Home Blog Page 188

मिरा भाईंदर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

मिरा भाईंदर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी कृषिमंत्री शरद पवार यांचा ८१ वा वाढदिवस १२ डिसेंबर रोजी मिरारोड येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय येथे केक कापून साजरा करण्यात आला.

शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम सुरू केले. राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर आणि महानगरपालिका स्तरावर सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. “सुप्रिया स्वाधार अभियान” अंतर्गत त्या सर्व योजनांचे अर्ज भरण्यात आले.
ज्या महिलांच्या पतीचा कोरोना महामारीत मृत्यू झाला त्यांच्यासाठी “संजय गांधी निराधार पेन्शन योजना” आणि ज्या मुलांचे पालक कोरोनामध्ये मरण पावले त्यांच्यासाठी “श्रवण बाळ निराधार योजने” अंतर्गत ‘अर्ज’ भरण्यात आले जेणेकरून त्यांना सरकारी मदत मिळू शकेल. कोरोनाच्या काळात ज्यांनी आपले आप्तेष्ट गमावले त्यांना शासकीय मदत मिळण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांनी यावेळी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दोन दिवसीय कार्यक्रमात शनिवारी भाईंदर पूर्व येथील होलीक्रॉस स्कूल, आरएनपी पार्क येथे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आले होते.
ज्यामध्ये शिव, फुले, शाहू, आंबेडकर, शरद पवार यांची व्याख्याने प्राध्यापक उत्तमराव भगत यांनी दिली.

त्याचबरोबर अक्षय गणेश भोसले यांनी संविधान या विषयावर मार्गदर्शन केले आणि अधिवक्ता किशोर सामंत यांनी केंद्रीय यंत्रणाच्या गैरवापरावर आणि शेतकरी कायद्यांच्या बद्दल तीव्र शब्दात सांगितले. शेवटी प्राध्यापक शशिकांत माघाडे यांनी महिला विकास धोरण आणि शरद पवार यांच्या एकूण कारकिर्दीतील महत्त्वाचे निर्णय या विषयावर कार्यकर्त्यांना संबोधित केले.

दुसऱ्या दिवशी 12 डिसेंबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात शरद पवार यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीत साजरा करण्यात आला. राज्यात होत असलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कार्यक्रमस्थळी एलईडी स्क्रीनने करण्यात आले.जयंत पाटील, अजित पवार, रुपाली चाकणकर, नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल, शरद पवार यांनी थेट राज्यातील जनतेला संबोधित केले. ऑनलाइनच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी केंद्राच्या धोरणांविरोधात बोलताना शरद पवार यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणवत्तेची सर्वांना जाणीव करून दिली.

भाजपसोबत सरकार स्थापनेची चर्चा साफ फेटाळून लावत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने दिवस परतत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिमोच्या वाढदिवसानिमित्त जमलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीतून स्पष्ट होत होते.

मीरा-भाईंदरमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती, पण नेत्यांच्या पक्षांतरामुळे पक्ष कोलमडला होता.
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमू लागली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना मालुसरे म्हणाले की, शरद पवार यांच्या वाढदिवसाचे साक्षीदार मानून पुन्हा एकदा ‘कार्यकर्ता जोड़ों ’ अभियान सुरू करणार आहोत आणि येत्या निवडणुकीपर्यंत नवे-जुने कार्यकर्ते सर्व लोकांना पक्षाशी जोडतील. दुसरीकडे प्रदेश सरचिटणीस अन्नूताई पाटील म्हणाल्या की, महिला आरक्षण आणि सक्षमीकरणासाठी शरद पवार यांचे मोठे योगदान आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांच्यासह प्रदेश महासचिव अन्नू ताई पाटिल प्रदेश सचिव पूर्णिमा ताई काटकर, महिला जिलाध्यक्ष सुप्रिया ताई माइनकर, कार्याध्यक्ष वनजारानी नायडू, उपाध्यक्ष माधुरी तांबे, साउथ इंडियन सेल (महिला) अध्यक्ष शिला पाटिल, डॉक्टर सेल अध्यक्ष शोभा पाटिल, विद्यार्थी सेल अध्यक्ष ओमकार धाकतोड़े, चित्रपट सेल अध्यक्ष रोहित गुप्ता, सहकार सेल अध्यक्ष लक्ष्मण पाटिल, लीगल सेल अध्यक्ष विक्रमतारे पाटिल, हिंदीभाषी सेल अध्यक्ष सुधाकर चौबे, आई टी सेल अध्यक्ष नुमान रहमान, ब्लॉक अध्यक्ष रमेश कवठेकर, बाबूराव शिंदे, गणेश लांबे, शाहनवाज सिद्दिकी, इमरान खान, पार्थ मालुसरे, प्रीति शर्मा, सोनल डीशा, प्रवक्ते प्रेम यादव यांच्यासह अन्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

जुन्नरच्या सुपुत्राला मिळाले एशिया कपसाठी भारताच्या टीममध्ये स्थान

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: मिलन शाह

मुंबई, ता 11 डिसें : १९ वर्षांखालील आशिया चषक या स्पर्धेसाठी बीसीसीआयच्या ज्यूनियर क्रिकेट निवड समीतीने २० जणांचा संघ घोषित केला आहे. या संघात जुन्नरचा सुपूत्र कौशल तांबे याचीही निवड झाली आहे.

ही स्पर्धा २३ डिसेंबरपासून संयुक्त अरब अमिराती येथे खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी २० जणांची संघात निवड झाली असून आणखी ५ खेळाडू राखीव असतील. असे एकूण २५ खेळाडूंचा संघ स्पर्धेपूर्वी बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव शिबीरात सहभागी होईल. हे सराव शिबीर ११ ते १९ डिसेंबरदरम्यान पार पडणार आहे.

आशिया चषकासाठी १९ वर्षांखालील संघाचे कर्णधारपद यश धूळ यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. दरम्यान, वसू वत्स याचाही २० जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह आहे. तो जर वेळेत फिट झाला, तरच तो ही स्पर्धा खेळू शकणार आहे.

तसेच जुन्नर तालुक्यातील कौशलचीही २० जणांच्या संघात निवड झाली आहे. अष्टपैलू खेळाडू असलेल्या कौशलला यापूर्वी बांगलादेशविरुद्ध झालेल्या तिरंगी मालिकेत १९ वर्षांखालील भारत ब संघात संधी मिळाली होती. तसेच तो आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या विविध वयोगटातील संघाकडूनही खेळला आहे.

भारतीय संघाला पुढीलवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिज येथे १९ वर्षांखालील वनडे विश्वचषक खेळायचा आहे. या स्पर्धेच्या दृष्टीने आशिया चषक महत्त्वाची स्पर्धा ठरणार आहे. त्याचबरोबर बीसीसीआयने माहिती दिली आहे की या विश्वचषक स्पर्धेसाठी काही कालावधीनंतर संघ घोषित केला जाईल.

आशिया चषकासाठी असा आहे १९ वर्षांखालील भारतीय संघ-
हरनूर सिंग पन्नू, अंगक्रिश रघुवंशी, अंश गोसाई, एसके रशीद, यश धुळ (कर्णधार), अन्नेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधू, दिनेश बाना (यष्टीरक्षक), आराध्य यादव (विकेटकीपर), राजनगड बावा, राजवर्धन हंगरगेकर, गर्व सांगवन, रवी कुमार, रिषिथ रेड्डी, मानव पारख, अमृत राज उपाध्याय, विकी ओस्तवाल, वासू वत्स (फिटनेसवर अवलंबून)

राखीव खेळाडू – आयुष सिंग ठाकूर, उदय सहारन, शाश्वत डंगवाल, धनुष गौडा, पीएम सिंह राठोड

मसाज पार्लरमध्ये सुरू होता धक्कादायक प्रकार नवी मुंबईचे पोलीस पोहोचले अन्…

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: मिलन शाह

नवी मुंबई: ‘स्पा’च्या नावाखाली शरीरविक्रय चालविणाऱ्या सीबीडी सेक्टर-१५मधील दी थाई व्हीला ‘स्पा’वर नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकून ९ तरुणींची सुटका केली. या कारवाईत या मसाज पार्लरच्या मॅनेजरसह दोघांना पीटा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.

सीबीडी सेक्टर-१५मधील अरेंजा प्लाझा या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर असलेल्या या मसाज पार्लरमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली मुली ठेवून त्यांच्याकडून शरीरविक्रय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास या मसाज पार्लरमध्ये एक बनवाट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. या मसाज पार्लरमध्ये शरीरविक्रय सुरू असल्याची खात्री पटल्यानंतर या कक्षाच्या महिला सहायक पोलिस निरीक्षक अलका पाटील, पोलिस उपनिरीक्षक विजय शिंगे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक इनामदार, पोलिस हवालदार पिरजादे, उटगीकर, तायडे, कांबळे आदींच्या पथकाने तेथे छापा टाकला.

पोलिसांनी या ‘स्पा’चा व्यवस्थापक अमित ठक्कर व तेथे कामास असणारा मोहम्मद अफजल या दोघांवर पीटा कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांना अटक केली. पोलिसांनी यावेळी ९ तरुणींची सुटका केली. मसाज पार्लरमधील रोकड रक्कम आणि इतर आक्षेपार्ह वस्तू या पथकाने जप्त केल्या. या ‘स्पा’ची चालिका रिता ऊर्फ सिया असून ती या तरुणींकडून शरीरविक्रय करून घेत असल्याचे तपासात आढळून आले आहे. ग्राहकांकडून मिळालेल्या रकमेपैकी निम्मी रक्कम ती घेत असून निम्मी रक्कम संबंधित तरुणींना देत असल्याची माहिती या तपासात उघड झाली.

औरंगाबाद राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट करता दादरा नगर हावेली आणि दमण दिव येथून मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणलेला मद्याचा दारूसाठा केला जप्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्य उत्पादन शुल्क या विभागाचे आयुक्त सन्माननीय श्री.कांतीलाल उमाप साहेब तसेच संचालक सन्माननीय श्रीमती.उषा वर्मा, राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद या विभागाचे विभागीय उप-आयुक्त सन्माननीय श्री.प्रदीप पवार साहेब व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद श्री.सुधाकर कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक औरंगाबाद यांनी रात्रगस्ती दरम्यान मिळालेल्या खात्रीलायक गुप्त बातमीनुसार नारेगाव येथील सरकार मान्य देशी दारू दुकाना समोरील सरकारी रोडवर नारेगाव ते वरुड रोड ता.जि.औरंगाबाद येथे एक अज्ञात इसम आपल्या चारचाकी वाहनातून दुसऱ्या एका वाहनात विदेशी दारू ‘फॉर सेल दादरा नगर हावेली अँड दमण दिव’ राज्याकरिता विक्रीस असलेल्या दारूचा मद्यसाठा देणार असल्याच्या खात्रीलायक बातमीच्या अनुषंगाने दोन पंचा समक्ष सदर ठिकाणी निरीक्षक भरारी पथक व ‘क’ विभाग यांच्या संयुक्त पथकाने छापा मारला असता सदर ठिकाणी एक चारचाकी वाहनातून सदर मद्यसाठा रस्त्यावर टाकून आरोपी वाहनासह फरार झाले.

सदर मुद्देमाल तपासला असता तो ‘ओन्ली फॉर सेल दादरा नगर हावेली अँड दमण दिव’ करिता असलेला व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला मद्यसाठा प्रथम दर्शनी दिसून आला तो येणे प्रमाणे विदेशी दारू ‘रॉयल स्टॅग’ १८० मि.ली च्या एकूण २४० सीलबंद बाटल्या, ‘इंपेरियल ब्लू’ १८० मि.ली च्या एकूण २०४ सीलबंद बाटल्या, ‘मॅकडॉवेल नं १’ व्हीस्की १८० मि.ली च्या एकूण १०० सीलबंद बाटल्या, ‘बडव्हायजर बियर’ ५०० मि.ली क्षमतेच्या एकूण ४८ सीलबंद बाटल्या असे एकूण १,००,८००/- रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदर साठा जप्त करून अज्ञात इसमा विरुद्ध म.द.का अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

सदर कारवाई श्री.विजय रोकडे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, भरारी पथक, व ‘क’ विभाग औरंगाबाद, श्री.शरद रोटे, श्री.रमेश विठोरे, दुय्यम निरीक्षक, श्री.प्रवीण पुरी, श्री. गणेश नागवे सह.दुय्यम निरीक्षक जवान सर्वश्री, श्री.युवराज गुंजाळ, श्री.रवींद्र मुरडकर, श्री.सुभाष गुंजाळे, श्री.शारेक कादरी वाहन चालक श्री.संजय गायकवाड व श्री.अमोल अन्नदाते यांनी पार पडली. पुढील तपास श्री.व्ही.व्ही.रोकडे, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, औरंगाबाद हे करत आहेत.

 

ओबीसींचे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट ! भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांचा ठाकरे सरकारवर आरोप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात काँग्रेसच्या व शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील सरंजामशाही प्रवृत्तींना ओबीसी समाजाचे राजकारणातील अस्तित्व खुपते आहे. त्यामुळेच राज्य मागासवर्ग आयोगाची आर्थिक कोंडी करून ओबीसी आरक्षणास कायमचा सुरुंग लावण्याचा आणि त्याद्वारे ओबीसीं चे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा ठाकरे सरकारचा कट आहे. हा कट सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे उघड झाला आहे, अशी टीका भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत निवेदनाद्वारे केली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी उमेदवारांसाठीच्या आरक्षणाच्या गंभीर मुद्द्यावर जाणीवपूर्वक चालढकल करणाऱ्या ठाकरे सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली, असा आरोपही त्यांनी केला.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या २७ टक्के जागांवर निवडणूक घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ओबीसींचे आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी या समाजाचे राजकीय मागासलेपण सिद्ध करणे आवश्यक होते. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगास ठाकरे सरकारने निधी व अन्य कोणत्याही प्रकारचे सहकार्य न केल्याने आयोगाचे कामकाजच सुरू झाले नाही. काँग्रेसच्या व शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील सरंजामशाही प्रवृत्तींना ओबीसी समाजाचे राजकारणातील अस्तित्व खुपते आहे. त्यामुळेच न्यायालयाने निर्धारित करून दिलेली प्रक्रिया जाणीवपूर्वक लांबवून आरक्षण मिळूच नये यासाठीच सरकारने आयोगाची कोंडी केली, असा आरोपही त्यांनी केला.

राज्यातील ओबीसी समाजाची माहिती गोळा करून त्यांच्या राजकीय मागासलेपणाचा अभ्यास व त्यानुसार अहवाल सादर करण्यासाठी ४३५ कोटी रुपयांचा प्रस्ताव आयोगाने जुलैमध्येच राज्य सरकारला पाठविला होता, पण सरकारने त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केल्याने आरक्षणासंदर्भात आवश्यक माहिती गोळा करण्याचे कामच सुरू झाले नाही. राज्य सरकारने आदेश दिल्यास एक महिन्याच्या आत हा अहवाल देण्याची तयारी असल्याचे आयोगाने गेल्या ऑगस्टमध्येच स्पष्ट केले होते. मात्र सरकारने त्यावरही काहीच कार्यवाही न केल्याने आरक्षण गमावण्याची वेळ ओबीसी समाजावर आली, असे ते म्हणाले.

गेल्या ऑगस्टमध्ये या प्रश्नासंदर्भात ठाकरे सरकारने बैठक बोलावली, तेव्हाही सरकारकडे कोणताच प्रस्ताव किंवा तोडगा नव्हता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्या बैठकीतच सुचविल्याप्रमाणे, मागासवर्गीय आयोगामार्फत इम्पिरिकल डेटा तयार करून ओबीसींचा राजकीय मागासलेपणा सिद्ध करणे आवश्यक होते. मात्र ही तिहेरी प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी दिरंगाई करून तीन पक्षांच्या सरकारने तिहेरी फसवणूक केली आहे.

राज्यातील महत्वाचे राजकीय व सामाजिक प्रश्न टांगणीवर ठेवून समाजामध्ये अस्वस्थता माजविण्याचा राज्य सरकारचा कट आहे, असा थेट आरोप अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केला. आयोगाची कोंडी करून अध्यादेशाद्वारे आरक्षण लागू करण्याचा निर्णय न्यायालयात टिकणार नाही याची जाणीव असतानाही, आरक्षण मिळू नये या भूमिकेतूनच सरकारने तिहेरी फसवणुकीचा कट आखला, असेही ते म्हणाले. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करून त्यांचे राजकीय हक्क त्यांना पुन्हा मिळावेत यासाठी भाजप संघर्ष करेल, असा इशाराही त्यांनी दिला.