Home Blog Page 88

मनसे आमदार राजू पाटील यांच्या निधीतून विकासकामांचा शुभारंभ..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील मानपाडा रोडसाठी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यामार्फत २७ कोटीचा निधी मंजूर झाला होता. मात्र मधल्या काळात ही कामे मागे पडली होती. पण विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या कामातील अडथळे दूर केले असून लवकरच मानपाडा रस्त्याचे काम सुरू होईल. रस्त्यांच्या कामाला सुरूवात होईपर्यंत रस्त्यावर पॅच लावण्याची विनंती केली असल्याची माहिती मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित पत्रकारांसमोर दिली आहे.

आमदार राजू पाटील यांच्या आमदार निधीतून मतदार संघातील विविध कामांचे भूमीपूजन व उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी आमदार राजू पाटील बोलत होते. आमदारच्या निधीतून देसलेपाडा येथील रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या अंतर्गत ‘सद्गुरू आर्केड’ ते ‘श्री गणेशनगर’ पर्यंतच्या रस्ता काँक्रीटीकरणासाठी रुपये २५ लाख, ‘अमा पॅलेस’ ते ‘शिवस्पर्श सोसायटी’ करिता रुपये २५ लाख तर ‘शिवस्पर्श सोसायटी’ ते ‘सलोनी प्लाझा’ बिल्डींग पर्यंत काँक्रीटीकरणासाठी रुपये २५ लाखाचा निधी देण्यात आला आहे.

शुभारंभ प्रसंगी, घारिवली गावचे सरपंच योगेश पाटील, हेदुटने गावचे सरपंच तकदीर काळण, काटई गाव उपसरपंच काशिनाथ पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर जाधव, काटई ज्येष्ठ नागरिक दगडु पाटील, घेसरचे साईनाथ भोईर, माजी नगरसेविका रविना माळी, भाजपाचे अमर माळी, बळीराम पाटील, महेश माळी, प्रल्हाद माळी, संजय देसले, दिलीप देसले, निर्मल भोईर, सुदेश चुडनाईक, ओम लोके, आदी पदाधिकारी तथा मनसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आमदार पाटील म्हणाले, कल्याण ग्रामीण परिसरातील लोकसंख्या जास्त आहे त्याप्रमाणो या परिसरातील समस्या देखील जास्त आहेत. कडोंमपा मालमत्ता कर घेतात पण सुविधा देत नाही. कडोंमपा रस्त्यातील खड्डे भरण्यास सांगत आहे पण त्याकडे ही महापालिका दुर्लक्ष करीत असते. नागरिकांना पाण्यासह, रस्ते अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. तरी ही ते लोकप्रतिनिधीचे स्वागत करीत आहात ही गोष्ट अभिमानास्पद आहे. तसेच निवडणूकीत मतदारांनी डोळे उघडे ठेवून मतदान करावे. पक्ष न पाहता उमदेवाराला पाहून मत द्या. जो लोकप्रतिनिधी तुमच्यासाठी काम करेल अशाच व्यक्तींना मत द्या असा सल्ला ही आमदार राजू पाटील यांनी दिला.


एकता नगर येथील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने संजय देसले यांनी निवेदन देऊन  केली.

 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मिरा भाईंदर महापालिके तर्फे “राष्ट्रीय एकता दिवस” साजरा!

“राष्ट्रीय एकता” दिनानिमित्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले “मानवी एकता साखळीचे” आयोजन

31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचाराविरुद्ध दक्षता जनजागृती सप्ताह करण्यात येणार साजरा – आयुक्त दिलीप ढोले

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: संपूर्ण देशात 31 ऑक्टोबर रोजी थोर स्वातंत्र्य सैनिक व भारताचे पहिले गृहमंत्री स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी केली जाते. या निमित्ताने मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय प्रांगणात “राष्ट्रीय एकता दिनाचे” औचित्य साधून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या अध्यक्षतेखाली “मानवी एकता साखळी” चे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मनोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (उद्यान) संजय शिंदे, उपायुक्त (सार्व. आरोग्य) रवी पवार, शहर अभियंता दिपक खांबित, अतिरिक्त शहर अभियंता सुरेश वाकोडे, तहसीलदार नंदकिशोर देशमुख, महानगरपालिका विभागप्रमुख/खातेप्रमुख व कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.

सदर प्रसंगी “राष्ट्रीय एकता दिनाचे” औचित्य साधून राष्ट्रीय एकात्मकतेची शपथ घेण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचाराविरुद्ध दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी मिरा-भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात देखील करण्यात येणार असल्याचे आयुक्त यांनी सांगितले.

भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी सर्व विभागप्रमुख/खातेप्रमुख व कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतिज्ञा घेण्यात आली. सदर शपथ/प्रतिज्ञा समाप्तीनंतर मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय पासून अंदाजे एक ते दीड किलोमीटर इतकी लांब “मानवी एकता साखळी” तयार करून शहरातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मकते बाबत जनजागृती करण्यात आली. या मानवी एकता साखळीमध्ये आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, महानगरपालिका सर्व विभागप्रमुख/खातेप्रमुख, कर्मचारी व सफाई कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

31 ऑक्टोबर ते 06 नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचार विरुद्ध दक्षता व जनजागृती मोहीम चालविण्यात येणार असून या काळात भ्रष्टाचार मुक्त प्रशासन चालविण्याचे आवाहन आयुक्त दिलीप ढोले यांनी जरी केले असले तरी मात्र महापालिका प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यावर खरे उतरतात का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

‘भारत जोडो’ यात्रेच्या समर्थनार्थ मिरा भाईंदर शहरात काँग्रेसची बाईक रॅली संपन्न!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला देशभरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून ही ‘भारत जोडो’ यात्रा तेलंगाणा मधून ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येत असून देगलूर, नांदेड येथे प्रवेश करणार आहे.

या निमित्ताने मिरा भाईंदर शहरातील काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वाखाली मीरा भाईंदर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने उत्तन ते डेल्टा गार्डन, मिरारोड अशी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये माजी उपमहापौर सय्यद नूरजहाँ हुसैन यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, जिल्हा, सेल, ब्लॉकचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

काँग्रेसचे जेष्ठ नेते मुझफ्फर हुसैन यांच्या आदेशानुसार मिरा भाईंदर शहरातील पक्षाचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असून त्यांची पहिली तुकडी रेल्वेने नांदेडला रवाना होणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी पत्रकारांना दिली आहे.

 

सज्ञान मुलींना त्यांच्या मर्जीने विवाह करण्याचा अधिकार हा त्यांचा मूलभूत हक्क; दिल्ली उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिल्ली उच्च न्यायालयाने लग्नआणि सज्ञान मुलींचा अधिकार (राईट टू मॅरी) या संबंधित एक महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. सज्ञान मुलींना त्यांच्या मर्जीने विवाह करण्याचा पूर्ण हक्क असून तो त्यांचा घटनात्मक हक्क असल्याचं दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. आपल्या मर्जीने विवाह करणे हा सज्ञान मुलींच्या खासगी स्वातंत्र्याचा भाग असून तो मूलभूत हक्क असल्याचंही न्यायालयाने सांगितलं आहे. विवाह करताना आपल्या मर्जीने (राईट टू मॅरी) तो करणे ही गोष्ट भारतीय राज्यघटनेतील कलम २१ या मूलभूत अधिकाराचा भाग असल्याचं दिल्ली उच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं.

काय आहे प्रकरण ?

प्रेमविवाह केलेल्या एका व्यक्तीने तिच्या पत्नीची हत्या झाल्याची तक्रार नोंदवत ही हत्या तिच्या कुटुंबियांनी केली असल्याचा आरोप केला होता. आपल्या पत्नीचे अपहरण करण्यात आलं आणि तिला मारहाण करण्यात आल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला. हे अपहरण आणि मारहाण तिच्या कुटुंबियांनीच केल्याचंही या तक्रारीत त्या व्यक्तीने म्हटलं होतं. पत्नीची हत्या करताना तिच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला असा आरोप त्या व्यक्तीने केला. आपल्या पत्नीने तिच्या घरच्याच्या विरोधात जाऊन आपल्यासोबत लग्न केल्याने तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप या व्यक्तीने केला. या संबंधित एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.

काय म्हणालं दिल्ली हायकोर्ट ?

या संबंधी सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, अशा प्रकारच्या घटना घडणे ही बाब आपल्या देशात आता नित्याची झाली आहे. आपल्या मर्जीने विवाह केल्यानंतर त्या मुलीवर अत्याचार केला जातोय. पण एखाद्या मुलीने तिच्या मर्जीने विवाह करणे हा तिच्या मूलभूत हक्काचा भाग आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक मुलीला हा अधिकार दिला आहे.

पोलीसांवर कडक ताशेरे

या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने पोलीसांवर कडक ताशेरे ओढले आहेत. प्रेम विवाह करणाऱ्या किंवा आपल्या मर्जीने लग्न करणाऱ्या जोडप्यांना पोलीसांनी संरक्षण देण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास संबंधित जोडप्यांना त्वरीत संरक्षण देण्याची गरज आहे. प्रेम विवाह केल्यानंतर मुलीला कुटुंबियांकडून धमक्या येत असतील आणि त्याची तक्रार करण्यात आली असेल तर याकडे पोलीस दुर्लक्ष करतात ही गोष्ट दुर्भाग्यपूर्ण आहे.

 

१८ हजार जागांसाठी राज्यात होणार पोलीस भरती..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासनाकडून पोलीस भरतीचा जीआर काढण्यात आला आहे. शासनाच्या जीआरमुळे तब्बल ११ हजार ४४३ पदं भरली जाणार आहेत. महाराष्ट्र पोलिसांची रिक्त असलेली १०० टक्के पदं भरण्याला मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी एकूण ११ हजार ४४३ पदं भरली जातील. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी कक्षेतील पदं वगळता अन्य पदं ५० टक्के पद भरण्यास राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस दलात रिक्तपदे वाढली असून सततचा बंदोबस्त आणि वाढलेल्या गुन्हेगारी खटल्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर आता २०२० आणि २०२१ मधील तब्बल १९ हजार ७५८ रिक्तपदांची दोन टप्प्यात भरती होईल.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, येत्या आठवडाभरात १८ हजार पोलीसांच्या भरतीची जाहिरात निघणार आहे. मुख्यमंत्र्यांनी इतर विभागांना आदेश दिलेले आहेत की, ज्या कोणत्या विभागांमध्ये जागा रिकाम्या असतील त्या जागांचा रिपोर्ट तयार करावा आणि विभागानुसार लवकरच नोकरीची जाहिरात काढावी, यामुळे अजून इतर वेगवेगळ्या विभागातील जाहिराती निघण्याची शक्यता आहे. महिनाभरापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून पोलीस भरतीची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिनाभरापूर्वी पोलीस भरतीची घोषणा केली होती. राज्यात साडेसात हजार पदांसाठी लवकरच पोलिस भरती प्रक्रिया राबवणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. तसंच गृह विभागाचे सचिव आणि इतर अधिकाऱ्यांना तातडीने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी सूचना दिल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं होतं.