Home Blog Page 284

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर मानपाडा पोलिसांची कारवाई

संपादक: मोइन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

वाढत्या महाभयंकर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यसरकारने १५ एप्रिल ते ३१ एप्रिल पर्यत लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊनच्या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर पालिका आणि पोलिसांना सक्त कारवाईचे आदेश देण्यात आला आहे. डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करत दंडात्मक कारवाई केली आहे.

मानपाडा पोलिसांनी गेल्या चार दिवसात डोंबिवली पूर्वेकडील टाटा पॉवर, खोणी नाका, लोढा जंकशन, लोढा पालावा या ठिकाणी २२९ जणांवर कारवाई करत त्यात काही दुकानात विनामास्क, सॅनेटाईजर, आरटीपीसीआर तपसणी न करणे या नियमाचे पालन न केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली. कल्याण परिमंडल-३ चे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री.दत्ता कराळे, पोलीस उपायुक्त श्री.विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. जयराम मोरे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि श्री.दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब पवार, पो.कॉ. मंदार यादव, पो.ह. संतोष चौधरी आणि कर्मचारी यांनी सदरची कारवाई यशस्वी रित्या केली. या कारवाईत एकूण १ लाख १४ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आली आहे. दरम्यान कोरोनावर मात करण्यासाठी सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज राहून काम करत आहे.

नागरिकांनी आपल्या जबाबदारीनुसार गर्दी टाळावी, विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्क परिधान करणे, हात न मिळवता भारतीय संस्कृतीनुसार हात जोडावे, दोघांमध्ये कमीत कमी ३ फुटाचे अंतर ठेवावे, दुकानदारांनीही स्वतःचा आणि समाजाचा विचार करून सरकारच्या नियमांचे पालन केले पाहिजे असे मार्गदर्शनपर आवाहन पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब पवार यांनी केले आहे.

कोरोना विरोधातील लढाईसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आमदार निधीतून ५० लक्ष रुपये.

मिलन शाह, मुंबई, प्रतिनिधी: सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढतो आहे. शहरी भागासोबत ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. भंडारा जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे. कोरोना रूग्णांवरील उपचारासाठी अस्तित्वात असलेली साधनसामग्री देखील अपुरी पडत आहे. त्यामुळे कोरोनाशी लढण्याकरिता आवश्यक असलेली साधनसामग्री खरेदी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी आपल्या स्थानिक विकास निधीअंतर्गत ५० लक्ष रुपये खर्च करण्याच्या सूचना भंडारा जिल्हाधिका-यांना दिल्या आहेत.

या निधीतून जिल्हा प्रशासनाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सीजन सिलेंडर, हॉस्पिटल बेड, आय सी यू बेड, एन आय सी यु व्हेंटिलेटर्स, इमर्जन्सी ट्रॉली, फार्मास्युटिकल फ्रिज, व्हॅक्सिन बॉक्ससह इतर आवश्यक उपकरणे व औषधे यांची खरेदी करता येणार आहे. या निधीच्या उपलब्धतेमुळे भंडारा जिल्ह्याला कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये बळ मिळणार आहे.

कोरोनाविरोधातील या लढाईत नागरिकांची भूमिका सुद्धा महत्वाची आहे. ब्रेक द चेन अंतर्गत प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपली व आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्यावी व कोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाला सहकार्य करावे असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.

रात्रीच्या वेळीस लूटमार करणाऱ्या सराईत लुटमारांच्या बाजारपेठ पोलिसांनी आवळल्या मुसक्या

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण येथे रात्रीच्या वेळेस हायवे रोडवर लूटमार करणाऱ्या २ सराईत लुटमारांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, मुनवर हुसेन अब्दुल रहमान शेख हे ओला कॅब ड्रायव्हर डोंबिवली येथे पॅसेंजर सोडून कल्याणला जायला निघाले असताना गोविंदवाडी बायपास येथील ए.पी.एम.सी मार्केट गेट पासून पुढे गेल्यावर फानूस धाब्यासमोरील रस्त्यावर स्पीड ब्रेकरजवळ कल्याण (प) येथे दोन अनोळखी इसमांनी त्यांना कॅब थांबविण्याचा इशारा करून ते ओला कॅब मध्ये बसले आणि थोड्यावेळाने त्यातील एका इसमाने त्यांच्या मानेवर चाकू लावून मारहाण करून त्यांच्याकडील २०४०/- रु. रोख रक्कम व २ मोबाईल फोन असा माल जबरीने काढून घेतला. त्यानंतर त्यातील एकाने कॅब चालविण्यास सुरुवात करून सदर ड्रायव्हरला आणखी पैशांची मागणी करून त्यांना एटीएम मशीन मधून पैसे काढण्यासाठी कल्याण स्टेशनच्या रस्त्यावर येत असताना कॅब चालकाला पोलीस दिसल्याने त्यांनी मदतीला आरडाओरड केली असता ड्रायव्हर सीट वर बसलेल्या इसमाने सदर ड्रायव्हरला मारहाण करून गाडीतून उतरून दिले आणि ते कल्याण स्टेशनच्या दिशेने पळून गेले. सदर २ इसमांनी ओला कॅब चालकाचा ५,६५,०३०/- रु. कीं माल जबरी चोरी करून नेला.

या घटनेबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून दुर्गाडी किल्ल्याच्या शेजारी असलेल्या जुन्या खाडी पुलाजवळ सापळा रचून सदर दोघांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात जबरी चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले हत्यार देखील जप्त करण्यात आले आहे.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, ठाणे शहर, सह पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला, ठाणे शहर, अति. पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण दत्तात्रय कराळे, युनिट ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहा.पोलीस आयुक्त कल्याण विभाग अनिल पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वपोनिरी. यशवंत चव्हाण, पोनि. सुनील पवार, मसपोनिरी. कांदळकर, सपोनिरी अरुण घोलप, पोहवा. टी के पावशे, पोहवा. यु सावंत, पोहवा. लीकडे, पोलीस नाईक. सचिन साळवी, पोलीस नाईक. बी.आर.बागुल, पोलीस नाईक पी.बाविस्कर, पोलीस नाईक जी.पोटे, पोलीस शिपाई. आर.एम.सांगळे यांनी यशस्वीरित्या पार केली आहे.

.आणि आली झुक झुक गाडी!

….आणि आली झुक झुक गाडी!

आजचा दिवस भारतातील प्रवासी व माल वाहतुकीच्या इतिहासाला वेगळेच वळण देणारा ठरला. याच दिवशी १८५३ साली भारतातील पहिली रेल्वे गाडी मुंबई ते ठाणे या मार्गावर धावली.

बैल किंवा घोडे यांच्याशिवाय ही गाडी धावताना पाहून हा ‘चमत्कार’ पाहणाऱ्या हजारो बघ्यांना ही ‘जादु’च वाटली. ‘या साहेबाचं पोर मोठं अकली रे, बिनाबैलानं गाडी कशी हाकली रे’ हे गाणे मोठ्या कौतुकाने गायले जाऊ लागले.

देशात रेल्वे सुरू झाली व देशाची प्रगती तशाच वेगाने धावू लागली. या १६८ वर्षांत रेल्वेने आपली रुपे परिस्थितीनुसार बदलली. वाफेच्या इंजिनावर धावणारी रेल्वे नंतर डिझेल, विजेवर धावू लागली.

उपनगरी गाड्या, नंतर जमीनीच्या खालून धावणाऱ्या मेट्रो गाड्या आल्या. रेल्वेचे जाळे देशभर पसरले व रेल्वे भारताची जीवन वाहिनी बनली.

आता रेल्वेचा परीघ इतका विस्तारला की, भारतीय रेल्वेचं नेटवर्क चीननंतर आशियातील दुसऱ्या क्रमांकाचं नेटवर्क मानलं जातं. भारतात एकूण ७, ८५३ रेल्वे स्टेशन आहेत. देशातील रेल्वे रुळांची एकत्रित लांबी पकडली तर ती जवळपास ७० हजार किलोमीटरपर्यंत जाते.

भारतात दररोज १४,४०० गाड्या रुळावरून धावतात. त्यापैकी ७ हजार प्रवासी गाड्या आहेत. त्यातून अडीच कोटी माणसं दररोज प्रवास करतात. हा आकडा अनेक छोट्या-मोठय़ा देशांच्या लोकसंख्येपेक्षाही मोठा आहे.

भारतीय रेल्वेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल साडेसोळा लाख आहे.

जमिनीखालून धावणारी पहिली मेट्रो रेल्वे कोलकात्यात १९८४ मध्ये सुरू झाली. त्यानंतर राजधानी दिल्लीत २००२ मध्ये मेट्रो धावायला लागली. मुंबईतही आता मेट्रो सेवा सुरू झाली. मात्र सध्या ती जमिनीवरुनच धावते.

मुंबईतील मध्य रेल्वेचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे सर्वात गजबजलेले स्टेशन. इथून दररोज ३ लाख प्रवासी वेगवेगळ्या दिशेने प्रवासाला निघतात. या रेल्वे स्टेशनचा युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे.

अशा भारतीय रेल्वेचा आज वाढदिवस! आपण सारेजण रेल्वेचे अभिष्टचिंतन करूया!

Happy Birthday, Indian Railway!

– भारतकुमार राऊत

ठाणे महानगरपालिका उभारणार २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प; ३० एप्रिलपर्यंत होणार कार्यान्वित..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे मनपा ने प्राणवायू (Oxygen) चा होणारा तुटवडा व मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू (Oxygen) निर्माण करणारे स्वतःचे दोन प्रकल्प उभारण्याचा महत्वाचा निर्णय हाती घेतला आहे.

या दोन प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसाला अंदाजे २० टन प्राणवायू निर्माण होणार आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत युद्ध पातळीवर हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासंदर्भात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, महापौर नरेश गणपत म्हस्के, महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा हे सातत्याने पाठपुरावा करीत होते.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात प्राणवायूचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत होती. प्राणवायूअभावी रूग्णांची गैरसोय होवू नये यासाठी पार्किंग प्लाझामधील रूग्णांना ठाणे कोविड रूग्णालयामध्ये स्थलांतंरित करण्याचा निर्णय घेतला गेला होता.

त्यानंतरही ठाणे महापालिकेच्या कोविड रूग्णालयांना तसेच खासगी कोविड रूग्णालयांना प्राणवायूचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत होते. त्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने पीएसए तंत्रज्ञानावर आधारीत स्वतःचे दोन प्रकल्प उभे करण्याचा ठाम निर्णय घेतला.

ठाणे महानगरापलिकेच्या ठाणे कोविड रूग्णालय आणि पार्किंग प्लाझा रूग्णालय या ठिकाणी हे दोन प्लांट उभे करण्यात येणार असून एका प्लांटमधून २४ तासामध्ये जवळपास १७५ सिलेंडर्स प्राणवायू (Oxygen) तयार होईल एवढी क्षमता आहे. त्यामुळे दोन प्लांटमधून दिवसाला अंदाजे २० टन प्राणवायू निर्माण होणार आहे.

औरंगाबाद स्थित आयरॅाक्स टेक्नॅालॅाजिज प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून हे दोन प्लांट उभारण्यात येणार असून यामध्ये प्रेशर स्विंग ॲबसॉर्प्शन (पीएसए) या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सदर कंपनीने यापूर्वी नंदुरबार जिल्हा परिषद, मुंबई महानगरपालिका, सामान्य रूग्णालय, सिंधुदूर्ग, बीड या शासकीय ठिकाणी असे प्लांट उभे केले आहेत.

या प्लांटमधून २४ तासा मध्ये १७५ सिलेडंर्स प्राणवायू निर्माण करण्यात येणार आहे.सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे कोविड रूग्णालयासाठी २० टन तर पार्किंग प्लाझा रुग्णालयासाठी १३ टन प्राणवायुची आवश्यकता आहे. या दोन प्लांटमुळे या दोन्ही रूग्णालयांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.