Home Blog Page 74

“राणी लक्ष्मीबाई पुरस्कार” मिळाल्याबद्दल ‘अपेक्षा सुतार’ सारख्या खेळाडूंमागे सरकारचे पाठबळ राहील” म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तिचा घरी जाऊन केला सत्कार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रत्नागिरी येथील अपेक्षा सुतार सारखे खेळाडू क्रिडा क्षेत्रात पुढे येत असतील तर त्यांना आमचे सरकार नक्की पाठींबा देईल. क्रीडा विभागाच्या कोट्यातून सरकारी नोकरीत सामावुन घेऊ. तिच्यासारखे खेळाडू निर्माण होणे ही रत्नागिरीसह महाराष्ट्राच्या दृष्टीने काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

उस्मानाबाद येथे झालेल्या ५५ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महिला गटातून महाराष्ट्र संघात रत्नागिरीचे प्रतिनिधीत्व करत देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा ‘राणी लक्ष्मीबाई पुरस्कार’ पटकावणार्‍या अपेक्षा सुतार या गुणवान खो-खो पटूचा उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तिच्या कुवारबाव येथील घरी जाऊन सत्कार केला.

दि.२८ रोजी सोमवारी सायंकाळी कुवारबाव येथील सुतार यांच्या घरी हा कार्यक्रम झाला. पुरस्कार प्राप्त अपेक्षाला मंत्री सामंत यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. याप्रसंगी अपेक्षाचे वडील अनिल सुतार, तिची आई, भाऊ आणि सुतार कुटूंबीय, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष बाळू साळवी, संतोष कदम, फैय्याज खतिब, उल्का पुरोहित, कुवारबाव मधील प्रतिष्ठीत नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी सुतार कुटूंबियांतर्फे पुष्पगुच्छ देऊन मंत्री सामंत यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मंत्री सामंत यांनी स्वतःहून अपेक्षाचा केलेला हा गौरव तिच्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे असे सुतार कुटूंबियांतर्फे उल्का पुरोहीत यांनी सांगितले. मंत्री उदय सामंत यांच्या पाठींब्यामुळे आज रत्नागिरीत सर्व मैदानी खेळांमध्ये विविध खेळाडू यश मिळवत असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी मंत्री सामंत म्हणाले, अपेक्षा सुतार हीचे अभिनंदन करत असतानाच तिच्या प्रशिक्षकांचेही अभिनंदन करत आहे. महाराष्ट्राचे क्रिडाक्षेत्रातील प्रतिनिधीत्व करण्याची संधी अपेक्षाला मिळाली ही रत्नागिरीकरांचे भाग्य आहे. अशी मुले क्रिडा क्षेत्रात पुढे येत असतील, तर आमचे सरकार त्यांना नक्कीच पाठींबा देईल. भविष्यात क्रीडाविभागचा कोट्यामधून नोकरीत सामावून घेण्यासाठी आम्ही ठामपणे प्रयत्न करु. अपेक्षा सारखे खेळाडू निर्माण होत असतील तर रत्नागिरीसह महाराष्ट्राच्या क्रीडासंस्कृतीच्या वाढीसाठी काळाची गरज आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

 

यजमान महाराष्ट्राच्या महिला संघाचे विजेतेपद कायम; महाराष्ट्राच्या महिलांचे २४ वे अजिंक्यपद तर रेल्वेचे ११ वे अजिंक्यपद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महिलांमध्ये महाराष्ट्राचा भारतीय विमान प्राधिकरण संघावर डावाने विजय मिळवत उस्मानाबाद येथे यजमान महाराष्ट्राच्या महिला खो-खो संघाने ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे विजेतेपद कायम राखले. महाराष्ट्राच्या महिलांचे हे २४ वे अजिंक्यपद ठरले आहे.

भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली होती. येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या महिला संघाने भारतीय विमान प्राधिकरण संघाचा ११-९ असा डावाने शानदार विजय मिळविला. महाराष्ट्राच्या पहिल्या तुकडीनेच संरक्षणाची भक्कम बाजू सांभाळली. प्रियांका इंगळे (३.३० मिनिटे व २ गुण), अपेक्षा सुतार (२.२o व १.१०मिनिटे व १ गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. पूजा फरगडे हीने ४ गडी बाद करीत आक्रमणाची बाजू सांभाळली. दुसऱ्या डावात रेश्मा राठोड २.२० व दिपाली राठोड हीने २.३० मिनिटे संरक्षण केले. भारतीय विमान प्राधिकरण संघाकडून वीणा (१.१० मिनिटे नाबाद), ऋतुजा खरेने (१.२० मिनिटे), जान्हवी पेठे हीने (१.०० मिनिटे व १ गुण) संरक्षण करीत एकाकी लढत दिली.

पुरुषांमध्ये रेल्वेची हॅट्ट्रिक साधत ११ वे अजिंक्यपद, महाराष्ट्राला उपविजेतेपद तर कोल्हापूरला तृतीय क्रमांक

भारतीय रेल्वेने यजमान महाराष्ट्रावर १४-१२ असा ४५ सेकंद राखून विजय मिळवित हॅटट्रिक केली. रेल्वेचे हे ११ वे विजेतेपद आहे. नाणेफेक जिंकून रेल्वेने संरक्षण स्वीकारले. महाराष्ट्राने पहिल्या आक्रमणात ६ गडी बाद केले. रेल्वेने ७ गडी बाद करीत मध्यंतरास एका गुणाची निसटती आघाडी घेतली. महाराष्ट्राने दुसऱ्या डावातही ६ गडी टिपले. विजयासाठी रेल्वेला ६ गुण मिळवायाचे होते. त्यांनी ७ गुण मिळवित हॅटट्रिक केली.
रेल्वेकडून अक्षय गणपुले (२.०० व १.३० मिनिटे), महेश शिंदे (१.५० व १.४० मिनिटे व २ गुण), अमित पाटील (१.३० मिनिटे व १ गुण), विजय हजारे (१.१० मिनिटे), मिलिंद चौरेकर ३ गुण यांनी शानदार खेळी केली.
महाराष्ट्रकडून रामजी कश्यप (१.४० व १.३० मिनिटे व १गुण), प्रतिक वाईकर (१.५० मिनिटे), अक्षय भांगरे (१.१० मिनिटे व ४ गुण) यांनी लढत दिली.

अपेक्षा सुतार, अक्षय गणपुले सर्वोत्कृष्ट

अपेक्षा सुतार राणी लक्ष्मीबाई पुरस्काराची मानकरी तर अक्षय गणपुले एकलव्य पुरस्कारचा मानकरी ठरला. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेतर्फे पुरस्कारप्राप्त पुरुष व महिला खेळाडूना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. पारितोषिके विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमराजे नाईक निंबाळकर, आमदार श्रीकांत भारतीय, कल्याणराव काळे, बँक ऑफ महाराष्ट्रच्या विभागीय व्यवस्थापक दत्तात्रय कावेरी, अभिनेत्री किरण डहाने, भारतीय खो-खो महासंघाचे सचिव एम.एस.त्यागी यांच्या उपस्थितीत देण्यात आली. त्यांचे स्वागत डॉ. चंद्रजीत जाधव, रहिमान काझी व अनिल खोचरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.ज्योती वाघमारे यांच्या हस्ते देण्यात आली.

सोलापूरचा रामजी कश्यप सर्वोत्कृष्ट संरक्षक

या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू असे :
अष्टपैलू : अपेक्षा सुतार, अक्षय गणपुले
संरक्षक : रेश्मा राठोड, रामजी कश्यप
आक्रमक : नसरीन, विजय हजारे

 

 

स्वतंत्र मराठवाडाच नाही तर मुंबई ही केंद्रशासीत करू – गुणरत्न सदावर्ते


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केवळ स्वतंत्र मराठवाडाच नाही, तर मुंबई ही केंद्रशासित प्रदेश करून दाखवू असे खळबळजनक वक्तव्य वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे. स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मितीच्या मागणीसाठी आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी हे विधान केले आहे. यावेळी त्यांनी पवारांनाही लक्ष्य केले आहे.

सदावर्ते यांनी यावेळी पवार चव्हाण आणि देशमुख अशी तीन कुटुंबं मराठवाड्याचे मारेकरी असल्याचा आरोप केला. ते म्हणाले “शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शिप्टा नावाची एकमेव कंपनी या भागात आणली. त्या तुप्पा भागातील कष्टकरी त्यांना मतदान देण्यासाठी उत्सुक नव्हते. त्यावेळी वेगळ्या पक्षाची कामगार चळवळ होती म्हणून ती शिप्टा कंपनीही बंद पाडण्यात आली. सामान्य लोकांना आवाज नव्हता. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध नेते शरद पवार व कुटुंब , शंकरराव चव्हाण व कुटुंब आणि विलासराव देशमुख व कुटुंब हेच मराठवाड्याचे मारेकरी आहेत. म्हणून आम्ही खनिजाच्या सर्वंकष अभ्यासानंतर मराठवाडा स्वतंत्र राज्य झाले पाहिजे ही मागणी घेऊन पुढे आलो आहोत,” असंही सदावर्तेंनी नमूद केलं. यावेळी मराठवाड्याला वेगळी वागणूक दिल्याचा आरोप करत ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी आणे यांनीही मला पाठिंबा दिला आहे, असा दावा सदावर्ते यांनी केला आहे.

मुंबई वेगळी का हवी ? या प्रश्नावर गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “ज्याप्रमाणे पंजाबची राजधानी चंदीगड केंद्रशासित प्रदेश आहे, त्याचप्रमाणे मुंबाईलाही केंद्रशासित प्रदेश केलं पाहिजे. मुंबई २४×७ सुरू ठेवायची असेल, तिचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल, जगाची आर्थिक राजधानी ठेवायची असेल तर मुंबई केंद्रशासित प्रदेश झाली पाहिजे. अशी भुमिका मांडलीआहे. त्यामुळे आगामी काळात राजकारण तापण्याची शक्यता आहे.

 

अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांमुळे अधिकृत विकासकांना नाहक त्रास; शासकीय अधिकाऱ्यांचेही लागेबांधे असल्याचा आरोप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना सर्व नियम कायदे पाळावे लागतात. मात्र बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना कुठलीही बंदी नसते. त्यामुळे अधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांची बदनामी आणि डोकेदुखी होते. रेरा प्राधिकरणाला खोटी कागदपत्रे सादर करून कल्याण-डोंबिवलीतच नव्हे तर राज्यभरातून एक हजार बांधकाम नोंदणी प्रमाणपत्र रेराकडून मिळविली असल्याचा गौप्यस्फोट कल्याण डोंबिवली ‘क्रेडीया एमसीएचआय’चे माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी केला आहे.

यामुळे कल्याण-डोंबिवली शहराचे नाव खराब झाले असून अधिकृत बांधकाम धारकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ‘रेरा’ घोटाळ्यामध्ये एमसीएचआय मधील एकाही विकासकाचा सहभाग नाही. तरीही अधिकृत विकासकांना बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी रेरा नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी तीन चार महिने वाट पहावी लागत असल्याची माहिती कल्याण-डोंबिवलीतील एमसीएचआय च्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

केडीएमसीकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम परवानगी आणि त्यावरून रेरा नोंदणी प्रमाणपत्र मिळवित कल्याण-डोंबिवलीतील काही विकासकांनी शासनाची तसेच नागरिकांची देखील फसवणूक केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अधिकृतरित्या, नियमानुसार काम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, याविषयी माहिती देण्यासाठी शुक्रवारी कल्याणमध्ये ‘एमसीएचआय’च्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कल्याण-डोंबिवली युनिटचे अध्यक्ष भरत छेडा, सचिव अरविंद वरक, माजी अध्यक्ष रवी पाटील, राहूल कदम, दिनेश मेहता, संजय पाटील, रोहित दीक्षित, सुनिल चव्हाण यांसह इतर सदस्य उपस्थित होते.

पालिकेची बनावट कागदपत्र सादर करत रेराची फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरण वास्तूविशारद संदीप पाटील यांनी उघडकीस आणले आहे. हे प्रकरण उघडकीस आणणारे वास्तू विशारद संदीप पाटील यांच्या धाडसाचे एमसीएचआयने कौतूक केले आहे. या प्रकरणी विकासकांवर गुन्हे दाखल होत एसआयटीकडून तपास सुरु आहे.

माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी पुढे सांगितले अधिकृत काम करणाऱ्याला सर्व कायदे आणि अनधिकृत कामे करणाऱ्यांना एकही कायदा लागू नाही या परिस्थितीला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल करत हा घोटाळा केवळ एका व्यक्तीचा नसून त्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचेही लागेबांधे असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अधिकृत विकासकांना लवकरात लवकर परवानगी मिळण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेत केडीएमसी सोबतच रेरा संस्थेकडून कागदपत्रांची छाननी करण्यासाठी एक डेस्क ऑफिसर नेमणे आवश्यक आहे.

बांधकाम व्यावसायिकांकडून करोडो रुपयांची गुंतवणूक केली जात आहे आणि त्यानंतरही आम्हाला त्रास होत असेल तर ते योग्य नसून आम्हाला लवकरात लवकर बांधकाम परवानगी मिळाली पाहिजे अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली.

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्यापुढे ही समस्या मांडणार असल्याचे देखील यावेळी एमसीएचआय च्या सर्व सदस्यांनी सांगितले.

 

 

रामदेव बाबांच्या विधानावर संजय राऊतांची तिखट प्रतिक्रिया; अमृता फडणवीस बद्दल म्हणाले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

योग गुरू बाबा रामदेव यांचा नुकताच ठाण्यात योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात महिलांबाबत विधान करताना रामदेव बाबांचा तोल सुटला व त्यांनी महिलांवर वादग्रस्त विधान केले होते, दरम्यान रामदेव बाबांच्या या विधानाने विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून रुपाली ठोंबरे यांच्यानंतर ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी रामदेव बाबांबद्दल खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राबद्दल चुकीचे विधान करतात, राज्यपाल वादग्रस्त विधान करतात आणि रामदेव बाबा महिलांच्या बाबतीत लज्जास्पद भाष्य करतात, असे असताना सरकार गप्प का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना राऊत म्हणाले की, रामदेव बाबांच्या योग कार्यक्रमाला खुद्द मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या, मात्र महिलांबाबत रामदेव बाबा लज्जास्पद बोलल्यावर देखील त्या गप्प का बसल्या. त्यांनी सणसणीत कानाखाली द्यायला हवी होती. या सरकारने जीभ गहाण ठेवली आहे का?असा प्रश्न उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणावर संजय राऊतांनी तिखट प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे यांच्या बुलढाणा येथे आज होणाऱ्या शेतकरी मेळाव्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या भेटीला जात आहे, ठाकरे गट हीच खरी शिवसेना व सरकार आहे, त्यामुळे आजची उद्धव ठाकरेंची भेट ऐतिहासिक होईल, असा विश्वास यावेळी राऊतांनी व्यक्त केला. रामदेव बाबा यांनी ठाण्यातील कार्यक्रमात महिलांच्या बाबतीत विधान करताना म्हटले होते की, महिला या साडीमध्ये चांगच्या दिसतात, सलवार सूटमध्ये देखील चांगल्या दिसतात आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, नेमक्या याच वक्तव्याने सध्या वाद सर्वत्र पेटलेला आहे.