Home Blog Page 202

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नायर रुग्णालयाला १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बृहन्मुंबईतील ‘टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय’ आणि ‘बी.वाय.एल.नायर रुग्णालय’ ही शंभर वर्षांची तरुण संस्था असून आधुनिकतेचा साज घेत काळाप्रमाणे बदलणाऱ्या या संस्थेला राज्य सरकारच्या वतीने १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय’ आणि बी.वाय.एल.नायर रुग्णालयाचा शतकपूर्तीवर्ष सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, आमदार यामिनी जाधव, उपमहापौर सुहास वाडकर, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, जनतेला दीर्घायुष्य देणारी संस्था आज शतायुषी होते आहे, हे समाधान काही वेगळे असून या संस्थेचा हा प्रवास थक्क करणारा आहे. प्रतिकूल काळात जिद्द आणि चिकाटीने काय करता येऊ शकते हे या संस्थेने दाखवून दिले आहे. संस्था निर्माण केल्यावर जीव ओतून इतरांना जीवदान देण्याचे काम या रुग्णालयातील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र केले आहे. आज मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद आहेत, देव केवळ मंदिरे आणि प्रार्थनास्थळांमध्ये नाही तर डॉक्टरांच्या रुपात रुग्णांचा जीव वाचवत आहे. कोविड-१९ काळात कोरोनाचे संकट हे अनपेक्षित तितकेच अनाकलनीय होते, सुरुवातीला या संकटाची दहशत होती, मात्र आज आपण या संकटाचा मुकाबला करण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या, त्यामुळे राज्य सरकार, प्रशासन यांचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र, या कौतुकाचे खरे मानकरी सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढले.

.

कोविडच्या अगोदर शंभर वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्ल्यूची साथ पसरली होती, आता त्याची काही माहिती उपलब्ध असेल असे वाटत नाही, मात्र यापुढे कोणताही विषाणू येईल त्यावेळी कोरोनाकाळात आपण काय केले ? काय करायला हवे ? याची अधिकृत नोंद करण्याची आवश्यकता असून ही माहिती ५०-१०० वर्षानंतरदेखील उपलब्ध होईल या दृष्टिने प्रयत्न करण्याची गरज बोलून दाखवतानाच या संस्थेला जेव्हा दोनशे वर्षे पूर्ण होतील त्यावेळी इतिहासात या रुग्णालयाच्या कार्याची निश्चितच नोंद होईल असेही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. शंभर वर्षांपूर्वी अनेक दानशूरांनी दान दिले, मदत केली म्हणून आज आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून जीवनदान मिळाले आहे. ‘टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय’ आणि बी.वाय.एल. नायर रुग्णालय या संस्थेला १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करतानाच शंभर वर्षांनंतरही लोकांसाठी हितकारक ठरेल असे काम करून दाखवण्याचे आवाहनही मुख्यमंत्री यांनी यावेळी केले.

२००५ च्या मुंबईतील पूरानंतर लॅप्टोस्पयरोसिस, डेंग्यूचा धोका वाढला होता त्यावेळी चाचण्या करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात पहिली लॅब सुरु झाली, नंतर कोरोनाच्या काळात चाचण्यांसाठी सुरुवातीला ‘कस्तुरबा’ आणि पुण्याची ‘एनआयव्ही’ अशा दोनच प्रयोगशाळा होत्या आज या प्रयोगशाळांची संख्या सहाशेच्या वर गेल्या असून पूर्वी सात-आठ हजार खाटांची क्षमता असलेल्या या राज्यात आता साडेचार लाख खाटा वाढल्या आहेत. कोरोनाच्या ‘डेल्टा व्हेरियंट’च्या तपासणीसाठी नायर रुग्णालयातच एकमेव ‘जिनोम सिक्वेन्सिंग लॅब’ उभारण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

शतकपूर्तीवर्षे असलेल्या या संस्थेचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान असून ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. वैद्यकीय सेवेसाठी पुढाकार घेऊन संस्थेने केलेल्या कार्याचा पालकमंत्री असलम शेख यांनी यावेळी खासकरून गौरव केला. फ्रंटलाईन वर्कर्ससाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या भरीव उपाययोजनांची माहिती यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.

नायरसारखी मुंबईतील सर्व रुग्णालये ही मुंबईकरांची हृदयस्थानं असून कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या काळात नायर रुग्णालयाने केलेल्या सेवेचा महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी गौरव केला. भविष्यातील कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी मुंबईतील आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीदेखील महापौरांनी यावेळी दिली.

याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इम्युनॉलॉजी, शल्यक्रिया कौशल्य आणि संगणकधारित शिक्षण या तीन प्रयोग शाळांचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागनिर्मित पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची माहिती देणाऱ्या ‘गणेशोत्सव २०२१’ या माहितीपुस्तिकेचे तसेच नायर रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचाऱी तसेच विद्यार्थ्यांना कोविड काळात आलेल्या अनुभवांचे संकलन असलेल्या पुस्तिकेचेही मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. भारतीय टपाल विभागाने नायर रुग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त जारी केलेल्या विशेष ‘टपाल कव्हर’चे प्रकाशन आणि संस्थेच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या भित्तीचित्राचेदेखील यावेळी अनावरण करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरातील विविध रुग्णालयांमध्ये कोविड काळात केलेल्या व्यवस्थापनाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचेही यावेळी मान्यवरांनी प्रकाशन केले. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे नायर रुग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त संस्थेच्या कार्याचा गौरव केला.

 

अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याप्रकरणी १२ तासांत चालत्या ट्रेन मधून आरोपीच्या मुसक्या आवळल्यामुळे कोलाबा पोलिसांचा विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरव..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक २८/०८/ २०२१ रोजी मुंबईतील एका फुटपाथवर राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याबाबत खबर मिळाली त्या अनुषंगाने कुलाबा पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. ३६९/ २०२१ कलम ३७६ भादवि सह कलम ४, ८ (पोक्सो कायदा) अन्वये त्यानी दिलेल्या तक्रारीं वरून गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यातील आरोपीचे नांव व कोणताही ठावठीकाणा माहीत नसताना त्यास केवळ जुना फोटो व आसाम चा रहिवाशी असल्याच्या माहितीवरून सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी सुधाकर शितप व गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगेश खरात व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी जाऊन मिळालेल्या माहितीनुसार व तांत्रिक पुराव्याच्या आधारे सदर आरोपींचा कसोशीने शोध घेऊन आरोपी रफिक-उल-इस्लाम अबुल कलाम आज़ाद उर्फ रोहित यास १२ तासांच्या आत मुंबई सोडून फरार होत असताना सापळा रचून चालत्या ट्रेन मधून ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला व आरोपीस अटक केली.

सदर कामगिरीबद्दल कुलाबा पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या प्रशंसनीय व उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिनांक ०३/०९/२०२१ रोजी सकाळी ११:०० वा मा. श्री.विश्वास नांगरे पाटील, पोलीस सह आयुक्त (का.व.सु.) बृहनमुंबई यांनी त्यांच्या कार्यालयात विशेष पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला आहे.

 

‘ईडी’ चे एकनाथ खडसे, त्यांची पत्नी आणि जावयाच्या विरोधात आरोपपत्र दाखल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात ‘ईडी’कडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या एक हजार पानी आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून आरोपपत्रात समावेश आहे. या सर्वांवर मनी लॉड्रींगचा आरोप लावण्यात आला आहे. त्याचबरोबर याप्रकरणी अटकेत असलेल्या गिरीश चौधरी यांचा जामीन अर्जही मुंबई सत्र न्यायालयानं शुक्रवारी फेटाळून लावला.

गिरीश चौधरी यांनी या प्रकरणी आपल्याला बळीचा बकरा बनवलं गेलंय असा आरोप केला होता. मात्र विशेष पीएमएलए कोर्टानं हा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे भाजपासोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या एकनाथ खडसेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. साल २०१६ मध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्री असताना हा सारा व्यवहार झाला होता. विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत याची चौकशीही झाली होती. मात्र एसीबीनं खडसे यांना याप्रकरणी क्लीन चीट दिली होती.

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी येथील एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ (अ) ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत.

या व्यवहाराखाली गिरीश यांनी पाच ‘शेल’ कंपन्यांकडून आलेला पैसा वापरल्याचं कागदोपत्री निष्पन्न झालेलं आहे. या सर्व व्यवहारात राज्य सरकारचं सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. म्हणून गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावून त्यांना अटक केली होती. एकनाथ खडसे यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. मात्र एकनाथ खडसे यांना याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं तूर्तास अटकेपासून दिलासा दिलेला आहे.

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल(Ajfc) पत्रकार संघटनेचे राज्य संघटक शहाजहान आत्तार यांचा पत्रकार डॉ. मुनीर तांबोळी यांच्या हस्ते सत्कार!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: नजीरभाई चट्टरकी, सांगली

पनवेल (मुंबई) : सोलापूर येथील जेष्ठ पत्रकार व ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल (Ajfc) पत्रकार संघटनेचे राज्य संघटक मा. शहाजहान आत्तार यांचा आज पनवेल येथे पत्रकार डॉ. मुनीर तांबोळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार व मार्गदशक श्री श्रेयष जी आदि मान्यवर व पत्रकार उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. मुनीर तांबोळी यांनी सततच्या लॉक डाऊन मुळे राज्यातील पत्रकार आपल्या कुटुंबियांसह दयनीय अवस्थेत गुजराण करीत आहेत. पत्रकार यांच्या मगण्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कोरोनाच्या भयंकर संकटकाळात ग्रामीण भागातील पत्रकारांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यांच्या मागण्यांसाठी आपण सदैव पाठीशी राहु व मदत करू असे आश्वाशन डॉ तांबोळी यांनी दिले.

शहाजहान आत्तार यांनी आपण पत्रकारांच्या हक्कासाठी वेळ पडलीच तर संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करू अशी ग्वाही दिली. संपूर्ण राज्यातील सर्वात जूनी ही पत्रकारांची संघटना असून जेष्ठ पत्रकार व Ajfc चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. यासीन पटेल यांच्या मार्गदर्शना खाली कार्यरत आहे.

(नजीरभाई चट्टरकी, पत्रकार जत, सांगली)

‘ईडी’ची ‘राज्य सहकारी बँक’ घोटाळा प्रकरणी सात ठिकाणी छापेमारी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सात ठिकाणी छापेमारी केली. ‘ईडी’च्या या धाडी मुंबई आणि मुंबईच्या बाहेर ‘महाराष्ट्र राज्य सहकारी बँक’ घोटाळा प्रकरणात टाकण्यात आल्या आहेत. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र राज्य सहकारी बँक’ घोटाळ्या प्रकरणात जे राजकीय नेते अडकले आहेत त्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे नाव अग्रस्थानी आहे. या प्रकरणात लवकरच अनेक राजकीय नेत्यांना ‘ईडी’ कडून समन्स जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं म्हटलं जातं होतं. या घोटाळ्याबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, माजी मंत्री शालिनीताई पाटील, माजी आमदार माणिक जाधव यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. यानंतर ‘ईडी’नेही गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यात ‘ईडी’ने ‘जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना’ जप्त केला. यानंतर इतर साखर करखान्या बाबत ‘ईडी’चा तपास सुरु झाला आहे.

‘ईडी’कडून याच अनुषंगाने धाडसत्र राबवण्यात आलं. ‘ईडी’कडून गुरुवारी सात ठिकाणी धाडी टाकण्यात आल्यात. अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यांची आता छाननी सुरु आहे. यानंतर आता संबंधितांना समन्स पाठवून बोलावलं जाणार आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरण कोर्टात अडकल्यानंतर ‘ईडी’ने आता आपला मोर्चा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याकडे वळवला आहे. या बँक घोटाळ्यात सुमारे ७० वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावे आली आहेत. यापैकी काही जणांची चौकशी झाली आहे. लवकरच इतर नेत्यांची चौकशी होण्याची शक्यता ईडीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार शिखर बँकेचे अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी को-ऑप बँकेचे अध्यक्ष होते. त्या काळात या बँकेत कथित २५ हजार कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. तर जो जरंडेश्वर कारखाना अवसायनात निघाला, तो कवडीमोल भावाने विकल्याच आरोप आहे, तो कारखाना सुद्धा अजित पवारांच्या नातेवाईकाचा आहे. राजेंद्र घाडगे हे अजित पवारांचे मामा या बँकेचे चेअरमन आहेत. यांच्याच कार्यकाळात ‘ईडी’ने या कारखान्यावर जप्तीची कारवाई केली होती.