Home Blog Page 253

कोरोनाबाधित महिलेच्या हृदयातून काढली चक्क ७ सेंटिमीटरची गाठ; मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयात यशस्वी उपचार!

संपादक: मोईन सय्यद / मीरारोड, प्रतिनिधी

कोरोना पॉझिटिव्ह आणि हृदयासंबंधी विकार असणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेच्या हृदयातून चक्क ७ सेंटिमीटरची गाठ काढण्यात मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांना यश मिळाले आहे. सहा तास ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया चालली. कोरोना संसर्गामुळे या महिलेला दम्याचा त्रास जाणवत होती त्यातच हृदयात असलेली ही इतकी मोठी गाठ काढणे हे डॉक्टरांसाठी एक मोठे आव्हान होते. परंतु अशा स्थितीत केवळ डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे या महिलेला नव्याने आयुष्य मिळाले आहे.
मुळची कोल्हापूरची असणारी योगिता पाटील हिचा नुकताच विवाह झाला होता. लग्नाच्या काही दिवसांनी तिला अचानक श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला. वैद्यकीय चाचणीत ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. औषधोपचारानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. श्वास घेता येत नसल्याने या महिलेला ऑक्सिजनची गरज असल्याने कुटुंबियांनी तिला तातडीने मीरा रोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात हलवले.

मीरा रोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयातील कार्डिओव्हस्कुलर आणि थोरँसिस सर्जन डॉ. उमेंद्र भालेराव म्हणाले की, “ज्या वेळी या महिलेला रूग्णालयात आणण्यात आले होते तेव्हा या महिलेला श्वास घेताना त्रास जाणवत होता आणि पायाला सूज होती. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. अशा स्थितीत डॉ. अनुप टकसांडे यांनी या महिलेची इकोकार्डिओग्राफी तपासणी केली. या चाचणीत महिलेच्या हृदयाच्या उजव्या वरच्या भागात ७ सेंटिमीटर इतक्या मोठ्या आकाराची गाठ असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे हृदयाव्दारे शरीरातील अन्य अवयवांना होणाऱ्या रक्तप्रवाहात अडचणी येत होत्या. फुफ्फुसाला योग्यपद्धतीने रक्तपुरवठा होत नव्हता. मायक्सोमा नावाचा हा हृदयाचा ट्यूमर होता. या आजारावर वेळीच उपचार न झाल्यास रूग्ण दगावू शकतो.”

डॉ. भालेराव पुढे म्हणाले, “कोविड-१९ संसर्ग असल्याने या महिलेवर स्टिरॉइड्स आणि रेमेडसवीरद्वारे उपचार करण्यात आले आणि जेव्हा कोविडचा संसर्ग बरा झाला त्यानंतर दहा दिवसांनी म्हणजे २१ एप्रिल रोजी तिच्या हृदयावर शस्त्रक्रिया करून गाठ काढण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर या महिलेवर पाच दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले म्हणूनच कोरोनाच्या कालावधीत हृदय व फुफ्फुसासंबंधी काही लक्षणे आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.”

अतिधोकादायक इमारतीं, अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स तातडीने निष्कासित करा

अतिधोकादायक इमारतीं, अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स तातडीने निष्कासित करा

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे महापालिका आयुक्तांचे सहाय्यक आयुक्तांना आदेश

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अतिधोकादायक इमारती, अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स तातडीने निष्कासित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांना दिले. त्याचबरोबर अतिवृष्टीच्या दृष्टीने भुस्खलन होणाऱ्या ठिकाणांच्या नागरिकांसाठी तात्पुरती निवारा केंद्रे उभी करून त्यांना त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या.

शहरात पावसाळ्यामध्ये कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी प्रभाग समितीनिहाय धोकादायक, अतिधोकादायक इमारतीं, नालेसफाई, भूसख्खन होणारी ठिकाणी तसेच पावसाळ्यासंबंधित इतर बाबींचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, मनीष जोशी आदी उपस्थित होते.

प्रभागसमीती निहाय अतिधोकादायक, धोकादायक इमारतीबाबत करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेत उर्वरित अतिधोकादायक इमारती तात्काळ खाली करून तात्काळ तोडून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले. तसेच पावसाळ्यात देखील या सर्व इमारतीची पाहणी करून कोणतीही जीवित आणि वित्तहानी होणार नाही याकडे लक्ष देण्याचा सूचना सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या.

ठाणे महापालिका क्षेत्रात मुंब्रा, कळवा, माजिवडा मानपाडा तसेच ठिकाणी पावसाळयात भुस्खलन झाल्यास तेथील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करून पर्यायी व्यवस्था करण्यासाठी तात्पुरती निवारा केंद्रे उभी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले.

या बैठकीत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स तात्काळ काढून टाकण्याचे आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले. त्याचप्रमाणे सध्या कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी पावसाळयात साथीच्या रोगांचा पादुर्भाव होवू नये यासाठी वेळोवेळी औषध फवारणी, इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज ठेवून स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक तसेच नागरिकांना याची माहिती देण्याच्या सूचना देखील महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या. यावेळी अतिवृष्टीच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेवून संपूर्ण यंत्रणा तयार ठेवण्याचे सूचना देखील त्यांनी दिल्या.

शिवसेनेचे युवा नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव, खासदार श्रीकांत शिंदे जेव्हा बसने प्रवास करतात

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण डोंबिवलीत वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यांचे काम सुरु आहे. काही ठिकाणी मोठमोठे पूल बनवले जात आहेत. या सर्व रस्त्यांच्या प्रकल्पांपैकी एक महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणजे रिंग रोड. या रोडचं काम कितपत पोहोचलं हे पाहण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज थेट बसने प्रवास केला. त्यामुळे त्यांच्या साधेपणाचे अनेकांकडून कौतुक होत आहे. श्रीकांत शिंदे यांचा हा साधेपणा याआधीदेखील अनेकदा दिसला आहे. पत्रीपूलचा गर्डर बसवण्याच्यावेळी तर ते रात्रभर तिथेच थांबले होते.

श्रीकांत शिंदेंचा पाहणी दौरा

श्रीकांत शिंदे यांनी पाहणी दौऱ्यानंतर प्रकल्पाच्या कामावर समाधान व्यक्त केलं. या प्रकल्पाचे दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यानचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे काम येत्या डिसेंबर अखेर पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली. शिंदे यांनी एमएमआरडीए आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत बसने दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यान प्रवास करीत आतापर्यंत झालेल्या रिंग रोडच्या कामाची पाहणी केली.

या प्रसंगी एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, माजी महापौर विनिता राणे, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, राजेश कदम, राजेश मोरे, रवी पाटील आदी उपस्थित होते. पाहणी दौरा दरम्यान अधिकाऱ्यांनी रस्ते कामात बाधितांकडून कशा प्रकारे अडथळे निर्माण केले जात आहेत. तसेच बाधितांचा कसा त्रास सुरु आहे. तरीदेखाल कामात खंड न पाडता आणि लॉकडाऊनमध्येही काम प्रगतीपथावर ठेवून मार्गी लावत असल्याची माहिती दिली.

प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे कामही प्रगतीपथावर

“रिंग रोड प्रकल्पाचे दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यानचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. हे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल. रिंग रोडचा मोठा गाव ठाकूर्ली ते दुर्गाडी या तिसऱ्या टप्प्याच्या कामासाठीही भूसंपादनाची प्रक्रिया ८० टक्के झाली आहे. या कामाचीही निविदा लवकर प्रसिद्ध केली जाणार आहे. याशिवाय दुर्गाडी ते टिटवाळा याठिकाणी रिंग रोडचा एण्ड पॉईंट आहे. या ठिकाणाहून टिटवाळा ते गोवेलीहा हा रस्ता आणखीन जोडण्यासाठी आठवा टप्पाही घेतला जावा, अशी सूचना अधिकारी वर्गास केली”, अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.

दुर्गाडी ते टिटवाळा फक्त २० मिनिटाचं अंतर होणार’

“मोठा गाव ठाकूली ते दुर्गाडी आणि दुर्गाडी ते टिटवाळा हा टप्पा आधी पूर्ण करुन मगच काटई ते मोठा गाव ठाकूर्ली दरम्यानचे रिंगरोडचे टप्प्याचे काम हाती घेतले जाईल. हा प्रशस्त रिंग रोडचे काम पूर्णत्वास आल्यावर दुर्गाडी ते टिटवाळा हे अंतर कमी होणार आहे. अवघ्या २० मिनिटात दुर्गाडी ते टिटवाळा हे अंतर कापले जाणार आहे. हा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पाचे १०० टक्के काम पूर्ण झाल्यावर सर्वार्थाने वाहतूक कोंडी सूटणार आहे”, असं यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.

रेल्वे प्रवासाकरीता बनावट ओळखपत्र बनविणाऱ्या इसमास अटक

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रेल्वे प्रशासनाची फसवणूक करण्याच्या इराद्याने फेसबुकद्वारे लोकांना संपर्क करून रेल्वे प्रवासाकरीता बृहन्मुंबई महानगर पालिकेचे बनावट ओळखपत्र बनविणाऱ्या इसमास गुन्हे शाखा, कल्याण युनिट, लोहमार्ग मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, लोहमार्ग मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत फेसबुकद्वारे लोकांना संपर्क करून रेल्वे प्रवासाकरीता बनावट ओळखपत्र बनवून देण्याचे प्रकार वाढत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. सदर मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर कल्याण रेल्वे स्थानक हद्दीत सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेतले.

त्याच्याकडून मोबाईल फोन, बृहन्मुंबई महानगर पालिका, उप निबंधक, सार्वजनिक आरोग्य विभाग या कार्यालयाचा रबर स्टॅम्प, बनावटीकरण करण्याकरीता वापरात असलेले कोरे व काही भरलेले फॉर्म व बनावटीकरण केलेली ओळखपत्रे, ओळखपत्रे देऊन मिळालेली रोख रक्कम १,८००/- असा एकूण ३,३००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच सदर प्रकरणी त्याच्याविरुद्ध कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट निवडणूक ओळख पत्र मिळाल्याने कल्याण मध्ये खळबळ

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल.. आरोपीच्या पत्नीने उघडकीस आणला प्रकार

कल्याण शहरात एका फ्लॅटमध्ये भारत निवडणूक आयोगाकडून मिळणाऱ्या निवडणूक मतदार ओळखपत्रासारखे बनावट कोरे निवडणूक मतदार ओळखपत्र मिळून आल्याने येथे खळबळ उडाली असून निवडणूक शासकीय अधिकारी यांनी याबाबत कामेश मोरे या इसमाविरोधात खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण मधील नायब तहसिलदार वर्षा राजेश थळकर यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील माधव संसार मधील फ्लॅट नंबर बी-२ या ठिकाणी ही ओळखपत्रे आढळून आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची नोव्हेंबर २०२० रोजी नगरसेवकांचे राजवट संपुष्टात आली असून कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर पडली आहे. मात्र कोणत्याही क्षणी निवडणुका घोषित होण्याचीही शक्यता असून या दृष्टिकोनातून ही बनावट मतदार ओळखपत्र बनवली गेली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कामेश मोरे याच्या विरुद्ध त्याच्या पत्नीने हुंड्याची केस दाखल केली होती. या गुन्ह्यात कामेश याला कोर्टाने घरी न जाण्याच्या आणि पत्नीला त्रास न देण्याच्या अटीवर जामीन दिला होता. यानंतर कामेश याने आपल्या मुलींना फोन करून घरात असलेले कार्ड घ्यायला येत असल्याचे सांगितले. सदर बाब त्याच्या पत्नीला समजताच तिने याची माहिती तहसीलदार दीपक आकडे यांना दिली. आकडे यांनी नायब तहसीलदार वर्षा थळकर यांना कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार नायब तहसीलदार थळकर यांनी कारवाई करत या घरातून सुमारे ४०० ते ५०० बनावट कोरे मतदार ओळखपत्र जप्त करत कामेश मोरे याच्या विरोधात खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती खडकपाडा पोलीस स्टेशनचे वपोनि अशोक पवार यांनी दिली.