Home Blog Page 166

रोटरी मिडटाऊनची ‘स्वरभूषण’ स्पर्धा उत्साहात संपन्न..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’ ने दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा “स्वरभूषण” ही गाण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचे नियोजन १२ ते १८ वर्षे, १९ ते ५० वर्षे आणि ५० वर्षावरील अशा तीन वयोगटात करण्यात आले होते. या स्पर्धेत जवळपास १०० स्पर्धकांनी स्वेच्छेने भाग घेतला होता.

या स्पर्धेचे आयोजन रो.डॉ. लीना लोकरस आणि रो.डॉ. मकरंद गणपुले यांनी अतिशय उत्कृष्टरित्या केले होते. त्यांनी सांगितले की या स्पर्धेचा उद्देश हा स्थानिक गायकांना उत्तेजन देणे आणि त्यांना प्रकाशात आणणे हा आमचा हेतू आणि लक्ष्य आहे आणि यापूर्वी झालेल्या स्पर्धेतून जिंकलेले अनेक गायक हे आज गायन क्षेत्रात प्रगती करीत आहेत.

रविवारी दि.२२ मे रोजी या स्पर्धेची उपांत्य आणि अंतिम फेरी, कामा हॉल, एमआयडीसी, डोंबिवली येथे पार पडली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नामवंत गायक श्री. उदय चितळे आणि सौ. कल्पिता खरे यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांनी रोटरी क्लब संगीताच्या क्षेत्रात करीत असलेल्या या कार्याची खूप प्रशंसा केली.

प्रेसिडेंट रो. जितेंद्र नेमाडे यांनी यावेळी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन करीत असलेल्या विविध समाजोपयोगी कामाची माहिती दिली. रो. अजय कुलकर्णी यांनी या स्पर्धेची तांत्रिक बाजू सांभाळली. रो. महादेव तामसे यांनी सर्व विजेत्यांना स्वखर्चाने रोख पारितोषिके दिली.

खालील गायक गायिकांनी या स्पर्धेत पारितोषिके पटकावली. त्यांना ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’ तर्फे रोख पारितोषिक व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी स्पर्धकांचे पालक, डोंबिवलीकर व रोटरी क्लबचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वयोगट १२ ते १८
१ – तेजस्विनी जोशी, २ – प्रेम विशे, ३ – जिविका हळबे, ४ – सुरभी देवस्थळे, ५ – पावनी कुलकर्णी, ६ – आश्लेषा सावळे

वयो,गट १९ ते ५०..
१ – शर्वरी बापट, २ – अमृता नायर, ३ – मंदार जोशी, ४ – डॉ. स्नेहल चटप, ५ – संतोष अय्यर

वयोगट ५० वरील..
१ – महेश देशपांडे, २ – प्रद्युम्न कुलकर्णी, ३ – उत्तम सोनवणे, ४ – परिमला देशपांडे, ५ – स्वाती देशपांडे, ६ – प्रफुल्ल साने

अशी यंदा या ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’ ने आयोजलेल्या ‘स्वरभूषण’  या संगीत स्पर्धेत वरील गायकांनी रोख पारितोषिक व ट्रॉफी जिंकलेल्यांची नावे आहेत.

 

‘या’ ४ कारणांमुळे तुमचं रेशन कार्ड रद्द होऊन कारवाईचीही शक्यता..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

  अपात्र शिधापत्रिका धारकांनी कार्ड सरेंडर करावे किंवा रद्द करावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. जे कार्ड सरेंडर करणार नाहीत, ते सरकारी पडताळणीत पकडले गेल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. यासोबतच त्यांच्याकडून आतापर्यंत घेतलेले रेशनही वसूल केले जाऊ शकते.

तुम्ही शिधापत्रिकाधारक असाल तर ही बातमी जरूर वाचा. कोरोना महामारीच्या काळात सरकारने गरिबांसाठी मोफत रेशनची व्यवस्था सुरू केली होती. मात्र, सरकारकडून मिळणाऱ्या मोफत रेशनचाही लाखो अपात्र लोक लाभ घेत असल्याचे गेल्या काही दिवसांत सरकारच्या निदर्शनास आले. अशा लोकांनी स्वतःच त्यांचे रेशनकार्ड रद्द करून घ्यावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. शिधापत्रिका रद्द न झाल्यास पडताळणीनंतर अन्न विभागाचे पथक ते रद्द करेल. अशा लोकांवरही कारवाई होऊ शकते.

जाणून घ्या काय आहेत कारणं ?
जर एखाद्या कार्डधारकाकडे स्वतःच्या उत्पन्नातून मिळालेला १०० चौरस मीटरचा प्लॉट/फ्लॅट किंवा घर असेल, चारचाकी वाहन/ट्रॅक्टर, शस्त्र परवाना, गावात दोन लाखांपेक्षा जास्त आणि शहरात वर्षाला तीन लाखांपेक्षा अधिक कौटुंबिक उत्पन्न असेल अशा लोकांनी आपले रेशनकार्ड ‘तहसील’ आणि ‘डीएसओ* कार्यालयात सरेंडर करावे लागेल.

घेतलेले रेशन वसूल केले जाईल
शासनाच्या नियमानुसार शिधापत्रिकाधारकाने कार्ड सरेंडर केले नाही तर अशा लोकांचे कार्ड छाननीनंतर रद्द केले जाणार आहेत. यासोबतच त्या कुटुंबावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. एवढेच नाही तर अशा लोकांकडून तो रेशन घेत असल्याने रेशनही वसूल केले जाणार आहे.

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची पेट्रोल आणि डिझेल बाबत मोठी घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रातील मोदी सरकार ने आज सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रातील सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील उत्पादन शुल्कात आज मोठ्या कपातीची घोषणा केली आहे. पेट्रोलचे उत्पादन शुल्क तब्बल ८ रुपये तर डिझेलचे उत्पादन शुल्क तब्बल ६ रुपयांनी कमी करण्यात आल्याची घोषणा केंद्रातील अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९.५० रुपये आणि डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी होणार आहेत. याशिवाय केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री उज्ज्वला’ योजनेच्या ९ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर (१२ सिलिंडरपर्यंत) २०० रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली. अर्थमंत्री निर्मला सितारमण म्हणाल्या की, यामुळे आपल्या माता-भगिनींना एकप्रकारे आर्थिक मदतच होईल.

देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणी मध्ये १२३.४६ रुपये प्रति लिटर, तर आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये डिझेल १०७.६१ रुपये प्रतिलिटर आहे. त्याच वेळी, पोर्ट ब्लेअर मध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल ९१.४५ रुपये आणि डिझेल ८५.८३ रुपये प्रति लिटर होते. त्याच वेळी, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर १०५.४१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर आज ९६.६७ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल १२०.५१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल१०४.७७ रुपये दराने विकले जात आहे. मात्र आता उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर आता कमी होणार आहेत.


नांदीवली येथे शिवसेना उपशहर प्रमुख श्री.अमित बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज सायंकाळी नांदीवलीतील ०१, राजेश्वरी कृपा, डोंबिवली (पूर्व) ४२१२०१ येथे शिवसेना उपशहर प्रमुख श्री.अमित बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे व जिल्हाप्रमुख श्री.गोपाळ लांडगे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उदघाटन झाले. श्री.अमित बनसोडे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

या उद्घाटन सोहळ्याला शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपजिल्हाप्रमुख श्री. सदानंद थरवळ, उपजिल्हाप्रमुख श्री.राजेश कदम, शहरप्रमुख श्री.राजेश मोरे, युवासेना-उपजिल्हाधिकारी श्री.दीपेश पुंडलिक म्हात्रे, डोंबिवली विधानसभा संघटक तात्यासाहेब माने, ग्रामीण विधानसभा संघटक श्री.एकनाथ पाटील, कल्याण ग्रामीण महिला शहर संघटक सौ.कविता गावंड, कल्याण तालुका संघटक श्री.अर्जुन पाटील, अध्यक्ष डोंबिवली शहर शिवसेना बंजारा समाज कु.ज्ञानेश्वर राठोड
“पोलीस वृत्तांत” मासिकाचे कार्यकारी संपादक श्री.विजय अंबावकर यांची उपस्थिती लाभली.

उपजिल्हाप्रमुख श्री. सदानंद थरवळ व जिल्हाप्रमुख श्री.गोपाळ लांडगे यांनी शिवसेना संघटना वाढवण्यासाठी व येणाऱ्या निवडणुकीत नगरसेवक निवडून येण्यासाठी उपशहर प्रमुख श्री.अमित बनसोडे यांना शुभेच्छा दिल्या.

माजी नगरसेवक रवी पाटील आणि माझी नगरसेवक नितीन पाटील यांनी उपशहर प्रमुख श्री.अमित बनसोडे यांनी यांच्या कार्यालयात येऊन श्री.अमित बनसोडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील यशस्वी कारकीर्दीकरिता शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अखेर जिल्हाध्यक्ष बदलला! अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती!

मिरा भाईंदर: मिरा भाईंदर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अखेर मोठा संघटनात्मक फेरबदल करण्यात आला असून जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांची तडकाफडकी हकालपट्टी करून अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आज अरुण कदम यांना आज जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देऊन पक्षाची जबाबदारी सोपवली.

चार वेळा नगरसेवक ते उप नगराध्यक्ष पदावर राहिलेले अरुण कदम यांच्याकडे प्रदीर्घ असा राजकीय अनुभव असून काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अशा अनेक पक्षांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांवर राहून पक्ष संघटनेचे कार्य केले असून मिरा भाईंदर शहरामध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.

अरुण कदम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत शहराध्यक्ष असताना अत्यंत कमी कालावधीत महानगर पालिका निवडणुकीना सामोरे जाताना त्यांनी एक हाती लढाई लढून पहिल्याच निवडणुकीत पक्षाचे चार नगरसेवक निवडून आणले होते. त्यानंतर मीरा-भाईंदर वसई-विरार पालघर जिल्हा संघटक सारख्या महत्त्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली असताना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी खूप मोठे प्रयत्न केले होते. परंतु मनसेमध्ये पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे कंटाळून त्यांनी अखेर मनसे सोडण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेत विधानसभा प्रमुख पदावर असताना देखील 2017 च्या महानगर पालिका निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले आणि एव्हढेच काय तर त्यांनी आपल्या पत्नी अर्चना कदम सोबतच चार नगरसेवकांचा संपूर्ण प्रभाग निवडून आणला होता. त्यांच्या पत्नी अर्चना कदम आजही शिवसेनेच्या नगरसेविका आहेत.

विधानसभा प्रमुख पदावर कार्यरत असताना शिवसेनेत देखील पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी शिवसेना सोडली आणि काही काळ राजकारणा पासुन अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. परंतु काही काळानंतर शहरातील राजकीय परिस्थिती आणि आपल्या समर्थकांच्या आग्रहा खातर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय केला होता.

अरुण कदम यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला असताना तेव्हाच त्यांच्यावर पक्षाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार अशी शक्यता वर्तविली जात होती परंतु त्याच वेळी भाजप सोडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील आणि काँग्रेस पक्ष सोडून आलेले अंकुश मालुसरे या तिघांत जिल्हाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनपेक्षित निर्णय घेत अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती न करता अचानकपणे तत्कालीन जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर यांना हटवून अंकुश मालुसरे यांची नियुक्ती करण्यात आली.

अंकुश मालुसरे यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्या नंतर पक्ष संघटना तर वाढली नाहीच उलट त्यामुळे पक्षाच्या दोन वर्षाचा महत्त्वाचा काळ वाया गेला त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा आपला जिल्हाध्यक्ष बदलण्याची नामुष्की ओढवून घ्यावी लागली. अखेर मिरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षाची निराशाजनक कामगिरी पाहता मीरा भाईंदर शहर जिल्ह्याचे समन्वयक माजी खासदार आनंद परांजपे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी एकत्रितपणे निर्णय घेऊन अंकुश मालुसरे यांना पदावरून हटवून त्यांची प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्त केली त्या ठिकाणी अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मिरा भाईंदर शहर जिल्हाध्यक्ष पदावर अरुण कदम यांची नियुक्ती केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवीन बळकटी येईल त्याच बरोबर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगली कामगिरी करुन दाखवेल असा निर्धार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आता व्यक्त केला जात आहे.

अरुण कदम यांची समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन चालण्याची कार्यपद्धती, शहरातील त्यांचा चाहता वर्ग पाहता मिरा भाईंदर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आता येणाऱ्या काळात पक्ष संघटना बळकट करून निवडणुकीला सामोरे जाण्याचे मोठे आव्हान अरुण कदम यांच्यासमोर आहे. अरुण कदम या आव्हानाला कशा रीतीने जात सामोरे जातील हे पाहणे महत्त्वाचे महत्त्वाचे ठरणार आहे. तूर्तास अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्त केल्यामुळे मिरा भाईंदर शहरातील राजकारणामध्ये एक मोठा फेरबदल घडला असल्याची चर्चा केली जात असून शहरातील सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाच वर्षांत बदलले पाच जिल्हाध्यक्ष!

माजी नगरसेवक आणि तत्कालीन जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांनी राष्ट्रवादी सोडल्या नंतर मिरा भाईंदर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक दिवस नेतृत्वहीनच राहिला होता. त्यानंतर इच्छा नसताना काँग्रेसचे माजी नगरसेवक जयवंत पाटील यांना जिल्हाध्यक्ष नेमले गेले परंतु राजकारणात राहण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती म्हणून त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर गणेश नाईक, संजीव नाईक यांचे समर्थक मानले जाणारे प्रकाश दुबोले यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. काही काळानंतर प्रकाश दुबोले हे देखील राष्ट्रवादी सोडून आपले व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी भाजपमध्ये गेले. त्यांनी पक्ष सोडल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा काही काळासाठी नेतृत्वहीन झाला.

2017 च्या महानगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सपाटून मार खाल्यामुळे त्यांचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. अशा कठीण अवस्थेत पक्षाचे पद घ्यायला कुणीच पुढे येत नसताना संतोष पेंडुरकर यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. संतोष पेंडुरकर जिल्हाध्यक्ष पदावर असताना पक्षांतर्गत वाद विकोपाला गेला होता. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अरुण कदम यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली जाणार अशी जोरदार चर्चा केली जात असताना पक्षाने अनपेक्षितपणे अंकुश मालुसरे यांची जिल्हाध्यक्ष नियुक्ती केल्यामुळे पक्षात आणखीन एक नवीन वाद निर्माण झाला होता. आणि जेमतेम दोन वर्षे कार्य केल्यानंतर आता अंकुश मालुसरे यांची देखील नियुक्ती रद्द करून आता अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.

अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेली पाच वर्षांत पाच जिल्हाध्यक्ष बदलण्याची करामत केली आहे. आता अरुण कदम यांच्या नेतृत्वखाली पक्षाला स्थैर्य मिळेल आणि येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगली कामगिरी करून दाखवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.