Home Blog Page 79

हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणाऱ्या स्थेथॉस्कोपचा अविष्कार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता कार्यक्रमात अमरावतीचा कुशकुमार ठाकरे हा युवक आरोग्य क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.

अमरावती येथील फार्मसी महाविद्यालयातील हा विद्यार्थी असून त्यांने हृदयविकाराबाबत कल्पना देणारे ‘पर क्ल्यू’ हे स्थेथॉस्कोपसारखे साधन तयार केले असून, या शोधाबद्दल त्याला राज्यस्तरावरील एक लक्ष रूपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात समारंभपूर्वक पुरस्कार कुशकुमार यांना प्रदान करण्यात आला. नावीन्यपूर्ण शोधाबाबत राज्यस्तरावर २१ उमेदवारांची निवड करण्यात आली होती. त्यात कुशकुमार याला ‘आरोग्य हेल्थकेअर सेक्टर’ मध्ये प्रथम पुरस्कार देवून राज्यपाल यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

कुशकुमार ठाकरे हा अमरावतीच्या शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याने ‘पर-क्ल्यू’ हे
स्थेथॉस्कोपचे काम करणारे साधन निर्माण केले आहे. या संशोधनाला कुशकुमार याचा वर्गमित्र असलेल्या मनीष पुथरन यांचे मोलाचे सहकार्य व शिक्षिका डॉ. शारदा देवरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

ज्याप्रमाणे घरच्या घरी शर्करापातळी मोजण्यासाठी ग्लुकोमीटरचा वापर होतो, त्याचप्रमाणे ‘पर-क्ल्यू’ (परफेक्ट क्ल्यू) हे साधन वापरून हृदयाचे ठोके मोजण्याबरोबरच हृदयविकाराची पूर्वकल्पनाही मिळणार आहे. त्यामुळे रुग्णाला तातडीने उपचार घेता येतील. या साधनात रक्तदाबाची दैनंदिन नोंद होऊन त्याचा महिनाभराचा डेटाही सेव्ह व्हावा, यादृष्टीने आम्ही ते अधिक अद्ययावत करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे कुशकुमार आणि मनीष यांनी सांगितले. त्यामुळे डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाताना या माहितीचा उपयोग होऊ शकेल.

मोदी सरकार स्टार्टअप सारखे उपक्रम राबवून नवनवीन संशोधनाला प्राधान्य देत असल्याने विद्यार्थी नावीन्यपूर्ण संशोधनावर भर देत असल्याचे गवरमेन्ट फार्मसी कॉलेजच्या शिक्षिका डॉ.शारदा देवरे यांनी सांगितले. अमरावतीच्या या विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे उपकरण भविष्य काळात निश्चितच समाजोपयोगी ठरेल असे वाटते.

 

शेकडो कर्मचाऱ्यांचा एलॉन मस्कच्या कडक धोरणा विरोधात ट्विटरला रामराम..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ट्विटरचे नवीन मालक एलॉन मस्क यांच्या धडाकेबाज निर्णयांमुळे गेले काही दिवस या कंपनीत रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी ट्विटरमधून एकूण कर्मचाऱ्यांच्या जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर आता कंपनीच्या कार्यपद्धतीला कंटाळून शेकडो कर्मचारी स्वत:च नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत.

“कार्यक्षम पद्धतीने जास्त तास काम करण्याची तयारी ठेवा अथवा कंपनी सोडून जा”, असा इशारा ईमेलद्वारे एलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना दिला होता. या इशाऱ्यानंतर जवळपास ८० टक्के कर्मचारी नोकरी सोडू शकतात, असे एका अहवालातून समोर आले आहे. एलॉन मस्क यांच्या ईमेलनंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. ट्विटरमध्ये राजीनामा सत्र सुरू झालं असून १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने दिले आहे.

या पार्श्वभूमीवर आठवडाभर कंपनीचे ऑफीस बंद ठेवण्याचा निर्णय मस्क यांनी घेता आहे. २१ नोव्हेंबर पर्यंत ट्विटरचे ऑफीस बंद राहणार आहे.

 

पहिल्या खासगी रॉकेटचं प्रक्षेपण करत ‘इसरो’ची ऐतिहासिक कामगिरी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘इसरो’च्या श्रीहरीकोटा केंद्रावरून आज पहिल्या खासगी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. ‘स्कायरूट एरोस्पेस कंपनी’च्या या रॉकेटचं नाव ‘विक्रम सबऑर्बिटल’ असं आहे. ‘स्कायरूट एरोस्पेस’ ही कंपनी स्टार्ट अप योजने अंतर्गत सुरू झाली होती. या कंपनीला ‘इसरो’ आणि ‘इन स्पेस’ या केंद्रानेही मदत केली.

‘विक्रम सबऑर्बिटल रॉकेट’ने सकाळी ११.३० वाजता सतीश भवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी झेप घेतली. निश्चित केलेल्या लक्ष्यानुसार, ५४५ किलो वजनाचं हे रॉकेट अवकाशात १०० किलोमीटर प्रवास करेल आणि त्यानंतर ते समुद्रात कोसळणार आहे. या रॉकेटला दिलेलं :विक्रम एस’ हे नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक विक्रम साराभाई यांच्या नावावरून दिलं गेलं आहे अशी माहिती देण्यात आली.

 

वारंवार मेंदुचे झटके येणाऱ्या 72 वर्षीय महिलेवर मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये यशस्वी उपचार!

मुंबई: डॉ. पवन पै, सल्लागार इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मिरारोड यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमने स्कार एपिलेप्सी असलेल्या 72 वर्षीय महिलेला नवे आयुष्य दिले आहे.

ज्या रुग्णाला वारंवार मेंदुचे झटके येतात त्यांना उजव्या बाजूच्या वरच्या अंगात वारंवार मुंग्या येणे, अंग बधीर होणे, चिडचिड आणि अस्वस्थता होणे ही लक्षणे सुधारण्यासाठी रुग्णालयात त्वरित उपचार देण्यात आले. आता, रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे आणि तिची दिनचर्या पुर्ववत झाली आहे.

मिरारोड येथील रहिवासी असलेल्या श्रीमती मिहिरा कुमारी या गृहिणीस अचानक उजव्या बाजूस वरच्या अंगाला मुंग्या येणे आणि उच्च रक्तदाबासह बधीरपणाची लक्षणे दिसू लागली. या रुग्णाला पुढील उपचारासाठी मिरारोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे तिचा जीव वाचला.

डॉ. पवन पै, सल्लागार इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मिरारोड सांगतात की, “रुग्णाला उजव्या वरच्या अंगात मुंग्या येणे आणि बधीरपणा जाणवू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणी केल्यानंतर, तिला इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम (ईईजी) वर फोकल सेन्सरी सीझर आढळून आले. तिच्या मेंदूच्या एमआरआयमध्ये मेंदूच्या डाव्या बाजूला मागील भागात रक्तस्रावाचा एक डाग दिसून आला ज्यामुळे संवेदना होतात. तिला स्कार एपिलेप्सी असल्याचे निदान झाले. या रुग्णाच्या आधीच्या रक्तस्रावामुळे मेंदूतील डागामुळे मेंदूला इजा झाल्याचे दिसून आले”

डॉ. पै पुढे म्हणाले, “तिच्यावर इंट्राव्हेनसद्वारे दुसऱ्या अँटी-एपिलेप्टिकवर उपचार करण्यात आले, ज्यामुळे तिच्या संवेदनाक्षम झटक्यांमध्ये सुधारणा झाली. तिचे ईईजी सामान्य होते. म्हणून ऍन्टी-एपिलेप्टिकच्या तोंडावाटे औषध देण्यात आले. पण त्याच दिवशी, तिला चिडचिडेपणा आणि अस्वस्थतेसह हातपाय हालचालींसह सामान्यीकृत झटका आला आणि चक्कर आल्यानंतर ती दीर्घकाळ तंद्रीत होती. तिला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. यानंतर तिसरे इंट्राव्हेनस अँटी एपिलेप्टिक सुरू करण्यात आले. ईईजी पुन्हा करण्यात आले आणि त्यात काही बदल आढळून आले. सीटी ब्रेनमध्ये नवीन इन्फार्क्ट किंवा रक्तस्त्राव दिसून आला नाही. तिचे सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड (CSF) विश्लेषण सामान्य होते.”

9 नोव्हेंबर रोजी, तिला गुंगी येत असलाने औषधांमध्ये बदल करण्यात आला जेणेकरून तिला अधिक सतर्क राहता येईल. 10 नोव्हेंबर रोजी, ती अधिक सतर्क झाली आणि हात पाय हलवण्यास सुरुवात केली. त्यानंतर रुग्णाला वॉर्डमध्ये हलवण्यात आले आणि 12 नोव्हेंबरला तिला डिस्चार्ज देण्यात आला. तिच्यावर योग्य वेळी उपचार न केल्याने मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला असता आणि वारंवार चक्कर येण्यामुळे कायमचे नुकसान झाले असते. तिला अँटी-एपिलेप्टिक्स नियमितपणे सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथे आमच्या नव्याने सुरू झालेल्या एपिलेप्सी क्लिनिकमध्ये उपचारापूर्वी आणि उपचारानंतरच्या काळजीने रुग्णाला तातडीने व्यवस्थापित करण्यात आले. क्रिटिकल केअर, बहुविद्याशाखीय दृष्टीकोन आणि त्वरित निदान यांसारख्या कौशल्यामुळे रुग्णावर एकाच छताखाली सहज उपचार करण्यात मदत झाली.

मला अचानक झटका आला, तो काही मिनिटांपर्यंत सून्न करणारा होता. उजव्या हाताला मुंग्या येणे आणि बधीरपणा यायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मी बेशुद्ध झाली आणि गोंधळ उडाला. त्यानंतर दोन दिवस काय झाले ते मला आठवलेही नाही. त्यानंतर शुद्धीवर आल्यानंतर अशक्तपणामुळे मला नीट चालता येत नव्हते. याचा माझ्या जीवनमानावर परिणाम झाला. मला माझी रोजची कामे सहजतेने करता येत नव्हती. पण, मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये वेळेवर दाखल केल्याबद्दल मी माझ्या कुटुंबीयांचे आभार मानते. माझे प्राण वाचवल्याबद्दल मी डॉक्टरांचे आभार मानते. मी माझी सामान्य दिनचर्या पुन्हा सुरू केली असून कोणत्याही अडचणीशिवाय दैनंदिन क्रिया पुरेववत करू शकत आहे. आता मला मेंदुचे झटके येत नाहीत अशी प्रतिक्रीया रुग्ण श्रीमती मिहिरा कुमारी यांनी व्यक्त केली.

बांधकाम धारकांकडून खंडणी मागणाऱ्या दोन ‘बोगस’ पत्रकारांना भाईंदर पोलिसांकडून अटक!

मिरा-भाईंदर, प्रतिनिधि: पत्रकार असल्याची बतावणी करून अनधिकृत बांधकाम धारक, दुकानदार आणि बार मालक यांच्याकडून वसुली करणाऱ्यांचे पेव सध्या मिरा-भाईंदर शहरात फुटले आहे. कुठल्याही वर्तमानपत्राचे किंवा न्युज चॅनेलचे ओळखपत्र मिळवायचे आणि शहरात पत्रकार असल्याची बतावणी करून लोकांकडून वसुली करायची हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.

असाच एक प्रकार भाईंदर पश्चिमेकडील शिवसेना गल्लीत घडला असून एका घराच्या दुरुस्तीचे बांधकाम चालू असताना “आम्ही न्युज-24 चे पत्रकार आहोत तुझ्या बांधकामाची तक्रार करू” अशी भीती दाखवून परवेज खान नावाच्या व्यक्तीकडून 4000 रुपये उकळणाऱ्या दोन भामट्यां पत्रकारांना भाईंदर पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार परवेज जलील खान यांच्या घराच्या दुरुस्तीचे काम चालू होते, त्यावेळेस दोन भामट्यांनीं आपण न्युज-24 चे पत्रकार असल्याची धमकी देऊन
वीस हजाराच्या खंडणीची मागणी केली. शेवटी 4000 रुपयात तडजोड झाली असता आरोपी राहुल सिंग आणि अरविंद राजभर यांना शिवसेना गल्लीमध्ये पैसे घेताना भाईंदर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे.

अशा प्रकारे पत्रकार असल्याची बतावणी करून मिरा-भाईंदर शहरात नागरिकांना लुबाडणाऱ्या बोगस पत्रकारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही बोगस पत्रकारांना तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनीच पोसून ठेवले आहे. ते या बोगस पत्रकारांना हाताशी धरून तक्रारी करायला लावतात आणि मग त्यांना पुढे करून पैसे उकळले जातात. अशा प्रकारामुळे काही प्रामाणिक पत्रकारांना मात्र नामुष्कीला तोंड द्यावे लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मिरा-भाईंदर शहरात तर अशा खंडणीखोर बोगस पत्रकारांची संख्या खूपच वाढलेली दिसत आहे. तर काही जण मुंबई, वसई-विरार सारख्या बाहेरच्या ठिकाणाहून येऊन इथे वसुली करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अशा बोगस पत्रकारांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी आता पत्रकारां कडूनच केली जात आहे.