिती दालनाचे लोकार्पण करण्यात आले.

सदर या कार्यक्रमाच्या प्रसंगी महापौर श्रीमती ज्योत्स्ना हसनाळे, आयुक्त दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, स्थायी समिती सभापती राकेश शाह, महिला व बालकल्याण समिती सभापती मिरादेवी यादव, उपसभापती विवीता नाईक, उपायुक्त रवी पवार, उपायुक्त संजय शिंदे, शहर अभियंता दिपक खांबीत, कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर, संगणक तथा जनसंपर्क अधिकारी राजकुमार घरत, सर्व सहाय्यक आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्थानिक नगरसेवक, उद्यान अधिक्षक, उद्यान विभागाचे कर्मचारी, स्वच्छता अधिक्षक, स्वच्छता निरीक्षक, मुकादम आणि सफाई कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि महानगरपालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशा प्रकारे शहरात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने 75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने महानगरपालिका मुख्यालयाच्या संपूर्ण इमारतीला तीन रंगाची अत्यंत सुंदर अशी सजावट करण्यात आली असून अशा प्रकारे ‘अमृत महोत्सवाची’ सुरुवात केली आहे. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 08.00 वाजता महानगरपालिका मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमात देखील शहरातील नागरिकांनी मोठया प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे.