Home Blog Page 33

गुन्हे शाखा घटक – ३ कल्याण कडून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस ०२ तासात केले जेरबंद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

टिळकनगर पोलीस स्टेशन गुना रजि. नं. ९३ / २०२३ भा.द.वि. कलम ३०२ या गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी नामे रमेश वेलचामी (तेवर) हा गुन्हा केल्यानंतर धारावी मुंबई तसेच मुळगावी तामिळनाडु राज्यात पळून जाणार असल्याची शक्यता गृहित धरुन त्यानुसार नमुद पाहिजे आरोपीचे छायाचित्र प्राप्त करून घटकातील अधिकारी/अमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार करून त्यांना योग्य सुचना देवुन एक पथक धारावी मुंबई, तसेच दोन पथक कल्याण रेल्वे स्थानक प्लॅटफार्म परिसरात आरोपीचे शोधार्थ घेण्याकरीता रवाना केले. त्यानुसार पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, पोहवा प्रशांत वानखेडे, प्रविणकुमार जाधव, पोलीस शिपाई गुरुनाथ जरग या पथकाने प्राप्त छायाचित्र, मोबाईल नंबर तसेच तात्रिक विश्लेषणाचे आधारे नमुद संशयीत नामे रमेश व्ही. (रमेश वेलचामी तेवर) वय २८ वर्षे रा. शिवाजी शेलार यांचे घराचे शेजारी, कांचनगाव, खंबाळपाडा, डोंबिवली पूर्व, कल्याण यास कल्याण रेल्वे स्थानक प्लॅटफार्म क्र ०६ चे मुंबई दिशेकडील ब्रिज जवळून पथकातील पोहवा प्रशांत वानखेडे यांनी ताब्यात घेवुन त्याकडे विचारणा करता तो उडवाउडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्याच्यावर संशय बळावला त्यामुळे त्याची अंगझडती घेता रेल्वे गाडी क्र. २२१५७ चैन्नई एग्मोर या जलद गाडीवे ई-तिकीट पीएनआर क्र. ८७०२८५७२९५ हे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवुन गुन्हे शाखा, घटक-३ कल्याण, मानपाडा येथील कार्यालयात आणुन त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने त्याचा मेव्हणा मारीकन्नी रामास्वामी (तेवर) रा. शिवाजी शेलार यांच्या घराचे शेजारी. कांचनगाव, खंबाळपाडा, डोंबिवली, कल्याण यास रागाचे भरात चाकुने भोसकुन / हल्ला करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले असुन रात्री चैन्नई एग्मोर रेल्वेने मुळगावी पळून जाणार असल्याची कबूली दिल्याने त्यास पुढील कारवाई करीता टिळकनगर पोलीस ठाण्याचे हवाली करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ठाणे शहर पोलीस आयुक्त श्री. जयजित सिंग, मा. पोलीस सह आयुक्त श्री. दत्तात्रय कराळे, मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले (गुन्हे), मा. पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील (गुन्हे), मा. सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे (गुन्हे शोध १) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ, पोलीस निरीक्षक शशांक शेळके व त्याचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, सहा पो उपनिरी संजय माळी, पोहवा प्रशांत वानखेडे, प्रविणकुमार जाधव पोहवा विकास माळी (मानपाडा पोलीस ठाणे), रमाकांत पाटील, किशोर पाटील, बापुराव जाधव, विश्वास माने, उल्हास खंडारे, बालाजी शिंदे, पोहवा गोरखनाथ पोटे, विलास कडू, पोशि गुरुनाथ जरग, विनोद चन्ने, चापोशि राहुल ईशी सर्व नेम गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण यानी यशस्वीरीत्या केलेली आहे.

 

पुढील तीन महिने दर मंगळवारी पाणी पुरवठा बंद ! कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा निर्णय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उन्हाळा सुरू झाला असून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आठवड्यातून एक दिवस म्हणजेच २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण पॅसिफिक महासागरातील अ‍ॅलनिनो या समुद्र प्रवाहाच्या प्रक्रियेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणी साठा ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत पुरवण्यासाठी ३२ टक्के तूट येत आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या जलस्त्रोतांमध्ये असलेला पाणी पुरवठा लक्षात घेता आणि त्यासोबतच मान्सूनची स्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आता, ९ मे २०२३ पासून आठवड्यातील दर मंगळवारी २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

या पाणी पुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे कल्याण डोंबिवलीतील बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पूर्व आणि पश्चिम, कल्याण ग्रामिण (शहाड, वडवली, आंबिवली आणि टिटवाळा), डोंबिवली पूर्व आणि पश्चिम परिसरात होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या पाणी पुरवठा बंदमुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करुन ठेवावा आणि पाणी जपून वापरण्याचं आवाहन कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडून करण्यात आलं आहे.

 

घटस्फोटासाठी ६ महिने थांबण्याची गरज नसल्याचा सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पती-पत्नीच्या नात्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. नात्यातील दरी संपत नसेल तर असे एकत्र राहण्यात अर्थ नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. म्हणूनच पती-पत्नी मधील दुरावा भरून काढता येत नसल्याच्या आधारावर ६ महिन्यांपूर्वीच घटस्फोट घेता येऊ शकतो, असे न्यायालयाने सांगितले आहे.

न्यायमूर्ती एस के. कौल यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सोमवारी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाला घटनेच्या कलम १४२ नुसार पूर्ण न्याय देण्याचा अधिकार आहे. कलम १४३ अंतर्गत दिलेल्या विशेष अधिकाराचा वापर करून पती-पत्नीच्या परस्पर संमतीने विवाह मोडू शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. आता या जोडप्याला संबंध संपवण्यासाठी सहा महिने वाट पाहावी लागणार नाही, असे खंडपीठाने त्यांच्या टिप्पणीत म्हटले आहे.

राज्यघटनेचे कलम १४२ सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या कोणत्याही प्रकरणात ‘पूर्ण न्याय’ करण्याच्या त्याच्या आदेशांच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती ए एस.ओका, न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती जे के. महेश्वरी यांचाही समावेश होता. खंडपीठाने म्हटले आहे की, या न्यायालयासाठी आम्ही अशी तरतूद केली आहे की, नात्यातील दुरावा किंवा दरी भरून काढता येत नसल्याच्या आधारे आम्ही विवाहित नातेसंबंध संपुष्टात आणू शकतो. विशेष म्हणजे, घटनेच्या कलम १४२ मधील अधिकारांच्या वापराशी संबंधित अनेक याचिकांवर न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

 

स्पॅम फोन कॉल्स आणि मेसेज होणार AI च्या मदतीने ब्लॉक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मोबाईलच्या नको असलेले फोन कॉल्स आणि स्पॅम मेसेजेसमुळे आपण त्रस्त झाला असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. Jio, Airtel आणि Vodafone-Idea या देशातील मुख्य मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी १ मे पासून त्यांच्या सिस्टीममध्ये स्पॅम मेसेज आणि कॉल्स ब्लॉक करण्यासाठी फिल्टर बसवल्याचे म्हटले आहे. AI (आर्टीफीशिअल इंटीलिजन्स) च्या मदतीने नेटवर्कवरच हे स्पॅम मेसेज आणि फोन कॉल्स ब्लॉक होणार आहेत.

आतापर्यंत आपल्यासा कॉल आल्यावर कळत असे की, हा स्पॅम कॉल आहे. मग आपण तो ब्लॉक करायचो. आता आधीच नेटवर्कवर त्यावर बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे स्पॅम कॉल आता तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने कंपन्यांना ३० एप्रिलपर्यंत या संदर्भात मुदत दिली होती.

अर्चना मोहिते या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबोधनात्मक वाद्यवृंदाचं निवेदन करणारी पहिली महिला निवेदिका..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

धम्मपद एक धम्मदेसना‘ हा अरविंद मोहिते प्रस्तुत महापुरुषांच्या व राष्ट्रमातांच्या जीवनावर आधारित वाद्यवृंद आहे. या वाद्यवृंदामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महर्षी महात्मा जोतिबा फुले, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या जीवनावर आधारित गाणी, नृत्य , नाट्य सादर केले जाते आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे निवेदन (प्रबोधन) हे अर्चना मोहिते करतात. अशा प्रकारचे कार्यक्रम करणारे बरेचसे ग्रुप आहेत पण संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे निवेदन (प्रबोधन) करणारी सगळ्यात पहिली व आतापर्यंत कोणीही न ऐकलेली व पाहिलेली पहिली महिला निवेदिका ह्या अर्चना मोहिते आहेत. ह्यांचं निवेदन (प्रबोधन) हे कणखर, तडफदार, लोकांना विचार करायला लावणारं व परिवर्तन घडवून आणणारं आहे. २०१२ मध्ये अर्चना मोहिते यांनी हे प्रबोधन करायला सुरुवात केली व आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ५०० पेक्षा अधिक कार्यक्रम त्यांनी निवेदिका म्हणून केलेले आहेत.

अर्चना मोहिते यांचं असं म्हणणं आहे की, ह्या महापुरुषांनी व राष्ट्रमातांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी मग तो कोणत्याही जाती, धर्माचा असेल स्त्री किंवा पुरुष असेल प्रत्येकासाठी संघर्ष केलेला आहे प्रत्येकाला हक्क अधिकार मिळवून दिलेला आहे मग फक्त एक विशिष्ट समाजालाच याची जाणीव का ? प्रत्येकाला याची जाणीव का नाही ? आणि म्हणूनच प्रत्येकाला या महापुरुषांचे व राष्ट्रमातांचे विचार त्यांनी केलेला संघर्ष व आपल्याला मिळवून दिलेले न्यायिक हक्क अधिकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून या देशातील प्रत्येकापर्यंत पोहचवण्याचं काम अर्चना मोहिते करत आहेत.

अर्चना मोहिते यांचं असंही म्हणणं आहे की ह्या महापुरुषांनी व राष्ट्रमातांनी आपल्याला न्याय मिळवून दिलेला आहे तर ह्या महापुरुषांनाही न्याय मिळाला पाहिजे प्रत्येकाला त्यांच्या कार्याची जाणीव असली पाहिजे. म्हणूनच तळमळीने अर्चना मोहिते हे प्रबोधनाचं काम ‘धम्मपद एक धमदेसना’ या वाद्यवृंदाच्या माध्यमातून करत आहेत व शेवटच्या श्वासापर्यंत करत राहण्याचा त्यांचा मानस आहे असे त्यांनी प्रसिध्दी माध्यमांना सांगितले.

महापुरुषांचे व राष्ट्रमातांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या पहिल्या महिला निवेदिका अर्चना मोहिते यांच्या कार्याला जाहीर सलाम व समाजप्रबोधनाचे काम अखंड करत राहण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.