Home Blog Page 45

युवकांकडून विचार होणार का ? राज ठाकरेंचा परखड सवाल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणं साजरी हाेत आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. मिरवणुकींची जाेरदार तयारी सुरू आहे. असे असताना काल ठाण्यामध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा वर्धापन दिन झाला. राज ठाकरे यांनी यानिमित्ताने पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज ठाकरे काय बाेलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले हाेते. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत कार्यकर्त्यांना आणि राज्यातील युवकांनी जयंती कशी साजरी करावी याबाबत खडेबोल सुनावले.

राज ठाकरे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरूषांचे केवळ पुतळे उभारून काहीही हाेणार नाही. त्यांचे आचार-विचार आत्मसात केले पाहिजेत. त्यांच्या विचारांचे आत्मचिंतन करण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे. या महापुरूषांचे विचारांचे आचरण केले नाही, तर महाराष्ट्रासाठी येणारा काळ हा अत्यंत अवघड हाेईल”.

राज ठाकरे यांनी पुतळ्यांवरून राजकारण करणाऱ्यांना यावेळी फटकारले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाची यावेळी त्यांनी आठवण करून दिली. इंदू मिलमध्ये माेठी वास्तू उभी राहिली पाहिजे. इतकं माेठं ग्रंथालय तिथं उभे राहिले पाहिजे की, अख्ख्या जगाने त्या ठिकाणी ज्ञान मिळविण्यासाठी आले पाहिजे. नुसते पुतळे उभारून काहीएक हाेणार नाही. नाक्यानाक्यावर, चाैकात शिवाजी महाराज किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळे उभारून काय साध्य हाेणार आहे? महापुरूषांचे पुतळे उभारून आपल्या हाती काहीही लागणार नाही. या महापुरूषांचे आचार-विचार आता कृतीत उतरवून आणण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी येणाऱ्या या पिढीला हे करावेच लागेल, असं झाले नाही तर महाराष्ट्राच्या भविष्याची वाटचाल अवघड हाेईल, असेही ठाकरे म्हणाले.

 

राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही, हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव – अजित पवार


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जागतिक महिला दिनी तरी राज्याच्या मंत्रिमंडळात महिला आमदारांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. मंत्रिमंडळात एकही महिला प्रतिनिधी नसणे हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या गंभीर विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधत सरकारने अशा नराधमांवर जरब बसवावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

प्रत्येक क्षेत्रात आपल्या माता-भगिनी, पुरुष सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. समाजाच्या विकासात योगदान देत आहेत. या महिलांना अज्ञान, अंधश्रद्धा, पुरुषी गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढण्याचे, त्यांच्यात आत्मविश्वास जगविण्याचे काम राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. महिलांना एक दिवसाचं झुकतं माप नको, तर रोज समान संधी मिळाली पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे. आपण जर असं करु शकलो, तर जागतिक महिला दिन सार्थकी लागला, असं म्हणता येईल, अशी भावना अजित पवारांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र हे प्रगतिशील विचारांचं, पुरोगामी राज्य आहे. देशाला, जगाला आदर्श ठरतील अशा कितीतरी सामाजिक सुधारणांची सुरुवात महाराष्ट्रात झाली आहे. महिलांचं शिक्षण, त्यांचे हक्क, अधिकार याबाबत महाराष्ट्र कायम जागरुक राहिला आहे. देशातलं पहिलं स्वतंत्र महिला धोरण तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना, १९९४ मध्ये आपल्या राज्यात आणलं. त्याआधी १९९३ मध्ये राज्यात महिला व बालविकास हे स्वतंत्र खातं त्यांनी सुरु केलं. केंद्रात राष्ट्रीय महिला आयोग स्थापन झाल्यानंतर, देशातला पहिला राज्य महिला आयोग आपल्या राज्यानं स्थापन केला. आदरणीय शरद पवार साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता. ते आरक्षण आता ५० टक्के केलं आहे. अशा प्रकारे महिलांना आरक्षण देणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. महिलांच्या सक्षमीकरणाची ही चळवळ पुढे नेण्यासाठी महिला धोरणात सर्व स्तरातील महिलांच्या प्रश्नांचा समावेश असावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

 

आशियातल्या सर्वात मोठ्या ‘पिकल बॉल’ स्टेडियम चे मराठी अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते उद्घाटन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जागतिक दर्जाच्या कमी अवधित जगप्रसिद्ध झालेला खेळ कल्याण-डोंबिवलीकरांना देखील खेळता यावा आणि येत्या ऑलिंपिक मध्ये इथला खेळाडू असावा या उद्देशाने ‘डावखर फाउंडेशन’ आणि ‘रिजेन्सी ग्रुप’ यांनी बेलग्रेव स्टेडियम सुरू केले आहे. ज्यामध्ये आठ कोर्ट चार पॅव्हीलिअन्स असणार आहेत. या स्टेडियमचे उदघाटन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

आशियातले सर्वात मोठे पिकल बॉल स्टेडियम हे डोंबवलीत असल्याचा मी एक डोंबिवलीकर म्हणून मला अभिमान आहे असे उद्गार अभिनेते भाऊ कदम यांनी यावेळी बोलताना काढले व डावखर फाउंडेशनचे संतोष डावखर यांच्या सोबत ‘पिकल बॉल’ खेळ खेळून सामन्यांची सुरुवात केली. यावेळी ‘रिजेन्सी ग्रुप’चे महेश अग्रवाल, संजय गोयल, अनिल भतीजा, विकी रुपचंदनी, दिनेशकुमार बासोरिया, डावखर ग्रुपचे संतोष डावखर, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर देखील या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.

आजची जीवनशैली पाहता सुदृढ व निरोगी राहण्यासाठी आणि चपळता वाढवण्यासाठी ‘पिकल बॉल’ हा खेळ देश विदेशात आवर्जून खेळला जातो. उद्घाटनाच्या दिवशी ‘डावखर करंडक २०२३’ चे आयोजन करण्यात आले होते. ज्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार, दिल्ली, झारखंड मधून खेळाडू या ठिकाणी स्पर्धेसाठी आले होते. ‘डावखर करंडक २०२३’ मध्ये एकूण १ लाख २५ हजार रुपयांची रोख बक्षिसे आणि पदकं विजेत्या स्पर्धकाला देण्यात आले.

‘ओपन मेन्स सिंगल’ मध्ये अनुक्रमे कुलदीप महाजन, गौरव राणे, हिमांश मेहता, ‘ओपन मेन्स डबल’ मध्ये अनुक्रमे तेजस मयूर, वंशिक रोनव, गौरव हिमांश आणि ‘३५ प्लस मेन्स डबल’ मध्ये  मिहीर हिमांशु, वैभव विकी, संदीप शैलेश यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले.

सानिया मिरझा विरुद्ध टेनिस खेळणारी नॅशनल खेळाडू ईशा लखानी व हिमांश मेहता आणि बहीण-भाऊ असलेले नॅशनल पिकल बॉल खेळाडू नैमी मेहता व हर्ष मेहता देखील उपस्थित होते व एक प्रात्यक्षिक मॅच खेळून प्रेक्षकांची दाद मिळवली तसेच ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशन अध्यक्ष अरविंद प्रभू है देखील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आले होते.

भारतात या खेळाची आवड निर्माण व्हावी त्यामुळे अल्पदरात प्रवेश असेल आणि सुरुवातीचे काही दिवस मोफत प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येक वयोगटात हा ‘पिकल बॉल’ खेळला जाणार असून प्रत्येक वयोगटातील बेस्ट प्लेयर च्या ‘युएस चॅम्पियनशिप’ चा पूर्ण खर्च डावखर फाउंडेशन उचलणार आहे अशी माहिती डावखर फाउंडेशनचे संतोष डावखर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे. आशियातील सर्वात मोठ्या पिकल बॉल स्टेडियमच्या उद्घाटनाचे सूत्रसंचालन कलाकार प्रणव भामबुरे यांनी केले. संतोष डावखर आणि टीमने विशेष मेहनत घेऊन उद्घाटनाचा कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

 

 

जागतिक महिला दिनानिमित्त महिला सफाई कर्मचाऱ्यांचा आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते सत्कार!

महिला सफाई कर्मचाऱ्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या समस्या दूर केल्या तरच खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा झाला असे मानले जाईल!

भाईंदर, प्रतिनिधी: दर वर्षी 08 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिन संपूर्ण देशात साजरा केला जातो. या दिवशी सार्वजनिक क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा विविध स्वरूपात सन्मान केला जातो. जागतिक महिला दिनानिमित्त मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे महिला सफाई कामगारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (जनसंपर्क) संजय शिंदे, उपायुक्त (शिक्षण) कल्पिता पिंपळे, अधिकारी व महिला सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वप्रथम आयुक्त यांनी उपस्थित महिला अधिकारी, महिला सफाई कर्मचारी यांना जागतिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपले मिरा भाईंदर शहर स्वच्छ व हरित ठेवण्यासाठी महिला सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान हे महत्त्वाचे असल्याचे मत आयुक्त यांनी व्यक्त केले. कोरोना काळात सुद्धा आपले शहर स्वच्छ व सुदंर ठेवण्यासाठी महिला सफाई कर्मचारी यांनी महत्त्वाचे योगदान दिले. म्हणूनच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा आयुक्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुख्य कार्यालयातील सर्व महिला अधिकारी यांचा देखील या कार्यक्रमाचे औचित्य साधून आयुक्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आजच्या कार्यक्रमासाठी सर्व महिला सफाई कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली त्यासाठी आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी सर्व महिला कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले व पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जागतिक महिला दिनानिमित्त महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी केला असला तरी वर्षभर शहरातील सफाईचे कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्यांना वेळेवर पगार दिला जात नाही, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य त्यांना दिले जात नाही, त्यांच्या आरोग्याची नियमितपणे तपासणी देखील केली जात नाही अशा अनेक समस्यांना या महिलांना तोंड द्यावे लागत आहे त्यावर महापालिका प्रशासनाने लक्ष देऊन सुधारणा केल्या तरच खऱ्या अर्थाने हा जागतिक महिला दिन साजरा झाला असे मानले जाईल अशी प्रतिक्रिया उपस्थित काही महिलांनी यावेळी व्यक्त केली आहे.

आज पासून सूरू होणार डोंबिवली क्रीडा संकुलातील तरण तलाव..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली येथील संत सावळाराम महाराज क्रिडा संकुलातील ऑलिंपिक दर्जाचा तरण तलाव कोरोना काळात म्हणजेच २०२० पासून गेले ३ वर्ष बंद होता. आंतरराष्ट्रीय अश्या भव्य ह्या तरण तलावात एकूण ३ तलाव आहेत एक मुख्य तलाव, एक डायविंग साठी आणि तिसरा लहान मुलांसाठी असे तीन तरण तलाव आहेत. कोरोना काळात शेजारील बंधिस्त सभागॄह, व्यायाम शाळा व स्कॉश मैदानात महापालिकेचे कोरोना रुग्णालय उभारल्यामुळे व तरण तलावाच्या कार्यालयात डॉक्टरांच्या विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली होती. ह्याच कारणांमुळे तरणतलावाचा व महत्त्वाचा फिल्टरेशन प्लांट चे मेंटनन्स करणे शक्य झाले नाही. नंतरच्या काळात फिल्ट्रेशन प्लांट मेंटेनन्स करिता ठेकेदार मिळत नव्हता त्या कारणाने तरण तलाव दुरुस्ती रेंगाळली होती. गेले वर्षभर तरण तलाव दुरुस्त व्हावा म्हणून महापालिका स्तरावर राजेश कदम, सागर जेधे ह्यांचा पाठपुरावा सुरु होता त्याचा अखेर काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब ह्यांच्या कानावर ही बाब घातली असता त्यानी त्वरीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त श्री. भाऊसाहेब दांगडे ह्यांना भेटण्यास सांगितले.

त्यानुसार काल राजेश कदम, माजी ज्येष्ठ नगरसेवक रवी पाटील, शहर समन्वयक जितेन पाटील, शिवसेना युवासेना शहर अधिकारी सागर जेधे ह्यांनी काल कल्याण येथे महापालिकेत जाऊन आयुक्त श्री. भाऊसाहेब दांगडे ह्यांची भेट घेतली असता त्यानी तरण तलाव त्वरित उद्याच्या उद्या म्हणजेच गुरुवार दि. २ मार्च पासून सुरु करावा असे आदेश दिले, ह्या वेळी शिवसेना शिष्ठमंडळांने आयुक्त महोदय यांनी आयुक्त श्री.दांगडे साहेबांचे आभार मानले व तेथून थेट डोंबिवलीच्या क्रीडासंकुल तरण तलाव येथे जाऊन वरिष्ठ अभियंता श्री. सांगळे ह्यांची भेट घेतली. श्री. सांगळे ह्यांनी डोंबिवली क्रिडासंकुलातील तरण तलाव आज २ मार्च रोजी किरकोळ डागडुजी करुन क्रीडा प्रेमींच्या वापरासाठी सायंकाळच्या सत्रा पासून सुरु करण्यात येईल परंतु नेहमीप्रमाणे शुक्रवारी बंद असल्यमुळे तो शनिवार ४ मार्च पासून पुर्ण क्षमतेने सुरु होणार आहे असे प्रसिध्दी माध्यमांना सांगितले आहे.

तरण तलाव लवकरात लवकर सुरु व्हावा ह्यासाठी पाठपुरावा करत असलेले डोंबिवलीतील तमाम क्रिडा प्रेमींची प्रतीक्षा आता संपली असून महापालिकेचा तरण तलाव ऐन सुट्टीच्या हंगामात सुरु होणार आहे त्यामुळे त्याचा मनसोक्त आनंद घ्यावा असे आवाहन शिवसेने तर्फे करण्यात आले असून क्रीडा प्रेमी नागरिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ह्यांचे व महापालिका आयुक्तांचे आभार मानत आहेत.