Home Blog Page 211

गुन्हे शाखा घटक-४ चे कर्तव्य तत्पर पोलीस निरीक्षक श्री.मनोहर नरसप्पा पाटील यांना ‘सर्वोत्कृष्ट तपासी अधिकारी’ पदक जाहीर..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ येथील कर्तव्य तत्पर पोलीस निरीक्षक श्री. मनोहर नरसप्पा पाटील यांना १५ ऑगस्ट २०२१ ला स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर ‘सर्वोत्कृष्ट तपासी अधिकारी’ म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री यांच्या कडील ‘विशेष तपास पदक’ जाहीर केले आहे.

थोडक्यात हकीगत अशी की मुंब्रा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु.र.नं ५५७/२०१६ भा.द.वि कलम ३०२,२०१, ३६३,३६५ ठाणे सेशन केस क्र.१०३/२०१७ या गुन्ह्यातील फिर्यादी श्रीमती साधनादेवी अवधेश भगत रा. गावदेवी मंदिराजवळ, मुंब्रा बायपास रोड, ठाणे यांनी दि.१२/११/२०१६ रोजी तिच्या ७ वर्षे वयाच्या कु. रंजन नावाच्या अल्पवयीन मुलाची परिसरात खेळत असताना अनोळखी व्यक्तीने अज्ञात कारणास्तव अपहरणाची फिर्याद दिली होती.

सदर गुन्ह्याचा कोणत्याही स्वरूपाचा धागादोरा व पुरावा उपलब्ध नसताना फिर्यादी च्या मोबाईल वर अज्ञात इसमाने फोन करून अपहरीत मुलाची विचारणा केली होती हाच दुवा धरून तपासिक अधिकारी यांनी मोबाईल चे तांत्रिक विश्लेषण करून संशयित आरोपी संतोष रामरूत शर्मा (वय २५ वर्षे) रा. गावदेवी मंदिराजवळ, बायपास रोड, मुंब्रा, जिल्हा ठाणे यांस ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या तपासात आरोपी हा फिर्यादीच्या शेजारीच राहत असल्याने त्याचे फिर्यादी सोबत एकतर्फी प्रेम होते. फिर्यादी ज्या ज्या वेळी घरी असे त्या त्या वेळी अपहरित मुलगा रंजन हा तिच्या सोबत वावरत असल्याने आरोपीस फिर्यादी सोबत लगट करण्याचा सतत प्रयत्न करूनही त्यास संधी मिळात नव्ह्ती म्हणून मार्गातील अडसर कायमचा दूर करण्याचा उद्देशाने आरोपीने सदर मुलाचे अपहरण करून त्याला निर्मनुष्य असलेल्या पडक्या चाळीतील एका खोलीत नेऊन त्याचा गळा दाबून जीवे ठार मारून त्याची ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रुप करून पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने सदरचे प्रेत खड्डा खोदून पुरून टाकले. सदर गुन्ह्यातील नमूद आरोपीस अटक करून त्याच्या विरुद्ध सबळ पुरावा गोळा करून मा. सत्र न्यायालय ठाणे यांनी पुराव्यानिशी आरोपी विरुद्ध गुन्हा शाबीत झाल्याने आरोपी संतोष शर्मा यांस भा.द.वि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व ₹ ५०००/- दंड, भा.द.वि कलम ३६३ अन्वये ३ वर्षे सजा व ₹ १०००/- दंड आणि भा.द.वि कलम २०१ अन्वये ३ वर्षे सजा व ₹ १०००/- दंड अशी शिक्षा दि.२०/०२/२०२१ रोजी ठोठावली आहे.

सदर तपासात पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांच्या समवेत त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाजन, सहा.पोलीस उपनिरीक्षक शंकर देसाई, पो.हवा सुभाष शेलार, महिला पो.ना रेश्मा गांगुर्डे या टीमने अथक परिश्रम घेत गुन्ह्याचा छडा लावून आरोपीस शिक्षेस पात्र ठरवले.

सदर गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाची केंद्र शासनाने दखल घेऊन १५ ऑगस्ट २०२१ च्या शुभ मुहूर्तावर ‘सर्वोत्कृष्ट तपासी अधिकारी’ म्हणून मा. केंद्रीय गृहमंत्री यांचेकडील ‘विशेष तपास पदक’ पोलीस निरीक्षक श्री.मनोहर नरसप्पा पाटील, उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ यांना जाहीर झाले असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

मुंबई पोलिसांचे स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘मिशन ऑलआऊट’..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘१५ ऑगस्ट’ हा दिवस देशभर ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा केला जातो व ह्या दिवशी सर्व भारतीय जनमाणसात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह असतो, मात्र या दिवशी देशाच्या दुश्मनांकडून काही घातपाताच्या घटनांचा धोका देखील असतो. या पार्श्वभूमीवर देशातील महत्वाच्या शहरांमध्ये चोख बंदोबस्त करण्यात येतो. या स्वातंत्र्य दिनी मुंबईतील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, कोणताही घातपात घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी ‘मिशन ऑलआउट’ काल रात्री पासून सुरू केले आहे. या मिशन अंतर्गत मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणत नाकाबंदी करण्यात आली आहे. छोट्या रस्त्यांवर पेट्रोलिंग देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मुंबईच्या वेशीतून आत येणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी केली जात आहे. मुंबईचे महत्त्वाचे प्रवेश द्वार असलेल्या आनंद नगर टोल नाक्यावर मुंबई पोलिसांची मोठी नाकाबंदी लावण्यात आली आहे. प्रत्येक वाहन चालकांची चौकशी करून, कागदपत्रं तपासली जात आहेत.

मुंबई पोलिसांचे प्रवक्ते डीसीपी एस चैतन्य यांनी सांगितलं की, या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयांची सुरक्षा वाढवली आहे. खासकरुन मंत्रालयात जिथं ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे तिथली सुरक्षा कडक करण्यात आली आहे. डीसीपी चैतन्य यांनी सांगितलं की, कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी ज्या व्यक्तिवर संशय आहे त्या सर्व व्यक्तिंची तपासणी केली जात आहे. ‘बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड’ सोबत सर्व महत्वाच्या परिसरांची काटेकोरपणे पाहणी केली जात आहे. मुंबईच्या ९४ पोलीस स्टेशन्सच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे की त्यांनी हाय अलर्ट वर राहावं. त्यांच्या परिसरात त्यांनी पेट्रोलिंग करावी. सोबतच ‘एंटी टेरर सेल’ (एटीसी) आणि बीट ऑफिसर यांना देखील माहिती काढण्यासाठी सांगितलं आहे.

‘लसीकरणाबाबत केंद्र सरकारनं थापा मारणं बंद करावं’ – सायरस पूनावाला

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सीरम इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा व संस्थापक अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी त्यांच्या पुण्यातील पत्रकार परिषदेत करोना लसीकरणाबाबत बोलताना आज केंद्र सरकारच्या लस निर्यात धोरणावर कडकडून टीका केली. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोरोना लसीकरण, लॉकडाउन व केंद्र सरकारच्या धोरणावर रोखठोक मतं मांडत त्यांनी केंद्र सरकारच्या लस निर्यातबंदीच्या धोरणावर त्यांनी बेधडक टीका केली. ‘माझा मुलगा म्हणाला होता की यावर बोलू नका, पण मी बोलणार,’ असं ते यावेळी म्हणाले.

‘केंद्र सरकारनं लस निर्यातीवर घातलेली बंदी योग्य नाही. मोदी सरकारनं हा निर्णय घेऊन अतिशय वाईट केलं. माझ्या मुलानं सांगितलं होतं की त्यावर तुम्ही तोंड उघडू नका. पण माझं मत आहे की निर्यातबंदी उठवली पाहिजे. कारण, बाकीच्या देशातील नागरिकांना देखील लसीची गरज आहे. सीरम इन्स्टिट्यूट आजवर जगातील १७० देशांना लस पुरवत आली आहे. पण आता गरज असताना आम्ही त्यांना लस पुरवू शकत नाही अशी स्थिती आहे. त्यांच्याकडून अॅडव्हान्स पैसेही घेतले आहेत. ‘बिल गेट्स फाउंडेशन’कडून मी ५ हजार कोटी रुपये घेतले आहेत. मात्र, त्यांना लस पुरवता येत नाहीए,’ असं पूनावाला म्हणाले.

लसीकरण पूर्ण करण्याच्या टार्गेटवरूनही त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘आम्ही वर्षाला ११० कोटी लसीकरणाचं लक्ष्य ठेवलं आहे. याचा अर्थ महिन्याला सुमारे १० कोटी डोसेसचं उत्पादन करावं लागणार आहे. ही काही सोपी गोष्ट नाही. जगातली कुठलीही कंपनी इतकं उत्पादन करू शकत नाही. पण तिकडं केंद्र सरकार वर्षाअखेरीस लसीकरण पूर्ण करण्याचं आश्वासन देत आहे. त्यांनी थापा मारणं बंद करावं. त्यांनी सांगितलेल्या मुदतीत लसीकरण शक्य नाही,’ असं परखड मत त्यांनी मांडलं.

मृत्यू दर वाढला तरचं लॉकडाउनचा पर्याय स्वीकारावा !

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरसकट लॉकडाउनचा वापर करण्यासही सायरस पूनावाला यांनी विरोध दर्शवला. ‘लॉकडाउन लावणे योग्य नाही. सरकारनं लॉकडाउन लावूच नये. ‘कोरोना मृत्युदर खूपच कमी आहे. कोरोनातील बरेच मृत्यू हे निष्काळजीपणामुळे झाले आहेत. लोक वेळीच उपचार घेण्यासाठी गेले नाहीत, अशी अनेक कारणं आहेत. मृत्यू दर वाढत असतील, तरच लॉकडाउनचा पर्याय स्वीकारावा,’ असा सल्ला त्यांनी यावेळी बोलताना दिला.

नवी मुंबईत ड्रग्ज तस्करांचा ‘एनसीबी’च्या पाच अधिकाऱ्यांवर गोळीबार; एकाची प्रकृती गंभीर..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘एनसीबी’ (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) ने गेल्या आठवड्यात पोटातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या परदेशी नागरिकाला अटक करून १० कोटींचे कोकेन जप्त केले होते. त्यानंतर एनसीबीने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. काल रात्री ‘एनसीबी’ने ड्रग्ज तस्कारांवर कारवाई करत तब्बल १ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. दरम्यान ड्रग्ज तस्कर गॅंगकडून ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांवर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात ‘एनसीबी’चे पाच अधिकारी जखमी झाले आहेत. तसेच यातील एका अधिकाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती एनसीबी’ कडून समोर आली आहे.

नवी मुंबई भागात ड्रग्ज तस्करीचे मोठे जाळे पसरले असल्याची गुप्त माहिती ‘एनसीबी’ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांकडून रात्री उशीरा संबंधित ठिकाणी छापेमारी करण्यात आली. मात्र, ड्रग पेडलरनं ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांवर हल्लाबोल चढवला. या हल्ल्यात ‘एनसीबी’चे ५ अधिकारी जबर जखमी झाले आहेत. तसेच एका अधिकाऱ्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या कारवाईत ‘एनसीबी’ने ड्रग्ज तस्कर गॅंगच्या म्होरक्याला अटक केली आहे. तसेच यावेळी अधिकाऱ्यांनी एक विदेशी बनावटीचे अग्निशस्त्र जप्त केले आहे. ही माहिती ‘एनसीबी’चे झोनल संचालक समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. ड्रग्ज तस्कर तिवरांच्या झाडांची मदत घेत फरार झाले आहेत. अन्य फरार आरोपींचा कसून शोध सुरू आहे असे एनसीबी’च्या अधिकाऱ्यांकडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

 

वर्सोवा खाडी किनाऱ्या लगतचे कांदळवन भू-माफियांनी केले नष्ट! अधिकाऱ्यांचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष!

संपादक: मोईन सय्यद/पालघर प्रतिनिधी

पालघर: मुंबई-वसई महामार्गा लगत वर्सोवा खाडी किनाऱ्याच्या तसेच ससू नवघर, मालजी पाडा परिसरात  कांदळवन क्षेत्र भरणी माफियांनी मोठ्या प्रमाणात नष्ट केले आहे. मात्र पालघर जिल्ह्यातील महसूल विभाग, वन विभाग आणि वसई-विरार महानगरपालिकेचे अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे, शेड आदी बांधकामे झालेली आहेत.
मोठ्या प्रमाणात झालेल्या भरावामुळे राष्ट्रीय महामार्ग पावसाळ्यात पाण्या खाली बुडत आहे.

२०१८ पासून या प्रकरणी अनेक तक्रारी होऊन देखील महसूल व महापालिका यांनी बेकायदेशीर बांधकामे हटवली नाहीत किंवा गुन्हे दाखल केले नाहीत. तसेच याठिकाणी झालेला बेकायदेशीर मातीचा भराव देखील काढलेला नाही.

तब्बल अडीच वर्षांनी आज शुक्रवारी स्थळपाहणी आयोजित करण्यात आली होती. परंतु आज ही केवळ दोन ठिकाणीच पाहणी झाली. केवळ पाहणीचा फार्स करीत असल्याचे दिसत होते.

वर्सोवा खाडी किनारी तर सरकारी जागेत कांदळवन नष्ट करून भूखंड तयार करण्यात आला आहे. तेथे असंख्य मोटार पंप लावण्यात होते. या ठिकाणी रेतीचे भरलेले ७ डंपर जागेवर सापडले. त्याच प्रमाणे या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शेड आणि बांधकामे झाली आहेत.

प्रांत अधिकारी स्वप्नील तांगडे, वसईच्या तहसीलदार उज्वला भगत, वालीवचे पोलीस निरीक्षक पाटील सह पर्यावरण संरक्षणसाठी कार्यरत कार्यकर्ते धीरज परब सह मोईन सय्यद, इरबा कोनापुरे आदी उपस्थित होते.

या प्रकरणी मा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान व उल्लंघन तसेच पर्यावरण संरक्षण कायदा, भादंसं व महसूल अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करावा. सर्व बांधकामे काढून भराव काढून टाकावा व कांदळवन पूर्ववत करावे. जागेवर आढळलेली वाहने साहित्य जप्त करावे अशी मागणी धीरज परब यांनी केली आहे.

येथील भरणी माफिया व भूमाफियांच्या मुसक्या आवळून कठोर कायदेशीर कारवाई महसूल, पोलीस व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी सुद्धा केली आहे.

त्याच बरोबर कांदळवन क्षेत्रात व 50 मीटर बफर झोनमध्ये मातीचा भराव व बांधकामे होण्यास जबाबदार असलेल्या महसूल, पालिका अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी केली आहे.