Home Blog Page 90

ट्रान्सजेंडर्सना लिंग बदल शस्त्रक्रियेसाठी राजस्थान कडून २.५० लाख मदत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यस्थान मधील २० हजारांहून अधिक संख्या असलेल्या ट्रान्सजेंडर्स समुदायासाठी गेहलोत सरकारने विविध योजनांची घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून ट्रान्सजेंडर्सना लिंग बदल शस्त्रक्रिया अर्थात ‘सेक्स रिअसाइन्मेंट सर्जरी’ (एसआरएस) करण्यासाठी २.५० लाख रुपयांपर्यंतची मदत जाहीर करण्यात आली आहे. ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या इच्छेनुसारच ही शस्त्रक्रिया केली जाणार असून त्यासाठी राज्य सरकारने १० कोटी रुपयांचा ‘उत्थान कोष’ही तयार केला आहे राजस्थान हे देशातील पहिले राज्य असेल जिथे ट्रान्सजेंडरसाठी ‘सेक्स रिअसाइन्मेंट सर्जरी’ (एसआरएस) केले जाईल.

सामाजिक न्याय आणि हक्क विभागाचे उपसंचालक ओमप्रकाश तोष्णीवाल यांनी सांगितले की, सरकार एकतर शस्त्रक्रिया मोफत करेल किंवा २.५० लाख रुपयांपर्यंत पैसे देईल. इच्छुक पात्र ट्रान्सजेंडर सामाजिक सक्षमीकरण न्याय विभागात अर्ज करू शकतात.

२० नोव्हेंबर रोजी सरकार राज्यभर ‘ट्रान्सजेंडर डे’ साजरा करणार आहे. राज्यस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत ‘किन्नर महोत्सव ‘आणि ‘किन्नर कला व संस्कृती’ महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी सरकार १० लाख रुपये आणि जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी १ लाख रुपये देणार आहे.

ट्रान्सजेंडरसाठी विविध योजना

* प्रत्येक ट्रान्सजेंडरचे ओळखपत्र बनवले जाईल, जेणेकरून सरकारी योजनांचा त्यांना लाभ घेता येईल.

* व्यावसायिक आणि तांत्रिक कोर्स मोफत दिले जातील.

* स्वयंरोजगारासाठी ५०,०००/- रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल.

* कोटा, जयपूर, भरतपूर, उदयपूर, जोधपूर, बिकानेर आणि अजमेर येथे समुपदेशकांची नियुक्ती.

* उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये भत्ता, किराया आणि शिष्यवृत्ती.

 

‘बाहुबली’ रॉकेट एलव्हीएम-३ चे व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी करत ‘इसरो’ ने रचला इतिहास..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इसरो’ ने शनिवारी रात्री १२:०७ वाजता आपल्या सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण केले. इसरो चे रॉकेट एलव्हीएम-३ आकाशाकडे झेपावल्यामुळे भारताने ग्लोबल कमर्शियल लॉन्च मार्केटमध्ये एक नवीन इतिहास रचला. या प्रक्षेपणासह, ‘इसरो’ने सर्व भारतीयांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. कारण ‘एलव्हीएम३ – एम२/वनवेब इंडिया १’ हे मिशन पूर्णत: यशस्वी झाले. ‘वन वेब’ च्या ३६ रॉकेट प्रक्षेपणाच्या या मिशनसाठी, ‘इसरो’ ने आपले सर्वात वजनदार रॉकेट ‘एलव्हीएम-३’ म्हणजेच ‘लाँच व्हेईकल मार्क-३’ आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून मध्यरात्री १२:०७ वाजता प्रक्षेपित केले.

२४ तासांचा काउंटडाऊन

एलव्हीएम-३ पूर्वी या रॉकेटला ‘जीएसएलव्ही मार्क रॉकेट’ म्हणूनही ओळखले जात होते. या मिशनसाठी २४ तासांचा काउंटडाऊन ठेवण्यात आला होता. या मिशनमध्ये ‘ब्रिटिश स्टार्टअप वनवेब’चे ३६ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. ‘वनवेब’ ही एक खाजगी उपग्रह संपर्क कंपनी आहे. ‘इसरो’ने ‘ग्लोबल कमर्शियल लॉन्च सर्विस’ मार्केटमध्ये आपला प्रवेश नोंदविला आहे.

‘इसरो’चे अध्यक्ष म्हणाले, ४३.५ मीटर लांब रॉकेट ८,००० किलोपर्यंतचे उपग्रह वाहून नेण्याची क्षमता असलेला हा सर्वात वजनदार उपग्रह म्हणून ओळखला जातो. पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात ‘एलव्हीएम-३’ द्वारे ३६ वनवेब उपग्रहांचा आणखी एक सेट लॉंच केला जाईल, असेही ते म्हणाले.

‘इसरो’ साठी हे प्रक्षेपण महत्त्वपूर्ण

हे तीन-स्टेज रॉकेट आहे, ज्यामध्ये दोन ‘सॉलिड मोटर स्टेप्स ऑन’ आणि एक ‘प्रोपोलेंट स्टेज’ आहे. मध्यभागी एक क्रायोजेनिक स्टेज आहे. या वजनी रूपामुळे त्याला इसरोचा बाहुबली असेही म्हणतात. ‘इसरो’ साठी हे प्रक्षेपण महत्त्वपूर्ण आहे. कारण ‘एलव्हीएम-३ एम२ मिशन’ हे ‘इसरो’ ची व्यावसायिक शाखा असलेल्या ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड’ साठी पहिले समर्पित व्यावसायिक मिशन आहे.

भारताकडून ३०० हून अधिक व्यावसायिक प्रक्षेपण

जगातील बहुतेक देश आता त्याच्या सर्वात मोठ्या प्रक्षेपणासाठी भारताकडे पाहतो. कारण भारताने आतापर्यंत ३०० हून अधिक व्यावसायिक प्रक्षेपण केले आहेत आणि जगाला सांगितले आहे की, कमी खर्चातही ध्येय कसे साधले जाऊ शकते. कमी बजेटमध्ये मंगळावर पोहोचून भारताने ते दाखवून दिले होते. त्यामुळे इस्रोवर संपूर्ण जगाचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे.

आतापर्यंत ‘पीएसएलव्ही’च्या माध्यमातून व्यावसायिक प्रक्षेपण पूर्ण झाले होते, आता या बाहुबलीच्या व्यावसायिक बाजारपेठेत प्रवेश केल्याने, ‘इसरो’ आणि ‘एनएसआयएल’ साठी नवीन व्यासपीठ उघडणार आहे. या प्रक्षेपणाच्या यशाने, ‘इसरो’ ने जगभरात आपली क्षमता सिद्ध केली आहे. हे स्पष्ट आहे की, या ऐतिहासिक क्षणामुळे ‘इसरो’साठी नवीन संधींचे दरवाजे देखील उघडतील, जे थेट महसूलासाठी फायदेशीर ठरतील.

 

मुख्यमंत्र्यांनी साखर कारखाना पुन्हा सुरु दिली शेतकऱ्यांना खास दिवाळी भेट..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

यंदा अस्मानी संकटाने कोलमडलेल्या शेतकऱ्यांना यापूर्वी केंद्र शासनाने सहा पिकांच्या रब्बी हंगामातील किमान आधारभूत किंमतीत वाढ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ आता दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर राज्य शासनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. याअंतर्गत सुमारे नऊ वर्षांपासून बंद पडलेला नाशिक सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

पळस येथील बंद अवस्थेत असलेल्या नाशिक साखर सहकारी कारखाण्याचा गाळप हंगाम २०२२-२३ चा शुंभारंभ नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. प्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, राज्यातील शेतकरी हा केंद्रबिंदू असून सामान्य जनतेचे कल्याण व त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणे हा राज्य सरकारचा अजेंडा आहे. यावेळी देशात महाराष्ट्र राज्य सर्वाधिक साखर उत्पादन करत असल्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रकाश टाकला. यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकरी हितासाठीच हा कारखाना नव्याने सुरु करण्यात आल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले की, नाशिक सहकारी साखर कारखाना सुरु झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या घरी यंदा दिवाळी आनंदात साजरी होणार आहे. या साखर कारखान्यात यंदा साडे तीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आल्याची माहिती आहे. सोबतच पर्यायाने इथेनॉल निर्मितीवर भर देखील या कारखान्याच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

 

शिवसेना कोपर शाखेने गेल्या १२ वर्षांची परंपरा कायम राखत केले हजारो लाभार्थींना मोफत दिवाळी किटचे वाटप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पश्चिमेकडील प्रभागातील गोरगरीबांची दिवाळी गोड व्हावी याकरिता कोपर येथील शिवसेना शाखेने आपली १२ वर्षाची परंपरा अखंडरित्या कायम ठेवली आहे. हजारो लाभार्थींना दिवाळीचे पदार्थ तयार करण्यासाठी विविध जिन्नस असलेले किट मोफत वाटण्यात येत आहेत. माजी नगरसेवक आणि माजी परिवहन सभापती संजय पावशे, अपर्णा पावशे यांच्या हस्ते किट वाटपाचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला.

गेली १२ वर्ष शिवसेना कोपर शाखा आणि ‘कै.लक्ष्मण विष्णू पावशे प्रतिष्ठान’ च्या वतीने दोन वर्षांच्या कोरोनाच्या महाभयंकर संसर्गाच्या काळानंतर डोंबिवली येथील शिवसेना कोपर शाखेच्या वतीने दहिहंडी, गणेशोत्सव, दिवाळी इत्यादी सणांना विविध वस्तूंचे अन्यथा अन्नधान्य लाभार्थींना वाटण्यात येते. हिंदूह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारणाचे वैचारिक धोरण आम्ही राबवित आहोत.

धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डाॅ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेच्या वतीने विविध सांस्कृतिक, सामाजिक, मदतीचे, विविध प्रमाणपत्रे वाटप करण्यात येते. दोन वर्षांच्या कोरोना नंतरची दिवाळी आनंदाची आणि समस्त गोरगरीब जनतेला गोड जावी याकरिता हजारो लाभार्थींना मोफत किट वाटण्यात येत आहेत. चार दिवस हा उपक्रम सुरु असेल असे संजय पावशे यांनी प्रसिद्धी माध्यमांना  सांगितले.

 

राजकीय ‘लव्ह मॅरेज’ आणि ‘अरेंज मॅरेज’; रावसाहेब दानवे आणि गुलाबराव पाटलांची एकाच मंचावर तुफान टोलेबाजी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील एकाच मंचावर नुकतेच एकत्र आले होते, यावेळी या दोन्ही मंत्र्यांनी तुफान टोलेबाजी करत वातावरण निर्मिती केली प्रसंगी अनेक जणांना हसू अनावर झाले. प्रसंग होता सिल्लोड येथील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनाचा यावेळी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील एकत्रित या कार्यक्रमाला हजर होते.

या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आपले मत व्यक्त करताना गुलाबराव पाटील यांनी रावसाहेब दानवे तसेच भाजपला उद्देशून सुरुवातीला म्हटले होते की, “अडीच वर्षांपूर्वी आमची भाजपसोबत युती तुटली होती, लव्ह मॅरेज तुटलं होतं. परंतू योगायोगाने पुन्हा जुळून आलं. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे तसेच मिश्किल भाष्य करण्याच्या शैलीमुळे प्रसिद्ध असणाऱ्या रावसाहेब दानवेंनी देखील गुलाबराव पाटलांच्या या वक्त्यव्याला तितकेच साजेसे प्रत्युत्तर दिले.

यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, ”गुलाबराव आपलं ‘लव्ह मॅरेज’ नव्हतं ‘अरेंज मॅरेज’ होतं, ‘लव्ह मॅरेज’ तर तुम्ही त्यांच्यासोबत केले होते. ‘लव्ह मॅरेज’ करताना तुम्ही ज्या खाणाखुणा केल्या होत्या त्या मला कळाल्या होत्या.” अशाप्रकारे टोला दानवेंनी गुलबराव पाटलांना लगावला व जमलेल्या लोकांना हसू अनावर झाले.

प्रसंगी गुलाबराव पाटलांनी आजवर शिवसेनेसाठी केलेल्या कार्याच्या आठवनींना उजाळा दिला, तसेच टीका करणाऱ्यांसाठी अनेक सवाल देखील उपस्थित केले. पाठीवर दफ्तर असताना पासून आपण शिवसैनिक असल्याचे मत देखील यावेळी त्यांनी व्यक्त केले. एकंदरीतच राजकीय टोलेबाजीने रंगलेला हा भूमिपूजनाचा कार्यक्रम जनतेचे चांगलेच मनोरंजन करणारा ठरला.