Home Blog Page 279

खासगी डॉक्टरांची पालिकेच्या सेवेकडे पाठ; कारवाईच्या नोटिसांनंतरही महाभरतीला अल्प प्रतिसाद

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाचे वाढते रुग्ण, त्यात अपुरी आरोग्य यंत्रणा यामुळे पालिकेने खासगी सेवेतील डॉक्टरांना पालिकेच्या सेवेत पंधरा-पंधरा दिवसांसाठी रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. मात्र डॉक्टरांनी याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पालिकेने आता या डॉक्टरांना कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत.

दुसरीकडे पालिकेनेदेखील आरोग्य विभागात डॉक्टर्स आणि परिचारिकांची भरती सुरू केली असून त्यालादेखील म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. वसई-विरार शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत आहे. दिवसाला ९०० च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेने कोरोना उपचार केंद्रे वाढविण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यासाठी लागणारे पुरेसे मनुष्यबळ महापालिकेकडे नाही. त्यामुळे पालिकेने खासगी डॉक्टरांना १५ दिवसांसाठी सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले होते. मागील वर्षीदेखील पालिकेने हा प्रयोग राबवला होता. मात्र यंदा पालिकेच्या या आदेशाकडे खासगी डॉक्टरांनी पाठ फिरवली आहे.

जे खासगी सेवेतील डॉक्टर पालिकेला सेवा देणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. अशा नोटिसा डॉक्टरांना पाठविण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. आरोग्य विभाग अधिक बळकट करण्यासाठी पालिकेने एम.बी.बी.एस., बी.एच.एम.एस., बी.एम.एस. डॉक्टर्स तसेच परिचारिका, आरोग्य सेविका यांच्या पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
थेट मुलाखत घेऊन तात्काळ सेवेत रुजू केले जाणार आहे. यासाठी मुलाखती सुरू आहेत. मात्र त्यालादेखील फारसा प्रतिसाद मिळत नाही. पालिकेकडून दिले जाणारे मानधन कमी आहे तसेच कोरोना काळात धोका नको म्हणून डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी येण्यास उत्सुक नसल्याचे सांगण्यात येते.

सेवानिवृत्त वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा वरिष्ठांच्या हस्ते सत्कार..

सेवानिवृत्त वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा वरिष्ठांच्या हस्ते सत्कार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली वाहतूक उपविभागात नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक/ASI श्री. सदाशिव जाना हरपाले हे आज रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी आतापर्यंत महात्मा फुले चौक पोलीस ठाणे, हिल लाईन पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय, नारपोली पोलीस ठाणे व डोंबिवली वाहतूक शाखा येथे उत्कृष्ठ सेवा बजावली आहे.

त्या निमित्ताने मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण वाहतूक विभाग श्री. उमेश माने पाटील साहेब यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. पोलीस निरीक्षक श्री उमेश गित्ते, डोंबिवली वाहतूक उपविभाग यांनी त्यांच्या ३६ वर्षे पोलीस खात्याच्या उत्कृष्ठ सेवेबद्दल डोंबिवली वाहतूक विभागाच्या वतीने आभार मानले व त्यांना पुढील निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

सराईत गुन्हेगाराकडून ४ लाख किमतीचा २७ किलो गांजा हस्तगत; महात्मा फुले पोलिसांची दमदार कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण मधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील बऱ्याच गुन्ह्यात पाहीजे असलेला आरोपी रहमत युसुफ पठाण यास सापळा लावुन अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडून २७.४०५ किलो ग्रॅम वजनाचा ४ लाख ५ हजार किंमतीचा गांजा हस्तगत केला आहे.

आरोपी पठाण याला राहत्या घरातून २४ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. अनेक दिवसापासून पोलीस पठान याच्या मागावर होते, पठाण हा त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती एका गुप्तचराकडून महात्मा फुले पोलीसांना मिळाली. पठाण याच्या राहत्या घराजवळ सापळा रचत मोठ्या शिताफीने त्याला अटक करण्यात आली. यावेळी त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर घरातुन एकुण २७.४०५ किलो वजानाचा ₹ ४ लाख किमतीचा गांजा (अंमलीपदार्थ) हस्तगत करण्यात आला आहे.

पठाण याच्या विरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने शुक्रवार ३० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र त्याची २९ एप्रिल रोजी कोव्हीड-१९ अॅन्टीजेन चाचणी पॉझीटीव्ह आल्याने गुरुवारी २९ एप्रिल रोजी त्यास पुढील उपचाराकरीता सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर आरोपी औषधोपचार करून आल्यानंतर महात्मा फुले पोलीस ठाण्याकडुन ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली.

सदरची कारवाई ही सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार, वपोनि नारायण बानकर, पो.नि.(गुन्हे) संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिपक सरोदे, सपोनि प्रकाश पाटील, पोहवा भालेराव, निकाळे, पोना भोईर, भालेराव, चौधरी, ठिकेकर, जाधव, पोशि हासे, मधाळे, मपोना गरूड यांनी केली आहे.

मीरा भाईंदर शहरात येत्या दोन दिवसांत 100% लॉकडाऊन करण्याचा निर्णय

मीरा भाईंदर, प्रतिनिधी :  मिरा भाईंदर शहरातील नागरिकांकडून कोरोना संदर्भातील नियमांचे उल्लघंन होत असल्याने या शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी येत्या दोन दिवसांत 100% लॉकडाऊन करण्याचा निर्णय मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनासह सर्वच राजकीय पक्षांनी अखेर घेतला आहे.
मिरा भाईंदर शहरातील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता महापौर यांची सर्वपक्षीय गटनेते, उपमहापौर, स्थायी समिती सभापती सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि आयुक्त दिलीप ढोले आणि सर्व संबधित अधिकारी वर्ग यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.
या बैठकीत कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे अनेक ठिकाणी सवेंदनाक्षम क्षेत्र निर्माण झाल्यामुळे या क्षेत्रातील सोसायट्यांमध्ये एकापेक्षा जास्त कोरोनाचा रुग्ण आढळला गेल्यास त्या सोसायटीमधील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरीकांवर पोलीस व महापालिका प्रशासन यांच्यातर्फे कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वर्दळीचे ठिकाण असलेल्या रस्त्यांवर आता यापुढे प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन हे रस्ते वाहतुकीकरीता बंद ठेवण्यात येणार आहेत.
सध्या सकाळी 7.00 ते 11.00 या वेळेत मेडिकल आणि किराणा मालाच्या दुकानदारांना परवानगी देण्यात आलेली असली तरी या दुकानदारांकडून कोरोनाच्या नियमांचे उल्लघन होत असल्याचे निर्दशनास आल्यामुळे या दुकानदारांना पहिल्यांदा समज देण्यात येईल तदनंतर दुस-यांदा दंड आकारला जाईल मात्र याउपर देखील या नियमांचे पालन न झाल्यास लॉकडाऊनचा काळ संपेपर्यंत प्रभागनिहाय नेमण्यात आलेल्या कोविड समितीच्या अहवालानुसार सदरहू दुकानांना टाळे ठोकण्यात येईल, असाही निर्णय घेण्यात आलेला आहे.
मिरा भाईंदर शहरात महानगरपालिका रुग्णालये आणि महानगरपालिकेच्या जंम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांकरिता ऑक्सीजनयुक्त आणि आय.सी.यु बेडस निर्माण करण्यात आलेले असून सध्या ऑक्सीजनचा पुरवठा समाधानकारक आहे. तसेच रेमडीसीवर लसीचा देखील पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध होत असल्याची माहिती आयुक्त दिलीप ढोले यांनी यावेळी बोलताना दिली आहे.
मीरा भाईंदर शहरातील सर्व कोविड केंद्राच्या ठिकाणी दि. 01 मे 2021 पासून 18 वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली आहे.

येत्या ४ महिन्यात ठाकरे सरकारमधील ६ नेते सीबीआयच्या दारात असतील; सोमय्या यांचा खळबळजनक दावा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उद्धव ठाकरे सरकार सध्या भयंकर भयभीत झाले असून या सरकारमधील सहा बडे नेते २ हजार कोटींच्या वसुलीप्रकरणी येत्या ४ महिन्यात सीबीआयच्या दारात उभे असतील असा खळबळजनक दावा भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कल्याणात केला आहे.

कल्याण डोंबिवलीतील कोवीड परिस्थितीबाबत सोमय्या यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे सरकारवर टिका करताना त्यांनी हा दावा केला.

उद्धव ठाकरे सरकार अत्यंत भयभीत झाले असून त्यांच्या सरकारमधील ६ मंत्री सीबीआयच्या निमंत्रणाची वाट पाहत आहेत. त्यामुळे परमवीर सिंग, रश्मी शुक्ला, सचिन वाझे असे प्रेशर आणण्याचे पाप उद्धव ठाकरे सरकार करत असल्याची टिका सोमय्या यांनी यावेळी केली.

*ऑक्सिजन आणि रेमडीसीवीरच्या तुटवड्याने कोवीड मृत्यू वाढले..*

ऑक्सिजन पुरवठा आणि रेमडीसीवीर इंजेक्शनच्या अपुऱ्या पुरवठ्यामूळे महाराष्ट्रात कोवीड मृत्यूचे प्रमाण वाढल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी यावेळी केला. रुग्णालयांना ५० टक्के ऑक्सिजन आणि २५ टक्के रेमडीसीवीर इंजेक्शनचा पुरवठा होत असल्याने १२ एप्रिलनंतर कोवीड मृत्यू वाढल्याचे सोमय्या म्हणाले. तर याच कारणास्तव कल्याण डोंबिवलीमध्ये खासगी रुग्णालये ५० टक्केच रुग्ण घेत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

तर कोवीड लसींबाबत केंद्र सरकारने आयात करण्यास परवानगी दिली असून उद्धव ठाकरे सरकारने आता १ मेपासून योग्यप्रकारे लसीकरण करून दाखवावे. लसींबाबत उठसुठ केंद्र सरकारवर आरोप करणाऱ्या राज्य सरकारमधील नेत्यांवर आता लसीकरणाची जबाबदारी आहे, ती त्यांनी योग्य तऱ्हेने पार पाडून दाखवण्याचे आव्हानही किरीट सोमय्या यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिले.

दरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याबरोबर कल्याण डोंबिवलीतील एकंदर कोवीड परिस्थिती, बेड, ऑक्सिजन, रेमडीसीविर आदींबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.