Home Blog Page 319

पक्षाघात रूग्णांसाठी आता ग्लोबल रूग्णालयात ‘सेकंड ओपिनियन’ क्लिनिक सुरू ऑनलाईन पद्धतीने रूग्णांना मिळणार डॉक्टरांचा सल्ला

मुंबई, प्रतिनिधी : पक्षाघात (ब्रेन स्ट्रोक) म्हणजे मेंदूचा तीव्र झटका येणं या आजाराने पिडीत असणा-या रूग्णांची संख्या अधिक आहे. वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएसओ) च्या माहितीनुसार जगभरात ८० दशलक्ष लोक पक्षाघाताच्या आजाराने त्रस्त आहेत. पक्षाघाताचा झटका आलेल्या व्यक्तीचे आयुष्य वाचवण्यासाठी वेळेवर निदान आणि त्वरित उपचार करणं आवश्यक आहे.

अशा रूग्णांवर उपचार हे त्यांच्या वैदयकीय स्थितीनुसार भिन्न असतात. रूग्णांची स्थिती लक्षात घेऊन काय उपचार द्यावेत हे डॉक्टर ठरवतात. पण अनेकदा काही रूग्णांना आपल्या आजारासाठी दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असतो. अशा रूग्णांच्या भावना लक्षात घेऊन परळ येथील ग्लोबल रूग्णालयाने पक्षाघाताचा झटका आलेल्या रूग्णांसाठी आता सेकंड ओपिनियन क्लिनिक सुरू केले आहे.
हे क्लिनिक सोमवार ते शुक्रवार सुरू शकणार आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून रूग्णांना ऑनलाईन डॉक्टरांचा सल्ला घेता येईल. याशिवाय रूग्णालयात जाणून डॉक्टरांची प्रत्यक्ष भेटही घेता येईल.

पक्षाघात रूग्णांची वाढती संख्या विचारात घेता समाजात स्ट्रोक विषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी रूग्णालयातर्फे विविध कार्यक्रम, मोहीम राबवली जात आहे. अशातच आता पक्षाघाताचा झटका आलेल्या रूग्णांना आपल्या आजाराबद्दल दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेता यावा, यासाठी सेकंड ओपिनियन क्लिनिक सुरू केले आहे. या क्लिनिकद्वारे पक्षाघाताने पिडीत रूग्णांना त्यांच्या उपचाराबद्दल अचूक सल्ला मिळण्यास मदत होणार आहे. सुप्रसिद्ध मेंदूविकार आणि स्ट्रोक तज्ज्ञ डॉ. शिरीष एम हस्तक या क्लिनिकचं काम पाहणार आहेत.

परळ येथील ग्लोबल रूग्णालयातील स्ट्रोक आणि न्यूरोक्रिटिकल केअर प्रादेशिक संचालक डॉ. शिरीष एम हस्तक म्हणाले की, ‘‘पक्षाघाताचा झटका आलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना उपचाराबाबत दुसरा सल्ला मिळावा, यासाठी हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. याद्वारे पक्षाघाताचा त्रास असणाऱ्या रूग्णांची वैद्यकीय स्थिती जाणून रुग्णाला इतर कोणत्याही उपचाराची आवश्यकता आहे की नाही हे सुद्धा सांगितले जाईल.

रक्तदाब, कोलेस्ट्रॉल किंवा मधुमेह यांसारख्या जोखीम घटकांच्या व्यवस्थापनावर अतिरिक्त लक्ष केंद्रित केले जाईल. रुग्णांना फिजिओथेरपी आणि पुनर्वसन करण्याचा सल्ला दिला जाईल. पक्षाघातामुळे पिडीत रूग्णांचे प्राण वाचवणे हा क्लिनिक सुरू करण्यामागील मुख्य उद्देश आहे.”

ग्लोबल रूग्णालय (मुंबई) मुख्य कार्य़कारी अधिकारी डॉ. विवेक तलौलीकर म्हणाले की, ‘‘पक्षाघाताचे त्रस्त असणाऱ्या लोकांना या क्लिनिकमुळे खूप फायदा होणार आहे. स्ट्रोक चा झटका आलेल्या रूग्णांना वेळीच निदान व उपचार झाल्यास रूग्ण पटकन बरा होऊ शकतो. या दृष्टीकोनातून पक्षाघात रूग्णांवर लवकरच उपचार मिळावेत हा आमचा उद्देश आहे. या शिवाय क्लिनिकमुळे स्ट्रोकच्या रूग्णांचे आयुष्य सुधारण्यास मदत होईल.’’

शिवसेनेचे वादग्रस्त खासदार राजेंद्र गावितां विरुद्ध त्यांच्याच महिला कर्मचाऱ्यांने दाखल केला विनय भंगाचा गुन्हा.

पालघर, प्रतिनिधि :  पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्यावर मिरारोड येथील नया नगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी नया नगर पोलीस तपास करत आहेत. तक्रारदार महिला खासदार राजेंद्र गावितांच्या एका गॅस एजन्सीमध्ये काम करत होती. राजेंद्र गावित यांनी महिलेने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. हे संपूर्ण प्रकरण खोटे आहे. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

तक्रारदार महिला गेल्या १५ वर्षांपासून खासदार राजेंद्र गावितांच्या एका गॅस एजन्सीमध्ये काम करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझा लैंगिक छळ, अत्याचार, शोषण केले जात आहे. सन २००५ मध्ये गावित अचानक घरी आले आणि भेटवस्तू म्हणून मोबाईल आणला आहे, असे सांगितले. त्यावेळी मी तो घेण्यास नकार दिला. त्यानंतर माझ्याशी मैत्री कर, तुला घर, पैसा सर्व देतो, मला शारीरिक सुख दे, असे म्हटल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय अनेकदा आपला विनयभंग केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या अगोदर मी कोकण भवन पोलीस महानिरीक्षकांपासून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले. मात्र, राजकीय दबाव असल्याने माझी तक्रार नोंदवली गेली नाही. आज माझी तक्रार दाखल केली. गावित मोठे नेते आहेत, माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे मला भीती वाटत आहे, पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, असे तक्रारदार महिलेने म्हटले आहे.

या संदर्भात मिरारोड विभागाचे पोलीस सहआयुक्त विलास सानप यांच्याशी संपर्क साधला असता कॅमेरा समोर बोलू शकत नाही, असे म्हणून त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. खासदार राजेंद्र गावित यांच्याशी संपर्क केला असता, त्या गोष्टीमध्ये काहीही अर्थ नाही, माझ्या विरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांनी फक्त लेखी पत्र दिले आहे. माझ्या गॅस एजन्सी मध्ये ही महिला गॅसचा काळाबाजार करायची. माझ्या कंपनीत १ कोटी पेक्षा अधिक पैशांची त्यांनी अफरातफर केली आहे. याबाबत मी स्वतः त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. सहा दिवस त्यांनी तरुंगवासही भोगला आहे. सदरचा आरोप खोटा आहे अशी माहिती खासदार गावित यांनी दिली.

शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या विषयी थोडक्यात-
काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित हे मूळचे नंदूरबारचे असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री होते. 2014 लोकसभा आणि 2016 मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून सातत्याने होत असलेल्या अपमानाला कंटाळून आपण पक्ष सोडल्याचे गावित यांनी सांगितले होते.

भाजपमध्ये गेल्यानंतर युतीच्या जागा वाटपानंतर पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला. त्यामुळे गावित यांनी 26 मार्च 2019 ला शिवसेनेमध्ये प्रवेश केला. भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष माझ्यासाठी सारखेच असल्याची प्रतिक्रिया गावित यांनी दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे ते म्हणाले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजेंद्र गावित यांनी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांचा पराभव केला.

या प्रकरणात खासदार राजेंद्र गावित यांनी जरी विनयभंग केल्याचे आरोप फेटाळून लावले असले तरी त्यांची वृत्ती रंगेल आहे आणि अशा प्रकारचे त्यांनी असे अनेक कारनामे केले आहेत परंतु राजकीय दबावापोटी कुणी तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही मात्र या तक्रारदार महिलेने हिम्मत दाखवली म्हणून हे प्रकरण बाहेर पडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यात किती खरे किती खोटे हे तर तपासा नंतर बाहेर येईल त्या अनुषंगाने पोलिस तपास करीत आहेत.

 

मोदी सरकारने मंजूर केलेले शेती कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांची सुप्रीम कोर्टात धाव

दिल्ली, प्रतिनिधी : कृषी कायदे रद्द करण्यासाठी राजधानी दिल्ली येथे गेल्या 16 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान सहा ते सात चर्चांनंतरही सरकार आणि शेतकरी आंदोलक यांच्यात तोडगा निघू शकलेला नाही.

दरम्यान, भारतीय किसान युनियनने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली आहे. संसदेने सप्टेंबर महिन्यात मंजूर केलेले हे तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी किसान युनियनने याचिकेत केली आहे.

भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भानू प्रताप सिंग यांनी ही याचिका दाखल केली आहे.

हे तीन कृषी कायदे बाजारीकरणाला चालना देत आहेत. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचं भवितव्य कॉर्पोरेट कंपन्यांच्या मर्जीवर अवलंबून असेल, असं याचिकेत म्हटलं आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. आगामी काळात रेल रोकोही करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

नवीन कृषी कायदा हा मनमानी असून कोणत्याही चर्चेशिवाय हा कायदा मंजूर करण्यात आल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.

सुप्रीम कोर्टाने याआधीच केंद्र सरकारला कृषि विधेकांबाबत प्राप्त याचिकांबाबत नोटीस बजावली आहे.

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलनास बसलेले शेतकरी मागे हटावेत, असं वाटत असेल तर सरकारने आधी मागे हटावं, असं भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.

हरयाणा-दिल्ली येथून आलेले शेकडो शेतकरी दिल्ली-हरयाणा सीमेवर ठाण मांडून आहेत. दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज (11 डिसेंबर) 16 वा दिवस आहे. तिन्ही कृषी कायदे बिनशर्त मागे घेण्यात यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र हे कायदे मागे घेण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे.

शिवाय, मोदी सरकार चर्चेसाठी तयार आहे, असंही कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटलं आहे.

तत्पूर्वी, केंद्र सरकारने एक संशोधन प्रस्ताव शेतकऱ्यांना पाठवला होता. पण हा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला आहे.

सरकार इतके सारे बदल करण्यास तयार आहे, तर कायदे मागे घेण्यास का तयार नाही, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

या पार्श्वभूमीवर राकेश टिकैत शुक्रवारी (11 डिसेंबर) माध्यमांशी बोलताना म्हणाले, “सरकार आणि शेतकरी दोघांनाही मागे हटावं लागेल. आधी सरकारने कायदे मागे घ्यावेत, तेव्हाच शेतकरी आपापल्या घरी जाण्यासाठी निघतील. त्याशिवाय कोणताच पर्याय उपलब्ध नाही.”

भारताच्या फायद्यासाठी दिशाभूल करणारी मोहीम तब्बल 15 वर्षं चालवण्यात आली?

दिल्ली : भारताच्या फायद्यासाठी दिशाभूल करणारी मोहीम तब्बल 15 वर्षं चालवण्यात आली आणि यासाठी किमान 750 खोटी माध्यमं (Fake Media Outlets) आणि बंद पडलेल्या अनेक संस्थांसोबतच मरण पावलेल्या एका प्राध्यापकाचाही वापर करण्यात आल्याचं एका तपासातून उघडकीला आलंय.

ज्या व्यक्तीच्या नावाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला ते आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याची पायाभरणी करणाऱ्या मूळ संस्थापकांपैकी एक होते आणि 2006मध्ये वयाच्या 92व्या वर्षी त्यांचं निधन झालं होतं.

“आम्ही उघडकीला आणलेलं आतापर्यंतचं हे सर्वांत मोठं नेटवर्क आहे,” EU डिसइन्फोलॅबचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अॅलेक्झांद्रे अलाफिलिपे सांगतात. याच EU डिसइन्फोलॅब हा तपास करून बुधवारी याविषयीचा एक प्रदीर्घ अहवाल प्रकाशित केलाय.

“आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची बदनामी करण्यासाठी आणि युनायटेड नेशन्समधील ह्युमन राईट्स काऊन्सिल आणि युरोपियन पार्लमेंटच्या निर्णयांवर प्रभाव टाकण्याच्या प्राथमिक हेतूने या नेटवर्कची रचना करण्यात आली होती,” असं EU डिसइन्फोलॅबने म्हटलंय.

EU डिसइन्फोलॅबने हे नेटवर्क गेल्या वर्षी काही प्रमाणात उघडकीला आणलं होतं पण या नेटवर्कच्या कामाचं स्वरूप बरंच विस्तारलं असून सुरुवातीला वाटलं त्यापेक्षा हे जाळं अधिक मोठं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

या नेटवर्कचा भारत सरकारशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत पण खोट्या माध्यमांनी तयार केलेला कन्टेन्ट वा मजकूर जास्तीत जास्त प्रमाणात पसरवण्यावर या नेटवर्कचा मोठा भर आहे. यासाठी या नेटवर्कने एशियन न्यूज इंटरनॅशनल म्हणजेच ANI वृत्तसंस्थेची मदत घेतल्याचं उघड झालंय. ही भारतातली सर्वांत मोठी वृत्तसंस्था असून या तपासादरम्यान या संस्थेवरही लक्ष ठेवण्यात आलं.

भारताचा शेजारी आणि शत्रू देश असणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधातली प्रचारमोहीम राबवणं हा या नेटवर्कचा हेतू असल्याचं ब्रसेल्समधल्या या EU डिसइन्फोलॅबच्या संशोधकांचं म्हणणं आहे. या दोन्ही देशांनी गेली अनेक वर्षं एकमेकांच्या विरोधातल्या कहाण्या सांगितलेल्या आहेत.

65 देशांतून चालवण्यात येणाऱ्या भारताला झुकतं माप देणाऱ्या 265 वेबसाईट्स गेल्यावर्षी संशोधकांनी उघडकीला आणल्या होत्या. दिल्लीस्थित श्रीवास्तव ग्रूप (SG) या होल्डिंग कंपनीशी त्यांचा संबंध असल्याचं आढळलं होतं.

श्रीवास्तव ग्रूपद्वारे चालवण्यात येणारं हे ऑपरेशन 116 देशांमध्ये पसरलं असून त्यांनी युरोपियन पार्लमेंट आणि युनायटेड नेशन्सच्या सदस्यांनाही मोहरा केल्याचं EU डिसइन्फोलॅबने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या – इंडियन क्रॉनिकल्स नावाच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय.

या SG च्या कारवायांबद्दल युरोपियन युनियन आणि युनायटेड नेशन्सच्या कर्मचाऱ्यांना कितपत माहिती होती आणि या कारवाया रोखण्यासाठी गेल्या वर्षीचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना काही करता येणं शक्य होतं का, याविषयीच्या शंका आता उपस्थित केल्या जातायत.

एका नेटवर्कमधल्या विविध घटकांमध्ये दिशाभूल करणारी माहिती (Disinformation) पसरवण्याबाबत इतका समन्वय असल्याचं EU डिसइन्फोलॅबच्या संशोधकांना यापूर्वी कधीच आढळलं नसल्याचं अलाफिलिपे यांनी म्हटलंय.

“गेली 15 वर्षं आणि अगदी गेल्या वर्षी पितळ उघडं पडूनही या नेटवर्कने प्रभावीपणे काम सुरू ठेवलंय. यावरूनच इंडिया क्रॉनिक्लसच्या मागच्या लोकांनी किती बारकाईने आणि झपाटून काम केलंय, ते दिसून येतं. अशी काम योजण्यासाठी आणि करत राहता येण्यासाठी तुमच्याकडे फक्त काही कंम्प्युटर्स असून चालत नाही. त्यापेक्षा जास्त यंत्रणा असावी लागते,” अलाफिलिपे सांगतात.

पण यापुढचा तपास केल्याखेरीज इंडियन क्रॉनिकल्सचा संबंध भारतीय गुप्तचर यंत्रणांशी लावणं योग्य नसल्याचं संशोधकांनी म्हटलंय.

आता उघडकीला आलेलं नेटवर्क हे ‘सर्वाधिक सातत्य असणारं आणि गुंतागुंतीच्या कारवाया करणाऱ्या नेटवर्कपैकी एक’ असल्याचं डिसइन्फर्मेशन नेटवर्कचे तज्ज्ञ असणाऱ्या बेन निम्मो यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

निम्मो हे ग्राफिका नावाच्या डिजीटल मॉनिटरिंग फर्मचे इन्व्हेस्टिगेशन्स डायरेक्टर आहेत. याविषयी बोलताना ते यापूर्वी खासगी पातळीवर चालवण्यात आलेल्या मोठ्या ऑपरेशन्सचं उदाहरण देतात. ते म्हणतात, “ही ऑपरेशन्स मोठी आहेत म्हणजे ती थेटपणे एखाद्या देशाद्वारे राबवण्यात येत असावीत, असा याचा अर्थ होत नाही.”

हा सगळा तपास ओपन सोर्स पद्धतीने करण्यात आला. म्हणजे सार्वजनिकरीत्या उपलब्ध असणाऱ्या माहितीद्वारे तपास करण्यात आलाय.

याप्रकारे करण्यात आलेल्या तपासामध्ये श्रीवास्तव ग्रूपचे (SG) युएनची मान्यता असणाऱ्या किमान 10 संस्थांसोबतच इतरांशीही संबंध असल्याचं उघडकीला आलंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर टीका करत भारताच्या हेतूंचा पुरस्कार करण्यासाठी या संस्थांचा वापर केला जात होता.

“या अशा थिंकटँक्स आणि NGOवर जिनिव्हामध्ये लॉबिंग करण्याची, निदर्शनांचं आयोजन करण्याची, पत्रकार परिषदेत आणि UNच्या इतर कार्यक्रमांत बोलण्याची जबाबदारी असते. आणि एक मान्यताप्राप्त संस्था म्हणून अनेकदा युएनमध्ये संधी दिली जाते,” असं हा अहवाल म्हणतो.

युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स काऊन्सिलची स्थापना झाल्याच्या काही महिन्यांनंतर 2005च्या उत्तरार्धामध्ये श्रीवास्तव ग्रूपच्या नेतृत्वाखालच्या या कारवायांना सुरुवात झाली.

यात एका विशिष्ट एनजीओकडे या संशोधकांचं लक्ष गेलं. या संस्थेचं नाव – कमिशन टू स्टडी द ऑर्गनायझेशन ऑफ पीस (CSOP). 1930च्या दशकात या संस्थेची स्थापना करण्यात आली होती आणि 1975मध्ये तिला UNची मान्यता मिळाली. पण त्यानंतर ही संस्था फारशी कार्यरत राहिली नाही.

याच CSOPचे माजी अध्यक्ष होते प्रा. लुई बी. सॉन. (Prof Louis B Sohn) ते 20व्या शतकातल्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय कायदा तज्ज्ञांपैकी एक होते आणि हार्वर्डच्या लॉ स्कूलमध्ये 39 वर्षं त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं होतं.

याच व्यक्तीची नोंदणी CSOPचे प्रतिनिधी लुई शॉन (Louis Shon) म्हणून 2007च्या युएन ह्युमन राईट्स काऊन्सिल च्या सत्रासाठी करण्यात आली. आणि त्यानंतर 2011मध्ये वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या वेगळ्या एका कार्यक्रमासाठीही या नावाने नोंदणी करण्यात आली.

ही नाव नोंदणी पाहून संशोधकांना धक्काच बसला. कारण प्रो. सॉन यांचं 2006मध्ये निधन झालं होतं.

प्रा. सॉन यांच्या नावाचा गैरवापर करण्यात आल्याचं म्हणत हा तपास अहवाल या संशोधकांनी या प्राध्यपक सॉन यांच्या स्मृतीला अर्पण केलाय.

“2005मध्ये CSOP ला पुन्हा जागृत करत त्या संस्थेची ओळख काहीजणांनी चोरल्याचं आमच्या पहिल्या तपासात आढळलं.”

यासोबतच मान्यता नसणाऱ्या (Non Accredited) इतर काही संस्थांनी पाकिस्तानची प्रतिमा मलिन करायच्या हेतूने, भारताच्या बाजूने शेकडो वेळा हस्तक्षेप केल्याचंही तपासात आढळलं. या संस्थांना मान्यताप्राप्त संस्थांच्या वतीने UNHRC मध्ये संधी देण्यात आली.

इतर वेळी ज्या संस्था आणि एनजीओंचा त्यांच्या धोरणांवरून वरवर पाहता भारत वा पाकिस्तानाशी काहीही संबंध वाटत नसे, अशांना UNHRC मध्ये बोलायची संधी मिळे आणि त्या संस्था आणि NGO पाकिस्तानवर टीकास्त्र सोडत.

मार्च 2019मध्ये UNHRCचं सत्र सुरू असताना युनायटेड स्कूल्स इंटरनॅशनल (USI) या UNची मान्यता असणाऱ्या आणखी एका संस्थेने त्यांचा बोलायचा कालावधी हा अॅम्सटरडॅममधल्या युरोपियन फाऊंडेशन फॉर साऊथ एशियन स्टडीज (EFSAS) नावाच्या संस्थेच्या योआना बाराकोव्हा या प्रतिनिधीला दिला. युनायटेड स्कूल्स इंटरनॅशनलचेही श्रीवास्तव ग्रूपशी थेट संबंध असल्याचं आढळून आलं आहे.

या सत्रामध्ये बोलताना योआना बाराकोव्हा यांनी ‘पाकिस्तानने केलेल्या अत्याचारांविषयी’ आपलं म्हणणं मांडलं. EFSAS ही संस्था USIची भागीदार होती आणि या दोन संस्थांमधल्या तडजोडीमध्ये आपण सहभागी नसल्याचं त्यांनी बीबीसीला सांगितलं. बीबीसीने EEFSASच्या संचालकांशी संबंध साधायचा प्रयत्न केला पण आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही.

1971मध्ये स्थापन करण्यात आलेली ANI ही वृत्तसंस्थाही SGशी संबंधित भारताच्या बाजूने झुकणाऱ्या मतांना चालना देण्याचं काम करत असल्याचं दिसून येतंय.

ANI स्वतःचं वर्णन ‘भारत, दक्षिण आशिया आणि जगभरामध्ये 100पेक्षा जास्त ब्युरोज असणारी दक्षिण आशियाची आघाडीची मल्टीमीडिया वृत्तसंस्था’ असं करते. भारतातली वृत्त माध्यमं विशेषतः प्रसारमाध्यमं ANIच्या मजकुरावर अवलंबून असतात.

मेंबर्स ऑफ द युरोपियन पार्लमेंट (MEPs) ने लिहीलेले आणि पहिल्यांदा EU क्रॉनिकल या SGशी संबंधित फेक न्यूज साईटवर प्रसिद्ध झालेले लेख ANIने किमान 13 वेळा पुनर्प्रकाशित केल्याचं EU डिसइन्फोलॅबला आढळलं. यातले बहुतेक लेख पाकिस्तानविरोधी होते, तर काही चीन विरोधी होते.

यापूर्वीच्या EU डिसइन्फोलॅबच्या अहवालामध्ये EP टुडे या दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्या वेबसाईटचं नाव आल्यानंतर मे 2020मध्ये EU क्रॉनिकल चा जन्म झाला. आधीचीच वेबसाईट बंद करून नवीन नावाने सुरू करण्यात आली.

EU डिसइन्फोलॅबच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय, “या कारवाया घडवून आणणाऱ्यांनी इतरांची नावं आणि ओळख चोरली आणि EU ऑब्झरर्व्हर सारख्या माध्यमांप्रमाणेच स्वतःला भासवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी युरोपियन पार्लमेंटचे लेटरहेड वापरले, वेबसाईट्सची नोंदणी एका नव्या अवतारात आणि खोट्या फोन नंबर्सनिशी केली, युनायटेड नेशन्सना खोटे पत्ते दिले, स्वतःच्य मालकीच्या थिंकटँक्सची पुस्तकं छापण्यासाठी पब्लिशिंग कंपन्या तयार केल्या.

“त्यांनी अनेक पातळ्यांवर फेक मीडिया वापरला आणि एकमेकांचा दाखला देत गोष्टी छापल्या. ज्या राजकारण्यांना खरोखरच महिला आणि अल्पसंख्याकांचे हक्क जपण्याची इच्छा होती त्यांचा गैरवापर जिओपोलिटिकल हेतू साध्य करण्यासाठी करण्यात आला आणि टोकाची भूमिका गाठण्यासाठी कट्टर विचारसरण्याच्या राजकारण्यांना संधी देण्यात आली.”

या सगळ्या ‘प्रभाव पाडण्यासाठीच्या’ प्रयत्नांना अधिकृत भासवण्यासाठी ANI वृत्तसंस्थेचा वापर करण्यात आल्याचं अलाफिलिपे सांगतात. “माहिती पोहोचवण्यासाठीच्या इतर कोणत्याही मार्गापेक्षा विश्वसनीयता मिळवण्यासाठी आणि आपला मजकूर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ANIवर सर्वांत जास्त भिस्त होती,” असंही अलाफिलिपे सांगतात.

लेख सौजन्य : बीबीसी मराठी

स्वप्नांची नगरी ‘मुंबई’ सारखी फिल्मसिटी उत्तर प्रदेशात उभारणं खरोखर शक्य आहे का?

मुंबई, प्रतिनिधी : दोन दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर आलेले उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बॉलीवूडच्या 50 हून अधिक प्रोड्यूसर आणि दिग्दर्शकांची भेट घेतली. उत्तरप्रदेश सरकारने त्यांच्या राज्यात देशातील सर्वांत मोठी ‘फिल्म सिटी’ उभारण्याचा निर्णय घेतलाय.

नोएडामध्ये बनवण्यात येणाऱ्या या फिल्म सिटीबद्दल चर्चा करण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते. त्यांनी मुंबईत बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमारसोबतही चर्चा केली.

प्रोड्युसर आणि दिग्दर्शकांसोबत फिल्म सिटीची रूपरेषा आणि बॉलीवुड समोरील आव्हानं या विषयावरही त्यांनी चर्चा केली.

पण, उत्तरप्रदेशात उभारण्यात येणाऱ्या फिल्म सिटीमुळे मुंबईच्या फिल्म उद्योगाला धोका आहे का? यावर बॉलीवुडचं म्हणणं काय? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

प्रसिद्ध चित्रपट विश्लेषक आणि डिस्ट्रीब्यूडर राज बंसल बीबीसीशी बोलताना सांगतात, “हिंदी चित्रपटांसाठी मुंबई वगळता इतरत्र काहीच होत नसल्याचं माझं पहिल्यापासून मत आहे. जयपूरमध्ये आम्ही काही गोष्टी शक्य होतात का? यासाठी प्रयत्न केले होते. पण, काही होऊ शकलं नाही. उत्तरप्रदेश सरकारने यासाठी प्रयत्न सुरू केलेत, ही चांगली गोष्ट आहे.”

ते पुढे सांगतात, “ही अत्याधुनिक फिल्मसिटी सुरू झाल्यानंतर चित्रपटांचं प्रॉडक्शन वाढण्यास मदत होईल. मुंबईत चित्रपटांसाठी काम फार मर्यादीत होतं. इथं टीव्ही सिरिअलचं काम खूप आहे. आता, वेब सिरीज बनू लागल्या आहेत. मोठे सेट उभारल्यामुळे फिल्मसिटी बूक होत होती. आता नोएडामध्ये फिल्मसिटी तयार होत असल्याने काम वाढेल. येत्या काही दिवसात चित्रपट निर्मीतीत 20 ते 30 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.”

बॉलीवूड स्टार्स मुंबईत रहातात. शूटिंगनंतर त्यांना आपल्या घरी जाणं सोपं असतं. मग, अशा परिस्थितीत आपलं घर सोडून ते नोएडामध्ये शूटिंगसाठी काही महिने रहाणं पसंत करतील?

यावर बोलताना राज बंसल म्हणतात, “असं आधी होत असे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आधी कलाकार एक दिवस शूटिंग केल्यानंतर तीन दिवस येत नव्हते. मात्र, आता चित्रपटांच्या शूटिंगसाठी ते घरापासून दूर रहातील. काम लवकरात-लवकर संपवण्याचा त्यांच्या प्रयत्न असेल.”

हल्ली, शूटिंग संपवून 40 दिवसात चित्रपट तयार होतो. शक्य तितक्या लवकर चित्रपटाचं शूटिंग संपवण्याची कलाकारांची अपेक्षा असते. त्यामुळे प्रोड्यूसर आणि दिग्दर्शकांचा पैसा जास्त खर्च होणार नाही, असं बंसल पुढे सांगतात.

“मुंबईहून दिल्लीला जाणं सहज शक्य आहे. विमानांची संख्या जास्त आहे, पंचतारांकित हॉटेल्स आहेत. त्यामुळे काहीच अडचण येणार नाही,” असं राज बंसल पुढे सांगतात.

बॉलीवुडमध्ये फक्त कलाकारच नाहीत. तर सेट्सवर काम करणारे मजूरही मोठ्या संख्येने काम करतात. मग या मजुरांचं काय? यावर बोलताना राज बंसल दाक्षिणात्य चित्रपटांचं उदाहरण देतात. ते म्हणतात, मुंबईतील मजुरांच नुकसान होणार नाही.

ते पुढे म्हणतात, “दक्षिण भारतातील चित्रपट निर्मात्यांची स्वत:ची टीम असते. काम करणारे मजूर वेगळे असतात. उत्तर भारतातून अनेक मजूर कामासाठी मुंबईत येतात. आता, नोएडामध्ये शूटिंग सुरू झालं तर मजुरांना कामासाठी मुंबईत यावं लागणार नाही. त्यांना त्यांच्या घराजवळच रोजगाराची संधी मिळेल.”

मला फक्त भीती एकाच गोष्टीची वाटते. अशा घोषणा अनेकवेळा करण्यात आल्या. यावेळी, ही फक्त घोषणाच राहू नये, तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, असं बंसल यांच मत आहे.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉई युनिअनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांच्या सांगण्यानुसार, “नोएडामध्ये फिल्म सिटी उभारल्यामुळे बॉलीवुडला नक्कीच फायदा होईल. फिल्म इंडस्ट्री मोठी होईल. चित्रपट बनवण्यासाठी आधी मुंबईत यावं लागत असे. आता उत्तरप्रदेशातील लोक आपल्या राज्यातच चित्रपट बनवू शकतील.”

“लखनऊमध्ये मोठ्या चित्रपटांचं शूटिंग सुरू आहे. सरकार दिड ते दोन कोटी रूपयांची सब्सिडी देत आहे. सद्य स्थितीत चित्रपट बनवण्यासाठी प्रोड्यूसर सोयी-सुविधांच्या शोधात असतो. खर्च कसा कमी करता येईल? कोणत्या शहरात स्वस्त पडेल? याचा विचार केला जातो,” असं ते पुढे म्हणतात.

परदेशात शूटिंगसाठी जाणाऱ्यांना 30-40 टक्के सब्सिडी मिळते. परदेशात चांगले लोकेशन आणि सुविधा मिळत असल्याने लोक बाहेर शूटिंग करतात.

दुसरीकडे भारतात मात्र फिल्मसिटीबाहेर शूटिंग करायचं असल्यास फार कठीण आहे. अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. परवानगी असेल तरी, महापालिका, पोलीस आणि रहिवासी अडवणूक करतात, याची खंत तिवारी व्यक्त करतात.

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, परवानगी घेऊनही ही प्रॉपर्टी आमची आहे असं म्हणत लोक लूटतात.

तिवारी पुढे सांगतात, “ज्या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळतील, त्याच ठिकाणी काम होईल. आता आमच्या स्पर्धेत अनेक लोक उतरले आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री मुंबईत आले. त्यांनी बॉलीवुडशी चर्चा केली. अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरूख खान आणि सलमान खान सारख्या कलाकारांनी उत्तरप्रदेशात शूटिंग केलं आहे.”

चांगल्या सुविधा मिळत असल्याने लोक उत्तरप्रदेशात जात आहेत. महाराष्ट्रात कोणीच लक्ष देत नाही. आम्हाला सरकारसोबत चर्चा करायची असेल तर पहिल्यांदा आम्हाला सरकारी बनवं लागतं, असा त्यांचा आरोप आहे.

बी एन तिवारी सांगतात, “सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही तर याचा परिणाम दिसून येईल. महाराष्ट्र सरकारने चांगल्या सुविधा देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले पाहिजेत.”

लेख सौजन्य : बीबीसी मराठी