Home Blog Page 216

पोलिसांनी पकडलेल्या युरियायुक्त ट्रकच्या ई-वे बिलामध्ये गोलमाल

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: प्रमोद तिवारी

बोईसर: बोईसर पोलिसांनी ५ ऑगस्टला ताब्यात घेतलेल्या युरीयाने भरलेल्या गाडीबाबतचे गूढ अधिकच वाढले आहे. या गाडीची ५ ऑगस्टला एकाच दिवशी भिवंडी आणि तारापूर येथे बनवलेली दोन-दोन इ वे बिल समोर आल्याने या प्रकरणी संशय अधिकच गडद झाला असून पोलिसांनी या अँगलने कोणाच्याही दबावाला बळी न पडता तपास केल्यास युरियाच्या काळाबाजाराचे मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरम्यान पालघरच्या कृषी अधिक्षक कार्यालयातील निरीक्षक अधिकारी जगन सुर्यवंशी यांनी युरियाचे नमुने सील करून ते तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

५ ऑगस्टला संध्याकाळी तारापूर औदयोगिक वसाहतीतून माल भरून निघालेला आयशर टेम्पो क्र. MH-48 T-9844 खैरापाडा चेक पोस्ट येथे तपासणी दरम्यान बोईसर पोलिसांनी थांबवला असता त्यामध्ये असलेल्या मालाची टेम्पोचालक कोणतीही कागदपत्रे सादर न करू शकल्याने पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेऊन बोईसर पोलीस स्टेशनमध्ये आणला होता.पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतल्यानंतर या टेम्पोच्या मालकाने जवळपास दीड ते दोन तासांच्या उशीराने गाडीमध्ये ९ टन युरिया असल्याचे चलन, टॅक्स इन्व्हॉईस आणि इ वे बिल सादर केले. मात्र पोलिसांना सादर केलेल्या या कागदपत्रानुसार युरियाने भरलेला हा आयशर टेम्पो पूर्णा भिवंडी येथील कृष्णा सोल्वेकेम लिमिटेड या कंपनीतून गुजरातमधील पनोली येथील हिकल लिमिटेड या कंपनीत पाठविण्यात आलेला होता.

कृष्णा सोल्वेकेम कंपनीच्या इ वे बीलामध्ये आयशर टेम्पो क्र. MH 48 T 9844 हा ९ टन युरिया भरून ५ ऑगस्टला दुपारी २.२४ वाजता गुजरातमधील पनोली येथील हिकल लिमिटेड या कंपनीकडे निघाल्याची नोंद आहे. मात्र दुसरीकडे याच दिवशी तारापूर औदयोगिक वसाहतीमधील प्लॉट क्र. W-11 या कंपनीतूनही हाच आयशर टेम्पो संध्याकाळी ५.४९ वाजता ९ टन युरिया भरून निघाल्याची नोंद इ वे बिलात करण्यात आली आहे. त्यामुळे भिवंडी आणि तारापूर येथील युरियाचे नेमकं कोणते इ वे बिल खरं आणि कोणते इ वे बिल बनावट आहे याचा गुंता अधीकच वाढला आहे. याप्रकरणी तारापूर मधील प्लॉट क्र.W-11 या कंपनीतून युरिया भरल्याचे तेथील व्यवस्थापक हे नाकारत असून आयशर टेम्पोचे मालक आणि चालक मात्र युरिया प्लॉट क्र. W-11 मधूनच टेम्पोत भरल्याचे सांगत आहेत. त्यामुळे युरियाचे हे प्रकरण जास्तच संशयास्पद बनले असून पोलिसांनी सखोल चौकशी करून याची पाळेमुळे खणून काढण्याची आवश्यकता आहे.

पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या २ आरोपींना विष्णूनगर पोलिसांनी केले जेरबंद..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक ०६/०५/२०२१ रोजी ०४.४२ वाजता विष्णूनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर ८५/२०२१ भादवि कलम ३०७,३२४,३२३,५०४,३४ अन्वये गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी हे राहत्या घराच्या बाहेर चक्कर मारत असतांना यातील अटक आरोपी यांच्या पैकी एक हा कोलते यांच्या घराचा दरवाजा ठोठावत होता त्यास फिर्यादी यांनी कोलते यांच्या घराचा दरवाजा ठोठावु नका असे सांगितले असता त्या गोष्टीचा त्यांना राग येऊन त्यांनी आपसात संगनमत करून फिर्यादिस शिवीगाळ करून त्यांच्या दोन्ही डोळ्यावर हाताचे ठोशे मारून, अटक आरोपीत अनिकेत उर्फ दत्तात्रय म्हात्रे उर्फ पांडा याने फिर्यादी याला संपवण्याची वार्ता करत त्याच्या गळ्यावर उजव्या बाजूला चाकूने वार करून दुखापत केली, तसेच पाहिजे असलेला आरोपी साहिल श्रीनिवास ठाकूर उर्फ वालट्या याने लाकडी बांबूने फिर्यादीच्या पाठीवर व डोक्यावर मारून त्यास दुखापत केली म्हणून गुन्हा दाखल झाला होता. सदरच्या गुन्ह्याचा तपास हा विष्णूनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी स.पो.नि गणेश वडणे व त्यांचे पथक यांनी त्यांच्या गुप्त महितीदारा मार्फत हवा असलेला आरोपी जो आपल्या राहण्याची जागा नेहमी बदलत असल्याने तो सुमारे ३ महिन्यांपासून मिळून येत नसतांना गुप्त बातमीदारा मार्फत आरोपिचा शोध घेऊन हवा असलेला आरोपी नामे १) साहिल श्रीनिवास ठाकूर उर्फ वालट्या (वय २२ वर्षे) रा. हनुमान निवास चाळ, चाळ नंबर २, रूम नंबर २, सुभाष रोड, डोंबिवली पश्चिम २) सोमेश नवनाथ म्हात्रे (वय २५ वर्षे) रा.ठि. चिंचोलीपाडा, हनुमान मंदिराजवळ, सोन्याच्या दुकानाच्या मागे, डोंबिवली पश्चिम याला मोठागाव, शंकर मंदिराच्या पाठीमागे, रेतीबंदर रोड येथे पकडून दिनांक ०५/०८/२०२१ रोजी १९:२७ वाजता अटक करण्यात आली आहे. यापूर्वी नमूद गुन्ह्यात अनिकेत दत्तात्रेय म्हात्रे उर्फ पांडा या आरोपीस दि. १५.०५.२०२१ रोजी अटक केलेली आहे तो सध्या जेल मध्ये आहे, यामधील उर्वरित २ आरोपी यांना वरील प्रमाणे आता अटक केले आहेत.

सदरची कामगिरी मा. सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग, डोंबिवली चे श्री.जयराम मोरे, डोंबिवली विभाग व मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली १) सपोनि गणेश वडणे, २) पोहवा एस एन. नाईकरे, ३) पोना एस के. कुरणे ४) पोना बी के. सांगळे, ५) पोशि के ए.भामरे, ६) पोशि एम एस. बडगूजर यांनी सदरची कारवाई यशस्वी पणे पार पाडली आहे.

मे. सर्वोच्च न्यायालयाचा अ‍ॅमेझॉनच्या बाजूने कौल, ‘फ्यूचर-रिलायन्स’ विलीनीकरण अवैध!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी:अवधूत सावंत

सिंगापूर लवादाच्या निवाडय़ाला मान्यता…….

नवी दिल्ली : मे. सर्वोच्च न्यायालयाने फ्यूचर रिटेलबरोबरच्या वादात ई-व्यापारातील बलाढय़ अमेरिकी कंपनी अ‍ॅमेझॉनची बाजू उचलून धरणारा निकाल दिला.

रिलायन्स रिटेल आणि फ्यूचर रिटेल यांच्यात गेल्या वर्षी झालेल्या २४,७१३ कोटी रुपयांच्या व्यवहारासाठी हा निकाल म्हणजे मोठा धक्काच असून, अ‍ॅमेझॉनने विविध न्यायालयांमध्ये त्यावर आक्षेप घेत अखेर या लढय़ात यश मिळविले आहे.
फ्यूचर रिटेल आणि रिलायन्स रिटेल यांच्या विलीनीकरणाच्या व्यवहाराला प्रतिबंध करणारा सिंगापूरच्या आपत्कालीन लवादाने दिलेला निवाडा वैध आणि लागू करण्यायोग्य असल्याचे मे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सिंगापूर येथील आपत्कालीन लवादाने दिलेला निवाडा भारतीय लवाद आणि समेट कायद्याशी सुसंगत असून,
तो भारतातही ग्राह्य़ आणि अंमलबजावणी करण्यायोग्य आहे,
असे स्पष्ट करीत मे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. आर. एफ. नरिमन यांच्या खंडपीठाने कायद्याच्या अन्वयार्थाच्या एका मोठय़ा प्रश्नाची तडही या निकालातून लावली आहे.

अ‍ॅमेझॉन डॉट कॉम एन.व्ही. इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्ज एल.एल.सी. आणि फ्यूचर रिटेल यांच्यातील कायदेशीर लढाई अटीतटीच्या पातळीवर गेली होती.
ऑगस्ट २०२०मध्ये ‘रिलायन्स रिटेल’ने ‘फ्यूचर समूहा’तील किराणा आणि गोदाम व्यवसायाचे २४,७१३ कोटी रुपयांच्या मोबदल्यात संपादन करीत असल्याची घोषणा केली आणि अ‍ॅमेझॉनने त्यावर हरकत घेणारी मे. न्यायालयीन लढाई सुरू केली.
रिलायन्सबरोबरचा हा व्यवहार म्हणजे फ्यूचर समूहाने त्यापूर्वीच अ‍ॅमेझॉनबरोबर केलेल्या कराराचा भंग ठरतो,
असा अमेरिकी कंपनीचा दावा होता.

‘जेईई’ मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिल्ली येथील ‘नॅशनल टेस्टींग एजन्सी’ म्हणजेच ‘एनटीए’ ने ‘जेईई’ च्या जुलै २०२१’ च्या मुख्यम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. आज रात्री ८ वाजता हा निकाल वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे.

परीक्षार्थींना परीक्षेचा हा निकाल jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे.

एप्रिल २०२१ मध्ये ‘जेईई’ ची मुख्य परीक्षा होणार होती. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर, मुख्य परीक्षेच्या तिसऱ्या सत्रासाठी जुलै २०, २२, २५ आणि २७ रोजी (२०२१) ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी देशभरातून ७.०९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

दरम्यान, एकूण १३ भाषांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात येते. इंग्लिश, हिन्दी, गुजराती, आसामी, बंगाली, कन्नड़, मल्याळम, मराठी, ओड़िया, पंजाबी, तमिळ, तेलुगू, उर्दू भाषांचा यामध्ये समावेश आहे.

येत्या १७ ऑगस्टपासून पहिली ते सातवी ची शाळा सुरू होण्याचे संकेत..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे, आता लवकरच शाळांची घंटा वाजणार असल्याचे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. पहिली ते सातवीचे वर्ग येत्या १७ ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. मात्र, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतरच अंमलबजावणी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंचवीस जिल्ह्यांत अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्याचा विचार करूनच शाळा १७ ऑगस्टपासून सुरू करण्याविषयी शालेय शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. राज्य सरकारने ०१ ऑगस्टला :ब्रेक द चेन’ अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य शिक्षण विभागाकडे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे, शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे, त्यानंतर या निर्णयाची घोषणा होऊ शकते. ८ वी ते १० वीच्या शाळा या आधीच म्हणजे १५ जुलैपासून सुरू झाल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर मार्च २०२० पासून राज्यातील शाळा कोरोना महामारीमुळे बंद आहेत. आता लवकरच शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पहिली बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या.

राज्यात शाळा सुरू करण्याचा विचार सुरू असला तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आणि ‘डेल्टा व्हायरस’चा प्रादुर्भाव लक्षात घेऊनच उपाययोजना आखण्यात येत आहेत. यासाठी एक समिती नेमण्यात येणार आहे. त्यानंतर, ज्या जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, त्याच जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनंतरच शाळा सुरू करण्यात येतील, असेही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

राज्यात शाळा सुरू करण्याची घाई नको, त्यासाठी अजून काही काळ थांबावं लागेल, असे आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटलं आहे. परदेशात आणखी नवीन स्ट्रेन सापडले आहेत, त्यातच महाराष्ट्रात कोविडच्या केसेस अधिक आहेत. दुसरीकडे लहान मुलांवर लसीकरण ट्रायल सुरू आहे. त्यामुळे, मुलांना शाळेत पाठविण्यासाठी अजून वाट पाहावी लागेल, असे पवार यांनी सांगितले. त्यामुळे, शाळेची घंटा वाजायला आणखी अवधी असणार असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.