Home Blog Page 86

‘मशाल भडकली आणि भगवा फडकला’; उद्धव ठाकरेंनी केलं भाजपा-शिंदे गटाला लक्ष्य..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय झालाय. यानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘मशाल भडकली आणि भगवा फडकला’ अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजयानंतर ऋतुजा लटके उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर पोहोचल्या होत्या. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं.

“कपट कारस्थानानंतर पहिली पोटनिवडणूक झाली. आमचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं. मशाल चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक लढलो. ही मशाल भडकली असून भगवा फडकला आहे याचा मला अभिमान आणि आनंद आहे, असं म्हणत “लढाईची सुरुवातच विजयाने झाली असून भविष्यातील लढाईची आता मला चिंता नाही. या निवडणुकीत ज्याप्रमाणे एकजुटीने हा विजय खेचून आणला, त्याचप्रमाणे यापुढेही विजय एकत्र मिळून खेचून आणू,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

“नोटाच्या मागे काय गुपित आहे हे सर्वांनाच माहिती आहे,” असा टोला लगावत उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला असल्याच्या फडणवीसांच्या विधानावर ते म्हणाले की, लोकांसमोर सर्व घडलं आहे. आता कोण काय बोलतंय यापेक्षा तुम्ही काय करत आहात हे लोक पाहत आहेत. हा दृष्टीहीन धृतराष्ट्र नसून उघड्या डोळ्यांनी पाहणारा छत्रपतींचा ‘महाराष्ट्र’ आहे. त्याच्यामुळे धृतराष्ट्र आणि महाराष्ट्र यात फरक आहे. सध्या शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. सर्वजण एका वेगळ्या लढाईच्या तयारीत होते. विरोधकांनी माघार घेतल्यानंतर उत्साहावर थोडं पाणी पडलं पण तरीही मशाली भडकल्या आहेत,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

गुजरातच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत महाराष्ट्रात येणारे जमिनीवरील प्रकल्प तिथे ओरबाडून नेले आणि आता अचानक पंतप्रधानांच्या तोंडातून महाराष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त होऊ लागलं आहे. जमिनीवरील प्रकल्प गुजरातला आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्रात आणले जात आहेत. हे प्रकल्प जाहीर केल्यानंतर या प्रकल्पांचा भ्रमाचा भोपळा फुटण्याआधी मध्यावधी निवडणुका जाहीर होऊ शकतात असा माझा अंदाज आहे,” असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं. तसंच राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत आपण सहभागी होऊ का नाही हे नक्की नाही, पण आपले नेते सहभागी होतील असं त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.

 

भाजप करणार नवीन गेम ! राजकीय वर्तुळात पुन्हा युतीची चाहूल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर राजकीय घडामोडींनी भलताच वेग घेतला आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करून भाजपसोबत जाऊन राज्यात नवे सरकार स्थापन केले. त्याचप्रमाणे आता शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी करण्यासाठी मनसेचीही चर्चा सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे यांची आज पुन्हा भेट होणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, आता प्रशांत दामले यांच्या साडेबारा हजाराव्या प्रयोगासाठी हे तिघे एकत्र येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. शिवाजी पार्क वरील दीपोत्सवानंतर तिन्ही नेते आज पुन्हा भेटणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी अधिकच वाढत आहेत. कधी एकमेकांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी, कधी शिवाजी पार्कमधील दीपोत्सवासाठी, तर कधी एखाद्या उद्योजकाच्या सामाजिक प्रकल्पासाठी एकत्र येत असल्याचे दिसत आहे.

इतकंच नाही तर महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या कार्यक्रमाच्या मुहूर्तावरही दोघे एकाच मंचावर दिसले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे अनेकवेळा एकत्र आलेत. त्यामुळे शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील सततच्या बैठका ही भविष्यातील युतीची नांदी तर नाही ना ? अशी चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे.

अंधेरी पोटनिवडणूक जिंकल्यानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात एकूण सात उमेदवार होते. यामध्ये ऋतुजा लटके यांना ६० हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत. निवडणुकीतील विजयानंतर ऋतुजा लटके यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

ऋतुजा लटके या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत विजयी झाल्या आहेत. या विजयानंतर लटके यांनी माध्यमांशी संवाद साधला. अंधेरी पोटनिवडणुकीतील हा विजय माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा आहे. त्यांनी संपूर्ण राजकीय कारकिर्दीत जनसेवा आणि विकास कामेच केली आहेत. त्याची पोचपावती म्हणजेच अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतील माझा विजय आहे, अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांनी विजयानंतर दिली.

उमेदवारी मागे घेतली असली तरी त्यांनी नोटाला मत देण्यासाठी प्रचार केला होता. त्याचे व्हिडीओही समोर आले होते. पण मतदारांनी या सर्व गोष्टी नाकारून शिवसेनेला मतदान केले. ज्या नोटांना मतदान झाले आहे ते भाजपचे आहेत. त्यामुळे त्यांनी माघार घेतली कारण त्यांना वाटले की, ” एवढी मते मिळाली असती, सहानुभूती असती तर त्यांनी आधी उमेदवार दिला नसता.” अशी टीका लटके यांनी केली.

रमेश लटके यांनी जे काही काम हाती घेतले ते पूर्ण करणार आहे. अंधेरीचा विकास हेच माझे ध्येय आहे. उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद आणि आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्या पाठिंब्यामुळे मी विजयी झाली आहे. आता मातोश्रीवर जाणार असल्याचेही लटके म्हणाले.

‘हा विजय पक्षातील कार्यकर्त्यांचा आहे, त्यांचे मी आभार मानते. हा जल्लोष मी साजरा करणार नाही. माझ्या पतीचे निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक झाली. मी माझ्या पतीच्या जागेवर ही निवडणूक लढवली असून हा माझ्या पतीचा विजय आहे. अंधेरीचा विकास व्हावा, हा त्यांचा विचार होता. आम्हाला नवं पक्षचिन्ह मिळालं, त्या चिन्हाखाली हा विजय आहे. पण मला एक गोष्टीची खंत आहे. पतीच्या जागेवर निवडणूक लढवावी लागली’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

 

२०१४ च्या ‘कर्मचारी पेन्शन योजना’ कायदेशीर आणि वैध ठरवत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नोकरी करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. २०१४ च्या कर्मचारी पेन्शन योजनेबाबत सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी म्हणजेच ५ नोव्हेंबर रोजी मोठा निर्णय दिला आहे. २०१४ ची कर्मचारी पेन्शन योजना कायदेशीर आणि वैध असल्याचे कोर्टाने सांगितले आहे. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. दिलासा देताना कोर्टाने महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी अद्याप कर्मचारी पेन्शन योजनेत सहभागी होण्याचा पर्याय वापरला नाही. त्यासाठी त्यांना आणखी सहा महिन्यांची मुदत द्यावी.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे देशभरात करोडो खातेदार आहेत. ईपीएफओ आपल्या खातेदारांच्या ठेवींवर व्याज देते. तसेच पेन्शन योजनेअंतर्गत किमान एक हजार रुपये पेन्शन दिली जाते. २०१४ च्या दुरुस्तीनुसार दरमहा १५ हजार रुपये मासिक वेतन आवश्यक होते. मात्र आता ही मर्यादा हटवण्यात आली आहे. ज्यांचे पगार १५ हजार रुपये आहे त्यांना दरमहा ६ हजार ५०० रुपये पेन्शन देण्यात येईल, असे त्यात म्हटले आहे. आता हा नियम कोर्टाने स्वीकारला आहे.

पेन्शन पॉलिसी अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या १२% रक्कम भविष्य निर्वाह निधीसाठी कपात केली जाते. कंपनीच्या १५ हजार रुपयांच्या १२% शेअरपैकी ८.३३% पेन्शन योजनेत जातो. याशिवाय १.१६% रक्कमही सरकार पेन्शन फंडात भरते.

 

शीतपेयामधून नशेचे औषध पाजून तरुणीसोबत अश्लील व्हिडीओ बनवत केले विद्यार्थ्याचे ब्लॅकमेलिंग..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पार्टीच्या बहाण्याने कोल्हापूरला एका फार्महाऊसवर तीन मित्रांनी १९ वर्षीय एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला शीतपेयामधून नशेचे औषध पाजून एका तरुणीसोबत अश्लील व्हिडीओ काढला. यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करत तीन मित्रांनी चाळीस लाख रुपये किंमतीचे आठशे ग्रॅम सोने लाटल्याचा खळबळजनक प्रकार घडला असून याप्रकरणी डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यात तीन मित्रांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत एकाला बेड्या ठोकल्या आहे. संजय राजपूत (वय २२) राहणार इचलकरंजी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शुभम जाधव, रोहन संघराज (दोघेही रा. कावळानाका, कोल्हापूर) असे फरार आरोपींची नावे आहेत.

मित्रांनीच केला घात

डोंबिवली शहरातील गोग्रासवाडी भागात १९ वर्षीय पीडित तरुण आपल्या कुटुंबासह राहतो. काही वर्षांपासून तो कोल्हापूरमधील एका महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. तर आरोपीही याच महाविद्यालयात त्याच्यासोबत शिक्षण घेत असल्याने त्याचे मित्र आहेत. त्यातच २०२० मध्ये ऑगस्ट महिन्यात पीडित तरुणाला आरोपी मित्रांनी एका फार्महाऊसवर पार्टीचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार तो पार्टी करण्यासाठी गेला होता. त्या पार्टीत आरोपी मित्रांनी त्याला शीतपेयामधून गुंगींचे औषध पाजून एका तरुणीसोबत त्याचे अश्लील व्हिडीओ काढले.

पीडित तरुणाचे ब्लॅकमेलिंग

त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपींनी त्या विध्यार्थ्याला ब्लॅकमेल करत त्याच्या मागे लाखो रुपयांचा मुद्देमाल आणून देण्याचा तगादा लावला होता. आरोपींनी तरुणाकडून चाळीस लाख रुपये किंमतीचे आठशे ग्रॅम वजनाचे दागिने लाटले. दरम्यान हा ब्लॅकमेलच्या प्रकार वाढत असल्याने अखेर त्याने डोंबिवली गाठत तो राहत असलेल्या हद्दीतील टिळकनगर पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस पथकाने संजय राजपूत या आरोपीला इचलकरंजीमधून अटक केली आहे.

न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

टिळकनगर पोलीसांचे पथक अधिक तपासासाठी काल कोल्हापूरला रवाना झाले आहे. अटक आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात पीडित तरुण आणि आरोपींनी पोलीसांना दिलेल्या जाब जबाबात तफावत दिसून येत असल्याने टिळक नगर पोलीस त्या दिशेने या गुन्ह्याचा तपास करीत आहे.