Home Blog Page 31

डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे प्रकाश म्हात्रे यांचा अध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पूर्वेकडील सागांव भागातील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांनी ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. मागील १२ वर्ष ते विश्वस्तांच्या सहकार्याने ट्रस्टचा कारभार पाहत आहेत. अध्यक्ष पदाच्या पाच वर्षामधील तीन वर्षाचा कालावधी शिल्लक असताना त्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय दबाव तंत्राने त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा भक्तगणांमध्ये सुरू आहे.

शिवसेना एकसंध असताना प्रकाश म्हात्रे यांनी कल्याण ग्रामीण उपजिल्हाप्रमुख, जिल्हा परिषदेचे सदस्य अशी अनेक पदे उपभोगली आहेत. कल्याण ग्रामीण शिवसेनेवर त्यांचे वर्चस्व आहे. पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचा कारभार इतर विश्वस्तांच्या सहकार्याने त्यांनी १२ वर्ष सांभाळला. अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम मंदिराच्या माध्यमातून राबविण्यासाठी ते आघाडीवर होते. शिवसेनेचा कल्याण ग्रामीण मधील उमेदवार निवडून आणण्याचे नियोजन त्यांच्याकडे असायचे. शांत, संयमित आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर प्रकाश म्हात्रे आणि त्यांच्या काही समर्थकांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) सोबत राहणे पसंत केले. म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी शिंदे गटात दाखल व्हावे म्हणून विविध प्रकारची आयुधे, दबावतंत्र शिंदे समर्थकांकडून वापरण्यात आली. गेल्या नऊ महिन्याच्या कालावधीत कोणत्याही दबावतंत्राला बळी न पडता. आमची निष्ठा शिवसेनाप्रमुखांच्याच चरणी, या बाण्याने प्रकाश म्हात्रे आणि समर्थक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समवेत आहेत. या गोष्टीची चिड शिंदे समर्थकांना आहे. त्यामुळे म्हात्रे यांच्या मार्गात जेवढे अडथळे आणता येतील असे प्रयत्न आता सुरू झाले आहेत. या अडथळ्यांमधून होणाऱ्या त्रासातून मुक्त राहण्यासाठी प्रकाश म्हात्रे यांनी ‘श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट’ अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा सुरू आहे.

मंदिर ट्रस्टवर ११ सदस्य आहेत. त्यामध्ये शिंदे समर्थक तीन सदस्य आहेत. प्रकाश म्हात्रे हे स्वतः उद्धव ठाकरे समर्थक असल्याने मंदिरा संदर्भातील काही विकास कामे मार्गी लावताना आपण शिंदे गटात प्रवेश करत नसल्याने अडथळे येत असल्याची जाणीव म्हात्रे यांना होत होती. आपण शिंदे गटात जाणार नाही या विषयावर म्हात्रे ठाम आहेत. मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी असल्याने आपला अध्यक्ष पदाचा अडसर मंदिराच्या विकास कामात नको म्हणून म्हात्रे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा इतर विश्वस्त, भक्तगणांमध्ये सुरू आहे. प्रकाश म्हात्रे हे राजीनाम्याविषयी विस्तृत बोलत जरी नसले तरी, राजकीय दबाव हेच त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्या मागील मुख्य कारण असल्याच्या चर्चेला उधाण आहे. कल्याणमध्ये ठाकरे समर्थक जिल्हाप्रमुख विजय साळवी, डोंबिवलीत जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, माजी आमदार सुभाष भोईर असे जुने मोहरे एकनाथ शिंदे यांच्या गटात यावेत यासाठी विविध प्रकारच्या खेळी प्रतिस्पर्ध्यांकडून सुरू असल्याचे कळते. “श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराची १२ वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली. विश्वस्त, भक्तगणांची चांगली साथ मिळाली. व्यक्तिगत कारणामुळे आपण राजीनामा दिला आहे.” असे शिवसैनिक उद्धव ठाकरे समर्थक प्रकाश म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

मणिपूर दंगलीत अडकलेले २५ विद्यार्थी महाराष्ट्रात सुखरूप परत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील २५ विद्यार्थी अडकले होते. ही बाब समजताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्याशी संपर्क साधला. त्याचप्रमाणे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी काल चर्चा केली होती, त्यानंतर आज सकाळी या विद्यार्थ्यांना इंफाळहून आसामच्या गुवाहाटी येथे विशेष विमानाने आणण्यात आले. त्यानंतर आज रात्री विशेष विमानाने या विद्यार्थ्यांचे मुंबईत आगमन झाले. यावेळी राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे, राजशिष्टाचार अधिकारी अब्दुल अजीज बेग आणि त्यांच्या टीमने शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. सुखरूप परतल्याबद्दल विद्यार्थ्यांनीदेखील राज्य शासनाचे आभार मानले.

महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहेत. यातील काही विद्यार्थी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या दंगलीच्या परिस्थितीत अडकले असल्याचे समजताच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने मणिपूर आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. याचबरोबरच मुख्यमंत्र्यांनी तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांना मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सर्वप्रथम विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. तसेच त्यांना विशेष विमानाने आसाममार्गे महाराष्ट्रात परत आणण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार आज हे विद्यार्थी सुखरूप परतले आहेत.

विद्यार्थ्यांनी मानले महाराष्ट्र शासनाचे आभार

मणिपूर येथील दंगलीमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मुंबई येथे सुखरूप परत आणण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी तातडीने दखल घेऊन प्रयत्न केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

सुखरूप परत आलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे :

आदित्य गजभिये, तुषार आव्हाड, आयुष दुबे, शिवसंपत तागिरीसा, गौतम चौरसिया, साजन पौणिकर, मोहित खडपे, भूषण पावरा, वृक्षाल गणवीर, विकास शर्मा, तन्मय मादव, मडिकोंडा अविनाश, रोहित कोरी, आयुष रवी, ज्ञानदीप छुटे, प्रतिक कोडग, पुनर्वसू इंगोले, साईजित निकम, अनन्य बॅनर्जी, शंतनू कुंभीरकर, क्रिश कलगुडे, फाल्गुन महाजन, मधुरिका इंदूरकर, रोनिल नाडर आणि अश्वगंधा पराडे.

 

माजी स्थायी समिती सभापतींनी ‘अमृत योजने’ अंतर्गत सुरू असलेल्या ग्रामीण भागातील कामाचा घेतला आढावा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण ग्रामीण भागात माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आज केडीएमसी अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. या भागात असलेल्या पाणीटंचाईची समस्या देखील जाणून घेतली. या भागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी उद्या पालिका आयुक्तांसमवेत बैठक घेणार असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती दीपेश मात्रे यांनी आज पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसोबत कल्याण ग्रामीण मधील गोळवली, दावडी , सोनारपाडा व मानपाडा या गावांमध्ये अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. या अमृत योजनेअंतर्गत प्रत्येक विभागाकरिता स्वतंत्र जलकुंभ बांधून देण्यात येणार आहे जेणेकरून भविष्यात पाण्याची कमतरता भासणार नाही. सध्या या चारही विभागात पाणी कमी प्रमाणात देण्यात येत आहे, यावरही तोडगा काढण्याकरिता उद्या महापालिका आयुक्तांसोबत बैठक आयोजित केल्याची माहिती दीपेश म्हात्रे यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.

सदर भागातील पाण्याचा प्रश्न येत्या चार महिन्यात सोडविण्यात येईल अशी ग्वाही संबंधित ठेकेदाराने दिली. यावेळी माजी नगरसेवक जालींदर पाटील, नकुल गायकर, मुकेश पाटील पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी, योगेश म्हात्रे, आशु सिंह, मुकेश भोईर, स्वप्निल विटकर, पवन म्हात्रे, अक्षय गायकर, सचीन कासार व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या डोंबिवली पोलीसांनी आवळल्या मुसक्या..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली सारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या शहरात नुकतीच शेजार धर्माला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या एका २२ वर्षीय नराधमाने ६ वर्षाच्या अल्पवयीन पीडित मुलीवर लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील आयरेगावात घडली असून याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलीसांनी नराधमाला अटक केली आहे. कुंदन रवींद्र चौहान (वय: २१ वर्ष) असे अटक नराधमाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी कुटुंबासह डोंबिवली पूर्वेकडील भागात आयरेगाव येथील एका चाळीत राहते. तर नराधम आरोपी हाही त्याच चाळीत शेजारी राहतो. विशेष म्हणजे आरोपी नराधम हा मूळचा उत्तरपदेश मधील आजमगडचा रहिवाशी असून तो काही दिवसापूर्वीच आयरेगावातील नातेवाईकाकडे आला होता. त्यातच ५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी त्याला घरा बाहेर दिसली होती. त्यावेळी तिला बहाण्याने नराधम त्याच्या घरात घेऊन गेला. त्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद करत त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असतानाच, पीडितीचे आई तिला शोधत होती. त्याचवेळी मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने तिने बंद घराचा दरवाजा ठोकला असता, पीडित मुलगी रडतच बाहेर आली होती. त्यानंतर आईला संशय आल्याने मुलीकडे खोलवर चौकशी केली असता, तिने घडलेला प्रसंग आईला सांगताच आईला मोठा धक्काच बसला.

आईने तातडीने पीडित मुलीला घेऊन डोंबिवली पोलीस ठाणे गाठून मुलीवर घडलेल्या प्रसंगाचे कथन करताच, पोलीसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून पीडितेच्या २६ वर्षीय आईच्या तक्रारीवरून आरोपी नराधमावर विनयभंगासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला. दरम्यान ७ मे रोजी त्याला ताब्यात घेऊन चौकशी करत त्याला पोलीसी खाक्या दाखवला असता त्याने अखेर पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर डोंबिवली पोलीसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून त्याला न्यायालयात हजर केले असता त्या नाराधमाला अधिक पोलीस कोठडी सुनावली असून या गुन्ह्याचा पुढील तपास डोंबिवली पोलीस करत आहेत.

 

नव्या पर्यटन आराखड्याने शिर्डी शहराचं रूप पालटणार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी प्रतिमा शिर्डीची होईल, यावर भर राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री विखे-पाटील यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केला.

महसूलमंत्री विखे-पाटील यांनी आज सकाळी श्रीसाईबाबा समाधी मंदीराचे दर्शन घेत शिर्डी सौंदर्यकरणाच्या आराखड्याची प्रत साईचरणी अर्पण केली. शिर्डी संस्थान सभागृहात वास्तूविशारद तज्ज्ञ अजय कुलकर्णी यांनी या सौंदर्यकरण आराखड्याचे चित्रफितीच्या माध्यमातून सादरीकरण केले. त्यानंतर पत्रकारांशी महसूलमंत्र्यांनी संवाद साधला. याप्रसंगी शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले की , शिर्डी शहर, मंदीर परिसर, परिक्रमा मार्गाचे सुशोभीकरण करून ठिकठिकाणी सौंदर्यस्थळे विकसित व्हावीत यासाठी राज्यशासनाकडून शिर्डीसाठी ५२ कोटींचा विशेष निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात मंदीरासमोरील पादचारी मार्ग, शहरातील मुख्य प्रवेश मार्ग, मुख्य चौक, मंदीर आवारातील पादचारी मार्ग, शिर्डी परिक्रमेचा १४ किलोमीटरचा मार्गाच्या सौंदर्यीकरणाचे सुनियोजन करण्यात आले आहे.

काय आहे विकास आराखड्यात ?

पहिल्या टप्प्यातील कामांना तीन महिन्यात सुरूवात होईल. सौंदर्यकरण, सुशोभीकरण करताना ग्रामस्थांच्या सूचनांचाही गांभीर्याने विचार करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात शिर्डी गावाच्या मूळ ढाच्याला कोठेही धक्का लागू न देता शिर्डी शहराचा अंर्तबाह्य चेहरामोहरा बदलण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. नगरविकास विभागाच्या माध्यमातून ५० कोटी रूपये खर्चून श्री साईबाबांच्या जीवनाची माहिती देणारा ‘थीम पॉर्क’ उभारण्यात येणार आहे. शेती महामंडळाच्या जागेवर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसाठी ७० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

शिर्डी विमानतळावर एकाच वेळेस १२ विमाने थांबतील असे नवीन टर्मिनल इमारतीसाठी ६०० कोटी मंजूर झाले आहेत. लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे. शेती महामंडळाच्या जागेवर ‘लॉजिस्टिक पार्क’, ‘इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर’ उभारण्याचा शासनाचा मानस असल्याचे ही महसूलमंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदी येणार

श्री साईबाबा वातानुकूलीत दर्शनरांग इमारत, शैक्षणिक संकुल व निळवंडे धरण पाणी कालव्याचे लोकार्पणासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याचवेळी भव्य शेतकरी मेळावा घेण्याचे प्रस्तावित आहे. राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या आमंत्रणास पंतप्रधान कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. असे ही महसूलमंत्र्यांनी विखे पाटील यावेळी सांगितले. लवकरच मंदीरात सातबाराधारक स्थानिक शेतकऱ्यांच्या माध्यमातून फुल विक्रीला सुरूवात होणार असल्याची विखे-पाटील यांनी सांगितले.

सौंदर्यकरणाचा प्रस्तावित आराखडा

शहर नियोजक तथा वास्तूविशारद तज्ज्ञ अजय कुलकर्णी यांनी शिर्डी परिसर सौंदर्यकरणाचा आराखडा तयार केला आहे. शिर्डी श्री साईबाबा मंदीर परिसरातील पादचारी मार्ग, परिक्रमेचा १४ किलोमीटर मार्ग, ५ एकर परिसरात साई वृंदावन पार्क विकसित करणे, दांडीच्या धर्तीवर पर्यावरणपूरक सोलर बगीचा, शहरातील प्रवेश मार्गातील चौकांमध्ये तसेच शहरातील मुख्य चौकात सौंदर्यस्थळे विकसित करणे, परिक्रमा मार्गावर त्रिकोणी खांबावर कोरीव साईचरित्र आदी विशेष कामे पहिल्या टप्प्यातील आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहेत.

या सुशोभिकरणाच्या कामांसाठी स्थानिक स्तरावर तयार करण्यात आलेले फर्निचर, दगड, वीटांचा वापर करण्यात येणार आहे. या कामांमध्ये साईनेज डिझाईन, पुरेशा वॉश रूम, लँडस्केपची कामे, भूयारी पादचारी मार्ग, झाडे-झुडपांसह नैसर्गिक सजावट, आकर्षक बैठक ‌व्यवस्था, ग्राफिक्स, भित्तीचित्रे, पर्यायी मार्ग, अल्प उपहार केंद्र, विश्रांती कक्ष, मदत केंद्र, पर्यटन माहिती केंद्र, सीसीटीव्ही, रेन वॉटर हॉर्वेस्टींग, वॉटर पॉईंट इत्यादी प्रस्तावित करण्यात आले आहेत.