Home Blog Page 278

जनतेच्या हितासाठी सेना,भाजप, मनसेचे एकत्रित लसीकरण ..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जनतेच्या हिताच्या दृष्टीने आपापसातील राजकीय मतभेद दूर ठेवून सेना, भाजप, मनसे या पक्षांतीतल तरुणांनी एकत्र येत डोंबिवलीतील रामचंद्र नगर
येथे पालिकेचे लसीकरण केंद्र सुरु केले आहे.

रामचंद्र नगर येथील स्वामी विवेकानंद शाळेत कल्याण-डोंबिवली पालिकेच्या वतीने १८ एप्रिल पासून पासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. येथे लसीकरण सुरु व्हावे याकरिता भाजपचे डोंबिवली पूर्व उपाध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे यांनी पालिकेकडून परवानगी मिळविली आहे.

दरम्यान तळागाळातील लोकांपर्यंत लसीकरणाची प्रामाणिक अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने पंढरीनाथ म्हात्रे यांच्या सोबत पप्पू म्हात्रे यांनी शिवसेनेचे कल्याण तालुका अधिकारी प्रतिक पाटील, शिवसेना उपविभाग प्रमुख राहुल कुलकर्णी, मनसेचे विभाग अध्यक्ष मिलिंद म्हात्रे, माजी नगरसेवक सुदेश चुडनाईक, ताम्हणकर सेनेचे पंढरी पाटील यांना जनतेच्या हितासाठी राजकीय मतभेद दूर ठेवून पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्यास सकरात्मक प्रतिसाद देत तीन पक्षातील पदाधिकारी लसीकरण मोहिमेत सहभागी झाले. सोमवार, बुधवार, शुक्रवार अशी एक दिवसाआड लाभार्थीना लस देण्यात येते. परंतु पालिकेकडून लस कुप्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे लस लाभार्थ्यांना मोठ्या संख्येने देता येत नाही. कधी ३०० तर कधी ७० लस कुप्या पालिका सकाळी पाठविते. त्याअगोदर लाभार्थी मोठ्या संख्येने रांग लावत असल्याने वितरण कसे करावे असा प्रश्न निर्माण होतो असे पंढरीनाथ म्हात्रे यांनी यावेळी बोलताना सांगितले. पालिकने ५०० लस कुप्या दिवसाआड द्याव्या अशी मागणी सेना उपविभाग प्रमुख राहुल कुलकर्णी यांनी केली आहे. या केंद्रासाठी भाजपचे संजय कुलकर्णी आणि जेष्ठ नगरसेवक मंदार हळबे यांनी खुप मोलाचे सहकार्य केले आहे. सेना भाजप मनसेचे विविध पदाधिकारी कोणतीही अपेक्षा न बाळगता लसीकरण योग्य रितीने पार पडण्यासाठी मेहनत घेत असल्याचे पंढरी म्हात्रे यांनी सांगितले.

बनावट कॉलसेंटर द्वारे अमेरिकेतील नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

 

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई येथे बनावट कॉलसेंटरद्वारे अमेरिकेतील नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीला मालाड आणि बांगूर नगर पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, मालाड व बांगूर नगर पोलीस ठाणे परिसरातील बनावट कॉल सेंटर मधून अमेरिकेतील नागरिकांना गंडा घातला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

सदर मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने मालाड आणि बांगूर नगर पोलिसांनी संयुक्तरित्या एकूण ३ बोगस कॉलसेंटरवर छापा टाकून केलेल्या कारवाईत एकूण ४५ संगणकाची हार्ड डिस्क, १४ लॅपटॉप, २८ मोबाईल, राऊटर्स आणि इतर साहित्य हस्तगत करून एकूण १० इसमांना अटक केली आहे.

यामध्ये मालाड पोलीस ठाणे हद्दीतील लोटस बिजनेस पार्क, राम बाग लेन, एस.व्ही.रोड, मालाड (प) या ठिकाणी केलेल्या कारवाईत अमेरिकेत स्थित नागरिकांशी संपर्क साधून त्यांना व्हिआग्रा व इतर औषधांची विक्री करत असल्याचे भासवून त्यांच्याकडून पैशांची मागणी करून त्यांची फसवणूक करणाऱ्या तीन इसमांना अटक केली.

तसेच बांगूर नगर पोलीस ठाणे हद्दीत पाम स्प्रिंग, लिंक रोड, मालाड (प) या ठिकाणी केलेल्या कारवाईत परदेशी नागरिकांना सॉफ्टवेअर व तत्सम वस्तूंची विक्री करून त्यांना पैशाची मागणी करून त्याचे रोखीकरण करून आर्थिक लाभ मिळविणाऱ्या ४ इसमांना अटक केली.

त्यानंतर पाम स्प्रिंग इमारतीमधील आणखी एका कॉल सेंटरवर केलेल्या कारवाईत अमेरिकेत स्थित नागरिकांशी संपर्क साधून त्यांना व्हिआग्रा व इतर औषधांची विक्री करत असल्याचे भासवून त्यांच्याकडून पैशांची मागणी करून त्याचे रोखीकरण करून आर्थिक लाभ मिळविणाऱ्या चार इसमांना अटक केली.

ठाणे महापालिकेचा ३ लाख उच्चांकी लसीकरणाचा टप्पा पूर्ण..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महापौर आणि आयुक्तांच्या उपस्थितीत ३ लाख लोकांचे लसीकरण..

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमे अंतर्गत ठाणे महापालिकेने आज महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत ३ लाख लोकांचा उच्चांकी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा महत्वपूर्ण टप्पा यशस्वीरीत्या पार केला.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसीचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार टप्प्या टप्प्याने देण्याचे काम महापालिका प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीकरण साठ्यानुसार महापालिका तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना पाहिला व दुसरा डोस देण्यात येत आहे.

यामध्ये कोरोना बाधित रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना, फ्रंटलाईन वर्कर्स, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांना पाहिला व दुसरा डोस देण्यात येत असून आज महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी महापालिकेच्या आनंद नगर येथील आपला दवाखाना येथील लसीकरण केंद्राला भेट देवून लसीकरण मोहिमेबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॅा. चारूदत्त शिंदे, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, डॉ. खुशबू टावरी आदी उपस्थित होते.

आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर २३,४४८ आरोग्य कर्मचाऱ्यांना पाहिला तर १४,९५७ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंट लाइन कर्मचारी पैकी २२,९५१ लाभार्थ्यांना पहिला व ११,५२० लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला असून ४५ ते ६० वयोगटा अंतर्गत ८१,९५६ लाभार्थ्यांना पहिला तर १०,०९२ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ६० वर्षावरील नागरिकांमध्ये १,०४,५७५ लाभार्थ्यांना पहिला डोस व ३०,७४२ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या मार्गदर्शन सुचेननुसार १८ वर्षाखालील व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज असून शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीनुसार लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे असे प्रसिद्धीमाध्यमांना सांगण्यात आले.

ठाण्यात साडेचार लाखाचे गोमांस टेम्पोसह जप्त; दोघांना अटक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भिवंडी तालुक्यातील मुबंई-नाशिक महामार्गावरील राजणोली नाका येथील पुलावरून उतरणाऱ्या मार्गावर कोनगाव पोलिसांनी रात्रीच्या सुमारास नाकाबंदी केली होती. यावेळी एका टेम्पोत (एम. एच. १२-एल. टी. ४४५२) यामध्ये गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नाकाबंदीमध्ये प्रत्येक वाहन तपासणी करीत असतानाच टेम्पोच्या आतमध्ये पोलिसांनी पाहणी केली असता, जनावराचे मांस असल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे पोलिसांनी पशु वैद्यकीय अधिकारी यांना घटनस्थळी बोलवून मांसाच्या तुकड्याची तपासणी केली असता गोवंश जनावराची कत्तल केलेले मांस असल्याचे निष्पन्न झाले.

सोलापूरवरून केली जात होती मांसाची वाहतूक

पिकअप टेम्पोतुनच सोलापूरवरून इतर शहरात विक्रीसाठी जाणारे साडे चार लाख रुपयांचे गोमांस कोनगाव पोलिसांनी जप्त करून चालकासह दोघांना अटक केली आहे. मंजूर गफूर मुल्ला (वय ३३, रा. शनिवार पेठ, सोलापूर) सैफन गफूर शेख (वय २२, रा. मल्लिकाजुर्ननगर, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी बेकायदा जनावरांचे मांस वाहतूक केल्याप्रकरणी चालकासह त्याच्या साथीदारावर कोनगाव पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने यांनी दिली आहे.१६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्तगोवंश मांसाची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो ज्याची किंमत १२ लाख आणि टेम्पोतील ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचे गोमांस असा एकूण १६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे मार्च २०१५ पासून गोमांस विक्रीसाठी बंदी असूनही आजही भिवंडी, कल्याण, मुंब्रा, ठाणे व मुंबई या भागात हे गोमांस विक्रीसाठी ट्रक, टेम्पोमधून इतर जिल्ह्यासह परराज्यात विक्रीसाठी पाठविले जात असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे.

राज्य शासनाने गाय तसेच गोवंश हत्येला बंदी घातली असतांनाही चारचाकी वाहनातून चोरट्या मार्गाने गोवंश मांसाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याची बाब भिवंडीत वारंवार समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना कठोर शिक्षेची तरदूत करावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनेकडून केली जात आहे.

तिसरी लाट येईल हे गृहीत धरून काटेकोरपणे नियोजन करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जिल्ह्यांनी ऑक्सिजन प्लांट्सची तात्काळ उभारणी करावी, आवश्यक औषधांचा साठा करावा दुर्बलांसाठी जाहीर पॅकेजचे लाभ विनाविलंब द्यावेत..

कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा पुरेल याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंधाच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या जाहीर पॅकेजप्रमाणे या घटकांना तात्काळ लाभ द्यावा. केवळ घोषणा नव्हे तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनांना दिल्या आहेत. आज ते कोविड परिस्थितीसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी,पालिका आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते.

राज्यातील कडक निर्बंधांमुळे काही प्रमाणात रुग्ण संख्या स्थिरावली असली तरी आपल्याला आता अतिशय सावध राहून पुढील तिसऱ्या लाटेचे नियोजन करावे लागेल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कडक निर्बंध लावल्यानंतर लगेचच रुग्णसंख्येत उतार पडेल असे नाही. तरी देखील वेळेत कडक निर्बंध लावल्याने अंदाजित मोठी रुग्ण वाढ आपण रोखू शकलो.

तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग महत्त्वाचा आहे पण त्यासाठी पुरेश्या प्रमाणात व वेळेवर लस पुरवठा अतिशय गरजेचा आहे. आपण आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे मात्र पुरवठ्यावर त्याचे नियोजन करावे लागेल तसेच जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी देखील व्यवस्थित पार पाडावी लागणार आहे.

ऑक्सिजन प्लांट उभारणीत अजिबात दिरंगाई नको..

आज ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट्सची गरज आहे तिथे आवश्यक त्या परवानग्या दिल्या आहेत, नसतील तर तात्काळ देण्यात येत आहेत मात्र कोणत्याही परिस्थितीत येत्या काळात पुरेसा ऑक्सिजन रुग्णांसाठी उपलब्ध राहील याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावयाची आहे व यासाठी कोणतेही कारण चालणार नाही असे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्ह्णून आवश्यक त्या औषधांचा पुरेसा साठा आत्तापासून करून ठेवा. यासंदर्भात राज्यातील टास्क फोर्सचे डॉक्टर्स मार्गदर्शन करीत आहेतच. योग्य ती औषधे योग्य त्या प्रमाणात देण्यासाठी उपचार पद्धतीबाबत टास्क फोर्सचे डॉक्टर्स कायम उपलब्ध आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रामीण भागातल्या डॉक्टर्सनी सुद्धा त्यांच्या अडीअडचणी या तज्ञ डॉक्टर्सना मनमोकळेपणाने विचारणे गरजेचे आहे. येणाऱ्या पावसाळ्यातल्या आपत्ती लक्षात घेता आवश्यक औषधी व संसाधनांचा साठा जिल्ह्यातील अगदी कानाकोपऱ्यात होईल याचेही चांगले नियोजन करावे.

इतर राज्यांतून येणाऱ्या मजुरांची नोंद ठेवा..

गेल्या काही दिवसांपासून अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांत परतले आहेत. आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल मात्र ते आपल्याबरोबर संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर आपण या साथीला रोखण्यासाठी प्रयत्न करतोय ते वाया जातील. यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग-व्यवसाय, कंत्राटदारांकडून व ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणेकरून त्यांच्या चाचण्या, विलगीकरण याबाबत ठरवता येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उद्योगधंदे थांबू नयेत..

कोणत्याही परिस्थितीत आणखी लॉकडाऊन लावावा लागला तरी उद्योगधंदे सुरूच राहावेत, अर्थचक्राला झालं बसू नये मात्र त्यासाठी आपापल्या भागातील उद्योगांशी संपर्क साधून कामगार व मजुरांची राहण्याची व्यवस्था त्या उद्योगाच्या ठिकाणी किंवा स्वतंत्ररित्या केली आहे का ते पाहण्याचे व त्याचे नियोजन आत्तापासून करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर, टास्क फोर्सचे डॉक्टर संजय ओक, शशांक जोशी, राहुल पंडित, डॉ.तात्याराव लहाने यांनी देखील आपले विचार मांडले. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काळजीपूर्वक काम करावे तसेच विशेषतः रुग्णालयांतील अग्नी सुरक्षा, बांधकाम आणि विद्युत उपकरणांचे ऑडिट तात्काळ पूर्ण करून अहवाल देण्याचे निर्देश दिले. प्रधान सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास आणि प्रधान सचिव विजय सौरव यांनी देखील बैठकीत सद्यस्थितीची माहिती दिली

मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड यांची देखील या बैठकीस उपस्थिती होती.