Home Blog Page 171

बदलापूर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या शहरातील विनापरवाना रात्रभर चालणारे अनधिकृत ढाबे त्वरित बंद करा अशी हॉटेल व्यावसायिकांची मागणी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बदलापूर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली सह आसपासच्या शहरांमध्ये सुरू असणारे अनधिकृत ढाबे त्वरित बंद करण्याची आग्रही मागणी हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने केली आहे.कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडीतील हॉटेल व्यावसायिकांनी आज कल्याणात बैठक घेतली.

गेली २ वर्षे आधीच कोरोनामुळे हॉटेल व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कोणतेही उत्पन्न नसतानाही लाईट बिल, कामगारांचा पगार, शासनाचे विविध कर आणि परवाना नूतनीकरण शुल्क हॉटेल व्यावसायिकांना भरावेच लागले आहे. तर कोवीड निर्बंध पूर्णपणे उठवल्याने हॉटेल व्यावसायिकांचा आर्थिक गाडा चालण्यास आताशी कुठे हालचाल सुरू झाली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत कल्याण-डोंबिवलीसह इतर शहरात सुरू झालेल्या अनधिकृत ढाब्यांनी हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठे आवाहन उभे केले असल्याचे यावेळी बोलताना विविध हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.

तर आम्ही सर्व जण शासनाचे रीतसर सर्व कर, देयके भरत आहोत. याउलट कोणतेही शासन शुल्क किंवा परवानगी न घेता अनधिकृत ढाबे सर्रासपणे राजरोज दिवसरात्र सुरू असून त्यांना कोणाचे संरक्षण आहे ? असा संतप्त सवाल हॉटेल व्यावसायिकांनी उपस्थित केला. तसेच या अनधिकृत ढाब्यांमुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान होत असून शासनाने तातडीने त्यांच्यावर कारवाई करण्याची आग्रही मागणी यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.

आम्ही दिसायला जरी मोठे हॉटेल व्यावसायिक दिसत आहोत, तरी अनेक जणांचा रोजगार व  सरकारी कर भरून सर्व नियमावली पाळतो. जे अनधिकृत ढाबे आहेत त्यांच्यामुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम होतोय, हे ढाबे तातडीने बंद करावेत, एवढीच आम्हा हॉटेल व्यावसायिकांची कळकळीची विनंती आहे असे उल्हासनगर हॉटेल ओनर्स असोसिएशनचे सचिव श्री. नरेश कंडारे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना त्यांनी हॉटेल व्यावसायिकांचा व्यथा मांडली.

 

अट्टल घरफोडी व चोरी करणाऱ्या आरोपीला बाजारपेठ पोलीसांनी शिताफीने पकडुन केली उत्कृष्ट कामगिरी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सविस्तर वृत्त असे की कल्याण मधील बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवसा व रात्री एकटा संधीचा फायदा घेऊन अट्टल घरफोडी व चोरी करणारा मोगा नावाचा अट्टल आरोपी हा घरफोडी करण्याच्या उद्देशाने बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत फिरत असल्याची बातमी पोलीस नाईक सचिन साळवी यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वपोनि श्री. नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ डिटेक्शन ब्रांच चे सपोनि. अरुण घोलप व त्यांच्या डिटेक्शन टीमचे पोहवा. पावशे, अनिल जातक, सचिन साळवी, बाविस्कर, सांगळ यांनी आरोपी संदीप बबन घोगरे (उर्फ मोगा) राहणार: भाऊ म्हात्रे चाळ, शंकर मंदिरा जवळ, काळा तलाव कल्याण याला शिताफीने पकडुन त्याचे कडून घरफोडी गुन्हा रजि नं. ९७/२०२२, कलम ४५४, ४५७, ३८० च्या घरफोडीतील एकूण २८,७००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, सदर आरोपीने अजून कुठे घरफोडी व चोरी केली आहे या बाबत बाजारपेठ पोलीस सखोल तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी वपोनि श्री. नरेंद्र पाटील, पोनि. राजेंद्र अहिरे (गुन्हे), पोनि. सुधाकर खोत, सपोनि. अरुण घोलप, पोहवा. पावशे, पोहवा. जातक, पोना. सचिन साळवी, पोना. परमेश्वर बाविस्कर, पोना. राज सांगळे यांनी केली असून सदर प्रकरणाचा पुढील तपास पोहवा. पावशे करीत आहे.

 

कल्याण ग्रामीण आणि पूर्वेकडील लोडशेडींग विरोधात शिवसेनेचा जाहीर मोर्चा… अधिकाऱ्यांच्या दालनातील लाईट, पंखे, एसी केले बंद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आधीच असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा अक्षरशः आगीमध्ये तेल टाकण्याचे काम करत आहे. परिणामी नागरिकांच्या संयमाचा कडेलोट होऊ लागला आहे. आज सकाळी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली कल्याण ग्रामीण भागातील संतप्त नागरिकांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण पूर्व आणि ग्रामीण भागात तब्बल ६-६ तास वीज पुरवठा खंडित होत आहे. कल्याण पूर्व आणि ग्रामीण भागात लाईट नसल्याने पाण्याचेही हाल होत आहेत. आधीच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांची अवस्था म्हणजे आगीतून फोफाट्यात अशी झाली आहे. त्यामूळे अखेर आज कल्याणातील महावितरणच्या मुख्य कार्यालयावर शिवसेना आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी भर दुपारी धडक दिली. शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड, सेना पदाधिकारी यांच्यासह सामान्य नागरिक, महिला आणि लहान मुले या मोर्चात सहभागी झाले होते.

दरम्यान यावेळी शिवसेना आणि संतप्त नागरिकांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दालनातील लाईट, पंखे आणि एसी यंत्रणा बंद करून आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच ग्रामीण भागातील हे अघोषित भार नियमन बंद करण्याची मागणीही शिवसेनेकडून यावेळी करण्यात आली.

 

राज्य सरकार बोलवणार लाऊडस्पीकरच्या मुद्यावर सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरेंनाही देणार आमंत्रण..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्य सारकरकर लवकरच लाऊडस्पीकरच्या मुद्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावणार असून या बैठकीला राज ठाकरे यांनाही बोलवणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. राज्यात सुरू असलेल्या लाऊडस्पीकरच्या मुद्यावरून आज वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले की, लाऊडस्पीकरच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी लवकरच सर्व प्रमुख विरोधी पक्षाचे नेते, राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहोत. या सर्वपक्षीय बैठकीनंतर काही संघटनांची बैठक घेणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.

कायदा हाती घेतल्यास..

गेल्या काही दिवसांपासून राज्यांत कायदा आणि सुव्यस्स्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, कायदा हातात घेऊ अन्यथा कठोर कारवाई करू असा इशाराही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.

वातावरण चिघळवण्यासाठी प्रयत्न सुरू..

गृह खात्याकडे विविध ठिकाणी वाद घडवून आणण्याबाबतचे प्रयत्न सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली आहे. त्या अनुषंगाने पोलीसांना आदेश देण्यात आले असून त्यांचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे वळसे-पाटील यांनी सांगितले.

लाऊडस्पीकरचा मुद्दा जुनाच..

लाऊडस्पीकरचा मुद्दा जुनाच असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत काही निर्णय दिले आहेत. त्याअनुषंगाने सन २०१५ आणि २०१७ मध्ये राज्य सरकारने काही आदेश काढले आहेत. याबाबत लाऊडस्पीकरबाबत काय भूमिका असावी हे नमूद करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

डोंबिवली शहर वाहतूक शाखेतर्फे विशेष सुरक्षा जनजागृती मोहीम..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज डोंबिवली शहर वाहतूक शाखेतर्फे विशेष सुरक्षा जनजागृती मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये हेल्मेट, सिटबेल्ट व सिग्नल जंपिंग बाबत तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत आजच्या विशेष मोहिमेअंतर्गत डोंबिवली वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उमेश गीत्ते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री.नवनाथ चव्हाण आणि सहकारी कर्मचारी यांच्या सोबत डोंबिवली पूर्व हद्दीतील टिळक चौक, शेलार नाका, घरडा सर्कल येथे हेल्मेट, सिटबेल्ट न वापरणाऱ्या व सिग्नल मोडणाऱ्या चालकांना थांबवून हेल्मेट, सीट बेल्ट वापरण्याबाबतचे व सिग्नल पाळण्याबाबतचे सूचना फलक हाती देऊन, त्यांच्याकडूनच त्याबाबत वाहतूक सुरक्षा जनजागृती करण्यात आली.



तसेच रोटरी क्लब डोंबिवली सनसिटी यांच्याकडून विना हेल्मेट चालकांना हेल्मेट चे वाटप करण्यात आले.

डोंबिवली वाहतूक उपविभागाकडून आज हेल्मेट, सिटबेल्ट व सिग्नल जम्पिंग बाबत जनजागृती करण्यात आली आहे. यापुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून सर्वांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उमेश गीत्ते यांच्याकडून करण्यात येत आहे.