Home Blog Page 39

दरोडा व जबरी चोरीचे ३२ गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीला मानपाडा पोलीसांनी २ तासात केली अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

फिर्यादी श्री. राजन पारस चौधरी (वय: २२ वर्षे) व्यवसाय: ओला कार चालक राहणार: गोवंडी, मुंबई हे दिनांक २४/०३/२०२३ रोजी त्यांची स्विफ्ट डिझायर कार घेऊन नेवाळी नाका, बदलापूर पाईप लाईन रोड, कल्याण पूर्व या ठिकाणी आले असता, त्यांना मध्यरात्री ०३:०० वाजण्याच्या सुमारास नेवाळी येथून डोंबिवली येथील भाडे आल्याचा कॉल ओला कंपनीकडून आला, त्याप्रमाणे त्यांनी नेवाळी, कल्याण पूर्व येथून तीन पॅसेंजर याना घेवून घरडा सर्कल या ठिकाणी आले असता, त्यांच्या कारला एका रिक्षाने कट मारला व रिक्षा त्यांच्या कारच्या पुढे उभी केली. रिक्षातुन दोन इसम खाली उतरून ते फिर्यादी यांच्या गाडीजवळ येऊन त्यांच्याशी वाद करू लागले. त्यावेळी फिर्यादी हे कारमधून खाली उतरले असता सदर इसमांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून त्यांच्या खिशाची तपासणी करु लागले, त्यावेळी फिर्यादी हे त्यांच्या कार मध्ये बसण्याचा प्रयत्न करीत असताना कारमध्ये बसलेले तिन्ही इसम खाली उतरले व ते देखील फिर्यादी यांच्याशी वाद करू लागले. त्यावेळी सदर पाचही इसमांनी फिर्यादी यांना मारहाण करून त्यांच्या पँटच्या खिशातील पाकीट जबरीने काढून घेऊन ते पाचही जण रिक्षातून पळून गेले. त्यानंतर फिर्यादी हे कारमध्ये बसले असता त्यानी कारमध्ये ठेवलेले त्यांचे दोन मोबाईल फोन कारमध्ये नव्हते. सदरचे मोबाईल फोन कारमध्ये बसलेल्या तिन्ही पॅसेंजरांनी चोरी करून नेल्याचे फिर्यादी यांना आढळून आले. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिनांक ०१/०४/२०२३ रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन मानपाडा पो.स्टे. गुरनं २३४/२०२३ भादंविक ३९५, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर दरोड्याचा गांभीर्य ओळखून मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी लागलीच गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वेगवेगळया टीम तयार करून, त्यांना गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना व मार्गदर्शन करून रवाना केले. सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासात आरोपी नामे चंद्रकांत उर्फ मोठा चंदया, रमेश जमादार, शिवा रुषीपाल तुसंबल, सत्यपाल मुकेशकुमार कनोजिया यांना अटक करण्यात आलेली असून एका विधी संघर्शीत बालकास ताब्यात घेण्यात आले असून, एका पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध चालू आहे. नमुद आरोपी यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी गुन्हयात चोरलेली रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच इतर गुन्हयात चोरलेले एकंदर ९ मोबाईल फोन, १ लॅपटॉप, रोख रक्कम, फिर्यादीचे ओळखपत्र, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण रुपये २,००,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल व लॅपटॉपच्या संबधाने तपास चालू असून सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध डोंबिवली, टिळकनगर, खडकपाडा, हिललाईन पोलीस ठाण्यात खुन, दरोडा, दरोडयाची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, दुखापत, सरकारी नोकरास दुखापत, अवैध शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे गंभीर ३२ गुन्हे दाखल आहेत. सदरचे आरोपी हे गुन्हयात रिक्षाचा वापर करून रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना कट मारून वाहन चालकांशी वाद घालून त्यांना लुटण्याचे तसेच रिक्षात एक प्रवासी बसवुन त्यास एकांत ठिकाणी नेवुन त्यास लुटण्याचे गुन्हे करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयाचा अधिक पुढील तपास चालू आहे. सदरचा गुन्हा २ तासाच्या आत उपडकीस आणण्यात मानपाडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांना यश मिळालेले आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुप्रावि कल्याण दत्तात्रय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३ कल्याण सचिन गुजाळ, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वपोनि. शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. (गुन्हे) बाळासाहेब पवार, सपोनि. सुरेश डांबरे, सपोनि. अविनाश वनवे, सपोनि. सुनिल तारमळे, सपोउपनि. भानुदास काटकर, पोहेकॉ. विकास माळी, सुनिल पवार, संजय मासाळ, गिरीश पाटील, पोकॉ अशोक आहेर, विजय आव्हाड यांनी केली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या ४३ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यामध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारतीय जनता पार्टीच्या ४३व्या वर्धापन दिनानिमित्ताने जिल्ह्यामध्ये प्रचंड आणि भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा कार्यालयामध्ये आज सकाळीच पक्षाचे सर्व कार्यकर्ते जमून ध्वजारोहण केले त्यानंतर राज्याचे कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण, माजी आमदार नरेंद्रजी पवार, प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले व जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

जुन्या आणि जाणत्या कार्यकर्त्यांचा त्यावेळी सत्कार करण्यात आला. जुन्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आज पक्षात काम केल्याचा अभिमान वाटल्याचं त्यांनी सांगितले माजी जिल्हाध्यक्ष के.आर. जाधव माजी, जिल्हाध्यक्ष दिनेश तावडे, माजी नगरसेवक रमाकांत उपाध्ये, माजी नगरसेवक सुरेश भोईर, सिताराम कदम, निरजा मिश्रा, कपिल देव शर्मा, राजेंद्र बेहेनवाल, इंदुमती सूर्यवंशी, चंद्रशेखर तांबडे, सुधा जोशी हेमल रवानी असा अनेक जुन्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाच्या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, नरेंद्र पवार, शशिकांत कांबळे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा कार्यालयामध्ये पेढे वाटून व फटाके उडवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व कार्यकर्त्यांना संबोधित केले.

 

‘गौरव यात्रा’ त्यावेळी का काढली नाही ? – अजित पवार


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी गौरव यात्रा काढण्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला.

आम्ही सर्व महापुरुषांचा आदर करतो. मात्र, आपल्या राज्यातील महापुरुषांचा राज्यपालांकडून अपमान होत असताना दातखिळी बसली होती का ? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, तुम्ही सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून सांगता आणि मराठवाड्याच्या जनतेचा अपमान करता. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान केला. त्यावेळी दातखीळ बसली होती का ? त्यावेळी का गौरव यात्रा काढली नाही ? आम्हाला सर्व महापुरुष यांचा आदर आहे. आज दोन केंद्रीय मंत्री राज्य सरकारचे मंत्री गौरव यात्रा काढतात हा दुटप्पीपणा आहे. सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केले हे शक्तीहीन नपुंसक सरकार आहे. सरकारला जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. सावरकरांना भारतरत्न देण्याची आहे का हिंमत ? असेही अजित पवार म्हणाले.

ज्यापद्धतीने महाराष्ट्राचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. जर हे अशाच पद्धतीने घडत राहिलं. तर देशात आणि राज्यात देखील स्थिरता राहणार नाही. जी देशाला, महाराष्ट्राला परवडणारी नाही. प्रशासनाचा देखील यावरून विश्वास उडेल. प्रशासन देखील चांगल्या पद्धतीने चालणार नाही. ज्या प्रकारे एक गट बाजूला गेला आणि निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिली. निवडणूक आयोग जर अशा पद्धतीने निर्णय द्यायला लागले तर कसं होणार ? सुप्रीम कोर्टाकडे आपल्या सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. न्याय देवतेवर सर्वांचा विश्वास आहे. निश्चितपणे न्याय देवता न्याय देईल, असेही अजित पवार बोलताना म्हणाले.

 

डोंबिवली पश्चिम येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने श्री राम नवमी उत्साहात साजरी..


संपादक: मोईन सय्यद l प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा गांधी रास्ता क्रांती डिपार्टमेंट स्टोअर येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, पदाधिकारी किशोर मानकामे, प्रकाश तेलगोटे, संजय पाटील, तानाजी मालुसरे, प्रमोद कांबळे, कविता गावंड, वैशाली दरेकर, किरण मोंडकर, परदेशी, ऋतुराज इत्यादी पदाधिकारी, ठाकरे गटाचे शिवसैनिक, कार्यकर्ते ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपच्या वतीने श्रीराम नवमी उत्सव आणि साईबाबा प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भाजपाचे राष्ट्रीय परिषदेचे सदस्य आणि माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि नगरसेविका मनीषा धात्रक यांच्या वतीने डोंबिवली पश्चिम येथे गुप्ते क्रॉस रोडवर श्रीराम नवमी आणि साईबाबा प्रकट दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे भेट देऊन दोन्ही उत्सवासाठी उपस्थित राहिलेल्या भाविकांना शुभेच्छा देत श्रीराम व साईबाबा यांचे मनोभावे दर्शन घेतले. सायंकाळी जनार्दन पेडणेकर बुवा आणि संजय पवार बुवा यांच्या डबलबारी भजनाचा अटीतटीचा सामना रंगला. हा सामना पाहण्यासाठी डोंबिवलीतील रसिकांनी तोबा गर्दी केली होती.

श्रीराम आणि साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती .यात महिला भाविकांची लक्षणीय संख्या होती. या भाविकांना प्रसाद म्हणून सकाळी साडेदहा वाजल्या पासून रात्री साडेअकरा वाजे पर्यंत भंडाऱ्याचे आयोजन केले होते. रात्री मध्यरात्रीपर्यंत हा भंडारा सुरू होता. या महाभंडाऱ्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. गेली अनेक वर्ष धात्रक कुटुंबाच्या वतीने हा उपक्रम विष्णुनगर प्रभागात आयोजित करण्यात येत असतो. डोंबिवली पश्चिम येथील रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर येथे व नगरसेवक म्हणून धात्रक दांपत्याने दोन टर्म आपल्या दोन्ही प्रभागात विकास कामे केली आहेत. नागरिकांना सार्वजनिक सोयी सुविधांचा लाभ मिळवून दिल्यामुळे धात्रक कुटुंब आणि आगामी काळात बहुदा सामाजिक सेवेमध्ये प्रवेश करणारी त्यांची कन्या पूजा हे लोकप्रिय झालेले आहेत. डोंबिवली पश्चिम येथील भाजपाचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी यांच्या साह्याने सदर उत्सव उत्साहात संपन्न झाला.