Home Blog Page 297

अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचवणार उद्धवजी? – फडणवीस

अवधूत सावंत, प्रतिनिधी : पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेमध्ये हिंदू समजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानीच्या मुद्य्यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ट्विटद्वारे म्हणतात, आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले, ‘शरजील उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार म्हणजे आणणारच’ प्रत्यक्षात काय, तो येऊन गेला, जबाब देऊन गेला आणि महाविकासआघाडी सरकारने प्रत्यक्षात काय केले? मूळ तक्रारीत भादंविचे २९५ (अ) कलम समाविष्ट असताना सुद्धा एखाद्या विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे हे कलम पद्धतशीरपणे एफआयआरमधून वगळले गेले. लावले ते कलम १५३ (अ) जे विविध घटकांमध्ये शत्रूत्त्व निर्माण होईल, अशा विधानांसाठी लागते.

तसेच, खरे तर एफआयआर २९५ (अ), १५३ (अ) या दोन्ही कलमांतर्गत असायला हवा होता. ‘न्यायव्यवस्था आणि सरकारी प्रशासनतंत्रा’ विरोधात युद्ध पुकारण्यासाठी १२४ (अ) हे कलम सुद्धा लावायला हवे होते. पण, प्रत्यक्षात करताहेत जामीन मिळण्यासाठी मदत. असा घणघणाती सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला आहे.

अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार मा. उद्धवजी? असा सवाल देखील फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेला आहे.

अरबी समुद्रातील उत्तन येथील खुट्याची वाट याखडकावर दिपस्तंभ कामाचे जल भूमिपूजन खासदार राजन विचारे यांच्या हस्ते संपन्न!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरातील उत्तन येथील मच्छीमारांसाठी समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या बोटीचे खडकावर आदळून होणारे नुकसान टाळण्यासाठी खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजनच्या उपलब्ध झालेल्या निधीतून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत दीपस्तंभाच्या कामाचे जलभूमीपूजन प्रार्थनापूर्वक खासदार राजन विचारे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यावेळी आमदार गीता जैन, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला संघटक स्नेहल सावंत, शहर प्रमुख बर्नाड डिमेलो, जयराम मेसे, पप्पू भिसे, उपशहर प्रमुख केशीनाथ पाटील, अशोक मोरे, नगरसेवक एलियस बांड्या, हेलन जॉर्जी गोविंद, शर्मिला बगाजी, स्थानिक मच्छीमार जमातीचे पाटील कलमेड गौर्या, डिक्सन डीमेकर, मॅक्सी नेतोगर, ऑस्कर ग्रेसेस, वासुदेव मयेकर, व इतर शिवसैनिक पदाधिकारी व स्थानिक मच्छिमार उपस्थित होते.

गेल्या १० वर्षापासून खुट्याची वाट या खडकावर दीपस्तंभ उभे रहावे अशी सर्व मच्छिमारांची मागणी होती. उत्तन, पाली, डोंगरी चौक तसेच इतर गावातील मच्छीमाऱ्यांचा मच्छिमारी हा पारंपारिक व्यवसाय असून छोटे मोठे मच्छिमार त्यांचा उदरनिर्वाह या मच्छीमारीवरती करतात. त्यांच्या बोटी भर समुद्रातून किनाऱ्यावर येत असताना या समुद्रातील खडकाळ भाग हा दिसून न आल्याने या खडकावर त्यांची बोट आदळून बोटीचे नुकसान व अनेक मच्छीमारांना आपले प्राण गमवावे लागले होते.

खासदार राजन विचारे यांनी सन २०१८-१९ च्या जिल्हानियोजनामध्ये ९० लाखाचा निधी उपलब्ध करून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत दीपस्तंभाच्या कामास जल भूमिपूजन करून कामास सुरुवात करून दिली.
तसेच खासदार राजन विचारे यांनी कातल्याची वाट, वाशी खडक आणि सऱ्याची वाट या तीन खडकांवर दीपस्तंभ लावण्याच्या सूचना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर या उत्तन भातोडी व पातान बंदरावर नव्याने जलभंजक (ब्रेक वॉटर) होणाऱ्या जेट्टीच्या कामाच्या स्थळाची पाहणी मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत केली व लवकरच या कामाचे भूमिपूजन संपन्न होणार आहे अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली.

गुंगीचे औषध देऊन मोबाइल चोरी करणारा भामटा अटकेत! आरोपीकडून १३ मोबाइल हस्तगत, लोहमार्ग पोलिसांची कामगिरी

अवधूत सावंत, प्रतिनिधी : चहात गुंगीचे औषध टाकून सहप्रवाशाला बेशुद्ध करून मोबाईल चोरी करणाऱ्या २५ वर्षीय आरोपीला वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १३ मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. अटक आरोपीचे नाव हमीद खान आहे.

राजस्थानमधील बिकानेर येथील आजारी नातेवाईकाला पाहण्यासाठी दीपक शर्मा यांनी ९ मार्चला वांद्रे टर्मिनस येथून जाणाऱ्या वांद्रे ते बिकानेर गाडीचे आरक्षण केले होते.

शर्मा चालू तिकीट खिडक्यांच्या समोरील एका हॉलमध्ये बसले असता एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला आणि ‘कहा जाना है’ असे विचारू लागला. तेव्हा आपण राजस्थानला जात असल्याचे शर्मा यांनी सांगितले. गाडी येण्यास वेळ असल्याचे सांगत त्या इसमाने शर्मा यांना चहा पिण्याचा आग्रह केला. हॉलबाहेरील चहाच्या दुकानाकडे दोघे गेले आणि तेथे त्यांनी चहा घेतला.
ते दोघेही चहा पिऊन पुन्हा हॉलमध्ये परतले. तेव्हा शर्मा बेशुद्ध पडले होते. तोपर्यंत त्यांच्याजवळील मुद्देमाल त्या इसमाने लंपास करून पोबारा केला.

वांद्रे टर्मिनसवर तैनात असलेल्या पोलिसांना शर्मा बेशुद्धावस्थेत असल्याचे दिसताच त्यांना तात्काळ भाभा रुग्णालयात दाखल केले. काही वेळाने शुद्धीवर आलेल्या शर्मा यांनी घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी स्थानकातील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तपासले आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कुर्ला येथे राहणाऱ्या हमीद खानला पकडले.

त्याच्याकडे २ लाख ८ हजार रुपये किमतीचे १३ मोबाइल आणि अन्य मुद्देमाल सापडला. गुंगीच्या २० गोळ्या आणि पाच ते दहा गोळ्यांची पावडरही सापडली व पुढील तपास सुरू आहे..

शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली दहिसरमध्ये 500 माथाडी कामगारांचा शिवसेनेत प्रवेश

 

मिलन शाह, मुंबई प्रतिनिधी : कामगारांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना सदैव आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाही शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली. बोरिवली- दहिसरमधील 500 माथाडी कामगारांनी काल शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी बोलताना घोसाळकर यांनी उपस्थितांचे शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात स्वागत केले.

शिवसेना कधीही जात- धर्म- पंथ मानत नाही. सर्व धर्मियांना- समाजातील सर्वांना सोबत घेऊन जाणारा एकमेव पक्ष शिवसेना असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हा शिवसैनिकांना ही शिकवण दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कामगारांवर जिथे-जिथे अन्याय होईल तेव्हा शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान महिन्याभरापूर्वी आपण कामगारांच्या विविध प्रश्‍नांबाबत विनोद घोसाळकर यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तातडीने याप्रकरणी पावले उचलत कामगारांना न्याय मिळवून दिल्याचे कामगार नेते इकबाल पटेल यांनी सांगितले.

याप्रसंगी उपस्थित परवेझ शेख, नौशाद शेख, अहमद शेख, सलमान उस्मानी व सलीम शेख यांनी आभार व्यक्त केले. विशेष म्हणजे यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेना उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे, विधानसभा संघटक कर्णा अमीन, माजी नगरसेवक मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर सहित मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.

वाळीव पोलीस ठाण्यासमोर उभ्या असलेल्या वाहनांना भीषण आग 30 पेक्षा जास्त वाहने जाळून राख!

अवधूत सावंत, प्रतिनिधी : वसई-विरार शहरात एकापाठोपाठ एक अशा आगीच्या घटना समोर येत आहेत.
दुपारी वसई पूर्व भागात वाळीव पोलीस ठाण्याच्या समोर उभा करण्यात आलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली.
या आगीत मोठ्या प्रमाणात वाहने जळून खाक झाली आहेत.
वसई पूर्व भागात वाळीव पोलीस ठाणे परिसर आहे.

या पोलीस ठाण्याच्या समोरच जप्त केलेली व अपघातांमधील काही वाहने ठेवण्यात आली होती.
दरम्याना भर दुपारी या वाहनांनी पेट घेतला.
एका पाठोपाठ एक अशी ही वाहने उभी करण्यात आलेली असल्याने आग पसरत गेली व मोठा भडका उडाला.

घटनेची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.
आगीची तीव्रता अधिक असल्याने या आगीत जप्त केलेली जवळपास ३५ वाहने जळाली.
आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अजूनही समजू शकले नाही. पुढील तपास सुरू आहे.