Home Blog Page 201

डोंबिवलीत शिवसेनेला खिंडार; शिवसैनिकांचा मनसे पक्षात प्रवेश..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजू लागताच डोंबिवलीत शिवसेनेला खिंडार पडू लागल्याचे दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन डोंबवलीतून गेल्या निवडणुकीत सेनेच्या कणखर उमेदवाराला चितपट करून मनसे चे एकमेव निवडून आलेले उमेदवार माननीय आमदार राजू दादा पाटील यांच्या मर्गदर्शनाखाली नांदिवली पंचानंद मधील समर्थ नगर येथील शिवसेनेचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते यांचे म.न.वि.से उपशहर अध्यक्ष दिप्तेश नाईक, विभाग अध्यक्ष सुहास काळे, महाराष्ट सैनिक कमलेश सावंत, यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हा संघटक हर्षद पाटील, उप-जिल्हा संघटक सुदेश चुडणाईक, डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, डोंबिवली संघटक योगेश पाटील विभाग अध्यक्ष राजेश म्हात्रे, गट अध्यक्ष निषाद आंबूर्ले, महाराष्ट्र सैनिक चिन्मय वारंगे व कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदुस्थान माथाडी ट्रान्स्पोर्ट कामगार सेनेच्या वतीने नळपाणी योजना पूर्ववत सुरु; पितळवाडी आरोग्य केंद्राला ऑक्सिजन सिलेंडरची मदत..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पाणी ही माणसाची मूलभूत गरज असल्याने संकटग्रस्त लोकांसाठी तातडीने धावून जाणे गरजेचे असल्याने आम्ही सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका जपली अशी भावना हिंदुस्थान माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष विकास मयेकर यांनी व्यक्त केली. २२ जुलैच्या अतिवृष्टीमूळे पोलादपूर तालुक्यातील कामथी नदीला आलेल्या बेफाम पुरात साखर खडकवाडी व आडावळे खडकवाडी या दोन गावांसाठी असलेल्या नळपाणी योजनांचे दोन्ही पंपघर, मोटर व इलेक्ट्रिक मोटर मशीन केबलसह संपूर्णतः वाहून गेले होते. ग्रामस्थ मंडळींनी अल्पावधीत श्रमदानातून पुन्हा उभारलेल्या नवीन पंपघराचे उद्घघाटन मयेकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष बाजीराव मालुसरे, संयुक्त सरचिटणीस शंकर झोरे, रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश डफळे, वाहतूक सेना उपाध्यक्ष गिरीश विचारे, शिवसेना युवानेते अनिल मालुसरे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेले महिनाभर पावसाने उघडीप घेतल्याने ना नळाचे पाणी ना पावसाने पडणाऱ्या वळचणीचे पाणी अशा अडचणीत ग्रामस्थ पाण्याविना सापडले होते. याची दखल घेत पोलादपूर नाईक मराठा समाज मुंबईचे कार्याध्यक्ष व फोर्टचे माजी शाखाप्रमुख बाजीराव मालुसरे आणि दातृत्वासाठी नेहमी तत्पर असणारे सामाजिक कार्यकर्ते दीपेश मालुसरे यांनी सिंहाचा वाटा उचलत तातडीने दोन्ही गावातील चाकरमानी तरुणांच्या मदतीने शासनाच्या मदतीची वाट न पाहता काम पूर्ण केले. यातल्या फार मोठ्या आर्थिक खर्चाचा भार हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेने उचलून सामाजिक भूमिका पार पाडली.

पोलादपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भूसख्खलन होत दरडी कोसळून घरांसह मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. तिन्ही नद्यांना आलेल्या बेफाम पुरांमुळे तर दोन्ही बाजूच्या शेतजमिनी वाहून गेल्या त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत तो उध्वस्त झाला आहे याची प्रत्यक्ष पाहणीही यावेळी मुंबईतील कार्यकर्त्यांनी केली. कोरोनाच्या आजारामूळे तिन्ही खोऱ्यातील बाधित रुग्ण ग्रामीण भागातून महाड कोविड रुग्णालयापर्यंत सुखरूप पोहोचावा यासाठी संघटनेच्या वतीने पितळवाडी आरोग्य केंद्राला ऑक्सिजन सिलेंडर वैद्यकीय मदत म्हणून भेट देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लऊ मालुसरे, गणेश मालुसरे, गोपाळ जाधव, तानाजी मालुसरे, रामभाऊ मालुसरे यांनी विशेष मेहनत घेतली.

राज्यसरकार तर्फे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाच्या दीड वर्षांच्या दिर्घकाळानंतर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्यसरकार तर्फे सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत (टोल माफी) देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या पथकर सवलतीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना विशिष्ट स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

आगामी गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकणात जाणारे सर्व रस्ते, महामार्ग सुस्थितीत असणे गरजेचे आहेत. भाविकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी पनवेल, पेण, महाड रस्ता, सातारा, भुईंज, शेंद्रे तसेच कराड-पाटण चिपळूणमार्गे कोकणात जाणारा महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, वाकण-पाली-खोपोली मार्ग, सिंधुदुर्गातील वागदे-कुडाळ मार्ग, आंबेनळी घाट, ताम्हिणी घाट, रत्नागिरी-सावर्डे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची उर्वरित कामे दोन दिवसांत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देशही मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरात सवलत (टोल माफी) देण्याची घोषणा करतानाच या वाहनांसाठी विशिष्ट स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही यावेळी शिंदे यांनी दिले. मुंबई-पुणे, पुणे-सातारा, मुंबई-गोवा या महामार्गावरील पथकर नाक्यांवर अधिकचे मनुष्यबळ नेमणूक करुन गणेश भक्तांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवल्यास वाहतूक कोंडी कमी होईल.सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी समन्वयाने पथकर नाक्यांवर भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

पथकर नाक्यांवर गणेश भक्तांशी वाद घालू नका, पथकर सवलतीचे स्टीकर्स उपलब्ध करुन देण्याबरोबर पथकर नाक्यांवर रुग्णवाहिका, जलद प्रतिसाद वाहने, जेसीबीबरोबरच पुरेसे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करा. कोविडचे संकट पाहता भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या. कोकणात जाणाऱ्या मार्गावर स्थानिक पोलीसांबरोबरच महामार्ग वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले असून भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, वाहतूक खोळंबू नये यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

या बैठकीस ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, परिवहन, एसटी महामंडळ, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आदींचे वरिष्ठ अधिकारी तसेच पथकर कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात केलेल्या कामांची आणि सुविधांची माहिती यावेळी दिली. या बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, अपर पोलीस महासंचालक (महामार्ग वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री. देबडवार आदी वरिष्ठ अधिकारी ऑनलाइन दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीला उपस्थित होते.

‘ई.डी’ कडून अनिल देशमुखांच्या विरोधात शोध सुरू; लुकआउट नोटीस जारी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ई.डी) ने बजावलेले ‘समन्स’ रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण देशमुख यांची याचिका ऐकू शकत नसल्याचे न्यायमूर्ती रेवती डेरे यांनी स्पष्ट केल्याने दुसऱ्या एकलपीठासमोर या याचिकेची सुनावणी होणार आहे. दरम्यान आता अंमलबजावणी संचालनालय (ई.डी) ने अनिल देशमुख यांच्याविरोधात ‘लुकआऊट नोटीस’ जारी केली आहे. १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपाच्या संदर्भात ‘ई.डी’ ने ही ‘लुकआऊट नोटीस’ जारी केली आहे.

‘ई.डी’ कडून ‘लुकआउट नोटीस’ जारी झाल्यानंतर अनिल देशमुख यांना देश सोडून जाता येणार नाही. हे परिपत्रक एक वर्षापर्यंत किंवा तपास यंत्रणा रद्द किंवा नूतनीकरण करेपर्यंत वैध राहते. वसुलीच्या आरोपांनंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना देश सोडून पळून जाण्यापासून रोखण्यासाठी ‘लुकआउट नोटीस’ जारी करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.

‘ई.डी’ ने देशमुख यांना आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावले असून ते एकदाही चौकशीसाठी हजर झाले नाहीत. कायद्यानुसार उपलब्ध पर्यायांचा विचार करत असल्याचा दावा करत देशमुखांनी हजर राहण्यास नकार दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना गेल्या महिन्यात या प्रकरणातील ‘ईडी’च्या कारवाईपासून अंतरिम विश्रांती देण्यास नकार दिला होता. ‘ई.डी’ अधिकारी अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करत आहे.

एजन्सीने केलेल्या फिर्यादी तक्रारीनुसार आरोपपत्र  दाखल..

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘गृहमंत्री’ म्हणून काम करताना विविध ऑर्केस्ट्रा बार मालकांकडून अंदाजे ४.७० कोटी रुपयांची रोख रक्कम अवैधरित्या मिळवली होती असे ‘ई.डी’ ने  त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.

 

डोंबिवलीतील सामाजिक संस्थेकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोफत प्रसाद वाटप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

यंदाच्या गणेशोत्सवात ‘सेफ्टी वेलफेअर असोसिएशन डोंबिवली, आणि कुराश असोसिएशन महाराष्ट्र सलग्न, पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने डोंबिवली मधील सर्व ‘सार्वजनिक गणेशोत्सव’ मंडळांना मोफत प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेकडील असणाऱ्या सर्व गणेशोत्सव मंडळांना एकूण २५० किलो प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे असे ‘सेफ्टी वेलफेअर असोसिएशन’चे संस्थापक व अध्यक्ष विशाल वि.शेटे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे. दिनांक ८/०९/२०२१ पर्यंत डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेकडील सर्व गणेशोत्सव मंडळांनी आपला पत्ता आणि नाव संस्थेच्या ९९२०२६२१०१ या क्रमांकावर नोंदवण्याचे आव्हान संस्थेतर्फे करण्यात आले आहे.